अमोल पालेकर
- ६० वर्षांपूर्वी १८ एप्रिल रोजी समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली फक्त सात मुस्लिम महिलांनी तिहेरी तलाक, बहूपत्नीत्व, हलाला अशा अन्यायकारक प्रथेविरोधात मुंबईत मोर्चा काढला होता.
- या ऐतिहासिक घटनेचा हिरक महोत्सव साजरा करण्यासाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे नुकतीच पुण्यात एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
- ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल पालेकर यांनी या परिषदेतआपले मनोगत व्यक्त केले. त्यांचे हे भाषण…
“पाळण्याच्या झोळीपासून दफनाच्या कफनापर्यंत गुरासारख्या खस्ता उपशीत, वीण वाढवत, आपले स्वतंत्र अस्तित्व विसरून अंधारात झिजत जगणे हेच ज्यांचे नशीब आहे - या माणसांनी माणसांवर लादलेल्या नशिबाविरुद्ध दाद मागण्यासाठी हा मोर्चा होता. इतर स्त्रियांसारखे तिलाही खुल्या जगात यायचे आहे, सज्ञान व सुबुद्ध व्हायचे आहे, अनेक क्षेत्रात स्त्री म्हणून आपली जबाबदारी उचलायची आहे, स्वावलंबी व्हायचे आहे’... हे सारे मुसलमान पुरुषांसकट सर्वांना कळावे म्हणून हा मोर्चा होता.
या मोर्चेवाल्या सातजणींमागे आणखी कितीतरी मनाने उपस्थित असतील. ‘या राज्यात हिंदूंना लागू असलेला द्विभार्या प्रतिबंधक कायदा मुसलमानांनाही लागू करण्यात यावा’, या मोर्चाच्या शाब्दिक मागणीमागे हजारोंचा निशब्द पाठिंबा होता. म्हणून तर केवळ सातांच्या या मोर्चाला पोलीस अडवू धजले नाहीत. आमदारांनी धावत जाऊन त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची अर्जी जातीने स्वीकारून ती पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.” हा होता हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली १८ एप्रिल १९६६ रोजी काढलेल्या सात महिलांच्या मोर्चाचा वृत्तांत! साठ वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक नोंद, थोर नाटककार आणि विचारवंत विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या महाराष्ट्र टाइम्समधल्या ‘कोवळी उन्हे’ या सदरामध्ये केली होती.

फक्त ७ मुस्लिम महिलांचा ऐतिहासिक मोर्चा…
‘मुसलमान स्त्रीचे हिरावण्यात आलेले माणूसपण तिला हवे आहे’ हे जाहीर करण्यासाठी त्या सात मुस्लिम महिलांनी मुंबईच्या रस्त्यांवरून चालत त्यांचे प्रश्नं समोर ठेवले होते. तो केवळ प्रतीकात्मक प्रतिकार नव्हता… ती खर तर एक साद होती. त्यांच्या पावलांपेक्षा त्यांचा आवाज पुढे जाईल, एवढ्या माफक आशेने त्यांनी आपल्याला हाक दिली होती. आणि आज, मी स्वतःलाच एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो आहे की त्या हाकेला मी प्रतिसाद दिला का? त्यांना हवी असलेली भरभक्कम साथ मी दिली का?
साठ वर्षांनंतरही, समकालीन मुस्लिम स्त्रीची खरी वेदना मला कळते का? तिचे प्रश्न मला माहित आहेत का?
साठ वर्षांनंतरही, समकालीन मुस्लिम स्त्रीची खरी वेदना मला कळते का?
परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ आणि विवेकवादी हिंदू चळवळीचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मला कबूल करावं लागेल की मी माणूस म्हणून, पुरुष म्हणून त्यांच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी कमी पडलो; मी पुरेसे प्रयत्नच मुळी केले नाहीत त्यांच्या लढ्यात सामील होण्यासाठी… त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी!
या वास्तवामागची कारणं अर्थात बहुपेडी आहेत. मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न हे ‘त्या’ समाजाची अंतर्गत गोष्ट म्हणून बघितले गेले. जणू बदलाची, सुधारणा करण्याची जबाबदारी फक्त त्यांच्यावरच होती. हिंदू स्त्रियांप्रमाणेच गरीबी, हिंसा निरक्षरता, अन्याय, पितृसत्ताक पकड मुस्लिम स्त्रियांभोवतीसुद्धा होतीच. पण धर्माधारीत कायद्यांच्या विळख्यामुळे त्यांचा संघर्ष वाढतच राहिला.
नास्तिक असलो, धर्माधिष्ठित कोणतीही गोष्ट वैयक्तिक जीवनात करत नसलो तरीही सामाजिक आणि सामूहिक जीवनात मात्र “त्यांचे” आणि “आमचे” ही दुही, देशाच्या फाळणीवेळीच पेरली गेली होती. अगदी माझ्या कातडीखालीसुद्धा! स्वतंत्र भारतात राज्यघटनेने मांडलेली वैश्विक मानवतावादी मूल्यं आम्ही सहजी पत्करली. तरीसुद्धा सामाजिक अभिसरणामध्ये ‘त्यांची विरुद्ध आमची’ ही दुही नकळत पसरत राहिली होतीच. फाळणीनंतरच्या दंगली, आसाम आणि पश्चिम बंगालमधला चिघळत राहिलेला बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न, बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक अशा झालेल्या दुभंगाचा केला गेलेला राजकीय उपयोग, आणि पद्धतशीरपणे पसरवलेला धर्मद्वेष या सगळ्यामुळे ‘माझी धार्मिक अस्मिता काय?’ हा प्रश्न ऐरणीवर आणण्यात दोन्हीकडची मंडळी यशस्वी झाली. त्यामुळे खऱ्या अर्थानं धर्मातीत किंवा निधर्मी व्हायला आपल्याला जमलंच नाही.

हमीदभाई आम्हाला मात्र कायमच जवळचे वाटले
मुस्लिम समाजात विज्ञाननिष्ठांची कमतरता आहे; मात्र कर्मठ परंपरावाद्यांची कमी नाही अशी समीकरणं मी सहजपणे आत्मसात करत गेलो. ती गृहीतकं खोडून काढण्याचा प्रयत्न मीही केला नाही आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळांसारख्या पुरोगामी चळवळींनीही ते माझ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवलं नाही. हमीद दलवाईंसारख्या ज्येष्ठ क्रांतिकारी समाजसुधारकाने केलेली धर्मचिकित्सा कट्टर मुस्लिम धर्मवाद्यांनी कायमच हाणून पाडली. पण हमीदभाई आम्हाला मात्र कायमच जवळचे वाटले याला कारण त्यांची धर्मातीत आणि निरीश्वरवादी भूमिका! थोडक्यात हमिदभाईंकडेही ‘आमच्या वैचारिक परंपरेतलेच’ म्हणजेच ‘आपल्यातले’च म्हणून बघितले गेले.
आज जर संख्याशास्त्रीय आकडे समोर फेकून बहुसंख्यांकांना वाटत असेल की अल्पसंख्यांकांची प्रगती संथ झाली आहे तर त्याची जबाबदारी फक्त मुस्लिम समाजावर टाकून आपण हात झटकणार आहोत का? मुस्लिम स्त्रीला धार्मिक चौकटीतून मुक्त करायला, तिचं आर्थिक परावलंबित्व कमी करण्यात आपला हातभार किती लागला याचा वस्तुनिष्ठ उहापोह करणार आहोत का? मुस्लिम व हिंदू स्त्रियांमधल्या तौलनिक उन्नतीमधली असमानता हे अपयश आहे हे मान्य करणार आहोत का? एक भारतीय म्हणून आपल्या एकात्मतेचं ते अपयश आहे असं मला वाटतं.
जेव्हा हिंदू धर्माला आधुनिकतावादी, पुरोगामी बनवण्याचा प्रयत्न हिंदू सुधारकांकडून होत होता, विधवा विवाह, केशवपन - सती प्रथांविरोधी किंवा स्त्री शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले जात होते, तेव्हा मुस्लिम धर्मातील अंधश्रद्धांना, जुनाट - बुरसटलेल्या परंपरावादी धर्मनिष्ठेला आव्हान देण्याचा, बदलण्याचा प्रयत्न अभावानेच झाला असं म्हणावं लागेल. कळत नकळत तिथेही हिंदू असलेल्यांचे आणि नसलेल्यांचे प्रश्न एकत्र सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही. बदललेल्या आधुनिक परिस्थितीचे आव्हान स्वीकारायला मुस्लिम समाज मागे पडला असं वास्तव समोर येत असेल तर त्यामध्ये हिंदू विचारवंतांचा, सुधारकांचा, चळवळीतला एक छोटा कार्यकर्ता म्हणून कदाचित माझाही अप्रत्यक्षपणे हातभार लागला असेल का? हे प्रश्न मला अस्वस्थ करत आलेले आहेत.

मुस्लिम व हिंदू स्त्रियांमधल्या तौलनिक उन्नतीमधली असमानता हे अपयश
आजची परिस्थिती अजूनच आवाक्याबाहेरची आहे अशी जाणीव गेले दशकभर सतत होत राहते. धार्मिक सलोखा, बंधुभाव या शक्यता तरी वास्तवात उरल्या आहेत का अशी शंका निर्माण करणारी परिस्थिती अवतीभवती पसरलेली आहे. धर्मांधता, त्याला मिळालेली राजकीय आणि सामाजिक मान्यता, धार्मिक तेढ, असत्याची सरशी या वातावरणात आधार आहे तो त्या थोर महामानवाने दिलेल्या राज्यघटनेचा! समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, मूलभूत हक्क या घटनाधिष्ठित मूल्यांवर विश्वास ठेवून सकाळी उठायचं; पण रात्री झोपेपर्यंत त्यांच्यावरचा विश्वास उडून जाण्यासारख्या घटनांचे साक्षीदार व्हायचं… या दोन टोकांमधली विपरीत अशांती भोगणं हे माझं आजचं वास्तव आहे. ना गोमूत्र शिंपडून मनाचं शुद्धीकरण करू शकतो, ना हिरवा रंग लावून मुस्लिम जमातवाद्यांचं प्रबोधन करू शकतो, ना पितृसत्तेची वेसण काढून टाकू शकतो.
इतक्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा मी आशा गमावलेली नाही. युद्ध,मृत्यू, हिंसा या वास्तवातसुद्धा इराण-अफगाणिस्तान-आखाती देशातल्या महिला चित्रपट माध्यमातून त्यांचे प्रश्न जगापुढे उभे करत राहतात. ‘शाहिद’, ‘फिराक’, ‘मुल्क’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ किंवा शहाबानोच्या लढ्यावर आधारित ‘हक़’, असे उत्कृष्ट चित्रपट भारतात निर्माण होत राहतात.
धार्मिक प्रथा आणि परंपरांचे दाखले देऊन निरनिराळ्या धर्मांमध्ये महिलांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीविरुद्ध तीन खटल्यांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात खंडपीठापुढे सध्या चालू आहे. एक, शबरीमला देवस्थानाच्या, दहा ते पन्नास वयोगटातल्या महिलांना म्हणजे मासिक पाळी येणाऱ्या महिलांना अशुद्ध मानण्याच्या परंपरेविरुद्ध; दुसरा, दाऊदी बोहरा समाजातल्या स्त्री जननेंद्रियाचा विच्छेदन करण्याच्या ‘खतना’ या प्रचलित प्रथेच्या विरोधात, आणि तिसरा, पारशी महिलांना त्यांच्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्मीयांशी विवाह केल्यामुळे ‘अग्यारी’त प्रवेश नाकारला जातो त्याविरुद्ध! या तिन्ही खटल्यांच्या निमित्ताने धार्मिक स्वातंत्र्याची व्याप्ती, धार्मिक पंथांची स्वायत्तता, घटनात्मक नैतिकता आणि स्त्रियांचे वैयक्तिक हक्क यांच्यातल्या परस्पर संबंधांचं परीक्षण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.

बिल्किस बानो असो, शाहीनबागच्या महिला असो वा हे तीन खटले लढत असणाऱ्या इंडियन यंग लॉयर्सच्या डॉक्टर लक्ष्मी शास्त्री, प्रेरणा कुमारी आणि इतर प्रतिनिधी, सुनिता तिवारी आणि मासुमा रन्लवी तसंच गुलरुख गुप्ता आणि प्रिया भद्रेजा असोत… ह्याच मला आशेचे किरण दाखवत राहतात. संघर्ष करत राहणाऱ्या ह्याच महिला मला ‘शांतीच्या दूत’ वाटत राहतात. धार्मिक प्रथांविरुद्ध लढत राहणाऱ्या सर्वधर्मीय महिलांना कायदेशीर लढाईसाठी मी आणि संध्या मदत करू इच्छितो. माझ्या रंगभूमीला दिलेल्या योगदानासाठी नुकताच जीवन गौरव पुरस्कार मला दिला गेला. ती पाच लाखाची रक्कम अशा कायदेशीर लढायांसाठी आम्ही देऊ करत आहोत. स्त्रीवादी आणि मानवी हक्कांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाने असे उचित लढे आमच्यासमोर आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही मी करत आहे.
पापक्षालन करण्याच्या भूमिकेतून नाही तर सामुहिक आशेची ज्वाला धगधगती ठेवण्यासाठी एवढं तरी नक्कीच करू शकतो!






