टीम बाईमाणूस
- मध्य प्रदेशातील नर्मदपुरम जिल्ह्यातील गाय तस्करीच्या संशयावरून मारहाणीत मृत्यू झालेल्या प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
- सत्र न्यायालयाने 2022 मध्ये गो-तस्करीचा संशयावरून जमावाने केलेल्या एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणातील सर्व 14 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मध्य प्रदेशातील नर्मदपुरम जिल्ह्यातील गाय तस्करीच्या संशयावरून मारहाणीत मृत्यू झालेल्या प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सत्र न्यायालयाने 2022 मध्ये गो-तस्करीचा संशयावरून जमावाने केलेल्या एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणातील सर्व 14 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तबस्सुम खान यांनी हा निर्णय दिला. निर्णय ऐकताच दोषींच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला.
दीपक उर्फ बाबा केवट, अज्जू उर्फ अजय राठोड, प्रकाश कौशल, पवन बाथव, अमर उर्फ भोला बाथव, कन्हैया बाथव, अनुज उर्फ बल्लू रघुवंशी, संजू उर्फ राजेंद्र कौशल, आकाश उर्फ पिंटोली बाथव, गौरव यादव, आकाश सराठे, चेतन मराठा, देवेंद्र उर्फ छोटू कोरी आणि संदीप उर्फ राजा कौशल अशी या प्रकरणात दोषी ठरवलेल्या आरोपींची नावे आहेत.
मॉब लिंचिंग प्रकरणी १४ आरोपींना जन्मठेप
मध्य प्रदेशातील नर्मदपुरम जिल्ह्यातील सिवनी माळवा तालुक्यात, बरखड गावात घडलेल्या मॉब लिंचिंग प्रकरणात न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (एडीजे) तबस्सुम खान यांच्या न्यायालयाने 14 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या घटनेत सुमारे चार वर्षांपूर्वी, महाराष्ट्रातील अमरावती येथील रहिवासी नझीर अहमद यांची गाय तस्करीच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती. 3 ऑगस्ट 2022 च्या रात्री, महाराष्ट्रातील अमरावतीला जाणारा एक ट्रक राजधानी भोपाळला लागून असलेल्या नर्मदापुरम जिल्ह्यातील सिवनी माळवा येथील बरखड गावाजवळ थांबवण्यात आला. त्या ट्रकमध्ये अंदाजे 30 जनावरे होती. असा आरोप आहे की, गावकऱ्यांच्या आणि गोरक्षकांच्या जमावाने ट्रकमधील तीन लोकांना घेरले आणि त्यांना काठ्यांनी निर्घृणपणे मारहाण केली.

नेमकं काय घडलं होतं?
या हल्ल्यात जखमी झालेल्या ट्रकचालक शेख लाला यांनी नंतर सांगितले होते की, रस्त्यावर 50-60 लोक उभे होते. त्यांनी ट्रक थांबवला आणि कोणतीही चौकशी न करता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रक्त येईपर्यंत जमाव त्यांना मारत राहिला. नंतर, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले, जिथे नझीर अहमद यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये जमाव काठ्यांनी हल्ला करताना आणि त्यांना ठार करा! असे ओरडताना दिसत होते. काही लोकांनी हस्तक्षेप करून इतर दोघांचे प्राण वाचवले.
पोलिसांनी जमावातील 14 आरोपींना ओळखले आणि त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दंगल आणि रस्ता अडवणे यासह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल केला. तपासानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले. जवळपास तीन वर्षे चाललेल्या खटल्यानंतर शुक्रवारी निकाल देण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तबस्सुम खान यांनी प्रकरणातील सर्व 14 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निर्णय ऐकताच दोषींच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला.
निकालानंतर कुटुंबियांचा न्यायालयाच्या आवारात गोंधळ
निकालानंतर, दोषींचे कुटुंबीय विरोध करू लागले, त्यामुळे न्यायालयाच्या आवारात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलीस दोषींना तुरुंगात घेऊन जात असताना, काही कुटुंबीय पोलिसांच्या वाहनासमोर आडवे झाले. वाहन थांबवण्याच्या प्रयत्नात पोलीस आणि कुटुंबीयांमध्ये झटापटही झाली. बऱ्याच प्रयत्नांनंतर, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सर्व दोषींना तुरुंगात पाठवले. निर्णयाचा जोरदार विरोध आणि गोंधळ होत असल्याचे पाहून न्यायालयाच्या आवारात सुरक्षा वाढवावी लागली, जिथे न्यायाधीशांचे निवासस्थानही आहे.
या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात लक्ष वेधले गेले होते. या निकालामुळे पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. न्यायालयाने जमावाकडून होणाऱ्या मारहाणीसारख्या घटनांविरुद्धच्या आपल्या झिरो टॉलरेंस धोरणाला बळकटी देत एक कठोर संदेश दिला आहे.






