शंतनू खुजे
- सैन्यात जाण्याचे स्वप्न पाहणारा साकिब आयपीएलचा स्टार कसा बनला..?
- आईने स्वतःचे दागिने विकून साकिबला घेऊन दिले स्पाइक्स शूज..
- 'टुनू गिरी क्रिकेट अकादमी' ठरली साकिबसाठी टर्निंग पॉईंट
इंडियन प्रीमियर लीगच्या करंडकावर कोरलेले 'यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोति' म्हणजेच जिथे प्रतिभेला संधी मिळते हे संस्कृत वाक्य आता केवळ या स्पर्धेचे ब्रीद राहिलेले नाही तर दररोज कुठला तरी खेळाडू याला प्रत्यक्षात उतरवून दाखवतो.अलीकडेच अश्या संधीचं सोनं करून दाखवलंय मूळचा बिहारच्या गोपालगंजचा आणि सध्या सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून स्पर्धेत खेळत असलेला साकिब हुसेन याने.
१३ एप्रिल २०२६ रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबाद आणि अपराजित असलेल्या राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर करत साकिबने ४ षटकांत अवघ्या २४ धावा देऊन ४ फलंदाजांचा माघारी धाडले.
घरची परिस्थिती हलाकीच्या असूनही एवढ्या मोठ्या स्तरापर्यंत पोहचून आपली प्रतिभा सिद्ध करण्याचा साकिबचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. कधीकाळी आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि पैशांअभावी अनवाणी धावणाऱ्या साकिबचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

…आणि साकिबने पहिल्याच संधीचं सोनं केलं!
आयपीएल २०२६ मधील २१ वा सामना सनरायझर्स हैदराबादसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा होता. या सामन्यापूर्वी हैदराबादच्या गोलंदाजीच्या अनुभवावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राजस्थान रॉयल्स हा संघ या सामन्यापूर्वी सलग चार विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आणि अपराजित होता. अशा बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना सनरायझर्स हैदराबादने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. संघातील हर्षल पटेल आणि जयदेव उनाडकट यांसारख्या अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या गोलंदाजांना विश्रांती देऊन, हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने साकिब हुसेन आणि प्रफुल हिंगे या दोन नवख्या गोलंदाजांना पदार्पणाची संधी दिली.
या निर्णयामागे जोखीम किती मोठी होती, याचा अंदाज यावरून लावता येतो की, या सामन्यापूर्वी हैदराबादच्या गोलंदाजांचा एकूण आयपीएल अनुभव अवघा ५३ सामन्यांचा होता. त्यातही अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी हा ३२ सामन्यांच्या अनुभवासह सर्वात अनुभवी गोलंदाज होता. तरीही, हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी आणि वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक वरुण अॅरॉन यांनी या युवा खेळाडूंवर जो विश्वास दाखवला, तो या दोघांनीही सार्थ ठरवला.
राजस्थानसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध साकिबने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात केवळ ६.०० च्या इकॉनॉमी रेटने २४ धावा दिल्या आणि ४ महत्त्वपूर्ण बळी घेतले. या २१ वर्षीय युवा गोलंदाजाने १४ निर्धाव चेंडू टाकत आपल्या गोलंदाजीवरील नियंत्रणाचे उत्कृष्ट दर्शन घडवले.
साकिबला व्हायचे होते भारतीय सैन्यात भरती
साकिबचा जन्म १४ डिसेंबर २००४ रोजी बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील एका अत्यंत सामान्य कुटुंबात, दरगाह मोहल्ला येथे झाला. त्याचे बालपण अत्यंत हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीत गेले, जिथे पैशांची चणचण हा दैनंदिन जीवनाचा भाग होता.
साकिबचे वडील, अली अहमद हुसेन, हे रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि शेतकरी होते. त्यांना दिवसाला जेमतेम २०० ते ३०० रुपये मजुरी मिळायची. कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या छोट्याशा शेतीवर आणि या तुटपुंज्या मजुरीवर अवलंबून होता. परंतु, या कुटुंबावर एक मोठे संकट तेव्हा कोसळले, जेव्हा त्याच्या वडिलांना गुडघेदुखीचा गंभीर त्रास सुरू झाला आणि त्यांना शेतीची आणि मजुरीची कामे पूर्णपणे सोडावी लागली. साकिब तेव्हा अवघ्या सोळा वर्षांचा होता. घरात कमवणारे एकमेव वडीलच आजारी पडल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.
या बिकट परिस्थितीत साकिबच्या मनात क्रिकेटपटू होण्याचा विचारही नव्हता. त्याला भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते. लष्कराच्या नोकरीत मिळणारा स्थिर पगार, पेन्शन, आणि समाजातील आदर यामुळे आपल्या आजारी वडिलांना विश्रांती मिळेल आणि कुटुंबाला स्थैर्य लाभेल, हा त्याचा प्रामाणिक आणि भावनिक हेतू होता. लष्कराच्या भरतीसाठी आवश्यक असणारी शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी पास करण्यासाठी साकिब दररोज दोन-दोन तास धावण्याचा सराव देखील करायचा.
पण नियतीचा खेळ असा की, लष्करासाठी केलेल्या या तासन् तास धावण्याच्या सरावामुळेच साकिबच्या शरीराची 'कोअर स्ट्रेंथ' आणि सहनशीलता इतकी प्रचंड वाढली की, ती एका वेगवान गोलंदाजासाठी आवश्यक असणारी परिपूर्ण शारीरिक बांधणी ठरली.
त्याच काळात, कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी साकिबने गावाकडील स्थानिक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी त्याला एका सामन्यामागे ५०० ते १००० रुपये मिळत असत, ज्यातून त्याच्या घराचा थोडाफार खर्च भागयाचा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच्याकडे कोणतीही तांत्रिक माहिती नव्हती, पण त्याच्याकडे होता तो निव्वळ नैसर्गिक आणि रॉ पेस. त्याच्या या प्रचंड वेगामुळे स्थानिक लोक त्याला दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाच्या नावावरून आदराने 'रबाडा' असे हाक मारत असत.

साकिबसाठी आईने विकले दागिने…
साकिबच्या क्रिकेट प्रवासातील सर्वात भावूक प्रसंग म्हणजे त्याच्या आईने केलेला त्याग. जेव्हा साकिबने टेनिस बॉलवरून व्यावसायिक लेदर बॉल क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते पैशांचे आणि उपकरणांचे त्याच्याकडे साधे क्रिकेटचे शूज नव्हते. कधी कधी तर तो जुन्या, फाटलेल्या बुटांनी किंवा अगदी अनवाणी पायांनी गोलंदाजी करायचा.
व्यावसायिक स्तरावर खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पाइक्स शूजची किंमत सुमारे १०,००० ते १५,००० रुपये होती. ही रक्कम या कुटुंबासाठी कित्येक महिन्यांच्या उदरनिर्वाहाएवढी होती. एके दिवशी योग्य शूज नसल्यामुळे आपल्याला क्रिकेट खेळता येणार नाही या निराशेने साकिब रडू लागला.मुलाचे हे अश्रू आईला पाहवले नाहीत. त्याच्या आईने क्षणाचाही विलंब न लावता, आपल्या स्वतःच्या लग्नातील जपून ठेवलेले सोन्याचे दागिने बाहेर काढले आणि गोपाळगंजच्या एका दुकानात विकून साकिबला ते स्पाइक्स शूज आणून दिले.
आणि तो क्षण ठरला साकिबच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट
साकिबच्या नैसर्गिक वेगाला योग्य दिशा देण्याचे प्रशिक्षकांनी केले. साकिबने क्रिकेटचे सुरुवातीचे धडे घेतले ते गोपाळगंजमधील 'मिन्झ स्टेडियम' येथे. सुरुवातीला तो तिथे तासन् तास केवळ रिकाम्या बाकांवर बसून इतरांना खेळताना पाहत असे. तिथेच त्याची नजर भारतीय संघाचा सध्याचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याच्यावर पडली. साकिबने मुकेशला गोलंदाजी करताना पाहून त्याची कृती आत्मसात करण्याचा आणि घरी जाऊन आरशासमोर सराव करण्याचा प्रयत्न करू लागला.
साकिबच्या जीवनातील पहिला मोठा टर्निंग पॉईंट आला तो स्वर्गीय टुनू गिरीयांच्या रूपात. टुनू भैय्यांनी साकिबला एका टेनिस बॉल सामन्यात खेळताना पाहिले आणि त्याचा वेग पाहून ते थक्क झाले. त्यांनी साकिबला त्यांच्या 'टुनू गिरी क्रिकेट अकादमी'मध्ये बोलावले आणि त्याला टेनिस बॉल क्रिकेट खेळणे थांबवण्यास सांगितले. त्यांनी साकिबला लेदर बॉलने सराव करण्याचा ठाम सल्ला दिला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मिळणारे हमखास पैसे सोडणे हे कुटुंबासाठी अत्यंत कठीण होते, पण भविष्याच्या दृष्टीने टुनू भैय्यांचा तो सल्ला अत्यंत महत्त्वाचा होता.
त्यानंतर प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी साकिबच्या गोलंदाजीला तांत्रिक आकार दिला. रॉबिन सिंग यांनी साकिबला टेनिस बॉल आणि लेदर बॉल मधील फरक समजावून सांगितला. त्यांनी त्याला मनगटाची योग्य स्थिती कशी ठेवायची आणि चेंडू 'स्किड' कसा करायचा याचे सखोल तांत्रिक ज्ञान दिले.
साकिबने मुकेश कुमारला केवळ आपला आदर्श मानले नाही, तर मुकेशनेही साकिबला एका लहान भावाप्रमाणे मार्गदर्शन केले. साकिब सांगतो, "मी केवळ मुकेश भैय्यापासून प्रेरित नाही, तर तेही माझ्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम करतात. गोलंदाजी असो वा फिटनेस, ते कायम मला मार्गदर्शन आणि मदत करतात".

२०२१ मध्ये मिळाली पहिली मोठी व्यावसायिक संधी…
योग्य प्रशिक्षण मिळाल्यानंतर साकिबने अधिक चांगल्या संधींच्या शोधात पाटणा गाठले. तिथे पोहोचल्यानंतर प्रवासाचा ताण आणि सरावासाठी अपुऱ्या सुविधा यांसारख्या अनेक अडचणी आल्या, पण त्याने हार मानली नाही.
साकिबला पहिली मोठी व्यावसायिक संधी २०२१ मध्ये मिळाली, जेव्हा तो बिहार क्रिकेट लीगमध्ये गया ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळला. या लीगमध्ये त्याच्या प्रचंड वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लगेचच त्याची निवड चंदीगड येथील १९-वर्षांखालील स्पर्धेसाठी झाली, जिथे त्याने चार सामन्यांत २१ बळी घेत गुणवत्ता सिद्ध केली. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची निवड बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या आणि बीसीसीआयच्या 'हाय-परफॉर्मन्स कॅम्प'साठी झाली.
२०२२-२३ च्या हंगामात वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहारकडून वरिष्ठ टी-२० पदार्पण केले. आंध्र प्रदेशविरुद्धचा पहिला सामना त्याच्यासाठी निराशाजनक ठरला, जिथे त्याने दोन षटकांत २७ धावा दिल्या. परंतु साकिबची खासियत ही त्याच्या पुनरागमनात होती. त्याने हार न मानता त्याच स्पर्धेत गुजरातविरुद्धच्या पुढच्याच सामन्यात अवघ्या २० धावांत ४ बळी घेत जोरदार पुनरागमन केले.
या ४ बळींच्या स्पेलमुळे तो पहिल्यांदा आयपीएल फ्रँचायझींच्या रडारवर आला. २०२३ च्या आयपीएल हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने त्याला 'नेट गोलंदाज' म्हणून पाचारण केले. तिथे त्याला एमएस धोनीला गोलंदाजी करण्याचा अनुभव मिळाला, जो त्याच्यासाठी स्वप्नवत होता.
२०२४ मध्ये केकेआरने घेतले मूळ किंमतीत विकत
साकिबच्या सातत्यपूर्ण वेगाची दखल घेत २०२४ च्या आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले. साकिब आणि त्याच्या कुटुंबासाठी ती एक अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय रात्र होती. साकिबने एका मुलाखतीत त्या क्षणाचे वर्णन करताना सांगितले की, "जेव्हा प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा फोन आला आणि त्यांनी अभिनंदन केले, तेव्हा मला वाटले की ते मस्करी करत आहेत. मी त्यांना म्हणालो, माझ्याशी खोटे बोलू नका. पण जेव्हा मी घराबाहेर आलो, तेव्हा गावातील ५००-६०० लोक मला भेटण्यासाठी येत होते. सर्वांनी मला मिठी मारली, सेल्फी घेतले. संपूर्ण गोपाळगंज आणि बिहारमध्ये आनंदाचे वातावरण होते. मी इतका आनंदी होतो की माझ्या डोळ्यांतून पाणी आले".
२०२४ मध्ये केकेआरने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या संपूर्ण हंगामात साकिबला एकही सामना खेळण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली नाही. परंतु तो काळ त्याच्यासाठी शिक्षणाचा ठरला. आंद्रे रसेल, सुनील नरेन, रिंकू सिंग आणि प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केल्याने त्याचा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. साकिबच्या मते, "केकेआरमध्ये मी शिकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उच्च स्तरावरील क्रिकेट हा एक माइंड गेम आहे. केवळ शारीरिक कौशल्य पुरेसे नसते, तर मानसिक कणखरता, नियोजन आणि सामन्याच्या दिवशी योग्य मानसिकतेसह मैदानात उतरणे या गोष्टी तुम्हाला महान खेळाडू बनवतात".

पुढील हंगामापूर्वी केकेआरने त्याला रिलीज केले आणि २०२५ च्या आयपीएल लिलावात साकिब दुर्दैवाने अनसोल्ड राहिला. हा कोणत्याही तरुण खेळाडूसाठी मोठा धक्का असू शकतो, पण साकिबने या निराशेचे रूपांतर जिद्दीत केले. तो पुन्हा देशांतर्गत क्रिकेटकडे वळला. २०२५-२६ च्या रणजी करंडक स्पर्धेत लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याने आपली छाप पाडली. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ४१ धावांत ६ बळी घेतले. तसेच पंजाबविरुद्धही त्याने ४ बळी घेतले. लाल चेंडूवरील या वर्चस्वाने पुन्हा एकदा आयपीएल स्कॉउट्सचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.
“तुला कठोर परिश्रम करून पुढे जायचे आहे, हे फळ तुझ्या कष्टाचे आहे"
देशांतर्गत क्रिकेटमधील या सातत्यपूर्ण आणि तडाखेबंद कामगिरीचे फळ साकिबला अखेर मिळाले. २०२६ च्या आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात सामावून घेतले. हैदराबाद संघ व्यवस्थापन विशेषतः मधल्या षटकांत फरक निर्माण करू शकणाऱ्या आणि 'हिट-द-डेक' गोलंदाजी करणाऱ्या एका भारतीय गोलंदाजाच्या शोधात होते, आणि साकिब त्यांच्या या निकषांवर अगदी तंतोतंत उतरला.
या निवडीमागे सनरायझर्स हैदराबादचे वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी जलदगती गोलंदाज वरुण अॅरॉन याचा खूप मोठा वाटा होता. अॅरॉनचे साकिबवर गेल्या चार वर्षांपासून बारकाईने लक्ष होते. त्यांनी साकिबला सुरुवातीला एमआरएफ पेस फाउंडेशन मध्ये पाहिले होते आणि त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशविरुद्धच्या त्याच्या भेदक स्पेलने अॅरॉन यांना खूप प्रभावित केले होते. अॅरॉन यांनी स्वतः साकिबचे नाव मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी आणि इतर व्यवस्थापन सदस्यांसमोर सुचवले आणि सर्वांच्या सहमतीने त्याला लिलावात खरेदी करण्यात आले.
जेव्हा लिलाव सुरू होता, तेव्हा साकिब विजय हजारे ट्रॉफीच्या सराव शिबिरासाठी पाटणा येथे होता. लिलावानंतर वरुण अॅरॉन यांनी त्याला स्वतः फोन करून सांगितले की, "स्वतःला तयार ठेव, तुला कठोर परिश्रम करून पुढे जायचे आहे. हे फळ तुझ्या कष्टाचे आहे".
साकिबचा प्रवास हा केवळ एका क्रिकेटपटूचा प्रवास नाही, तर तो एका जिद्दी तरुणाचा, त्याच्या कुटुंबाच्या निस्वार्थ आणि सर्वोच्च त्यागाचा, आणि योग्य वेळी मिळालेल्या 'मिंटू भैय्या', रॉबिन सिंग आणि वरुण अॅरॉन यांच्यासारख्या मार्गदर्शकांचा परिणाम आहे. पैशांअभावी अनवाणी धावणारा, गरिबीशी दोन हात करणारा आणि सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणारा एक सामान्य मुलगा ते आयपीएलच्या झगमगत्या मंचावर १४५ किमी प्रति तासाच्या वेगाने दिग्गज फलंदाजांचे स्टंप्स उडवणारा 'मॅच-विनर' स्टार, हे स्थित्यंतर केवळ थक्क करणारे नाही तर लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.






