शंतनू खुजे
- हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेने ग्रामस्थांचे जीवन भयभीत केले आहे.
- हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर, हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ या चार तालुक्यांत मागील सहा वर्षांमध्ये ३० सौम्य धक्के बसले आहेत. यातील चार धक्के हे ४.४ ते ४.७ रिश्टर स्केलचे आहेत.
- भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये पसरलेली भीती, भेगा पडलेली घरं तसेच मदत, पुनर्वसन योजना आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता या सर्व मुद्द्यांचा आढावा घेणारा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट…
तारीख ११ एप्रिल, ठिकाण हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे गाव, सकाळचे पाऊणे नऊ वाजले आणि अचानक भूकंपाचा धक्का बसला, ज्याची तीव्रता होती ४.७ रिश्टर स्केल…ह्या धक्क्यामुळे गावातील काही मातीच्या घरांची पडझड देखील झाली.
त्यादिवशीचं वर्णन करतांना ४५ वर्षीय शारदा शिंदे सांगतात की,
"भूकंप झाला तेव्हा मी पोळ्या टाकत होते. पोळ्या टाकता टाकताच अचानक भूकंप झाला. आमच्या घराच्या भिंतीची मातीची ढेकळं खाली पडू लागली, भिंतीला तडे गेले आणि भेगा पडल्या. त्या वेळेत लेकरंही खूप घाबरली आणि सगळेच जण रस्त्याकडे पळाले. सगळे अगदी घाबरून गेले होते. घरात साधं उभं राहायलाही जमत नव्हतं, सगळी भांडी खाली पडली, भरण्या पडल्या, पिठाचे डबे पडले. आम्ही एवढे घाबरून गेलो होतो की, आमचा अगदी जीवच घाबराघुबरा झाला."
असाच काहीसा अनुभव त्या दिवशी सुनीता शिंदे यांना आला. ११ एप्रिलला भूकंपाचा धक्का बसला तेव्हा त्या देखील स्वयंपाक करत होत्या. त्या सांगतात की,
"मी स्वयंपाकाला लागले होते, अन् तेवढ्यात अचानक भूकंप झाला. घरात लय माती खाली पडली, ती नंतर झाडून काढली. आम्हाला लय भीती वाटली अन् आम्ही सगळे तडक घराबाहेर पडलो. हा भूकंपाचा धक्का बराच वेळ जाणवत होता... सगळं असं अचानकच घडलं."
पण ही पहिलीचं वेळ नाही की गावात भूकंपाचा धक्का बसलाय. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेने ग्रामस्थांचे जीवन भयभीत केले आहे. असं सगळं असतांना सततच्या भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये पसरलेली भीती, भेगा पडलेली घरं तसेच मदत, पुनर्वसन योजना आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता या सर्व मुद्द्यांचा आढावा घेणारा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट…
मागील नऊ वर्षांपासून सुरु आहे भूकंपाची मालिका…
हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर, हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ या चार तालुक्यांत मागील सहा वर्षांमध्ये ३० सौम्य धक्के बसले आहेत. यातील चार धक्के हे ४.४ ते ४.७ रिश्टर स्केलचे आहेत. भूकंपाच्या या धक्क्यांमुळे ५०० ते १००० टीएनटी ऊर्जा निर्माण झाली.

अलीकडेच ११ एप्रिल रोजी सकाळी ८:४५ वाजता ४.७ रिश्टर स्केलचा जोरदार धक्का बसल्याने गाव पुन्हा हादरले. या धक्क्यामुळे अनेक कच्च्या घरांच्या भिंतींना तडे गेले, तर काही ठिकाणी भिंती कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या हादऱ्यामुळे घरातील पत्रे थरथरले, भांडी जमिनीवर पडली आणि नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. या परिसरात २०१७ पासून आजपर्यंत २० हून अधिक सौम्य ते मध्यम तीव्रतेचे भूकंप नोंदवले गेले आहेत. त्यापैकी काही धक्के ४.५ ते ४.७ रिश्टर स्केलपर्यंत पोहोचले आहेत.
गेल्या ९ वर्षांपासून होत असलेल्या भूकंपाबाबत अमोल शिंदे सांगतात की,
“२०१७ पासून ते आजपर्यंत जवळपास २०० ते २५० वेळा भूकंपाचे धक्के गावाला जाणवलेले आहेत. पण शासन दरबारी यापैकी फक्त ४० भूकंपाची नोंद झाली. शिंदे हे पांगरा शिंदे ग्रामपंचायत मध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहे.”
पूढे ते सांगतात की , “२०१७ ला भूकंप व्हायचा तेव्हा नेमका असा थोडासा जाणवायचा, म्हणजे विहिरीमध्ये ब्लास्टिंग होते तसं. पण ती दिवसेंदिवस तीव्रता वाढत वाढत आता ४.७ पर्यंत गेलेली आहे, त्यामुळे गावातील नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे.”
भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण…
सततच्या भूकंपामुळे आणि त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये आणि लहान लेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घरातील पुरुष शेतीच्या किंवा इतर कामानिमित्त घराबाहेर असतात, त्यामुळे महिला अनेकदा घरात एकट्या असतात.
"घराघरात लहान लेकरं-बाळं अन् म्हातारी माणसं असतात. तरुण बाया, माणसं कामाला शेतात जातात, त्यामुळे घरी कुणीच नसतं. आता पुन्हा जर असा भूकंप झाला, तर या म्हाताऱ्या माणसांना आणि लहान लेकरांना घेऊन कुठे जायचं..? मागच्या भूकंपाच्या वेळी आमच्या घरात बाळंतीण बाई, पाच-सहा महिन्याचं बाळ अन् दोन लहान लेकरं होती. त्यामुळे मग आता याची खूप भीती वाटायला लागलीये, असं ४० वर्षीय सीमा शिंदे बाईमाणूसशी बोलतांना सांगतात.”
(सीमा शिंदे (Photo Credit - अविनाश गवळी))
अशीच काहीशी भीती अशोक शिंदे व्यक्त करतात, त्यांच्या मते या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता वाढत चालल्यामुळे मोठ्या भूकंपाची शक्यता नाकारत येत नाही.
"आता या भूकंपाची तीव्रता वरच्यावर वाढत चाललीये. एखाद्या वेळेस मोठा भूकंप झाला, तर काय होईल हे सांगता येत नाही. किल्लारीसारखा भूकंप झाला तर काय करायचं? पूर्ण नायनाटच होईल. अशी मोठी भीती आता प्रत्येक शेतकऱ्याच्या अन् गावकऱ्याच्या मनात निर्माण झाली आहे."
११ एप्रिलच्या सकाळी जेव्हा भूकंपाचा धक्का बसला तेव्हा लहान मुलं शाळेत पेपर सोडवत होती, पण अचानक भूकंपाचा धक्का बसल्याने मुलांची पळापळ झाली.
"त्या दिवशी जेव्हा भूकंप झाला, तेव्हा लेकरं शाळेत होती. धक्के बसताच लेकरं पेपर अर्धवट सोडून आरडत-ओरडत शाळेबाहेर पळाली. विचार करा, तो प्रसंग किती अवघड असेल. शाळेची इमारत खूप जुनी आहे. नुकत्याच दोन-तीन नवीन खोल्या बांधल्यात, पण बाकीची शाळा अजून बांधायचीच आहे. आता तर शाळेच्या जुन्या खोल्यांनाही तडे गेलेत आणि वर फक्त पत्र्याचं छत आहे. तिथली परिस्थिती खरंच खूप भयंकर आहे, असं अशोक शिंदे म्हणाले.”
दिवाळीच्या दिवशीच झाला होता भूकंप…
१८ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशीच गावाला भूकंपाचा धक्का बसला होता. यादिवशी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी भूगर्भातून मोठा आवाज झाला. याच वेळी वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्यांमध्येही तीव्र धक्के जाणवले होते.
त्या दिवशी काय घडलं यांचं वर्णन करतांना ४३ वर्षीय प्रमोद शिंदे सांगतात,
"दिवाळी म्हणजे केवढा मोठा सण, हे तुम्हाला माहितीच आहे. गावातल्या लेकी-बाळी या सणासाठी माहेरी आलेल्या असतात. पण नेमक्या याच दिवाळीच्या दिवशी असा काही दणकन भूकंप झाला की, गावातल्या सगळ्या महिला प्रचंड घाबरल्या. दन-दन-दन असा आवाज करत जमीन हादरली. तेव्हापासून गावात थोडं भीतीचं वातावरण पसरलंय. तिथून पुढे मग एक-दोन दिवसांआड, कधी पाच-सहा दिवसांआड असे सतत जमिनीला धक्के बसत आहेत आणि जमीन हादरत आहे."
या दिवसचा असाच काहीसा अनुभव ६५ वर्षीय बाळासाहेब शिंदे यांचा आहे, ते म्हणाले,
"दिवाळीच्या सणाला आम्ही आमच्या नातवंडांना इथे पांगरा शिंदेला आणलं होतं. पण नेमका तेव्हाच भूकंप झाला. ते धक्के बसल्यावर लेकरं एवढी घाबरली की त्यांनी हट्टच धरला, 'आम्ही इथे राहणार नाही, आम्हाला आमच्या गावी नेऊन सोडा.' भूकंपाच्या त्या भीतीमुळे, नाईलाजाने आम्हाला त्यांना ताबडतोब त्यांच्या गावी परत नेऊन सोडावं लागलं."
(बाळासाहेब शिंदे (Photo Credit - अविनाश गवळी))
गावकरी म्हणतात, आता भूकंपाची भीती वाटतं नाही….
गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या भूकंपाच्या घटनांमुळे आता गावातील लोकांना यांची सवय झाली आहे. ते म्हणतात की आता अश्या भूकंपाच्या घटनांची आधीसारखी भीती वाटत नाही.
"आता आम्हाला या भूकंपाची सवयच झालीय. पूर्वी जेव्हा पहिल्यांदा भूकंप झाला होता, तेव्हा जरासा जरी हादरा बसला तरी आम्ही जीव मुठीत धरून घराबाहेर पळायचो. पण आता तसं कोणीच बाहेर निघत नाही. आता जे होईल ते होईल, अशीच गावकऱ्यांची भावना झालीय. आधी लोक खूप घाबरायचे, पण हे धक्के आता नेहमीचेच झाल्यामुळे आम्हाला त्याची सवय लागलीये, आता कुणालाच तेवढी भीती वाटत नाही." असं बाळासाहेब शिंदे म्हणतात.
गावातील मातीच्या घरांना भूकंपाचा धोका अधिक….
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर या गावाला असणारा सर्वात मोठा आणि गंभीर धोका इथल्या जुन्या मातीच्या घरांमुळे निर्माण झाला आहे. गावात आजही ३५ ते ४० टक्के घरे ही मातीची असून, त्यापैकी अनेक जुन्या माड्या आणि चिरेबंदी वाडे तब्बल दोनशे ते तीनशे वर्षे जुने आहेत. केवळ १० टक्के गावकऱ्यांनीच काँक्रीटची नवीन पक्की घरे बांधली आहेत, त्यामुळे बहुतांश गाव आजही या धोकादायक स्थितीत जगत आहे.
नुकत्याच बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्यानेच या मातीच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या भिंतींना गंभीर तडे गेले आहेत, तर एक-दोन मातीची घरे आधीच कोसळली आहेत. साध्या धक्क्याने जर ही अवस्था होत असेल, तर भविष्यात अधिक क्षमतेचा मोठा भूकंप आला, तर ही जुनी घरं कोसळतील अशी भीती ग्रामस्थांना आहे.
(भूकंपाच्या धक्क्यामुळे पडलेलं घर (Photo Credit - अविनाश गवळी))
आमची घरं मातीची असल्यामुळे आम्हाला भूकंपाचा धोका जास्त आहे, अशी भीती घरकाम करणाऱ्या सीमा शिंदे व्यक्त करतात, त्या म्हणतात की,
“घरवरच्या पत्र्याला आधार म्हणून छपरावर मोठे-मोठे दगड ठेवलेले असतात. एखाद्या वेळी जर असाच मोठा धक्का बसला, तर हे मातीचं घर नक्कीच कोसळू शकतं. याआधीही आमचं घर दोनदा पडलं होतं, पण तेव्हा आम्ही ते मातीने पुन्हा सारवून लिंपून घेतलं, त्यामुळे त्याचं तेवढं काही वाटलं नाही. पण आता असेच नेहमी मोठे-मोठे भूकंप होत राहिले, तर इथून पुढे आम्हाला जिवाची भीती वाटणारच ना."
"सध्याच्या भूकंपाच्या धक्क्यांनी एवढे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी असते. पण जर भूकंपाची तीव्रता ५ च्या पुढे गेली, तर या मातीच्या आणि लाकूड-फाट्याच्या जुन्या घरांना १००% धोका आहे." असं निरीक्षण डॉ. भगवान बी. घुटे नोंदवतात. ते हिंगोलीच्या सेनगाव तोष्णीवाल महाविद्यालयात भूगर्भशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
नवीन बांधकामाबाबत ग्रामस्थ गोंधळात…
सततच्या भूकंपांमुळे केवळ जुन्या घरांनाच धोका नाही, तर नवीन बांधकाम करायलाही गावकरी आता घाबरत आहेत. भविष्यातील नुकसानीच्या याच भीतीमुळे घरांची कामे रखडली असल्याचं ५६ वर्षीय श्रीरंग शिंदे सांगतात. ते म्हणाले की,
"आता पांगरा शिंदे गावामध्ये भूकंप होत असल्यामुळे बऱ्याचशा लोकांची घरकुलं बांधायची राहिली आहेत. माझी पण तीच परिस्थिती आहे. मला स्वतः घराचा दुसरा मजला चढवायचा आहे, पण या भूकंपाच्या भीतीमुळं मी सध्या गोंधळात पडलोय की बांधकाम करावे की नाही. जर दुसरा मजला काढला आणि त्याला हादरे बसून तडे गेले किंवा तो कोसळला तर काय? अशी मोठी भीती आता मनामध्ये निर्माण झालेली आहे."
(बांधकाम अर्धवट असलेली घरं (Photo Credit - अविनाश गवळी))
भूकंपाच्या धक्क्यामुळे भूजल पातळीवरही परिणाम…?
भूकंपाच्या या सततच्या धक्क्यांमुळे पांगरा गावात केवळ घरांचेच नुकसान झालेले नाही, तर जमिनीखालच्या भूजल पातळीतही बदल पाहायला मिळतोय. याचा फटका इथल्या शेतकऱ्यांना कसा बसलाय, याबद्दल सांगताना प्रमोद शिंदे म्हणतात...
"ज्यांच्या विहिरीला आणि बोअरवेलला पूर्वी पाणी नव्हतं, त्यांना आता अचानक पाणी आलंय. पण ज्यांच्या बोअरवेलला आधी भरपूर पाणी होतं, त्यांचं पाणी आता अचानक निघून गेलंय. पांगरा गावात सध्या अशीच काहीशी विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे."
गावातील काही विहिरींना अचानक पाणी येणे आणि काहींचे पाणी आटणे, या गावकऱ्यांच्या दाव्याला भूगर्भशास्त्रज्ञांनीही दुजोरा दिला आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे जमिनीखालील पाणीसाठ्यांच्या रचनेत बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
"भूकंपामुळे जमीन हादरल्यानंतर जमिनीखालील पोअर स्पेसेस म्हणजेच पाणी साचून राहण्याच्या रिकाम्या जागांवर परिणाम होतो. या धक्क्यांमुळे काही पोअर स्पेसेस बंद होतात, तर काही नव्याने उघडतात. याच प्रक्रियेमुळे एखाद्या बोअरवेलचे किंवा विहिरीचे पाणी थोडेफार कमी-जास्त होऊ शकते, पण यात एकदम खूप मोठा फरक पडत नाही, असं मत डॉ. भगवान घुटे यांचं आहे.
"जमिनीखाली जेव्हा मोठा ताण जमा होतो, तेव्हा जिथे भूजल साठलेले असते भेगा रुंदावू शकतात. या भूगर्भीय हालचालींमुळे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पाण्याचे वहन होऊ शकते. याच शास्त्रीय कारणामुळे पांगरा गावात काही विहिरींना किंवा बोअरवेलला अचानक पाणी आल्याचे, तर काहींचे पाणी अचानक गेल्याचे प्रकार घडले असावेत."
असा अंदाज टी. विजय कुमार वर्तवतात. ते नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भूमापक केंद्रात केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
३०३ नुकसानग्रस्त घरांचे अहवाल तहसीलकडे सुपूर्द..
पांगरा शिंदे गावात एकूण ९१५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करण्याच्या प्रशासनाच्या सूचनेनुसार, ग्रामपंचायतीने गावकऱ्यांकडून नुकसानीचे तपशील मागवले होते. ज्यांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत किंवा घरांना तडे गेले आहेत, अशा ग्रामस्थांना आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि घराचा फोटो जमा करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत मध्ये लिपिक म्हणून कार्यरत असलेले अमोल शिंदे यांनी बाईमाणूसला दिली.
या आवाहनानुसार ग्रामपंचायतीकडे एकूण ३०३ नुकसानग्रस्त घरांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, यापैकी दोन घरे पूर्णपणे कोसळली आहेत, तर उर्वरित ३०१ घरांच्या भिंतींना कमी-अधिक प्रमाणात तडे गेले आहेत. ग्रामपंचायतीने हे सर्व ३०३ अर्ज आणि नुकसानीचा प्राथमिक अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तहसील प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे.
(राहुल गुप्ता, (जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हिंगोली))
गावातील लोकांना प्रशिक्षण देणार - आयएएस राहुल गुप्ता
भूकंपामुळे गावावर उद्भवलेली परिस्थिती आणि एकूणच यावर काय उपाययोजना असू शकतात याबाबत आम्ही हिंगोलीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांच्याशी चर्चा केली.
गावातील मातीच्या घरांच्या रचनेबाबत आम्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर मर्कल्ली स्केलच्या माध्यमातून भूकंपाच्या तीव्रतेचे मोजमाप करून डेटा देखील गोळा करतोय, जेणेकरून भविष्यातील संशोधनसाठी उपयुक्त ठरेल. सोबतच भूकंपासाठीच्या आपत्कालीन परिस्थितीत ओढवली तर काय करावे, याबाबतही आम्ही गावातील लोकांना प्रशिक्षण देणार असल्याचं त्यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितलं.
प्राथमिक सर्वेक्षणात हिंगोली परिसरात दिसून आले दोन फॉल्ट्स…
पांगरा शिंदे आणि हिंगोली परिसरात सातत्याने बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमागे नेमके काय कारण आहे? यावर भूगर्भशास्त्रज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं. दख्खनच्या पठारावरील कडक बेसॉल्ट खडक आणि त्याखालील जुन्या भेगांमध्ये होणारी हालचाल या भूकंपांना कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
"आपला महाराष्ट्र आणि मराठवाडा हा दख्खनच्या पठारावर वसलेला आहे. येथील बेसॉल्ट खडक अत्यंत कडक आहे आणि या बेसॉल्टच्या खाली ग्रॅनाईटचा मोठा थर आहे. फार जुन्या काळात या भागात एखादा फॉल्ट असावा आणि आता त्याचे रिॲक्टिव्हेशन झाल्यामुळेच आपल्याला हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत." असं निरीक्षण प्राध्यापक डॉ. भगवान घुटे नोंदवलं.
याबाबत असंच काहीस मत भूगर्भशास्त्रज्ञ टी. विजय कुमार यांचं आहे, ते म्हणतात की,
"आपण ज्या जमिनीवर आहोत, तो बेसॉल्ट खडक तब्बल ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. पण त्याच्याही खाली २.५ अब्ज वर्षे जुना ग्रॅनाईट्सचा खडक आहे. इतक्या खोलवर जमिनीखाली नेमके काय घडतेय, हे सध्या तरी लपलेले आहे. मात्र, आमच्या प्राथमिक सर्वेक्षणात हिंगोली परिसरात दोन फॉल्ट्स दिसून आले आहेत. आता अधिक सविस्तर सर्वेक्षणानंतरच इथे आणखी मल्टिपल फॉल्ट्स आहेत का, हे स्पष्ट होईल."
सध्या गावातील ग्रामस्थ सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे दहशतीखाली जगत आहेत. या संकटकाळात त्यांची शासनाकडून एकच प्रमुख आशा आहे ती म्हणजे, केवळ आश्वासने आणि भेटी न देता गावात तातडीने काहीतरी पूर्वसूचना देणारी यंत्रणा बसवावी, जेणेकरून संभाव्य मोठ्या धोक्यापूर्वी महिला व बालकांना सुरक्षित स्थळी हलवता येईल.
तसेच, गावातील बहुतांश घरे मातीची असून त्यांना तडे गेले असल्याने, शासनाने तातडीने नुकसानभरपाई आणि भूकंपरोधक पक्की घरे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत द्यावी. नैसर्गिक आपत्ती म्हणून सरकारने हात झटकण्यापेक्षा आमच्या जिवाची व सुरक्षिततेची प्रत्यक्ष जबाबदारी घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, हीच या गावकऱ्यांची अपेक्षा आहे.






