अप्सरा आगा
- आषाढी वारी म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष आणि लाखो वारकऱ्यांचा पायी प्रवास. पण या प्रवासासोबत आणखी एक प्रवास सुरू असतो तो पैशाचा, रोजगाराचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणाऱ्या एका विशाल लोकअर्थचक्राचा.
- ‘खोळ’ विकणाऱ्या सायकलस्वारापासून ते चप्पल शिवणाऱ्या कारागिरापर्यंत, दिंड्यांसाठी धान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यापासून ते पंढरपूरच्या छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत हजारो हात या सोहळ्याशी जोडलेले असतात.
- श्रद्धा आणि उदरनिर्वाह यांचा अद्भुत संगम घडवणाऱ्या या अर्थव्यवस्थेचा 'बाईमाणूस'ने घेतलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.
आषाढ महिना सुरू झाला की, महाराष्ट्रभराला वेध लागतात ते एकाच नावाचे… पंढरपूर! डोक्यावर तुळशीवृंद, हातात टाळ-मृदंग अन ओठांवर ‘ज्ञानबा-तुकाराम’चा गजर करत लाखो वारकरी पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला निघतात. दरवर्षी आषाढ महिन्यात लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, तसेच शेजारच्या राज्यांमधून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज यांसारख्या अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणांवरून निघतात आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करत पंढरपुरात एकत्र येतात.
या विलोभनीय सोहळ्यात वारकऱ्यांची भक्ती, त्यांचा उत्साह आणि चालणारे पाऊल आपण सगळेच पाहतो. पण या भव्य दिव्य सोहळ्याच्या मागे एक वेगळीच सृष्टी धावत असते. पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी हा केवळ महाराष्ट्राचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्राण नाही, तर तो या राज्याच्या ग्रामीण आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि बलाढ्य आर्थिक कणा आहे.

या संपूर्ण प्रवासादरम्यान आणि पंढरपूरमध्ये ज्या प्रकारची आर्थिक उलाढाल होते, ती जागतिक स्तरावर अभ्यासावी अशी विकेंद्रीत अर्थव्यवस्थेची एक उत्तम प्रतिकृती आहे. वारीच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, बाजारपेठांमध्ये अभूतपूर्व रेलचेल निर्माण होते आणि संपूर्ण वारी मार्गावरील ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रकारे नवसंजीवनी मिळते. या प्रक्रियेत भक्ती आणि अर्थकारणाचा जो अनोखा संगम पाहायला मिळतो, तो केवळ अद्भुत नसून सामाजिक समतोलाचे एक उत्तम उदाहरण आहे.
वारीची अर्थसाखळी नेमकी कशी फिरते?
पालखी सोहळा ज्या मार्गावरून जातो, तो मार्ग प्रामुख्याने ग्रामीण आणि निमशहरी भागातून जातो. आळंदी, देहू येथून सुरू झालेला हा प्रवास पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, माळशिरस, वाखरी आणि शेवटी पंढरपूर असा चालतो. सामान्यतः ग्रामीण भागातील बाजारपेठा या आठवडे बाजारांवर किंवा शेती हंगामावर अवलंबून असतात; परंतु वारीच्या या पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत स्थानिक व्यापाऱ्यांची वर्षभराची कमाई एका बाजूला आणि या दिवसांमधील कमाई एका बाजूला, असे चित्र असते. किरकोळ किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, दूध उत्पादक, चहाच्या टपऱ्या, छोटे हॉटेल्स आणि ढाबे यांना या काळात प्रचंड मागणी असते.
लाखो लोकांचा समूह जेव्हा एखाद्या गावातून जातो किंवा तिथे मुक्काम करतो, तेव्हा तिथे अन्नधान्य, पाणी आणि दैनंदिन गरजांच्या वस्तूंची मागणी अचानक हजारो पटीने वाढते. हा मागणीचा पुरवठा स्थानिक शेतकरी आणि व्यापारी करतात. त्यामुळे थेट ग्रामीण पातळीवर रोकड सुलभता वाढते आणि बाजारपेठांमध्ये एक अभूतपूर्व चैतन्य संचारते. या काळात केवळ प्रस्थापित व्यापाऱ्यांनाच फायदा होतो असे नाही, तर हजारो भूमिहीन मजूर, छोटे कारागीर आणि तात्पुरता व्यवसाय करणाऱ्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर हंगामी रोजगार मिळतो.
‘बाईमाणूस’च्या टीमने यंदाच्या वारीत भक्ती, उदरनिर्वाह अन् समाजसेवा असा अनोखा मेळ घालणाऱ्या अनेक वारकऱ्यांशी, छोट्या-मोठ्या विक्रेत्यांशी संवाद साधला आणि त्यातून वारीचे अर्थकारण समजून घेतले....
‘’खोळाचा गठ्ठा सायकलवर बांधायचा नि दिंडीच्या वाटेनं निघायचं…’’
आषाढी वारी ही साधारणपणे जून-जुलै महिन्यात म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला येते. त्यामुळे वारकऱ्यांना प्रवासादरम्यान पावसापासून संरक्षणाची गरज असते. या गरजेतून छत्री, रेनकोट, प्लास्टिक कोट आणि ताडपत्रीची बाजारपेठ प्रचंड वेगाने फिरते.

वारीच्या वाटेवर अचानक आलेला पाऊस किंवा डोक्यावर तळपणारे ऊन यापासून बचाव करण्यासाठी वारकऱ्यांचा सगळ्यात मोठा आसरा असतो तो म्हणजे 'खोळ'. चारही बाजूंनी झाकणारं हे प्लास्टिकचं आवरण विकून आपलं पोट भरण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मेढा गावचे सतीश काका गेली दोन दशकं दिंडीसोबत धावत आहेत. सतीश काका मूळचे शेतकरी, पण गेली २० वर्षे ते वारीत एक वेगळीच सेवा देत आहेत. सायकलवर खोळांचा भलामोठा गठ्ठा बांधायचा आणि दिंडीसोबत चालायचं, हा त्यांचा दरवर्षीचा नियम बनला आहे. सतीश काका त्यांच्या या प्रवासाबद्दल सांगतात,
"मी २००३ सालापासून सायकलवरून दिंडीसोबत जातोय. माझी वारी बी होते आणि वारकऱ्यांची सेवा बी करता येते. खोळाचा गठ्ठा सायकलवर बांधायचा नि दिंडीच्या वाटेनं निघायचं. जिथं दिंडी मुक्कामाला थांबते, तिथं आम्हीही थांबतो. सायकलवरचा गठ्ठा उतरवायचा नि छोटंसं दुकान मांडायचं."
यंदा पावसापेक्षा उन्हाचा तडाखा जास्त आहे, पण सतीश काकांचा नियम बदललेला नाही. अवघ्या तीस रुपयाला एक खोळ विकून त्यांना चार पैसे मिळतात, पण पैशांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान मोठं असतं.
ते पुढे सांगतात, "एक खोळ तीस रुपयाला विकतो. त्यातून चार पैसे मिळतात. पण त्यापेक्षा मोठं समाधान म्हणजे वारकऱ्यांची सेवा करता येते, वारीही घडते आणि उदरनिर्वाहालाही हातभार लागतो. एवढंच आमच्यासाठी मोठं समाधान हाय."
‘’बारा वर्ष झाली दिंडीच्या वाटेवर चपला शिवायचं काम करतोय…’’
लाखो पावलांनी चालणाऱ्या या वारीत हजारो लोकांच्या चपला तुटतात, पायाला फोड येतात. अशा वेळी महामार्गावर किंवा गावाबाहेर चप्पल शिवणारं दुकान शोधणं निव्वळ अशक्य असतं. अशा प्रसंगी वारकऱ्यांसाठी देवदूतासारखे धावून येतात धनाजी पवार... गेली १०-१२ वर्षे धनाजी माऊलींच्या दिंडीसोबत फिरत आहेत. त्यांनी आपल्या पिशवीत चप्पल शिवण्याचे साहित्य, सुई-दोरा, बॅगेच्या चैनी आणि कपाळावर लावायचे गंधाचे शिक्के ठेवलेले असतात. धनाजी पवार सांगतात,
"मला आता दहा-बारा वर्षं झाली, दिंडीच्या वाटेवर चपला शिवायचं काम करतोय. त्याचबरोबर कपाळावर लावायच्या गंधाच्या शिक्क्याही विकतो. हे सगळं सामान पोतगाडीत टाकायचं आणि वारीसोबत पंढरपूरपर्यंत निघायचं."

वारीच्या वाटेवर चालताना कोणाची चप्पल तुटली किंवा महिलांच्या बॅगची चैन खराब झाली की लोक कासावीस होऊन धनाजी पवार यांच्याकडे येतात. ते सांगतात,
"रस्त्यात अशी सोय कुठं मिळत नाही. मग माउली, माउली करत लोक माझ्याकडे येतात. जे जमेल तेवढं लगेच करून देतो. चार पैसे मिळतात हे खरं, पण त्यापेक्षा वारकऱ्यांची सेवा करता येते, हेच मोठं समाधान आहे. माउलींचा आशीर्वाद मिळतो. म्हणूनच मी दरवर्षी पंढरपूरपर्यंत वारीसोबत हे काम करत जातो."
पंढरपूरची वारी हे केवळ अध्यात्माचे व्यासपीठ नाही, तर ते ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक सक्षमीकरणाचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कॉर्पोरेट जगतातील मोठ्या जाहिराती किंवा विपणन डावपेच नसतानाही, केवळ श्रद्धेच्या आणि परंपरेच्या जोरावर एवढी मोठी बाजारपेठ दरवर्षी स्वयंचलित पद्धतीने उभी राहते, हे भारतीय संस्कृतीचे आणि अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. या अर्थकारणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्णपणे विकेंद्रीत आहे. यात मिळणारा नफा हा कोणत्याही एका मोठ्या मॉल किंवा कंपनीच्या खात्यात जमा न होता, तो समाजाच्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत, म्हणजेच चहाची टपरी चालवणारा, शेतात भाजी पिकवणारा शेतकरी, टाळ घडवणारा कारागीर आणि बस चालवणारे चालक यांच्यापर्यंत समप्रमाणात पोहोचतो. वारीच्या या आर्थिक चक्रामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या हातात पैसा येतो. त्यामुळे त्यांची खरेदी क्षमता वाढते आणि पर्यायाने राज्याच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाला गती मिळते.
‘’बॅगा दुरुस्त करून वारकरी सेवा करतो याचा अभिमान…’’
पुण्यात नोकरी करणारे रमेश जाधव सांगतात, "मी पुण्यामध्येच नोकरी करत होतो. पण एक दिवस तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गेलो, तिथं बघितलं की कोण चपला शिवतंय, कोण बॅगा शिवतंय. आमच्या घरीही हाच धंदा होता. मी ठरवलं की आपल्यालाही हे काम येतंय, मग आपण का मागे राहायचं? तेव्हापासून मी हे काम करतोय."
विशेष म्हणजे रमेश जाधव केवळ धंदा करत नाहीत, तर दररोज कित्येक वारकऱ्यांना मोफत सेवा देतात. "दिवसात वीस-पंचवीस माऊलींना मी फुकट चैन बसवून देतो. एका चैनचे फक्त दहा रुपये घेतो. ही एक प्रकारची माऊलींची सेवाच आहे. वारीमध्ये हे काम करायला मला मनापासून आनंद होतो," असे रमेश जाधव अभिमानाने सांगतात.

दिंडी म्हणजे फिरतं अर्थव्यवस्थेचं गाव
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शेकडो तात्पुरती दुकानं, राहुट्या आणि स्टॉल्स उभारले होते. या दुकानांमध्ये खेळणी, महिलांचे दागिने, कटलरीचे सामान, धार्मिक पुस्तके, संतांच्या प्रतिमा आणि विविध प्रकारच्या घरगुती वस्तू विकल्या जात होत्या. हे छोटे विक्रेते पालखीसोबत किंवा पालखीच्या पुढे-पुढे प्रवास करतात. यामुळे एकाच विक्रेत्याला वेगवेगळ्या गावांमध्ये सलग अनेक दिवस मोठी ग्राहकसंख्या मिळते. वारीच्या काळात पंढरपूर आणि वारी मार्गावर प्लास्टिक ताडपत्री, राहुट्यांचे साहित्य, बांबू आणि दोऱ्यांची विक्री करणाऱ्यांना मोठी मागणी असते. हा रोजगार थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत असल्याने याला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आर्थिक विकास म्हणता येऊ शकेल.
वारीच्या निमित्ताने काही विशिष्ट प्रकारच्या बाजारपेठांमध्ये जी आर्थिक उलाढाल होते, ती थक्क करणारी आहे. वारकरी संस्कृतीचा एक विशिष्ट पोषाख आहे. पुरुष वारकरी प्रामुख्याने पांढरे धोतर, सदरा आणि गांधी टोपी किंवा फेटा परिधान करतात तर महिला वारकरी नऊवारी किंवा सहावारी साडी आणि उपरणं परिधान करतात. वारी सुरू होण्यापूर्वी आणि वारीच्या काळात कपड्यांच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची खरेदी-विक्री होते. यासोबतच वारीच्या काळात टाळ, मृदंग, पखवाज आणि वीणा यांना मोठी मागणी असते.
छ. संभाजी नगर येथील मृदुंग कारागिर शरद तौर यांनी ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगितलं की,
‘’आषाढी वारी हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर यामुळे पारंपरिक कारागिरांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो. आमची वर्षभराची कमाई एकाबाजूला आणि आषाढीची खरेदी एका बाजूला असते. टाळ, मृदंग, पखवाज आणि वीणा हे साहित्य तयार करणारे कारागीर प्रामुख्याने ग्रामीण भागात असतात. वारीच्या निमित्ताने त्यांच्या पारंपरिक कौशल्याला मोठा आर्थिक मोबदला मिळतो.’’
धान्यापासून प्रसादापर्यंत बाजारपेठेचा विस्तार
दुसरीकडे, वारीमध्ये हजारो दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीत पन्नासपासून ते अगदी हजारापर्यंत वारकरी असतात. या सर्व वारकऱ्यांच्या सकाळच्या चहा-नाश्त्यापासून ते दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था दिंडी प्रमुखांमार्फत केली जाते. ‘बाईमाणूस’शी बोलताना दिंडी संचालक संतोष शेलार यांनी सांगितलं की, यासाठी लागणारे अन्नधान्य, गहू, तांदूळ, विविध डाळी, तेल, तूप, मसाले, साखर आणि चहापत्ती यांची खरेदी महिनाभर आधीपासूनच घाऊक बाजारपेठांमधून सुरू होते. पुणे, मुंबई, लातूर, वाशी आणि सोलापूर, अहिल्यानगरसारख्या मोठ्या बाजारपेठांमधून दिंड्यांसाठी लाखो टन अन्नधान्याची खरेदी केली जाते. त्यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादनांना मोठी मागणी मिळते.’’

ते पुढे म्हणाले की, ‘’जेव्हा लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात, तेव्हा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि घरी परतताना नातेवाइकांसाठी प्रसाद म्हणून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. पंढरपूरचे पेढे, बुक्का, कुंकू, अष्टगंध, तुळशीच्या माळा, अगरबत्ती, कापूर आणि नारळ यांची विक्री करणाऱ्या हजारो दुकानांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. तसेच राजगिरा लाडू, चिक्की आणि सुकामेवा यांसारख्या उपवासाच्या पदार्थांनाही या काळात प्रचंड मागणी असते.’’
लाखो लोकांना त्यांच्या गावापासून आळंदी-देहू किंवा थेट पंढरपूरपर्यंत आणणे आणि वारी संपल्यानंतर पुन्हा सुरक्षितपणे घरी पोहोचवणे, हे वाहतूक क्षेत्रासाठी एक अवाढव्य आव्हान आणि तितकीच मोठी आर्थिक संधी असते. यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एसटी महामंडळ दरवर्षी आषाढी वारीसाठी हजारो विशेष बसेस सोडते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या बस वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला येतात.
या वारी विशेष बसेसच्या माध्यमातून महामंडळाला शेकडो कोटी रुपयांचा महसूल मिळतो. सरकारी वाहतुकीसोबतच खासगी वाहतूक क्षेत्रालाही या काळात सुवर्णकाळ येतो. प्रत्येक दिंडीचे स्वतःचे सामान, स्वयंपाकाची भांडी, राहुट्या आणि वृद्ध वारकऱ्यांना वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक्स, टेम्पो आणि खासगी ट्रॅव्हल्स गाड्या भाड्याने घेतल्या जातात. साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांसाठी ही वाहने आरक्षित केली जातात. यामुळे वाहन चालक, मालक आणि इंधन कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. वारीच्या काळात इंधनाचा वापर लक्षणीयरीत्या वाढतो. त्यामुळे शासनाला कराच्या रूपात मोठा महसूल मिळतो.
पंढरपूर : काही दिवसांचं आर्थिक राजधानीत रूपांतर
पालखी सोहळा जेव्हा पंढरपूर शहरात प्रवेश करतो, तेव्हा पंढरपूर हे महाराष्ट्राचे आर्थिक केंद्रबिंदू बनतं. अवघ्या काही लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात एकाच वेळी पंधरा ते वीस लाख लोक एकत्र येतात. या अभूतपूर्व गर्दीमुळे पंढरपूरमधील सेवा क्षेत्राला प्रचंड मोठी गती मिळते. पंढरपूरमधील शेकडो मठाधिपती, धर्मशाळा, हॉटेल्स, लॉजेस आणि अगदी स्थानिक नागरिकसुद्धा आपल्या घरांची दालने वारकऱ्यांसाठी खुली करतात. राहण्याची व्यवस्था आणि तात्पुरता मुक्काम या माध्यमातून स्थानिक घरमालकांना आणि लॉजिंग व्यावसायिकांना मोठी आर्थिक प्राप्ती होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आल्यामुळे दूरसंचार कंपन्यांना तात्पुरते मोबाईल टॉवर्स उभे करावे लागतात. या काळात मोबाईल रिचार्ज, डेटा वापर आणि कॉलिंगचे प्रमाण प्रचंड वाढते. तसेच, अलीकडच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर ग्रामीण भागातही वाढल्यामुळे वारीच्या मार्गावर आणि पंढरपुरात कोट्यवधी रुपयांचे डिजिटल व्यवहार होतात. बँकिंग क्षेत्रासाठी ही एक मोठी उलाढाल असते.

वारीमध्ये चालणाऱ्या दिंड्यांमध्ये आणि पंढरपुरात लाखो लोकांसाठी चहा, कॉफी आणि दुधाचे पदार्थ तयार केले जातात. यासाठी दररोज लाखो लीटर दुधाची आवश्यकता असते. वारी मार्गावरील स्थानिक दूध डेऱ्या, सहकारी संस्था आणि वैयक्तिक शेतकरी यांच्याकडून हे दूध खरेदी केले जाते. पालखी सोहळ्यात रथाच्या पुढे चालणारे अश्व आणि रथ ओढणारे बैल यांच्या देखभालीसाठी आणि त्यांच्या खाद्यासाठी मोठी खरेदी केली जाते. यामुळे पशुधन क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यवसायांनाही थेट आर्थिक लाभ होतो.
भक्ती, बाजारपेठ आणि ग्रामीण विकासाचा अनोखा संगम
वारीचे अर्थकारण हे केवळ खासगी नफा आणि व्यापारापुरते मर्यादित नाही, तर यामध्ये शासनाचा आणि प्रशासनाचाही मोठा सहभाग असतो. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका वारीच्या नियोजनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करतात. या निधीचा वापर रस्ते दुरुस्ती, तात्पुरते आरोग्य केंद्र उभारणे, औषध पुरवठा, फिरती शौचालये, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी केला जातो. सरकारच्या या खर्चामुळे विविध कंत्राटदार, मजूर आणि साहित्य पुरवठादारांना कामे मिळतात. म्हणजेच, शासकीय पैसा पुन्हा फिरून बाजारपेठेत येतो आणि अर्थव्यवस्थेला गती देतो.
पंढरपूरात विठ्ठलाचं दर्शन घेऊन वारकरी परतीच्या वाटेला लागतात, तसं तात्पुरती उभी राहिलेली ही बाजारपेठही हळूहळू गुंडाळली जाते. खोळ विकणाऱ्या सायकली पुन्हा गावाकडे वळतात, चप्पल शिवणाऱ्यांच्या पेट्या बंद होतात, चहाच्या टपऱ्यांवरची गर्दी ओसरते, दिंड्यांचे ट्रक परत निघतात. पण या काही दिवसांत हजारो छोट्या व्यवहारांतून, लाखो हातांच्या श्रमांतून आणि असंख्य कुटुंबांच्या उदरनिर्वाहातून फिरलेलं अर्थचक्र ग्रामीण महाराष्ट्रात नवी ऊर्जा सोडून जातं. म्हणूनच वारीचा अभ्यास केवळ भक्तीपरंपरेचा म्हणून नव्हे, तर लोकांच्या श्रमांवर उभ्या राहिलेल्या, समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या एका जिवंत आणि समावेशक अर्थव्यवस्थेचा म्हणूनही व्हायला हवा. विठ्ठलाच्या दिशेने चालणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर इथे आशा, रोजगार आणि अर्थकारणही चालत असतं आणि कदाचित हीच वारीची सर्वांत मोठी सामाजिक ताकद आहे.






