टीम बाईमाणूस
- जळगावच्या भुसावळमधील संतापजनक घटना
- दोन अल्पवयीन मुलींची विहिरीत ढकलून हत्या
- ग्रामस्थांकडून कठोर कारवाईची मागणी
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. साकरी गावाजवळ एका माथेफिरू तरुणाने इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना बळजबरीने विहिरीत ढकलून दिल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकरी गावातील या दोन्ही मुली नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडल्या होत्या. त्या दोघी गावातीलच एका खासगी शिकवणीला जात होत्या. गावाबाहेरील एका शेतात रोहन चौधरी हा तरुण आधीच लपलेला होता. या मुली रस्त्याने जात असताना त्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मुलींना काहीही समजण्याच्या आतच त्याने दोन्ही मुलींना बळजबरीने ओढत नेऊन जवळच असलेल्या एका खोल विहिरीत निर्दयीपणे ढकलून दिले.
मुलींना विहिरीत ढकलल्यानंतर आरोपीने तिथून लगेचच पळ काढला. यानंतर घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून शेतात काम करणारे मजूर आणि जवळून जाणारे ग्रामस्थ तातडीने विहिरीकडे धावले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी साकरी गावात पसरली आणि काही वेळातच विहिरीवर मोठी गर्दी जमली. ग्रामस्थांनी तातडीने दोरखंडाच्या मदतीने विहिरीत उतरून मुलींना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने आणि मुलींना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला.
काही वेळाने दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. आपल्या मुलींचे मृतदेह पाहून पालकांनी केलेला आक्रोश उपस्थित सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तत्काळ साकरी गावात धाव घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी संशयित आरोपी रोहन चौधरी याला शोधून काढून ताब्यात घेतले आहे.
ग्रामस्थांकडून कठोर कारवाईची मागणी
प्राथमिक तपासात आरोपी हा माथेफिरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याने इतक्या लहान मुलींच्या बाबतीत असे टोकाचे आणि क्रूर पाऊल का उचलले, याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे साकरी गावासह भुसावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलींसोबत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये सुरक्षिततेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






