पराग फाटक
- कर्नाटकसारख्या मातब्बर संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर चीतपट करत जम्मू काश्मीरने रणजी ट्रॉफीचा अख्खा इतिहास-भूगोल बदलला.
- काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती अस्थिर असते. पाकिस्तान पुरस्कृत दहशदवाद, बंद इंटरनेट, लष्कराचं प्राबल्य, जिमखाने, क्लब्ज, मैदाने नाहीत, आंतरराष्ट्रीय सामने नाहीत, तरीही काश्मीर खोऱ्यात क्रिकेट फुलले.
- देशाच्या सगळ्यात अग्रणी असलेल्या काश्मीरने पटकावलेलं हे जेतेपद मैलाचा दगड होऊन प्रेरणा देत राहील.
१६ डिसेंबर २०२५
ठिकाण- दुबईतलं एक पंचतारांकित हॉटेल
निमित्त- आयपीएल लिलाव
लिलावाची प्रक्रिया सुरू होती. गोलंदाजांचा राऊंड होता. मान्यवरांनी बाऊलमधून नावाची डायस काढली आणि निवेदका मल्लिका सागर यांच्याकडे सोपवली. त्यांनी नाव उच्चारलं- आकिब नबी. त्यांच्या मागच्या पडद्यावर नबीचा फोटो आणि आकडेवारी दिसू लागली. हट्टाकट्टा मजबूत बांधा, दाढी आणि ठळकपणे दिसणारा आत्मविश्वास. या बाह्यरुपाच्या बरोबरीने नबीचे आकडे तगडे असे होते. दिल्ली कॅपिटल्सच्या टेबलवर हालचाल झाली आणि त्यांनी पेडल दर्शवलं. नबीची बेस प्राईज होती- ३० लाख. दिल्लीला राजस्थानने टक्कर दिली. दोन्ही संघांना चांगला गोलंदाज हवा होता. त्यामुळे किंमत १ कोटीवर जाऊन पोहोचली. कोणीच मागे हटेना. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मध्येच मुसंडी मारली. ५ कोटी पल्याड गेल्यानंतर राजस्थानने माघार घेतली कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. थोड्या वेळात बंगळुरूनेही शर्यत सोडली.
दिल्ली नबीला ताफ्यात घेण्यावर ठाम होतं. पण सनरायझर्स हैदराबाद टेबलवर हालचाल झाली आणि त्यांनी जोर लावला. दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात चुरस रंगली. हैदराबादने माघार घेताक्षणी निवेदिकने हॉलमध्ये उपस्थित सर्व संघांच्या टेबलवर नजर फिरवली. फायनल कॉल म्हणत तिने अक्वीब नबी- दिल्ली कॅपिटल्स असं म्हणत सोल्ड म्हटलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ८.४० कोटी रुपये मोजून दिल्ली कॅपिटल्सने नबीला ताफ्यात घेतलं. जगरहाटी जाणत नबीने बेस प्राईज ३० लाख अशी होती. तिथून चढत्या क्रमाने बोली लागत गेली.

आकिब नबी… ३० लाखांची बोली पोहचली तब्बल ८.४० कोटींवर
दर्दी क्रिकेटचाहत्यांना नबीचं नाव अनोळखी नव्हतं कारण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने विकेट्स पटकावून जम्मू काश्मीरच्या या शिलेदाराने नाव कमावलं होतं. पण असं म्हणतात की डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडली, विकेट्सच्या चळती उभारल्या तरी आयपीएलच्या व्यासपीठावर तुमची किंमत किती यावर गेम बदलतो. सोशल मीडियावर आक्विब नबी नाव ट्रेंड होऊ लागलं. कोण आहे नबी? या छापाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या.
काम बोलायला हवं हे नबीने सिद्ध केलं. टळटळत्या उन्हात, रिकाम्या स्टेडियममध्ये, पाटा खेळपट्ट्यांवर जीव तोडून बॉलिंग करणाऱ्या नबीच्या कष्टांना आता चांगले पैसे मिळतील. टी२० आक्रमण काळात गोलंदाज म्हणजे अपमानित होणारी जमात झाली आहे. या काळात फलंदाजांची भंबेरी उडवणारा आणि त्यांच्या नाकी दम आणणारा नबी ओअॅसिस आहे. बारामुलातल्या शालेय शिक्षकांचा हा मुलगा. जवळचं स्टेडियम ६० किमी अंतरावर. टेनिस बॉल क्रिकेटचा पाईक. अभ्यासात हुशार. नबीची ८३ वर्षांची आजी क्रिकेटप्रेमी आहे. दक्षिण आफ्रिकेचा आग ओकणारा गोलंदाज डेल स्टेन हे नबीचं प्रेरणास्थान आहे.
अजय शर्मा - मॅचफिक्सिंगचा १४ वर्षांचा वनवास संपला आणि मग…?
१८ फेब्रुवारी २०२६
ठिकाण- पश्चिम बंगालमधलं कल्याणी शहरातलं बंगाल क्रिकेट अकादमीचं ग्राऊंड.
निमित्त- रणजी करंडकाचा सेमी फायनलचा मुकाबला
पश्चिम बंगालसारख्या तुल्यबळ संघाला चीतपट करत जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. रणजी पदार्पणानंतर तब्बल ६७ वर्षानंतर जम्मू काश्मीरने ही भरारी घेतली होती. कार्यकर्ते खूश होते. त्यांनी प्रशिक्षक अजय शर्मा यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि मैदानाला रपेट मारली. प्रेक्षकांना अभिवादन केलं आणि मंडळी ड्रेसिंगरुममध्ये परतली. अजय यांच्यासाठी हा क्षण भावुक असा.
२०००च्या दशकात मॅचफिक्सिंग नावाच्या वाळवीने क्रिकेटला ग्रासलं. त्याच प्रकरणात अजय यांचं नाव घेतलं गेलं. आरोप होतात, बट्टा लागतो, दोषी कोण हे स्पष्ट होण्याआधीच माणूस देशोधडीला लागतो. पुढची १५ वर्ष अजय विजनवासात गेले. गठ्ठ्यात शतकं नावावर असणाऱ्या माणसाला दिल्ली क्रिकेट वर्तुळातून बाजूला केलं गेलं. त्यांच्या मुलानेही क्रिकेटपटू होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. या काळात न्यायालयीन लढाई सुरू राहिली. २०१४ मध्ये दिल्ली कोर्टाने त्यांची मॅचफिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. १४ वर्षांचा वनवास संपला. सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमधून जनरल मॅनेजर म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि तामिळनाडूतल्या टीएन मेमोरिअल ट्रस्ट अकादमीसाठी कोचिंग सुरू केलं.तो त्यांचा कोचिंगचा पहिला अनुभव. कोचिंगसंदर्भात बीसीसीआय लेव्हल २ त्यांनी पार केली आहे.

जम्मू काश्मीरच्या खेळाडूंचे लाडके अज्जूभैय्या…
चार वर्षांपूर्वी मूळचे काश्मीरचे पण दिल्लीकडून खेळलेल्या मिथुन मन्हास यांनी अजय यांना फोन केला. मन्हास त्यावेळी जम्मू काश्मीरचे क्रिकेट ऑपरेशन्स डिरेक्टर होते. त्यांनी अजय यांना संघाचा प्रशिक्षक होण्याबाबत विचारलं. अजय यांच्या नेतृत्वात मन्हास यांनी दिल्लीसाठी पदार्पण केलं होतं. सुट्टीसाठी विदेशात असलेल्या अजय यांनी हा प्रस्ताव गांभीर्याने घेतला नाही. जम्मू काश्मीरसारख्या छोट्या संघाचं प्रशिक्षकपदापेक्षा त्यांनी दिल्लीचं प्रशिक्षकपद खुणावत होतं. थोड्या दिवसांनी मन्हास यांचा पुन्हा फोन आला. बोलणं झालं आणि करून दाखवूया असा निर्धार करत अजय यांनी जम्मू काश्मीरचं प्रशिक्षकपद स्वीकारलं.
अजय यांच्यासाठी रणजी जेतेपदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. हेडमास्तर कोच असं त्यांना म्हटलं गेलं. शिस्तीचा बडगा उगारतात, आयपीएलचं स्वप्नं पाहणाऱ्या खेळाडूंना तंत्रशुद्ध फटके मारा सांगतात असा खेळाडूंनी फीडबॅक दिला. त्यांच्या पत्नीने सांगितलं की ही नवी पिढी आहे. ही मुलं आपल्या मुलाच्या वयाची आहेत. त्यांचं जग वेगळं आहे. त्यांच्या कलाने जावं लागेल. बीसीसीआय नियुक्त समितीचे निवृत्त ब्रिगेडियर अनिल गुप्ता, मन्हास आणि बायको यांचा सल्ला अजय यांनी प्रमाण मानला. संवाद होऊ लागला, खेळाडूंना अजय काय सांगतात ते पटू लागलं. मोट बांधली गेली. आज ते जम्मू काश्मीरच्या खेळाडूंचे लाडके अज्जूभैय्या झाले आहेत.
काश्मीरच्या खोऱ्यात क्रिकेट कसे फुलले?
ही दोन केवळ प्रातिनिधिक उदाहरणं. हुबळीच्या शांत हिरव्यागार कर्नाटक असोसिएशनच्या मैदानावर शनिवारी दुपारी २.१० मिनिटांनी दोन्ही संघांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आणि जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. देशांतर्गत क्रिकेटमधल्या सगळ्यात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या रणजी करंडकावर जम्मू काश्मीरने पहिल्यांदा नाव कोरलं. कर्नाटकसारख्या मातब्बर संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर चीतपट करत जम्मू काश्मीरने हे यश मिळवलं. रणजी करंडक स्पर्धा सर्वार्थाने कस पाहते.ऑक्टोबर-नोव्हेंबर सामने होतात. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी ब्रेक घेतला जातो. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीत सामने पुन्हा सुरू होतात. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही शहरात खेळावं लागतं.
प्रचंड उन्हाळा, प्रचंड थंडी, धुरकं, आणि अलीकडे अवकाळी पाऊस यापैकी कशाचाही सामना करावा लागू शकतो. खूप सारा प्रवासही करावा लागतो. यापैकी बहुतांश सामन्यांचं थेट प्रक्षेपण नसतं. अनेक ठिकाणी स्टेडियमसारखी रचनाही नसते. पूर्ण रिकाम्या मैदानातही खेळावं लागतं. चांगलं खेळूनही तुमची संक्षिप्त मध्ये बोळवण होऊ शकते. श्रीनगर,रायपूर, दिल्ली, जम्मू, पुदुच्चेरी, नदौल, इंदूर, कल्याणी, हुबळी अशी देशभराची सफर करत जम्मू काश्मीरने जेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे या यशाचं महत्त्व अनोखं आहे.

पण हे यश अनेक हातांचं आहे. पडद्यामागे राबलेल्या आणि प्रसिद्धीपासून दूर असलेल्या अनेक मंडळींचं आहे. मुळात कोणताही खेळ खेळण्यासाठी स्थैर्य आवश्यक असतं. जम्मू काश्मीरात ते किती मिळू शकतं हे तुम्ही जाणताच. भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण जम्मू काश्मीरचे प्रशिक्षक होते. इरफान यांनीच फिटनेसचं महत्त्व खेळाडूंच्या मनावर बिंबवलं. फिट असाल तरच सर्वोत्तम खेळू शकाल हा मंत्र त्यांनी दिला.
त्या काळात काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती अस्थिर अशी होती. संघातल्या २५ खेळाडूंना एकत्र आणणं अवघड होतं. इंटरनेट बंद होतं, अनेक ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली होती. इरफान आणि जम्मू काश्मीर संघटनेनं यातून मार्ग काढला. बडोद्यातल्या मोतीबाग इथे सगळ्यांना नेण्यात आलं. तिथे इरफान यांनी पैलू पाडले. याच काळात इरफान यांनी मिलाप मेवाडा यांनाही प्रक्रियेत आणलं.
या दोघांच्या आधी भारतीय संघाचे माजी फिरकीपटू बिशन सिंग बेदी हे काश्मीर संघाचे प्रशिक्षक होते. परखड आणि दिलदार व्यक्तिमत्वाच्या बेदी यांनीच या खेळाडूंच्या मनातून न्यूनगंड काढून टाकला. समोरच्या संघात कोहली असो, रोहित असो- तुम्ही तुमचा सर्वोत्तम खेळ करा हे बेदी यांनी ठसवलं. काही दिवसांपूर्वीच झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत पश्चिम बंगालकडे मोहम्मद शमी, आकाशदीप आणि मुकेश कुमार असं आक्रमण होतं.
तिघेही भारतासाठी खेळतात. पण जम्मू काश्मीरचे खेळाडू दबून गेले नाहीत.आताही अजय शर्मा यांच्या बरोबरीने पी.कृष्ण कुमार (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि दिशांत याग्निक (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) हे प्रशिक्षणाचं काम पाहतात.काश्मीरविरुद्ध सामना म्हणजे मोठ्या संघांची चंगळ हे समजू नका. प्रत्येक धावेसाठी प्रतिस्पर्ध्यांना संघर्ष करायला लावा. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोवर सामना सोडू नका हीच त्यांना शिकवण आहे.
पारस डोगरा - बिगरकाश्मीरी खेळाडूकडे जम्मू-काश्मीरचे नेतृत्व
रणजी करंडक स्पर्धेची ४२ जेतेपदं मुंबईच्या नावावर आहेत. जम्मू काश्मीरने आज ज्यांना हरवत जेतेपद पटकावलं त्या कर्नाटकच्या नावावर ७ आहेत. मुंबई काय किंवा अन्य कोणत्याही राज्यांमध्ये शांतता हा काही मुद्दा नसतो. पण जम्मू काश्मीरात तोच मुद्दा आहे. अस्तित्वाचीच लढाई आहे. कधी हल्ला होईल, काय गमवायला लागेल काही सांगता येत नाही. त्यातून सावरायला किती वेळ लागेल माहिती नाही. दळणवळणाची साधनं उपलब्ध होतील का सांगता येत नाही. इंटरनेट बंद केलं जाऊ शकतं. तर्क खुंटीवर टांगलेला पाकिस्तान खेटून आहे. लष्कराचं प्राबल्य असलेला टापू आहे. अनेक भाग बर्फाच्छादित असतात. जिमखाने, क्लब्ज, मैदानं सहजी उपलब्ध नाहीत. आयपीएलचा संघ नाहीये. आंतरराष्ट्रीय सामने आयोजित होत नाहीत. डोमेस्टिक स्पर्धांचे सामने अलीकडेच आयोजित होऊ लागलेत.

काश्मीर संघाचं नेतृत्व बिगरकाश्मिरी माणसाकडे आहे. त्याने संघाला आणि या परिसराला आपलंसं केलं आहे. त्याचं नाव- पारस डोगरा. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये १०,००० हून जास्त धावा पारसच्या नावावर आहेत. यावरून त्याची पत लक्षात यावी. एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पारसकडे पाहूया. ४२वर्षीय पारस गेली २५ वर्ष रणजी स्पर्धा खेळतोय. थोडक्यात एका पिढीएवढा काळ तो ही स्पर्धा अनुभवतो आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेचा करंडक उचलण्याची संधी त्याला मिळाली. हिमाचल प्रदेशचा आधारवड असलेल्या पारसने काही वर्षांपूर्वी संघ बदलण्याचा निर्णय घेतला. डोमेस्टिक क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या माणसाची आणि नेतृत्वाची काश्मीर संघाला गरज होती. परफेक्ट जमलं.
हा विजय कोण्या एकाचा नाही. ६० विकेट्स पटकावणारा नबी या विजयाचा शिल्पकार म्हणता येईल. पण प्रत्येकाचं योगदान आहे. आयपीएलमध्ये षटकार लगावण्यात पटाईत अब्दुल समदने या हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा केल्यात. कर्णधार पारस डोगराने ६०० पेक्षा जास्त धावा केल्यात. फायनलमध्ये कर्नाटकसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध शुभम पुंडीरने पहिल्या डावात शतक झळकावलं. फायनलआधी शुभम खजुरिया आणि वंशज शर्मा हे दोघे दुखापतग्रस्त झाले. कामरान इक्बाल आणि साहिल लोटरा यांना संधी मिळाली. दोघांनी शतकी खेळीसह संधीचं सोनं केलं.
हा विजय एका हंगामाचा चमत्कार नाही. आधीच्या हंगामांमध्येही जम्मू काश्मीर बाद फेरीत दाखल झालं होतं. केरळविरुद्ध एका धावेच्या फरकाने त्यांना परतावं लागलं होतं. रणजीच्या जेतेपदावर वर्षानुवर्ष मुंबईची सद्दी होती. गेल्या दशकभरात ही पकड सैल झाली आहे. मोठी शहरं सोडून यशाचा मुकूट निमशहरांकडे, छोट्या राज्यांकडे जाऊ लागला आहे. विदर्भ, सौराष्ट्र यांनी ते करून दाखवलं. पृथ्वीवरचं नंदनवन, स्वर्ग असं वर्णन होत असलं तरी काश्मीर खोऱ्यापुढच्या समस्या काय आहेत हे आपल्या सगळ्यांसमोर आहे. जीवापेक्षा मोठं काहीच नाही. क्रिकेट वगैरे अतिशय दुय्यम. दहशतवादाची भीती, फुटीरतावाद्यांचा धोका, पाकिस्तानच्या कुचाळक्या, प्रतिकूल हवामान हे सगळं बाजूला होऊन क्रिकेटला काश्मीरने संजीवनी मिळवून दिली आहे. देशाच्या सगळ्यात अग्रणी असलेल्या काश्मीरने पटकावलेलं हे जेतेपद मैलाचा दगड होऊन प्रेरणा देत राहील.

क्रिकेटचं कुलदैवत असलेल्या सचिन तेंडुलकरने सुरेख शब्दात या विजयाचं वर्णन केलंय. सचिनने लिहिलं,
भारतीय क्रिकेटपटूंच्या वाटचालीत जम्मू काश्मीरमधल्या बॅट्सचा सिंहाचा वाटा राहिला आहे. या बॅट्सचं माहेरघर असलेल्या जम्मू काश्मीरचा संघ आता रणजी विजेता आहे. देशवासीयांसाठी संस्मरणीय असे हे जेतेपद आहे. काय पाहिजे अजून!!!
जगभरात युद्धं पेटली आहेत. अस्थिरता नांदते आहे. असं असताना काश्मीरचं नाव निघावं पण ते क्रिकेटसाठी- हाच सुकून प्रमाण मानावा...
(सौजन्य - पराग फाटक यांच्या फेसबुक पेजवरून)






