अप्सरा आगा
- येरळा नदीत वाळू माफियांनी बेकायदेशीर उपसा करून २० फूट खोल खड्डे केले, ज्यात बुडून फिरदौसचा मृत्यू झाला.
- ६ मे रोजीच खानापूर तहसीलदारांना कारवाई आणि आर्थिक मदतीसाठी निवेदन देऊनही दीड महिना झाला तरी प्रशासनाने कोणतीच पावले उचललेली नाहीत.
- दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्यास आणि पीडित गरीब कुटुंबाला भरपाई न मिळाल्यास तीव्र उपोषणाचा इशारा.
लग्नाचा आनंद साजरा करायला भाळवणीत आलेल्या कोरेगावच्या फिरदौसचा येरळा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला. नदीत वाळू उपशामुळे झालेल्या २० फुटी खड्ड्याचा अंदाज न आल्याने हा घात झाला. निष्पाप मुलीचा जीव जाऊन दीड महिना झाला, तरी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आता शिकलगार समाज न्यायासाठी आरपारची लढाई लढायला रस्त्यावर उतरणार आहे.
कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील रहिवासी असलेली फिरदौस झाकीर शिकलगार ही २ मे रोजी खानापूर तालुक्यातील भाळवणी गावाला आपल्या नातेवाईकाकडे एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आली होती. लग्नघर म्हटलं की सगळीकडे कशी आनंदाची लगबग, पाहुण्यांची गर्दी आणि हसण्या-खिदळण्याचे आवाज असतात, पण कोणाला काय ठाऊक, की या आनंदाच्या काळात काही घडेल, फिरदौस कधीच परत येणार नाही?
मे महिन्यातील घटना. त्या दिवशी लग्नघराजवळूनच वाहणाऱ्या येरळा नदीच्या पात्रात काही मुलं पोहायला गेली होती. ही मुलं पोहता पोहता नदीत थोडी पुढे, एक सात-आठ फुटांच्या अंतरावर गेली आणि अचानक तिथे मोठा घात झाला. पाण्याचा आणि खोलीचा काहीच अंदाज न आल्यामुळे मुलं अचानक खाली बुडू लागली, ज्यांना बुडताना पाहून नदीकिनाऱ्यावर एकच ओरडाओरड झाला. तिथल्या लोकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या घेतल्या आणि बुडणाऱ्या मुलांना बाहेर काढायचा प्रयत्न सुरू केला, ज्यात शफक रशिद शिकलगार या अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरडीला बाहेर काढण्यात लोकांना यश आलं, पण तिची प्रकृती कमालीची खालावली असल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेऊन अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलं, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
२० फूट खोल महाभयंकर खड्डा
पण दुसरी मुलगी, फिरदौस कुठेच सापडत नव्हती, त्यामुळे गावकरी गोळा झाले आणि पोहणाऱ्यांनी पाण्यात सगळीकडे शोध सुरू केला. बराच वेळ जीवाचा आटापिटा करून शोध घेतल्यावर जेव्हा फिरदौसचा देह लोकांच्या हाताला लागला, तेव्हा सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला, कारण ज्या नदीत फार तर पाच फूट पाणी असायला हवं होतं, तिथे तब्बल २० फूट खोल महाभयंकर खड्डा पडलेला होता.

वाळू उपसून उपसून नदीच्या पोटात हे जीवघेणे भुयार तयार करण्यात आलं होतं आणि पाण्याचा प्रवाह सारखा असल्यामुळे वरून या खड्ड्याचा कोणालाच अंदाज आला नाही, त्यामुळे जेव्हा लोकांनी फिरदौसला बाहेर काढलं, तोपर्यंत त्या निष्पाप मुलीचा श्वास कायमचा थांबला होता. लग्नघराचं रूपांतर काही क्षणांतच एका मोठ्या स्मशानभूमीत झालं. हा केवळ एक अपघात नाही, तर हा सरळ सरळ वाळू माफियांकडून झालेला खून आहे, कारण येरळा नदीचे नैसर्गिक स्वरूप पूर्णपणे नष्ट करून, कायद्याला आणि नियमांना पायाखाली तुडवून वाळू उपसा करणाऱ्या कंपन्यांनी सामान्य माणसांच्या जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला.
तहसीलदार यांना निवेदन
शिकलगार जमात ट्रस्ट, मुंबई आणि सांगली जिल्हा संघटनेच्या वतीने ६ मे २०२६ रोजी खानापूरचे (विटा) तहसीलदार यांना एक सविस्तर लेखी निवेदन देण्यात आले होते, ज्यामध्ये समाजाने स्पष्टपणे आपली व्यथा मांडली होती की, हा केवळ अपघात नसून, नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि बेसुमार वाळू उपशामुळे निर्माण झालेली मानवनिर्मित आपत्ती आहे, त्यामुळे संबंधित वाळू माफियांची आणि कंपन्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत आणि मृत फिरदौसच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने शासनाने त्यांना तातडीने आर्थिक मदत आणि भरपाई द्यावी.
फाईल्स टेबलावर धूळ खात
आज या निवेदनावर सही-शिक्का घेऊन दीड महिना उलटून गेला तरीही प्रशासकीय फाईल्स टेबलावर धूळ खात पडून आहेत आणि अधिकारी मात्र ढिम्म हलत नाहीत. एका गरिबाच्या निष्पाप मुलीचा बळी जाऊनही प्रशासन कमालीच्या सुस्तीत आणि उदासीनतेत वावरत आहे, ज्यामुळे वाळू माफियांचे धाडस आता आणखीनच वाढताना दिसत आहे. प्रशासनाकडून कोणताही न्याय मिळत नसल्याचे पाहून आता संपूर्ण शिकलगार समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
जोवर न्याय नाही, तोवर लढाई...
न्यायाला होणारा उशीर हा न्याय नाकारण्यासारखाच आहे, अशी भूमिका घेऊन २१ जून रोजी भाळवणी येथे समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली, ज्यात ‘जस्टीस फॉर फिरदौस’ या मोहिमेची अधिकृत घोषणा करण्यात आली. ‘एक बेटी की पुकार, पूरे समाज की जिम्मेदारी...न चुप रहेंगे, न अन्याय सहेंगे’ अशी गर्जना करत समाजाने आता प्रशासनाविरोधात लढाई लढण्याचे ठरवले असून, फिरदौसला जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि तिच्या कुटुंबाला हक्काची भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही, असा निर्धार समाजाने केला आहे.

वाळू माफियांवर अद्याप गुन्हा दाखल नाही
प्रशासनाच्या आणि सरकारच्या या संशयास्पद मौनावर आज शिकलगार समाज काही सवाल विचारत आहे की, एका निष्पाप मुलीचा जीव जाऊन दीड महिना झाला, तरीही अद्याप एकाही वाळू माफियांवर गुन्हा दाखल का झाला नाही. प्रशासन नक्की कोणाला पाठीशी घालत आहे? येरळा नदीचे पात्र उकरून तिला सर्वसामान्यांसाठी मृत्यूचा सापळा बनवणाऱ्या त्या कंपन्यांचे परवाने रद्द का केले गेले नाहीत? मृत फिरदौसचे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि त्यांच्या घराचा उजळणारा दिवा विझला आहे, मग शासनाने अद्याप त्यांना आर्थिक मदत का जाहीर केली नाही?
तीव्र उपोषणाचा इशारा
शिकलगार जमात संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी आता स्वतः या अन्यायाविरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून जर प्रशासनाने लवकरात लवकर जागे होऊन संबंधित दोषी वाळू माफियांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले नाहीत, पीडित कुटुंबाला न्याय दिला नाही, तर नौशाद शिकलगार स्वतः तीव्र उपोषणाला बसणार आहेत. यापुढे होणाऱ्या तीव्र आंदोलनाला, रस्त्यावरील लढाईला आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे स्थानिक तालुका प्रशासन आणि ते मुजोर वाळू माफियाच जबाबदार असतील, असा इशारा शिकलगार समाजाने दिला.






