टीम बाईमाणूस
- प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चार पारलिंगींना विशेष निमंत्रण
- गोरखपूरच्या गरिमा गृहातील सदस्यांचा ऐतिहासिक सन्मान
- सामाजिक स्वीकृती आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल.
२६ जानेवारीला होऊ घातलेला ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्तरप्रदेशसाठी आणि विशेषतः गोरखपूरकरांसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण असेल. सामाजिक स्वीकार आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. येथील चार पारलिंगीं नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विशेष पाहुणे म्हणून सहभागी होतील. हे चारही गोरखपूरमधील गरिमागृह या आश्रयगृहातील आहेत.
गोरखपूरचे जिल्हा दंडाधिकारी दीपक मीणा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे सर्वजण सरकारी प्रोटोकॉलचे पालन करतील अशी माहिती त्यांनी दिली. २४ जानेवारी रोजी दिल्लीसाठी रवाना होतील. फक्त या चार व्यक्तींसाठी नव्हे तर संपूर्ण पारलिंगी समुदायासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
निवड झालेल्या सर्वांची कथा प्रेरणादायी
दीपिका (३४ वर्षे) - मूळची कुशीनगरची असलेली दीपिका प्रचंड मेहनती आहे. दिल्लीतील एका स्वयंसेवी संस्थेमध्ये काम केल्यानंतर तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून प्रशिक्षण घेतले ज्यामुळे आता ती स्वावलंबी आहे.
हीर (२१ वर्षे) - कुशीनगरची रहिवासी असलेली हीर हिचा प्रवास कठीण होता. लहानपणी तिला समाजाकडून भेदभाव, टोमणे आणि नैराश्य यासारख्या गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागले. या आव्हानांना तोंड देत तिने पारलिंगी व्यक्ती म्हणून आपली ओळख स्वीकारली आणि पुढचा प्रवास सुरु केला. 
लाडो (२० वर्षे) - गोरखपूर येथील लाडो २०१९ मध्ये गरिमा गृहात आली. ती तिच्या यशाचे श्रेय तिच्या गरिमा गृहातील कुटुंबाला आणि येथे मिळालेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला देते, ज्यामुळे तिला एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास मदत झाली.
एकता (३८ वर्षे ) - गरिमा गृहाचे नेतृत्व करणारी एकता ही मूळची लखीमपूर खेरी येथील आहे. ती 2007 मध्ये गोरखपूरला आली आणि 2011 मध्ये तिने शेल्टर होमची स्थापना केली.
केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे जीवन सुधारू शकलो
आपल्या भावना व्यक्त करताना एकता म्हणाली की, "केंद्र सरकारच्या पाठिंब्याने चालवल्या जाणाऱ्या या आश्रय गृहाच्या माध्यमातून आपण पारलिंगी समुदायाचे जीवन बदलू आणि सुधारू शकलो आहोत याचा मला खूप आनंद आहे."
गरिमा गृहाच्या संस्थापक एकता माहेश्वरी यांनी देखील याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "मला ही माहिती अधिकृत ईमेलद्वारे मिळाली. हा आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे."
समाजात समानतेचा अधिकार बळकट करण्यासाठी आणि उपेक्षित समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम एक सकारात्मक संदेश आहे. हा सन्मान भेदभावाची दरी कमी करून त्यांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा देणारा ठरेल अशी आहे.






