रितेश शिसोदे
- सलग दोन मोहिमांच्या अपयशामुळे पीएसएलव्ही कार्यक्रम संकटात
- मोहिमांच्या अपयशामागे बाह्य शक्तींच्या घातपाताचा संशय
- अजित डोवाल यांची विक्रम साराभाई केंद्राला गुप्त भेट
भारताचा सर्वात विश्वासार्ह मानला जाणारा ‘पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल’ (PSLV) कार्यक्रम सध्या संकटात सापडला आहे. आतापर्यंतच्या सुमारे 60 मोहिमांपैकी 90 टक्क्यांहून अधिक मोहिमा यशस्वी ठरल्या आहेत. मात्र सलग दोन मोहिमांमध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे याबाबत वैज्ञानिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर विविध तर्कवितर्क लावले जात असतानाच, बाह्य शक्तींनी यात घातपात केल्याचा दावाही अनेकांकडून केला जातोय, असे असले तरीही या दाव्यांची अद्याप पडताळणी किंवा पुष्टी झालेली नाही.
या संदर्भातील चर्चांना उधाण आले असतांनाच, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केरळच्या तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला अत्यंत गुप्त पद्धतीने भेट दिली. या ठिकाणी भारताच्या प्रक्षेपण वाहनांचे मुख्य इंटिग्रेशनवर काम केले जाते.
पीएसएलव्हीमध्येमध्ये सलग दोनदा बिघाड
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पीएसएलव्हीच्या मदतीने नेहमीच अविश्वसनीय असे यश संपादीत केले आहे, म्हणूनच याला भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा वर्कहॉर्स म्हटले जाते. मात्र, अलीकडील मोहिमांमध्ये गंभीर टप्प्यांवर तांत्रिक त्रुटी आढळल्या, ज्यामुळे इस्रोला अंतर्गत आढावा घेणे भाग पडले आहे. इस्रोने अद्याप या घटनांना सार्वजनिकरित्या अपयश म्हणून घोषित केलेले नाही, तर त्याऐवजी त्यांनी मिशन डेव्हिएशन म्हणजेच मोहिमेतील तफावत असा शब्दप्रयोग केला आहे.
इस्रो पीएसएलव्ही सी६२ मिशन उपग्रह आणि प्रक्षेपण वाहन. (Image Credit: ISRO)
१८ मे २०२५ रोजी पीएसएलव्ही-सी६१ आणि १२ जानेवारी २०२६ रोजी पीएसएलव्ही-सी६२ या मोहिमांच्या अपयशाने यशाची परंपरा खंडित झाली. पीएसएलव्हीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दोनदा अपयश आले आहे, ज्यामुळे उच्च-स्तरीय राष्ट्रीय सुरक्षा संकट निर्माण झाले आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यात लक्ष घालावे लागले.
पीएसएलव्ही-सी६१ आणि सी६२ च्या बाबतीत नेमके काय घडले?
१८ मे २०२५ रोजी, पीएसएलव्ही-सी६१ मोहीम EOS-09 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आखण्यात आली होती. हा उपग्रह हाय-रिझोल्यूशन अर्थ ऑब्झर्वेशन ऍसेट होता, जो सरकारी वापरासाठी महत्त्वाचा होता. उपलब्ध माहितीनुसार, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याने व्यवस्थित काम केले, लिफ्ट-ऑफ यशस्वी झाले आणि वाहन वातावरणाच्या थराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर इग्निशनच्या वेळी एक त्रुटी आढळून आली.
सी६१ च्या धक्क्यातून सावरत असतानाच, १२ जानेवारी २०२६ रोजी पीएसएलव्ही-सी६२ मोहिमेला त्याच टप्प्यावर पुन्हा तसेच अपयश आले. हे अपयश अधिकच धक्कादायक होते कारण याचे धोरणात्मक आणि व्यावसायिक मूल्य खूप जास्त होते. हे यान डीआरडीओचा 'EOS-N1' (अन्वेषा) हा हायपरस्पेक्ट्रल गुप्तहेर उपग्रह आणि आंतरराष्ट्रीय भागीदार देशांचे पंधरा व्यावसायिक पेलोड घेऊन जात होते.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन आणि इतर वरिष्ठ शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, दुसऱ्या टप्प्यात वापरले जाणारे इंजिन आणि तिसऱ्या टप्प्यातील सॉलिड मोटर्सना पोकळीत पुन्हा सुरू करताना किंवा कामगिरी राखताना आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

घातपाताच्या चर्चेत कितपत सत्यता
सलग दोनदा पीएसएलव्हीला आलेले अपयश दुर्मिळ असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील घातपाताच्या चर्चांना उधाण आले आहे. अंतराळ क्षेत्रात वाढती भू-राजकीय स्पर्धा, मग ती नासा, अमेरिका किंवा चीनशी असो, आणि व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणात भारताचा वाढता वाटा, यामुळे या शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, सुरक्षा तज्ज्ञांनी सावध केले आहे की, अशा जटिल प्रक्षेपण प्रणालींमध्ये तांत्रिक बिघाड होणे सामान्य गोष्ट नाही आणि घातपाताच्या दाव्यांचे समर्थन करणारे कोणतेही फॉरेन्सिक किंवा गुप्तचर पुरावे अद्याप सार्वजनिक झालेले नाहीत. सध्या तरी, घातपाताचा सिद्धांत केवळ एक अंदाज आहे आणि अद्याप अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.
अजित डोवाल यांची साराभाई केंद्राला भेट
एकाच टप्प्यावर आणि लागोपाठ झालेला हा बिघाड पाहता पंतप्रधान कार्यालय आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये आंतरराष्ट्रीय घातपाताची शक्यता असल्याची जोरदार चर्चा झाली. पीएसएलव्ही हे इस्रोचे अनेक वर्षांपासूनचे विश्वासार्ह वाहन असल्याने, त्याच्या गुणवत्तेत झालेली अचानक घसरण ही तांत्रिक नसून द्वेषपूर्ण असू शकते, असा संशय बळावला.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल २२ जानेवारी २०२६ रोजी तिरुवनंतपुरम येथे विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये दोन दिवसांच्या तपासणीसाठी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव ही भेट पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती.
पीएस३ स्टेजच्या निर्मितीमध्ये काही अंतर्गत धोका किंवा बाह्य हस्तक्षेप आहे का, हे तपासण्यासाठी डोवाल यांना पाठवण्यात आले होते. या भेटीदरम्यान, डोवाल यांनी व्हीएसएससीचे संचालक ए. राजराजन आणि इतर प्रमुख उपसंचालकांसोबत या विषयावर गंभीर चर्चा केली.
विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) तिरुवनंतपुरम, केरळ
इस्रोच्या जागतिक पटलावरील प्रतिमेवर काय परिणाम झाला?
लागोपाठच्या अपयशांमुळे इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पीएसएलव्ही-सी६२ मोहिमेमुळे अंदाजे २०० दशलक्ष ते २५० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जरी आंतरराष्ट्रीय पेलोड्सना लॉन्च इन्शुरन्सचे संरक्षण होते, तरीही भागीदार देशांच्या अनेक वर्षांच्या अभियांत्रिकी मेहनतीवर पाणी पडल्यामुळे विश्वासाला तडा गेला आहे.
भविष्यातील पीएसएलव्ही प्रक्षेपणांसाठी विमा कंपन्या प्रीमियममध्ये २०% ते ३०% वाढ करण्याची शक्यता आहे. स्पेसएक्स सारखे स्पर्धक फाल्कन-९ द्वारे कमी खर्चात सेवा देत असल्याने, पीएसएलव्हीचा विमा किंवा प्रक्षेपण खर्च वाढल्यास बाजारातील हिस्सा कायमचा गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.
इस्रोची पुढील उद्दिष्टे काय आहेत?
इस्रोने जून २०२६ मध्ये पुढील पीएसएलव्ही मोहिमेचे लक्ष्य ठेवले आहे. त्रयस्थ संस्थेच्या आढाव्यानंतर आणि तांत्रिक सुधारणांच्या अंमलबजावणीनंतरच ही मोहीम पुढे नेली जाईल. इस्रोने या वर्षासाठी सुमारे अठरा प्रक्षेपणांचे नियोजन केले आहे, ज्यामध्ये सहा खाजगी क्षेत्राच्या सहभागासह असतील. सुदैवाने, घातपाताच्या चर्चा आणि अलीकडील अपयशानंतरही कोणत्याही खाजगी भागीदाराने माघार घेतलेली नाही.






