Skip to main content

जगप्रसिद्ध ‘लोणार’मध्ये असं काय ‘अजब’ घडतयं, की धोक्याची घंटा वाजू लागलीये…?

Article in Marathi
Shantanu Khuje
28 Feb 2026
158 views
जगप्रसिद्ध ‘लोणार’मध्ये असं काय ‘अजब’ घडतयं, की धोक्याची घंटा वाजू लागलीये…?

शंतनू खुजे 




  • लोणार सरोवराची पाणीपातळी वाढल्याने परिसरातील ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत
  • खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराचे गोड्या पाण्यात रूपांतर होतय, ज्यामुळे सरोवरात मासे देखील आढळत आहे
  • सरोवराच्या वाढत्या पाणीपातळीमुळे पर्यटनावर देखील परिणाम झालाय.


बुलढाणा जिल्ह्यातील जगविख्यात लोणार सरोवर… एक असं कुतुहल ज्याची पर्यटकांना, अभ्यासकांना, जगभरातील शास्त्रज्ञांना कायम भूरळ. निसर्गाने महाराष्ट्राला दिलेला हा एक अनमोल ठेवा. त्याकाळी झालेल्या अशनीपातामुळे पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात एकूण चार विवरं तयार झाली, उत्तर अमेरिकेत दोन, ऑस्ट्रेलियात एक आणि आपल्याइथं एक… मात्र अग्निजन्य खडकात निर्माण झालेलं खाऱ्या पाण्यातील एकमव विवर म्हणजे आपलं हे लोणार सरोवर… या सरोवराचं वय साधारणपणे ५ लाख ७० हजार वषापूर्वीचं, म्हणूनच भारत सरकारने या लोणार सरोवराला राष्ट्रीय भू-वारसा स्थळाचा दर्जा दिलाय.


मात्र हा झाला लोणारचा इतिहास, आता वर्तमानकाळात या लोणार सरोवराची नेमकी काय स्थिती आहे…? अलीकडच्या काळात लोणार सरोवर वारंवार चर्चेत का येतयं…? लोणार सरोवराला घेऊन परिसरातील गावकऱ्यांनी ‘लोणार बंद’ची हाक का पुकारली आहे..? लोणार सरोवराला घेऊन जगभरातील शास्त्रज्ञ चिंतेत का आहेत…? 


या सगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ची टीम पोहचली लोणार गावात. लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस होत असलेली वाढ आणि त्यामुळे सरोवरच्या परिसरातील १३ पैकी १२ मंदिरे पाण्याखाली गेल्यामुळे परिसरातील चिंतेचे वातावरण हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. 


बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस होत असलेली वाढ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. २०२४-२५ या वर्षातील अतिवृष्टीमुळे जमिनीतील भूजल पातळी वाढली. परिणामी सरोवरातील गोड्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन झाले आणि अखंडपणे प्रवाहित धार या सर्वांचे पाणी प्रवाहित होऊन सरोवरात जात आहे. सरोवरच्या परिसरातील १३ पैकी १२ मंदिरे सद्यस्थितीत पाण्याखाली आहेत. याचा सर्वाधिक फटका बसलाय तो कमळजा देवी मंदिराला. हे मंदिर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र या विभागाने मंदिरांकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. 


User Imageपाण्याखाली गेलेले मंदिर (Photo credit - Ritesh Shisode)


“ही पाणी पातळी वाढत आहे, अलीकडचे एक मंदिर जे विष्णू मंदिर आहे, त्याच्याजवळ पाणी आलं होतं. त्यावेळेस वेळोवेळी आम्ही शासनाला, प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून सांगितलेलं आहे की, एक दिवस हे पाणी खूप वाढेल व आपलं जे नैसर्गिक सरोवर आहे त्याला धोका निर्माण होईल. परंतु तशा प्रकारचे पाऊल उचलल्या गेले नाही.” अशी खंत “मी लोणारकर” या संस्थेचे प्रतिनिधी सचिन कपुरे यांनी ‘बाईमाणूस’कडे व्यक्त केली. 


पण लोणार सरोवरातील पाण्याची पातळी कधीपासून वाढत आहे ? त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ? या सर्वांचा स्थानिक पर्यटनावर काय परिणाम होतोय ? सरोवरात मासे दिसू लागल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत आहे का ? आणि एकंदरच यावर उपाययोजना काय असू शकतात ? 

 

नैसर्गिक आश्चर्य मानल्या जाणाऱ्या लोणारचा इतिहास…


लोणार हे बुलढाणा जिल्ह्याच्या आग्नेयेला स्थित १.८८ किलोमीटर व्यासाच्या विवरातील खाऱ्या पाण्याचे आणि अत्यंत अल्कधर्मी सरोवर आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, हे जगातील सर्वात मोठे बेसॉल्टिक उल्का-विवर आहे. उल्कापिंडाच्या धडकेने तयार झालेल्या या विवराला केंद्र सरकारने 'नॅशनल जीओ हेरिटेज साइट' म्हणून घोषित केले आहे. जगभरातील वेगवेगळ्या संशोधकांनी या विवराच्या निर्मितीचा काळ वेगवेगळा सांगितला आहे. २०१० मध्ये अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठाचे ऍडम मालूफ यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने या हे सरोवर १२ हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सुचवले होते. तर २०११ मध्ये ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे फ्रेड जॉर्डन यांच्या चमूने ते ५.७ लाख वर्षे जुने असल्याचा अंदाज वर्तवला होता. कार्बन डेटिंगनुसार हे सरोवर ५२ हजार वर्ष इतके जुने आहे.


लोणार सरोवर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशानेही समृद्ध आहे. सरोवराच्या काठावरील हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील दैत्यसूदन मंदिर, धार तीर्थ, गोमुख तीर्थ, तसेच अहिल्याबाई होळकर यांचे अन्नछत्र ही ठिकाणे लोणारच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात. प्राचीन शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेले दैत्यसूदन मंदिर हे अभ्यासक आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. पण यातील अनेक मंदिरं सध्या पाण्याखाली आहेत. 


२०२१ पासून वाढत आहे सरोवराची पाणीपातळी…


“सरोवराची पाणी पातळी गेल्या पाच वर्षांपासून वाढत आहे. २०२१ मध्ये आम्ही प्रथमच सर्वांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. 'मी लोणारकर टीम' म्हणून आम्ही नेहमी सरोवराच्या संवर्धनासाठी काम करत आहोत. अलीकडचे एक मंदिर जे विष्णू मंदिर आहे, त्याच्याजवळ पाणी आलं होतं. त्यावेळेस वेळोवेळी आम्ही शासनाला, प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून सांगितलेलं आहे की, एक दिवस हे पाणी खूप वाढेल व आपलं जे नैसर्गिक सरोवर आहे त्याला धोका निर्माण होईल. परंतु तशा प्रकारचे पाऊल उचलल्या गेले नाही.” असं कपुरे सांगतात. 


User Imageसचिन कपुरे (प्रतिनिधी, मी लोणारकर संस्था) (Photo credit - Ritesh Shisode)


सध्याच्या घडीला विविध प्रकारचं खोदकाम करण्यासाठी मशिनरी वापरल्यामुळे व सरोरावच्या परिसरात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे विविध स्रोतांमधून पाणी सरोवरामध्ये येतंय ज्यामुळे सरोवराची पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुढे कपुरे सांगतात, 


‘’आता सरोवराच्या वरच्या बाजूने एक रोड तयार करण्यात आला. हा रोड तयार करण्याची काही गरज नव्हती. कारण त्या रोडसाठी भरपूर माती मोठ्या प्रमाणात टाकण्यात आली. ती माती पावसाने पूर्णपणे आत मुरली आहे. आधीपासूनच तिथे काही बाभूळ होत्या, प्रोसोपिस त्याला म्हणतात. परंतु शासनाने त्या काढून वर आणण्याचा मोठा प्रयत्न केला. तर जेव्हा प्रोसोपिस काढत होते, तर तेव्हा त्या वनस्पतीची पाणी ओढण्याची क्षमता खूप जास्त होती. त्या काढल्या, त्यामुळे खाली जी माती होती भुसभुशीत, ती आणखी भुसभुशीत झाली व पावसामुळे तीही माती सरोवरात गेली. सरोवराचा भाग जो असा खोलगट होता ना पूर्वी, तो खोलगट न राहता असा तव्यासारखा, बशीसारखा झालाय. त्यामुळे आता पाणी आल्यानंतर ते इकडे तिकडे स्प्रेड होणारंच आहे.’’


याबाबत वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक सांगतात की, "लोणारला 'रामसर' स्थळाचा दर्जा मिळालाय, ते एक जागतिक महत्त्वाचं वेटलॅंड आहे. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालं असून याचं पाणी अतिशय खारं आणि अल्कलाईन आहे. पण सध्या सरोवराची पाणी पातळी वाढून मंदिरं पाण्यात जाणं, ही खरं तर धोक्याची सूचना आहे. पूर्वी कितीही पाऊस झाला तरी असं कधीच व्हायचं नाही, पण आता परिस्थिती बदलली आहे. उन्हाळ्यात ही पातळी कमी होऊन मंदिरं उघडी पडायला हवीत, पण तसं होताना दिसत नाहीये." 


'निरी'चा सांडपाणी प्रकल्प अजूनही प्रतिक्षेत… 


लोणार येथे नीरी (National Environmental Engineering Research Institute) सांडपाणी प्रकल्प हा लोणार सरोवरात शहरातील घाण पाणी थेट जाण्यापासून रोखण्यासाठी उभारण्यात आला होता. सुमारे २.५० कोटी खर्चून बनवलेला हा प्रकल्प सरोवरातील जैवविविधता वाचवण्यासाठी आवश्यक होता, परंतु तांत्रिक त्रुटींमुळे हा प्रकल्प कुचकामी ठरला आहे. 


'नीरी'चा एक जो सांडपाणी प्रकल्प इथे तयार आहे, तो कधीही चालू झालेला मला दिसत नाही. मोठ्या प्रमाणात जे पाणी सरोवरात येते, गावातील सांडपाणीही येते आणि पावसाचं पाणी पण ते पूर्ण मोठ्या वेगाने लोणार सरोवरामध्ये चालल्या जाते. ज्यामुळे पाणीपातळी वाढण्यामागे हेही एक कारण असल्याचं सचिन कपुरे सांगतात. 


पुढे ते सांगतात की, इथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. माझ्या मते, वृक्ष लागवड अभयारण्यात करायची काहीच गरज नव्हती. ते करण्यात आलं त्यावेळेसही जी माती मोकळी करण्यात आली मोठी जेसीबीने, काही मशिनरीच्या साहाय्याने, काही माणसांच्या साहाय्याने, आठ-आठ हजार झाडं लावण्यात आले. मग ती जी माती मोकळी झाली, ती पावसाने आत चालल्या गेली. ज्यामुळे मग पाणीपातळीत वाढ झाली.


User Image'निरी'चा सांडपाणी प्रकल्प (Photo credit - Ritesh Shisode)


"लोणारची लोकसंख्या आणि पर्यटकांचा वावर वाढल्यामुळे शहर आणि हॉटेलचं सगळं सांडपाणी, बाथरूमचं पाणी थेट सरोवरात जातंय. यामुळे पाण्यात नायट्रेट्सचं प्रमाण वाढलंय. सर्वात धक्कादायक म्हणजे, या खाऱ्या पाण्यात आता गोड्या पाण्यातले मासे दिसू लागले आहेत. ही सरोवरासाठी धोक्याची घंटा आहे, कारण मूळ सरोवरात कधीच मासे नव्हते. जर हे असंच राहिलं तर सांडपाण्यामुळे सरोवरात जलपर्णी वाढेल आणि पाण्याचा पृष्ठभाग पूर्णपणे झाकला जाईल. मध्यंतरी बॅक्टेरियामुळे पाणी गुलाबी झालं होतं, हे सगळे बदल सरोवराच्या अस्तित्वासाठी घातक आहेत." असं डॉ. पाठक सांगतात. 


वन्यजीव अभयारण्य ठरतंय सरोवराला मारक….?


लोणार अभयारण्याची स्थापना ३ जून २००० रोजी झाली. लोणार सरोवर आणि परिसराचे संवर्धन तसेच मानवी हस्तक्षेप नियंत्रित करणे हा त्यामागील उद्देश होता. बऱ्याच अंशी तो सफलही झाला. त्यानंतर २०१८ मध्ये हे अभयारण्य वन्यजीव विभागाच्या ताब्यात आले. 


पूर्वी हे अभयारण्य प्रादेशिक वनविभागाकडे. नंतर हे वन्यजीवांकडे गेले. परंतु वन्यजीवांकडे गेल्यानंतर जो विकास मोठ्या प्रमाणात होऊ लागला, तो विकास या सरोवराला थोडासा घातक ठरलेला आहे, असं कपूरे यांना वाटतं, ते सांगतात, “या अभयारण्यात जे काही मशिनरी आणि जेसीबीने काम करण्यात आले, कुठे टॉवर उभारण्यात आले, तर हे या सरोवराला नकोय. हा इको सेन्सिटिव्ह झोनच राहावा. सरोवराचा जो विकास जो आहे, तुम्हाला करायचा आहे ना, तो सरोवराच्या १ किलोमीटर अंतरावर हा विकास करावा. अशी सर्वच नागरिकांची मागणी आहे.” 


सरोवराची पाणीपातळी वाढण्यामागे काही ऐतिहासिक आणि भौगोलिक कारणेही आहेत. पूर्वी या सरोवराच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणावर शेती व मळे होते. या मळ्यांसाठी झऱ्यांच्या पाण्याचा वापर होत असल्याने एक थेंबही पाणी थेट सरोवरात जात नव्हते. मात्र, प्रशासनाने हे मळे अधिग्रहित केल्यामुळे आता या झऱ्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर थेट सरोवरात मिसळत असून पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. याव्यतिरिक्त, परिसरात घेतल्या जाणाऱ्या ७०० फुटांहून अधिक खोल बोअरवेलमुळेभूगर्भातील पाण्याचे संतुलन बिघडून वरचे पाणी खाली झिरपत असावे आणि त्यामुळेही पाणीपातळी वाढत असावी, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे.


User Imageलोणार वन्यजीव अभयारण्य (Photo credit - Ritesh Shisode)


पीएच कमी झाल्यामुळे सरोवरात आढळले मासे…


सरोवरातील वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता सध्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे धोक्यात आली आहे. या सरोवराच्या पाण्याचा पीएच पूर्वी १०.५ ते ११ च्या दरम्यान असायचा, ज्यामुळे हे पाणी अत्यंत अल्कधर्मी होते. या विशिष्ट रासायनिक गुणधर्मामुळेच येथे मिथेन आणि प्लास्टिकचे विघटन करणारे दुर्मिळ सूक्ष्मजीव तग धरून होते. मात्र, अलीकडच्या काळात गोड्या पाण्याची आवक वाढल्याने पाण्याचे सौम्यीकरण झाले असून, त्याचा पीएच वेगाने खाली येत ७.५ ते ८ वर पोहोचला आहे.


या बदलांचा मोठा फटका सरोवराच्या नैसर्गिक रचनेला बसला आहे. पाण्याचा अल्कधर्मीपणा कमी झाल्याने सरोवरातील आधीचे उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होत आहेत, तर दुसरीकडे आजवर कधीही न आढळलेले मासे आता या पाण्यात काही प्रमाणात दिसू लागले आहेत. सरोवराच्या निर्मितीपासून जे जलचर येथे कधीच नव्हते, त्यांचे अस्तित्व निर्माण होणे हे येथील मूळ परिसंस्थेसाठी धोक्याचे लक्षण मानले जात आहे.


वाढत्या पाणीपातळीचा पर्यटनाला बसतोय फटका…. 


सरोवराच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचा परिणाम स्थानिक पर्यटनावर देखील होतोय. 


“पाणी वाढल्यापासून या ठिकाणी पर्यटकांची संख्या खूप कमी झाली आहे, ज्यामुळे आमचा व्यवसायही कमी झाला आहे. तसंच, पाण्याची पातळी वाढल्याच्या बातम्या मीडिया आणि सोशल मीडियावर वारंवार येत आहेत. त्यामुळे लोकांना वाटतंय की इथे परिस्थिती खराब आहे,” परिणामी मग पर्यटक कमी झाल्याचं स्थानिक व्यावसायिक शेख मुजम्मील सांगतात. 


पाणी वाढल्यामुळे लोकांना आतमध्ये जाण्याची भीती वाटते आता, कारण आतमध्ये काही हिंस्त्र प्राणी आहेत, पूर्वी पाणी खूप कमी होतं आणि सर्व दृष्टीस पडत होतं. परंतु आत्ता पूर्ण अभयारण्यातून आपल्याला जावं लागतं, त्यामुळे पर्यटक थोडे घाबरत आहे व इथे येण्याचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झालेलं आहे. असं सचिन कपूरे सांगतात.


User Imageशेख मुजम्मिल (स्थानिक व्यावसायिक) (Photo credit - Ritesh Shisode)


पाणीपातळी वाढल्यामुळे पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झालं असलं तरीही पर्यटकांचं प्रमाण मात्र कमीच आहे. कारण पर्यटकांना खाली मंदिरांपर्यंत जायला अडचणी येत आहेत. परतूर येथून आलेल्या कुलदीप लाईतबार या पर्यटकाचा असाच काहीसा अनुभव आहे, तो सांगतो “पाणीपातळी वाढल्यामुळे आधीचे रस्ते आता पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे मग वरून इकडे खाली मंदिरांपर्यंत यायला खूप त्रास होतो आणि मध्येच कुठंतरी पाणी असल्यामुळे वळण घेऊन यावं लागतं ज्यामुळे अधिक वेळ खर्च होतो.” 


भरमसाठ निधी पण तरी विकासाचा पत्ता नाही….


गेल्या २० वर्षांत शासन स्तरावरून कोट्यवधीचा निधी लोणारच्या विकासासाठी मंजूर झाला. २०१० साली पर्यटन आणि विकास कृती योजनेतून २०५ कोटी व ९१.२९ कोटी रुपये मिळाले. २०२२ साली पर्यटन सुविधा, जैवविविधता संवर्धन, पादचारी मार्ग, वारसास्थळांची कामांसाठी विकास आणि संवर्धन योजनेतून ३७० कोटी मिळाले. २०२५ साली पर्यटन चालना योजनेतून ९१.२९ कोटी मिळाले. पर्यटन पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन, नियोजन विभागाचा विकास अंदाज म्हणून ४३४.६२ कोटींची तरतूद झाली.


पर्यटन विकास, सौंदर्याकरण, रस्ते, घाट बांधकाम, संरक्षक भिंती, प्रकाशयोजना, उद्याने आदी कामांसाठी निधी खर्च झाल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात, लोणारचा अपेक्षित विकास झालेला नाही, हे कटू सत्य आहे. जी विकास कामे झालीत, ती दर्जेदार तर नाहीतच; उलट अनेक ठिकाणी काही वर्षांतच ती निकृष्ट कामामुळे मोडकळीस आलेली दिसतात. घाटांची फरसबंदी उखडलेली, पावसाळ्यात वाहून जाणारी माती, अपुरी निचरा व्यवस्था, अर्धवट सोयी-सुविधा आणि देखभाल नसलेली पर्यटनस्थळे हेच लोणारचे सध्याचे वास्तव आहे. 


उपाययोजना काय असू शकतात ? 


लोणार सरोवराच्या परिसरातील विकासकामे सरोवरापासून काही अंतरावर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सध्या सरोवराच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, कमळजा माता मंदिरातील मूर्तीच्या मुखवट्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. या वाढत्या पाणीपातळीवर तातडीने उपाययोजना न केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

या समस्येवर एक प्रभावी आणि कमी खर्चाचा उपाय समोर आला आहे. ग्रामस्थांच्या मते, रामगया, पापेश्वर आणि धार यांसारख्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांचा योग्य वापर केल्यास हा प्रश्न सुटू शकतो. या सर्व झऱ्यांचे पाणी एका जागी संकलित करून ते पंपिंगद्वारे थेट नगरपालिकेच्या जलकुंभात सोडण्याचा पर्याय व्यवहार्य मानला जात आहे.


यासाठी कोणताही मोठा खर्च अपेक्षित नाही किंवा विशेष ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही. विशेष म्हणजे, लोणार गावात सध्या महिना-महिनाभर पिण्याचे पाणी मिळत नाही; या योजनेमुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न मार्गी लागेल. याशिवाय, सरोवरात जाणारा पाण्याचा अतिरिक्त प्रवाह रोखला जाऊन पाणीपातळी नियंत्रणात येण्यास मदत होईल.


सरोवरातील वाढत्या पाणीपातळीबाबत प्रशासनाने पाऊलं उचलावी अशी अपेक्षा तज्ज्ञांना आहे. डॉ. पाठक म्हणतात की,


"प्रशासनाने आणि वन विभागाने आता गांभीर्याने लक्ष देऊन पर्यटकांचं सांडपाणी दुसरीकडे वळवायला हवं. जे काही पाणी सरोवरात जातंय, त्यावर एसटीपी (STP - Sewage Treatment Plant) प्लांट लावून ते शुद्ध केल्याशिवाय सोडू नये. सरोवरातील पाण्याचा विशिष्ट पीएच टिकवून ठेवणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे. जर आपण हे नैसर्गिक चक्र वाचवू शकलो नाही, तर लोणारचं मूळ वैभव धोक्यात येईल. त्यामुळे केवळ पर्यटनाचा विचार न करता, सरोवराच्या संवर्धनासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे."







Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...