अप्सरा आगा
- महात्मा जोतिबा फुले यांची आजपासून (११ एप्रिल) द्विजन्मशताब्दी सुरू होत आहे. त्याकाळी जोतिबांचा वाढता प्रभाव बघून सनातन्यांनी त्यांना मारण्यासाठी रामोशी रोडे आणि धोंडीराम कुंभार या मारेकऱ्यांना पाठवले होते.
- महात्मासोबत त्या रात्री झालेल्या चर्चेतून दोघांचेही हृदयपरिवर्तन झाले. दोघेही महात्मा फुले यांचे कट्टर अनुयायी झाले. धोंडिबा रोडे हे महात्मा फुले यांचे अंगरक्षक बनले तर धोंडीराम कुंभार हा जोतिरावांच्या प्रेरणेनं शिकून विद्वान आणि पंडीत बनले.
- पुढे अंगरक्षक असलेल्या धोंडिबा रोडे यांच्या सूनबाई सावित्रीबाई रोडे यांनी आयुष्यभर सत्यशोधक समाजाचे कार्य अतिशय निष्ठेने केले.
गौतम बुध्दांचे अनेक शिष्य होते पण त्यांच्या शिष्यांमध्ये एक गुंड सुद्धा होता ज्याचं नाव होतं अंगुलीमाल. तर गोष्ट अशी की, एकदा गौतम बुध्द वैशाली नगरातून प्रवास करत होते. त्या परिसरात अंगुलीमाल नावाचा एक गुंड राहायचा. तो लोकांना लुटायचा आणि मारायचा. जंगलातून जाणाऱ्या वाटसरुंच्या हाताची बोटं कापून त्याची माळ गळ्यात घालायचा म्हणून त्याला म्हणायचे अंगुलीमाल. तर वैशाली नगरातून प्रवास करताना बुद्धांना काही लोकांनी सावध केलं की तुम्ही जिथून जाताय तिथे अंगुलीमाल नावाचा एक गुंड राहतो. या परिसरातून जाताना तुम्ही त्याला कसे सामोरे जाणार त्यापेक्षा तुम्ही इथेच मुक्काम करा. लोकांनी बुद्धांना अडवण्याचा खुप प्रयत्न केला, सुरक्षेसाठी सोबत येतो असेही म्हणाले. पण बुध्द एकटेच निघाले. बुद्ध जंगलाच्या दिशेने जाऊ लागले बघता बघता अंधार पडला. तेव्हाच अंगुलीमाल त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. बुध्द घाबरले नाही. अंगुलीमाल बुध्दांना म्हणाला की, तुझ्याकडे जे काही असेल तर मला दे. नाहीतर मी तुला मारुन टाकेल. बुध्दांनी शांततेत उत्तर दिले, माझ्याकडे तर काहीच नाही, मी तर एक भिक्षुक आहे, लोकांकडे भिक्षा मागून पोट भरतो. तुला मी काय देणार? त्यानंतर अंगुलीमाल बुद्धांना म्हटला जर तुझ्याकडे काही नाहीये तर मग आता मरायला तयार हो. बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे. त्यावेळी बुद्ध बोलले, तुला जमेल ? त्यावर अंगुलीमाल म्हणाला मला सगळं शक्य आहे कारण मी सर्वशक्तीशाली आहे. बुद्ध म्हणाले, जा त्या झाडाची फांदी तोडून आण. अंगुलीमालने तोडून आणली. त्यानंतर बुद्ध म्हणाले जा आता ती फांदी पुन्हा झाडाला जोडून ये… अंगुलीमालला राग आला तो म्हणाला एकदा फांदी तोडली तर ती जोडता येत नाही. बुद्ध म्हणाले मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ते तुला जोडता येत नाही ते तोडण्याचा तुला हक्क नाही. आजवर तु अनेक निरपराध लोकांचा जीव घेतलास पण तुला जर त्यांना जीवनदान देता येत नाही तर तुला जीव घेण्याचा अधिकार नाही. अंगुलीमाल भानावर आला बुद्धांच्या या एका वाक्याने तो बुद्धांना शरण केला. बुद्धांची माफी मागितली आणि त्यांचं शिष्य़त्व स्विकारलं…

"माझ्या मरणाने गरिबांचे हित होत असेल, तर खुशाल जीव घ्या!"
अशीच घटना महात्मा जोतिबा फुलेंच्या आयुष्यात घडली होती. जोतिबा फुले यांचा प्रभाव वाढलेला बघून आणि लोक त्यांच्याकडे ओढले जाण्याचा वेग बघून जातीवादी लोकांनी त्यांना ठार मारण्याची योजना आखली आणि त्यानुसार प्रत्येकी एक हजार रुपये सुपारी देऊन दोन माणसे तयार केली. एक होता रामोशी धोंडीबा रोडे आणि दुसरा होता धोंडीराम नामदेव कुंभार…
एके रात्री जोतिबा आणि सावित्री झोपलेले असतात खिडकीतून धोंडिबा रामोशी उडी मारून येतो... त्या आवाजाने सावित्रीबाई जागी होते. शेजारचा कंदील मोठा करते, त्या प्रकाशात रामोश्याची कुऱ्हाड चमकते. सावित्रीबाई एकदम भीतीने ओरडते. जोतिबा उठतात. सावित्रीबाई त्यांना बिलगते. रामोशी आणि धोंडीराम कुंभार मागे दबा धरून उभे राहतात…
जोतिबा- कोण आहे तिकडे? कोण आहे? असे समोर या.. दोघेही कुऱ्हाड पाजळत पुढे येतात. डोळ्यात अंगार.
रामोशी- एऽऽऽ आवाज बंद.. एकदम आवाज नको..
सावित्रीबाई- अहो.. पण.. तू..
धोंडीराम- एऽऽऽ चूप.. थोबाडातून आवाज आला तरी मुंडकं बाजूला पडंल.. गप ऱ्हावा..
जोतिबा- हे पाहा.. हे सारं मान्य.. तुम्ही आम्हाला जरूर मारा, पण तुम्ही आहात तरी कोण? आणि आमचे मुडदे पाडायला का आलात, हे तरी सांगाल?
रामोशी- तुमचा निकाल लावायला आलो आहोत..
जोतिबा- हो, पण का बाबा? काय गुन्हा घडला आमच्या हातून ते तरी सांगाल?
धोंडीराम- ओ.. ते आम्हाला काय ठावं नाय. ए.. बघतोस काय, छाट मुंडकं.. जोतिबा अजिबात हलत नाहीत. शांत राहतात..
जोतिबा- अहो, पाहताय काय? जरूर उडवा माझं आणि या बाईंचं मुंडकं.. फक्त अजून एक मला सांगा.. आम्ही तुमचा काही अपराध केला आहे काय?
रामोशी- नाय.. तुम्ही आमचं कायबी वाईट केलेलं नाहीये.. तुमचा निकाल लावण्याकरता आमाला धाडलं आहे..
जोतिबा- ते तर तुम्ही आलात तेव्हाच जाणलं होतं.. आता मला अजून एक सांगा, की हे कृत्य करून तुम्हाला काय फायदा होणार आहे?
रामोशी- फायदा म्हंजे? पैका मिळणार आहे.. तशी सुपारीच घेतलीय आमी.
जोतिबा- वा! तर मग फारच चांगलं आहे.. केवढय़ाची होती सुपारी?
धोंडीराम- पन्नास रुपयांची.
जोतिबा- (गंभीर मुद्रेने) मग मारा मला. माझ्या मृत्यूनं तुमचा फायदा होणार आहे तर हे घ्या माझे डोके. ज्या गरीब जनतेची सेवा करण्यात मी अन् या सावित्रीनं धन्यता मानली, त्यांनीच माझ्या गळ्यावरून सुरी फिरवावी हे आमचे सद्भाग्य आहे. माझ्या मरणामुळं एका अतिशूद्राचं कल्याण होणार असेल तर मी मरायला तयार आहे.
शांतता पसरते... धोंडीराम कुऱ्हाड वर घेतो तेवढयात रामोशी मधे येतो...
रामोशी- धोंडय़ा, दम धर.. बाजूला हट..
अचानक तो जोतिरावांच्या पाया पडू लागतो.. तात्यासाहेब, या धोंडिबा रामोश्याला क्षमा करा.. तुमच्याविषयी माझ्या चुलत्याकडून ऐकलं होतं.. आज प्रत्यक्ष अनुभवाला आलं.. तुम्ही देवमानसं आहात.. तुमच्या शाळंत आमची विद्या येती नव्हं? अवं, या रामोश्याला क्षमा करा.. तुमास्नी मारलं तर माझा भाऊ अन् वहिनीबी जीव देनार हैत.. धोंडय़ा, ती कुऱ्हाड फेक.. अन् चल आल्या पावली माघारा..
धोंडीराम कुऱ्हाड बाजूला करतो. तोही पाया पडतो...
धोंडीराम- आमाला माफ करा ताई.. या धोंडीरामावर राग नगा धरू.. आमी आडाणी मानसं.. पोटाकरता अशी कामं करून पैका कमवावा लागतो.. आमच्यावर राग नगा धरू..
जोतिबा- धोंडीभाऊ, तुमच्यावर कशाला राग धरू? चूक अज्ञानाची आहे बाबा! तुम्हीच विचार करा. पन्नास रुपये तुम्हाला किती दिवस पुरणार? तुमचं कल्याण विद्येनेच होणार आहे. ते होऊ नये म्हणून हा सुपारीचा घाट आहे, एवढं लक्षात घ्या. ज्ञानासारखं प्रायश्चित्त नाही. ते ज्ञान तुमच्यापासून लपून राहावं म्हणून हा सगळा खटाटोप आहे. आणि माझ्यावर राग का? तर मी बहुजनांना ज्ञानाचे महत्त्व पटवितो, धर्माला प्रश्न करतो. जातिभेद नष्ट करा म्हणतो. कष्टकऱ्यांच्या हक्क आणि अधिकारांविषयी भांडतो. घातक रूढी-अंधश्रद्धा दूर करतो. स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये मानतो. समाजातील गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे म्हणतो. म्हणून माझे हे विचार काही धर्माध आणि विचारांनी बुरसटलेल्यांना खुपतात.
ज्योतिबा दोन्ही मारेकऱ्याला जवळ घेतात.
धनंजय कीर यांनी लिहिलेल्या ‘महात्मा फुले’ यांच्या चरित्रात ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळते.
(श्याम बेनेगेल यांच्या ‘भारत एक खोज’ या मालिकेत महात्मा फुलेंना ठार करण्यासाठी आलेले रामोशी धोंडिबा आणि धोंडीराम कुंभार यांच्यावरचा एक प्रसंग आहे.)
मात्र ही गोष्ट इथेच संपत नाही, तर रामोशी रोडे पुढे जोतिरावांचा अंगरक्षकच बनतो, तर धोंडीराम नामदेव कुंभार हा जोतिरावांच्या प्रेरणेनं शिकून विद्वान होतो...जोतिरावांनी काढलेल्या सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ बनतो, अन् महत्वपूर्ण ग्रंथही लिहितो… मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला ब्राह्मणेतरातील पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दांपत्याकडे जातो. या धोंडीरामने 'वेदाचार' नावाचा चिकित्सक ग्रंथदेखील लिहला आहे…
फुलेंचा मारेकरी झाला ब्राह्मणेतर समाजातील पहिला पंडित
महात्मा जोतिराव फुले यांच्या पश्चात सत्यशोधक समाजाचा किल्ला लढवण्याचं काम सामुदायिकरीत्या झालं. पण जोतिरावांपासून शाहू महाराजांकडे नेतृत्वाचं संक्रमण होताना घडून आलेला महत्त्वाचा बदल म्हणजे वेदांविषयीचं धोरण. स्वतः जोतिरावांचा वेद आणि वेदप्रामाण्य यांना तीव्र विरोध होता. इतकंच नव्हे, तर त्यांची विचारधारा, त्यांचं इतिहासलेखन अशा अनेक गोष्टी या विरोधावरच आधारित होतं. फुले यांच्या मृत्यूनंतर विशेषतः शाहू महाराजांच्या उदयानंतर वेदांचा अधिकृतपणे स्वीकार करण्यात आला. त्या वातावरणातही काही सत्यशोधकांनी जोतिरावांचा वेदविरोधाचा वारसा चालू ठेवला. पण वेदांना पूर्ण लक्ष्य करून त्यांची चिकित्सा करणारा विचारवंत म्हणजे तेच पंडित धोंडिराम नामदेव कुंभार, जे फुलेंना ठार करण्यासाठी एकेकाळी तयार झाले होते.
ही तत्कालीन परिस्थिती जाणून घेतल्यानंतर हे धोंडिराम कुंभार नेमके कोण होते? असा प्रश्न पुढं येतो. पण आज धोंडिराम कुंभारांचे चरित्र तपशील समाधानकारकपणे उपलब्ध नाही. तथापि, सत्यशोधक समाजाच्या १८७६च्या अहवालात उल्लेख असलेले आणि १८७५मध्ये पुण्याला आलेल्या इंग्लंडच्या युवराजाला उद्देशून स्वागतपर पद रचणारे, जोतिरावांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथात जोतिरावांशीच प्रश्नरूपाने संवाद साधरणारे धोंडिबा तेच हे असावेत, असं अभ्यासकांचं मत आहे. ‘गुलामगिरी’ जून १८७३मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर लगेचच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. त्या वेळी धोंडिराम हे केवळ जिज्ञासू श्रोते होते. त्यानंतर वीस वर्षांनी १८९३, १८९६ आणि १८९७ या तीन वर्षांत त्यांनी अनुक्रमे सलग ‘सत्यदर्पण’, ‘वेदाचार’ आणि ‘तमाशा’ ही पुस्तकं लिहिली.
(महात्मा फुलेंना मारण्यासाठी आलेले धोंडीराम कुंभार पुढे खुप मोठे पंडीत झाले आणि त्यांनी 'वेदाचार' नावाचा चिकित्सक ग्रंथ लिहिला.)
शंकराचार्यांना वादात हरवून मिळवली पंडीत ही पदवी
त्यापैकी ‘वेदाचार’ हे पुस्तक वेदांशी संबंधित आहे. ते वाचलं म्हणजे वीस वर्षांपूर्वीच्या एका जिज्ञासू श्रोत्याचं रूपांतर एका पंडितात झाल्याचं पाहून आदरयुक्त आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. शिवाय ‘पंडित’ ही पदवी त्यांनी खुद्द शंकराचार्यांबरोबर केलेल्या जाहीर वादात मिळाली, अशीही नोंद आहे. धोंडिराम कुंभारांच्या ‘वेदाचार’ या पुस्तकाची प्रत प्रसिद्ध अभ्यासक विजय सुरवाडे यांच्याकडून डॉ. य. दि. फडके यांच्यामार्फत बाबा आढावांना उपलब्ध झाली. त्यांनी ती प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे या पुस्तिकेत धोंडिरामांचा उल्लेख ‘ज्येष्ठ शृंगेरी कुडलगीचे स्वामी जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या संस्थानचे सुरसुभे‘ असा करण्यात आलेला आहे. तो विस्मयकारक आहे.
रामोशी रोडेंच्या सूनबाई म्हणजेच सत्यशोधक विद्यादेवी सावित्रीबाई रोडे
फुलेंना ठार करण्यासाठी आलेला रामोशी रोडे पुढे त्यांचा अंगरक्षक झाला हे तर आपण वर वाचलेच असेल. मात्र याच रोडेंच्या सूनबाईंनी पुढे जोतीबांच्या सत्यशोधक चळवळीत मोलाचे कार्य केले. सावित्रीबाई रोडे या धोंडिबा रोडे यांच्या सूनबाई होत. धोंडिबा रोडे आणि धोंडिराम नामदेव कुंभार या दोघांना सनातन्यांनी महात्मा फुले यांची हत्या करण्यासाठी पाठविले होते. रात्री-अपरात्री चोरपावलाने घरी आलेल्या या दोन्ही धोंडिबांशी महात्मा जोतिरावांनी निर्भीडपणे संवाद साधला. या चर्चेतून त्या दोघांचेही हृदयपरिवर्तन झाले. दोघेही धोंडिबा महात्मा फुले यांचे कट्टर अनुयायी झाले. धोंडिबा रोडे हे महात्मा फुले यांचे अंगरक्षक बनले. त्यांचे चिरंजीव तात्यासाहेब रोडे आणि सूनबाई सावित्रीबाई रोडे यांनी आयुष्यभर सत्यशोधक समाजाचे कार्य अतिशय निष्ठेने केले. त्याच या सावित्रीबाई रोडे, ज्यांना आपल्या सासरच्या घराकडून सत्यशोधक समाजाचा वारसा मिळाला. समाजकार्याचा हा वारसा त्यांनी अतिशय निष्ठेने जोपासला.
(पंडीत धोंडीराम कुंभार यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे मुखपृष्ठ.)
सत्यशोधक चळवळीच्या सुरुवातीपासूनच समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन ध्येयाने प्रेरित झालेल्या अनेक महिला कार्यरत असलेल्या दिसतात. ‘सावित्रीबाई तात्यासाहेब रोडे’ या त्यापैकीच एक. विसाव्या शतकाच्या पूर्वाधात, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी त्या सत्यशोधक समाज, पुणे शाखेच्या सचिव म्हणून कार्य करीत होत्या. सत्यशोधक समाज उपदेशकाचेही काम त्या करत. मुलांना धार्मिक विधी स्वतः शिकवत असत. सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात हजर राहून अभ्यासू व चटकदार निबंध सादर करत. सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीतही त्यांचा समावेश होता.
ज्या रामोशी समाजात त्यांचा जन्म झाला, त्या अज्ञानी, निरक्षर, गुन्हेगार समजल्या गेलेल्या रामोशी समाजासाठी शिक्षण जागृतीस्तव रामोशी शिक्षण परिषद भरविण्यात पुढाकार घेत होत्या. रामोशी संघाच्या सेक्रेटरी म्हणूनही त्या कार्य करत होत्या. शिक्षणावरील त्यांची निष्ठा पाहून 1920 च्या दुसर्या रामोशी परिषदेत त्यांना ‘विद्यादेवी’ म्हणून गौरविण्यात आले. सावित्रीबाई तात्यासाहेब रोडे यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
सत्यशोधक समाजाच्या बैठका, निर्णयप्रक्रिया यामध्येही सावित्रीबाई रोडे यांचा सहभाग असे. 1919 मध्ये सत्यशोधक समाजाला संघटनात्मक रूप देण्यासाठी मध्यवर्ती पातळीवर ‘सत्यशोधक समाज’ प्रतिनिधी सभा स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. त्याचा मसुदा सावित्रीबाई रोडे, कमलाबाई जाधव, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, वालचंद कोठारी, अण्णासाहेब लठ्ठे… आदी प्रभुख सत्यशोधक नेत्यांनी जाहीरपणे प्रसिध्द केला होता (‘दीनमित्र’ एप्रिल – 1919.) राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांच्या राज्यारोहण समारंभास जे शिष्ट मंडळ उपस्थित राहिले, या शिष्टमंडळातही सावित्रीबाईंचा सहभाग होता. सत्यशोधक समाजाचा ज्युबिली उत्सव 24 सप्टेंबर, 1923 रोजी पुणे येथे सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली साजरा झाला.
(रामोशी रोडेंच्या सूनबाई म्हणजेच सत्यशोधक विद्यादेवी सावित्रीबाई रोडे.)
मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या चौदाव्या अधिवेशनात (दि. 9 मार्च 1930) सावित्रीबाईंच्या कार्याची दखल घेऊन त्यांना केंद्रीय कार्यकारिणीत सहभागी करून घेतले. चौदाव्या अधिवेशनानिमित्त, मुंबई शाखेने प्रसिध्द केलेल्या विनंतीपत्रात महात्मा फुले निवर्तल्यानंतर सत्यशोधक समाजाला चालना देणार्या महनीय सत्यशोधकांच्या नावांच्या उल्लेख केला आहे. या गौरवपूर्ण नामावलीच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज, भास्करराव जाधव, भीमराव महामुनी, मुकुंदराव पाटील, अण्णासाहेब लठ्ठे… अशा सत्यशोधकांच्या नावांचा उल्लेख आहे. शेवटी, “सावित्रीबाई रोडे वगैरे विद्वान आणि निःपक्षपाती मंडळी मिळाल्यामुळे ‘सत्यशोधक समाज’रुपी लावलेल्या रोपट्याची पाळेमुळे हिंदुस्थानभर पसरून समाजाचा जोराने फैलाव झाला आहे,”
रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी केले उल्लेखनीय कार्य
विसाव्या शतकाच्या आरंभापासूनच बहुजन समाजाच्या जागृतीसाठी विविध परिषदा भरू लागल्या. सावित्रीबाई रोडे यांना आपल्या रामोशी बांधवांच्या उन्नतीसाठी काहीतरी करावे, असे वाटणे स्वाभविक आहे. 1915 पासून त्यांनी रामोशी बांधवांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. बारा बलुतेदारांपैकी रामोशी हा एक बलुतेदार. गावरक्षणाची जबाबदारी त्याची. या मोबदल्यात शेतकरी खळ्या-दळ्याच्या प्रसंगी त्याला धान्याच्या स्वरुपात बलुते देत असे.
या भटक्या जमातीच्या सात पिढ्यांना शिक्षण माहिती नव्हते. सावित्रीबाई याही रामोशी समाजात जन्मलेल्या. त्याचे चटके त्यांनाही बसलेले. तेव्हा त्यांनी रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी 1915 मध्ये ‘क्षत्रिय रामोशी संघ, पुणे’ या नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी रामोशी, मांग वगैरे जातींच्या हजेरी बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्यावर होत असलेला जुलूम समाजाच्या, सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी खूप काम केले.
सावित्रीबाई रोडे आणि तात्यासाहेब रोडे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची परंपरा पुढे चालविली, सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले; तसेच रामोशी शिक्षण परिषद भरवून रामोशी समाज संघटित करण्याचाही प्रयत्न आयुष्यभर केला.

इ. स. 1890 ते 1930 हा सावित्रीबाई रोडे यांच्या कार्याचा ऐन उमेदीचा कालखंड म्हणता येईल. या काळात सर्वच भटक्या जातींना गुन्हेगार ठरविण्यात आले होते. त्यांनी गुन्हे, उपराध करावेत, अशी परिस्थिती समाजानेच त्यांच्यावर लादली होती. अशा सामाजिक स्थितीच्या तुरुंगाचे जिणे झुगारून सावित्रीबाई रोडे मुक्त झाल्या. त्यांचे सासरे आणि पती सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्तेहोते. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. रामोशी जातीत जन्मलेल्या स्त्रीचे त्या काळातील हे कर्तृत्व नेत्रदीपक आहे. शिक्षणातून समाजपरिवर्तनाचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते सत्यात आणण्यासाठी त्या आयुष्यभर प्रयत्नशील राहिल्या. सावित्रीबाईंचे कार्य आजही मोलाचे आहे.






