36 वर्षे आर्थिक निर्बंधांखाली, विविध राजकीय धार्मिक बंधनाखाली असलेल्या इराणमधून जागतिक पातळीवर प्रभाव पाडणाऱ्या चित्रपट कलाकृती कशा निर्माण झाल्या असतील? इतक्या कलाकृती फक्त इराणमध्ये निर्माण होण्याचे कारण काय? याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे यंदाचा कान्स चित्रपट महोत्सव.
प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक जफर पनाहीच्या ‘इट वॉज जस्ट एनअॅक्सिडंट’ या चित्रपटाने 78 व्या कान्स चित्रपट महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार, पाल्म द’ ओर, जिंकला. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निकोल किडमन आणि ज्युरी अध्यक्ष जूलिएट बिनोश यांनी कान्समधील ग्रँड थिएटर ल्युमिएर येथे झालेल्या समारोप समारंभात जफर पनाही यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पाल्म द’ ओर पुरस्कार प्रदान केला.
हे बक्षीस जाहीर झालं आणि जफर मानेमागे हात धरून खुर्चीत मागे कलंडला, शांतपणे… प्रेक्षागृह टाळ्या वाजवत उभं राहिलं, जफर आपल्या खुर्चीत शांत बसला होता. बक्षीस मिळेल अशी अपेक्षा नसेल? की चित्रपट करताना मानसिक खळबळ आणि तणाव त्याला बक्षीस जाहीर होताना आठवत असतील? जफर पनाही यांचे नाव जाहीर केले तेव्हा ते काही क्षण आपल्या जागेवरच थबकले. नंतर ते भावनिक होत म्हणाले, “माझ्या देशात-इराणमध्ये-माझे अनेक सहकारी चित्रपट निर्माते आणि कलाकार तुरुंगात असताना मी इथे एकटाच कसा आनंदी राहू शकतो?
(यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक जफर पनाहीच्या ‘इट वॉज जस्ट एनअॅक्सिडंट’ या सिनेमाला सर्वोच्च पुरस्कार मिळाला.)
जफर पनाहीच्या ‘इट वॉज जस्ट एनअॅक्सिडंट’ सिनेमाची पार्श्वभूमी
एका प्रवासाला निघालेल्या जोडप्याच्या गाडीला अपघात होतो. गाडी ठीक करण्यासाठी गॅरेजमधे जाते. गॅरेजचा मालक एक माजी तुरुंगवासी असतो. तुरुंगात त्याचा छळ झालेला असतो. दुरुस्तीला गाडी घेऊन आलेला माणूस आपला छळ करणारा माणूस आहे असा संशय त्याला येतो. तोच असेल तर त्याला गाडीसकट जाळायचा असं तो ठरवतो. आपला वहीम खरा आहे की नाही ते तपासण्यासाठी आपल्याबरोबर तुरुंगात असलेल्या लोकांशी तो संपर्क करतो. पुढं काय होतं? विनोदी रहस्यपटासारखा चित्रपट पुढं सरकत जातो. इराणी समाज, सरकार, भ्रष्टाचार, धर्मवेड इत्यादी गोष्टी या चित्रपटात दिसतात.
संबंधित लेख वाचा: 1) भारत हा सर्वाधिक सिनेमे बनवणारा जगातील अव्वल देश असला, तरीही आपण जगाच्या खूप मागे का आहोत? |
इराणच्या इस्लामिक धर्मांध राजकारण्यांना पुरुन उरलेला दिग्दर्शक
जफर पनाही ही इराण सरकारची डोकेदुखी आहे. जफर इराणी सरकार,समाज, धर्म यांची क्ष किरण तपासणी करतो. त्या पोटी त्यानं तुरुंगवास पत्करला. दीर्घ काळ त्याला घरातच अटकेत ठेवण्यात आलं होतं. 2022 पासून त्याला चित्रपट करायलाही परवानगी नव्हती. एकदा त्यानं घरातल्या घरात बसून चित्रपट केला आणि कॅन चित्रपटात स्मगल केला. यंदाचा चित्रपट करायलाही त्याला परवानगी नव्हती. त्यानं आपलं चित्रीकरण युनिट लपवून वाळवंटात नेलं. अनेक वेळा त्यानं कारमधे कॅमेरा ठेवून रस्त्यावर चित्रीकरण केलं. वाटसरू, पोलिस, कोणालाही चित्रीकरण होतंय हे कळलं नाही. यंदाचा चित्रपट कान महोत्सवात गाजला तेव्हां कुठं इराण सरकारला या चित्रपटाची खबर लागली.
बक्षीस घेऊन जफर इराणमधे परतला तेव्हां त्याला अटक करतील अशी भीती होती. तसं झालं नाही. विमानतळावर त्याच्या स्वागताला वीस पंचवीस लोक हातात अभिनंदनाचे फलक घेऊन उभे होते. जफर कोणतेही गचके न बसता घरी पोचला. इराण सरकारच्या एका प्रवक्त्यानं एक पत्रक काढलं. कलाकारांना, लेखकांना स्वातंत्र्य असतं, पण त्याचा गैरफायदा घेतला जाता कामा नये, आपल्या देशाची प्रतिमा डागळेल असे चित्रपट करू नयेत. अजून इथवरच प्रकरण थांबलंय.
(सहा वर्षांची नजरकैद आणि 20 वर्षांची सिनेमा संबधित कामावर घातलेली बंदी इराणचा जागतिक दर्जाचा दिग्दर्शक जफर पनाही.)
कान महोत्सवातील एका पत्रकार परिषदेत भावना व्यक्त करताना जफर पनाही यांनी सांगितले, “या पुरस्काराने मी खूप आनंदी आहे, पण काही काळ मी माझ्या सहकारी चित्रपट निर्मात्यांच्या आठवणीत हरवलो होतो. एकामागून एक त्यांचे चेहरे माझ्यासमोर येत होते. त्यापैकी काही माझ्यासोबत तुरुंगात होते आणि काही अजूनही तुरुंगात आहेत. हा पुरस्कार मी स्वातंत्र्यासाठी आपले जीव धोक्यात घालून लढणाऱ्या इराणी जनतेला समर्पित करतो.”
इराणी चित्रपटांविषयी ते म्हणाले, "एक काळ असा होता जेव्हा इराणी सिनेमाबद्दल कोणाला माहिती नव्हते. आज त्याची एक खास ओळख आहे. अनेक इराणी चित्रपट निर्मात्यांनी यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आज इथे पोहोचलो आहोत. आम्ही आमचे आयुष्य चित्रपटासाठी समर्पित करतो. पैशाची नेहमीच अडचण असते. मात्र आम्ही सर्वांकडून पैसे घेऊ शकत नाही. गुंतवणूकदाराला चांगल्या सिनेमाचे आकलन नसेल तर तो चित्रपट खराब करतो. सध्या प्रत्येक देश हिंसा, युद्ध आणि हुकूमशाहीने पोखरून निघाला आहे. आम्हाला आशा आहे की सिनेमाच्या माध्यमातून एक दिवस सर्व काही ठीक होईल. शांतता नांदेल. सर्वांना न्याय मिळेल."
6 वर्षांचा तुरुंगवास आणि 20 वर्षांची सिनेमावरची बंदी, तरीही…?
सहा वर्षांची नजरकैद आणि 20 वर्षांची सिनेमा संबधित कामावर घातलेली बंदी इराणचा जागतिक दर्जाचा दिग्दर्शक जफर पनाहीला रोखू शकलेली नाही. जफर पनाही यांचे सिनेमे राष्ट्राची प्रतिमा बिघडवणारे असतात असा आरोप ठेवण्यात आला. 2008 ला त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला सुरु झाला. त्याचं फलित काय निघालं तर 6 वर्षांची नजरकैद आणि पुढची 20 वर्षे सिनेमानिर्मिती संदर्भातलं कुठलंही काम करण्यास बंदी.
जो माणूस फक्त सिनेमाच जगतो त्याच्यावर ही अशी बंदी टाकली तर त्याचं मानसिक खच्चीकरण होईल, गयावाया करेल, सरकारला शरण येईल, असं बहुदा इराणच्या इस्लामिक राज्यकर्त्यांना वाटलं असणार. पण घडलं भलतंच. त्यानंतर तर जफर पनाहींमधली क्रिएटीव्हिटी जास्त वाढली. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत हा माणूस सिनेमे बनवत राहिलाय. बंदी असताना ही सिनेमे बनवतो आणि ते जगभरातल्या फिल्म फेस्टिवलमध्ये पाठवतो. ते तिथवर कसे पोचतात. हा इराण सरकारच्या दृष्टीनंही शोधाचा विषय आहे.
(इराणने बंदी घातल्यामुळे जाफर पनाही दोन वर्षांपूर्वी ‘कान्स’ला जाऊ शकला नाही तेव्हा त्याच्यासाठी खास एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.)
पेनड्राईव्ह ‘केक’मध्ये लपवून सिनेमा कान्स फेस्टिव्हलसाठी पाठवला
जेव्हा जफर पनाही नजरकैदेत होते तेव्हा म्हणजे 2011 ला त्यानं 'धिस इज नॉट ए फिल्म' (2011) नावाची डॉक्युमेन्ट्री बनवली. पेन ड्राईव्हमधून केकमध्ये टाकून फ्रान्समधल्या कान्स फिल्म फेस्टिवलला गेली. तिथं त्या डॉक्युमेन्ट्रीला पुरस्कार ही मिळाला. त्यावर्षी कान्समध्ये जफरला ज्युरी म्हणून बोलवण्यात आलं होतं. बंदीमुळं तो जाऊ शकला नाही, त्याच्यासाठी खास एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. असं प्रेम आणि आदर कुठल्याच दिग्दर्शकाला मिळालेला नाही. 2010 ते 2018 या बंदीच्या 8 वर्षांच्या कालावधीत जफर पनाही यांनी 4 सिनेमे बनवलेत. ते सर्वच्या सर्व महत्त्वाच्या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवले गेले आणि तिथं त्यांना पुरस्कार ही मिळाले.
फिल्म फेस्टिवल सर्कलमध्ये जफर पनाही सर्वाधिक मागणी असलेला इराणी दिग्दर्शक आहे. हा सिलसिला त्याच्या द व्हाईट बलून (1995) पासून सुरु झालाय. 1990 नंतर इराणमध्ये सिनेमाची 'न्यू वेव' आली त्याचा पनाही साक्षीदार आहे. रस्त्यावर आंदोलनात उतरुन काही मिळत नाही म्हटल्यावर त्यानं सिनेमाचं आंदोलन सुरु केलं आणि इराणच्या एकूणच सामाजिक आणि राजकीय स्थितीवर भाष्य करायला सुरुवात केली.
द सर्कल (2000) क्रिमसन गोल्ड (2003) आणि ऑफसाईड (2006) या तीनही सिनेमांनी आतंरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल गाजवले. त्यानंतर इराण सरकारची त्यांच्यावर नजर गेली. हा माणूस सिनेमाच्या माध्यमातून इराणला बदनाम करतोय असं मत तयार करण्यात आलं आणि मग त्याच्याविरोधात खटला सुरु झाला.
बंदीनंतरचे चार ही सिनेमे 'धिस इज नॉट अ फिल्म (2011), 'क्लोज कर्टन' (2013) 'टॅक्सी तेहरान' (2015) आणि 'थ्री फेसेस' (2018) हे इराणच्या एकूणच इस्लामिक राजवटीविरोधात केलंलं जफर पनाही यांचं सिनेमॅटीक बंड आहे.
त्यांचे 'थ्री फेसेस' आणि 'टॅक्सी तेहरान' दोन्ही रोड मुवीज आहेत. टॅक्सी तेहरानमधून इराणच्या शहरी भागातलं जगणं आणि थ्री फेसेसमधून इराणचा ग्रामीण भाग. तिथल्या स्रियां, त्यांच्या समस्या आणि एकूणच तिथलं सामाजिक आणि राजकीय जगणं जफर पनाही यांनी अगदी साध्या पध्दतीनं दाखवलंय. गो प्रो कॅमेऱ्यातून अख्खा सिनेमा बनू शकतो, उगाच तंत्रज्ञानाचा भपका दाखवण्यात त्यांना रस नाही. साधी सोपी पण डोक्यात विचारसत्रांचं 'केमिकल लोच्या' तयार करणारी मांडणी ही जफर पनाही यांच्या सिनेमाची खासियत आहे.
जफर पनाही हे जागतिक सिनेमा क्षेत्रातलं एक मिथक आहे. इराणच्या इस्लामिक धर्मांध राजकारण्यांना पुरुन उरलेला दिग्दर्शक.
(दिग्दर्शक जफर पनाहीचे चित्रपट.)
इतक्या चित्रपट कलाकृती फक्त इराणमध्ये निर्माण होण्याचे कारण काय?
३६ वर्षे आर्थिक निर्बंधांखाली, विविध राजकीय धार्मिक बंधनाखाली असलेल्या इराणमधून जागतिक पातळीवर प्रभाव पाडणाऱ्या चित्रपट कलाकृती कशा निर्माण झाल्या असतील? इतक्या कलाकृती फक्त इराणमध्ये निर्माण होण्याचे कारण काय?
इराण आणि अमेरिकेसह सहा बड्या देशांत अण्वस्त्रनिर्मितीवरून सुरू असलेला वाद जेव्हा संपला तेव्हा इराणमध्ये नवे चित्रपटयुग सुरू झाले. इराणवरील आर्थिक निर्बंध निघून तो अन्य देशांप्रमाणे सर्व आघाड्यांवर प्रगती करण्यास सज्ज झाला. इराण इतकी वर्षे जगापासून तुटलेला असला तरी सर्वांच्या स्मृतींत तो सतत ताजा असण्याचे कारण सातत्याने अवघ्या जगाला चकित करणारे त्याचे चित्रपट होय.
घाट, निवेदनाच्या प्रयोग आणि पारंपरिक शैलीला पूर्णपणे फाटा देऊन शब्दांच्याही कह्यात न येणाऱ्या आशयाचा अनुभव प्रेक्षकांना देण्याची किमया त्यांना जमली कशी, यावर चर्चा सुरू आहेत. सोप्या निवेदनातून आणि साध्या मूल्यांच्या आशयाभोवती रचलेल्या आपल्या असामान्य चित्रपटातून नवी चित्रभाषा साकारणारे अमीर नादेरी, माजिद मजिदी हे इराणचे हिरो होते. सामान्य माणसांतील आत्मदोष, प्रेम, आकांक्षा या सामान्य भावनांतून आणि शोषण, गरिबी, संघर्ष या नित्याच्या समस्यांतून नवे विश्व साकारणारे मखमलबफ, रकशन बानी इतेमाद, जफर पनाही हे देशाचे आणि जगाचेही लाडके होते आणि आहेत.
‘द सायक्लिस्ट’ने रडवले आणि इराणचे चित्रपट कायम काळजावर कोरले गेले
ते ऐंशींचे दशक होते, जेव्हा पहिल्यांदा इराणी चित्रपटांनी जगभरातील, विशेषतः भारतातील महाविद्यालयीन माहोलमध्ये आपली जादू आणली. मग ते नवीन फिल्म सोसायटीच्या स्थापनेच्या निमित्ताने असेल किंवा सांस्कृतिक बंडखोरीतून असेल, पण इराणी चित्रपट बघितले जाऊ लागले आणि त्यांच्या विषयीच्या चर्चेत भाग न घेणारे बावळट ठरू लागले.
(प्रसिदध इराणी दिग्दर्शक माजिद मजिदी)
अमीर नादेरींचा ‘द रनर’ हा त्यापैकी पहिला चित्रपट. त्याने नवे वास्तववादी जग खुले केले आणि लहान मुलाच्या दृष्टिकोनातून गरिबी, ऐश्वर्य आणि भेदाभेद अनुभवायला लावले. त्यानंतर आला, अब्बास कियारोस्तानी यांचा ‘व्हेअर इज द फ्रेंड्स होम.’ यात एका मुलाची केवळ त्याच्या वर्गमित्राची वही परत करण्याबद्दलची कथा आहे. त्यातील अतिसोपेपणातून मानवी संस्कृतीची वैश्विक झलक होती. त्यानंतर मखमलबफ यांच्या ‘द सायक्लिस्ट’ने रडवले आणि इराण हा देश आणि त्याचे चित्रपट कायम काळजावर कोरले गेले.
या काळात इराण-इराक युद्ध घडले, तेथे राजकीय बदल झाले. त्यानंतर अमेरिकेने घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे गेल्या पस्तीस वर्षांत त्याचे कंबरडे मोडले. पण त्याच्या चित्रपटांचा प्रभाव काही ओसरला नाही. आजही जगभर त्याच्या चित्रपटांचा पाठपुरावा विविध महोत्सवांतून सुरूच असतो.
यामागे त्याच्या कलेचा अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. सपाट पृष्ठभाग कोरून त्यातून चित्रमय दृश्य निर्माण करण्याची ही दृश्यकला आजही जिवंत आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षांतील आखातातील विविध उदाहरणांवरून पाश्चात्य जगालाही आता, इराण हा एक स्थिर, पुढारलेला, प्रतिभावान आणि मोकळा देश असल्याचे लक्षात आले आहे. युरोपच्या तुलनेत सर्वाधिक महिला दिग्दर्शक इराणमध्ये आहेत.
कारण तेथील समाज हा मूलतत्त्ववादी नाही. साडेतीन दशकांच्या एकांतातील त्याच्या रूपेरी नभात जगभर चमकणारे तारे दिसले. म्हणूनच एकविसाव्या शतकाचा त्याचा सुटलेला सहभाग भरून काढत इराण पुढे जाईल, तेव्हा त्याचे आकाश अधिक विस्तारलेले आणि त्यातील रंग अधिक गहिरे असतील.






