अप्सरा आगा
- पुण्यात हुंडा आणि कौटुंबिक छळाला कंटाळून तरुण इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केली.
- मृत दीप्ती मगर-चौधरीची सासू गावाची विद्यमान सरपंच असून, सासू-सासरे, पती आणि दीराविरोधात गुन्हा नोंदवला.
- आर्थिक ताण, मानसिक छळ आणि गर्भपातासाठी दबाव यामुळे दीप्तीने २५ जानेवारीला गळफास घेऊन जीवन संपवले.
पुणे जिल्ह्यातील उरुळी-कांचन परिसरात हुंडा आणि कौटुंबिक छळाला कंटाळून एका तरुण इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीप्ती मगर-चौधरी (वय २९) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी सासू-सासऱ्यांसह पती व दीराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दीप्तीची सासू गावाची विद्यमान भाजपच्या सरपंच आहे.
दीप्तीच्या आई हेमलता मगर (वय ५०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. दीप्तीचा विवाह २३ नोव्हेंबर २०२३ रोजी रोहन चौधरी याच्याशी झाला होता. दीप्ती ही उच्चशिक्षित असून खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होती. विवाहावेळी माहेरकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने देण्यात आले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सासरकडील मंडळींकडून पैशांसाठी तगादा सुरू झाला. व्यवसायासाठी आणि आलिशान जीवनशैलीसाठी दीप्तीवर वारंवार दबाव टाकण्यात येत होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
माहेरकडील तक्रारीनुसार, सासरच्यांनी दीप्तीकडून रोख पैशांची तसेच कारसाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. कुटुंबीयांनी अनेकदा समजूत घालण्याचा प्रयत्न केला, आर्थिक मदतही केली; मात्र तरीही छळ थांबला नाही. मानसिक ताण, अपमानास्पद वागणूक आणि सततच्या मागण्यांमुळे दीप्ती प्रचंड तणावाखाली होती.
दरम्यान, दीप्ती गर्भवती असल्याचे समजताच सासरकडील लोकांनी तिच्यावर गर्भपातासाठी दबाव आणल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारांमुळे दीप्ती अधिकच खचली होती. अखेर २५ जानेवारी रोजी रात्री तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेवेळी तिची तीन वर्षांची चिमुकली मुलगी घरातच होती.
या घटनेनंतर दीप्तीच्या कुटुंबीयांनी उरुळी-कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी (सरपंच), सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींची चौकशी केली जात आहे.
हुंडा प्रथा आणि कौटुंबिक छळामुळे अजूनही महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे हे प्रकरण पुन्हा अधोरेखित करते. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेत दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दीप्तीच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना प्रश्न विचारले. तिच्या कुटुंबातील महिला रुपाली चाकणकर यांच्यावर संतापल्याचे दिसून आले. आमच्या मुली स्वस्त झाल्या आहेत का? याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे ना? असं म्हणत महिलांनी चाकणकर यांच्यासमोर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. या वेळी चाकणकर यांनी दीप्तीचे आई वडील यांच्याशीही संवाद साधला.






