- “मी शरद पवारांचा खून करायला आलोय”, असं मंत्रालयाच्या गेटवरच्या पोलीस अधिकाऱ्यांना तो गावठी पेहरावातला माणूस मोठ्याने सांगू लागला. गोंधळ उडून तात्काळ बातमी सहाव्या मजल्यावर जाऊन धडकली. तेव्हा पवारसाहेब हसत म्हणाले, “अरे तो आमचा तमासगीर दादू इंदुरीकर असणार. या घेऊन त्याला वर.”
- आज महाराष्ट्रातल्या तमाशा क्षेत्रात नामांकित सोंगाड्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या रघुवीर खेडकर यांनी जेव्हा तमाशात काम करायला सुरुवात केली तेव्हा रंगमंचावरच्या आपल्या पेहरावात बंडी वापरायला सुरुवात केली, बंडीची ही आयडिया मी दादू इंदुरीकर यांच्याकडून घेतली हे आजही रघुवीर खेडकर प्रांजळपणे सांगतात.
- तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर वयाच्या तेराव्या- चौदाव्या वर्षी साताऱ्याला रहात होत्या, तमाशाच्या वेडापायी त्या घरून मुंबईला पळून गेल्या. मुंबईच्या हनुमान थिएटरमध्ये तेव्हा एकाच वेळी दोन तीन तमाशे मुक्कामाला असायचे. कांताबाई जेव्हा हनुमान थिएटरला कामाच्या शोधात पोहचल्या तेव्हा त्यांना सर्वप्रथम आपल्या तमाशात आश्रय दिला, काम दिले ते दादू इंदुरीकर यांनीच.
- ज्यावेळी दादा कोंडके ‘सोंगाड्या’ चित्रपट बनवत होते त्यावेळी त्यांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्या पात्राची धाटणी त्यांना समजत नव्हती. अशा वेळी दादा कोंडके दादू इंदुरीकर यांच्याकडे गेले आणि इंदुरीकरांकडून ते पात्र समजावून घेतलं. ‘सोंगाड्या’ पूढे दणक्यात सुपरहिट झाला.
महाराष्ट्राचे ‘पॉल मुनी’ आणि वगसम्राट… दादू इंदुरीकर
तर महाराष्ट्राचे ‘पॉल मुनी’ असा किताब पु. ल. देशपांडे यांनी ज्या अस्सल कलावंताला दिला होता त्या दादू इंदुरीकर यांचा आज (13 जून 1980) स्मृतिदिन…
संबंधित लेख वाचा: 1) डॉ. गणेश चंदनशिवे : तमासगीराचं पोर बिट्या लई हूशार… |
तमाशा म्हणलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवते ती लावणी आणि संगीतबारीची दुनिया. एकदा का ढोलकीवर थाप पडली की मग विचारूच नका. तसं तमाशात हलगी ढोलकी जुगलबंदी, गण, गवळण, बतावणी, वग असं सगळं असतं पण तमाशा म्हटल्यावर आपण लावणीच गृहीत धरतो. पण तमाशात एक पात्र असं असतं जो लावणीच मार्केट खाऊ शकतो, गावात ज्या पाटलाने तमाशा आणलाय त्याची भर जत्रेत फिरकी घेऊ शकतो तो म्हणजे फक्त सोंगाड्या..!
महाराष्ट्राला लोककलावंतांची मोठी परंपरा. आजवर अनेक सोंगाडे झाले पण एकच गाजला आणि लोकांच्या गळ्यातला ताईत बनला असा महान विनोदसम्राट, वगसम्राट दादू इंदुरीकर. गावातला तमाशा शहरातल्या नाकं मुरडणाऱ्या पांढरपेशी लोकांना पाहायला भाग पाडणारा अवलिया म्हणजे दादू इंदुरीकर.
‘’नोकरी कर हा तमाशाचा नाद सोडून दे. यावर पोट भरत नाही’’
मार्च 1928 ला दादू इंदुरीकरांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव होतं गजानन राघू सरोदे. आईचं नाव नाबदाबाई तर वडिल राघू हे भेदीक रचणारे नामवंत तमासगीर होते. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदुरी गावात दादू इंदूरीकर यांचा जन्म झाला होता आणि तमासगीर घराणं असल्याने गावाचं आडनाव त्यांनी स्विकारल होतं. लहानपणापासून घरात लोककला आणि रंगभूमीच वातावरण होतं.
त्यामुळे साहजिकच तमाशाची गोडी लागणारच होती. पण घरच्यांनी दादुंना शाळा शिकवली. शाळेत मन लागत नसे. कशीबशी तेंव्हा सातवी त्यांनी पूर्ण केली आणि लगेच त्यांना चांगली नोकरी मिळाली. दादुंना त्यांच्या घरचे म्हणत होते की नोकरी कर हा तमाशाचा नाद सोडून दे. यावर पोट भरत नाही पण ऐकतील ते दादू कसले. त्यांनी नोकरी न करता तमासगीर होण्याचा निर्णय घेतला.
सुरवातीला प्रसिद्ध तमासगीर बाबुराव पुणेकरांच्या तमाशा फडात दादू इंदुरीकर काम करू लागले. इथच त्यांना विनोदाची जादू कळली. तो जो त्यांना विनोदाचा सुर सापडला तो शेवटपर्यंत त्यांनी टिकवला. वयाच्या 20- 21 व्या वर्षी दादू इंदुरीकर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने दादू मारुती इंदुरीकर या फडाची निर्मिती केली आणि बाऱ्या सुरू केल्या सोबतच लोकरंगभूमीवर प्रयोग करायला सुरवात केली.
सहज साधा मुद्रभिनय, हजरबाबीपणा, परफेक्ट डायलॉग डिलिव्हरी, दर प्रयोगाला नविन नवीन कोट्या यामुळे आघाडीचा सोंगाड्या म्हणून दादू इंदुरीकर गाजू लागले.
गाढवाचं लग्न, हरिश्चंद्र तारामती, मल्हारराव होळकर, मराठशाहीची बोलती पगडी, मीठाराणीचा वग हे 'वगनाट्ये इतकी गाजली की अजूनही या वगांची आठवण काढली जाते. या वगांमध्ये जीव ओतला तो दादू इंदुरीकर यांनी, त्यामुळे त्यांना वगसम्राट असं म्हटलं जाऊ लागलं. दूरदर्शनवर पहिल्यांदाच दाखवण्यात आलेल्या ‘येड्या बाळ्याचा फार्स’ (1960) या फार्सात इंदूरीकरानी मोठी बाजी मारली होती.
अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणाऱ्या दादोबांना आयुष्यात असंख्य संकटांना सामोरं जावं लागलं. व्यावसायिक इर्षेचा सामना तर करावा लागलाच पण त्यांच्या हितशत्रूंनी त्यांच्या तमाशाचा तंबू जाळून या सोंगाड्याला रडवण्याचं पापही केलं आहे.
‘गाढवाचं लग्न’... इतिहास घडवला
गाढवाचं लग्न हे वगनाट्य दाग इंदुरीकर यांच्यामुळे महाराष्ट्रात फेमस झालं. लोकांची झुंबड उडत असे जेव्हा या वगाचे प्रयोग असे. यातल्या सावळ्या कुंभाराची भूमिका इंदूरीकरांनी अजरामर केली होती.त्यांच्या या वगाचे चाहते होते पू. ल. देशपांडे. दादुंचा अभिनय बघून पुलंनी त्यांना महाराष्ट्राचा ‘पॉलमुनी’ असं म्हटलं होतं तर शंकर घाणेकर यांनी ‘वगसम्राट’ ही पदवी त्यांना दिली. गाढवाचं लग्न या वगामुळे काय झालं तर ग्रामीण आणि शहरी भागात तमाशा अधिकच लोकप्रिय झाला.
'गाढवाचं लग्न'द्वारे खरं तर दादूंनी इथल्या प्रस्थापितांना अनेक धक्के दिले. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागला. नाहीतर काही काळापूर्वी आलेल्या नाटकांमधून देव-धर्माची खिल्ली उडवल्यावरून त्या नाटकाचा बेरंग करून टाकण्याचं कुटील कारस्थान इथल्या कट्टरपंथीयांनी केलं. परंतु दादूंनी केलेली संवादफेक आणि उभा केलेला एकदर वगनाट्याचा फार्स पाहता या वगनाट्याविषयी काहीही न बोललेलं बरं म्हणून सर्वच मुग गिळून बसले होते.
जनता दादूंना ‘सोंगाड्यांचा दादा’ म्हणून संबोधू लागली
1969 ते 1973 या काळात तमाशा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये त्यांच्या फडाला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाल. राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार पारंपारिक लोककलावंत म्हणून दादू इंदुरीकर यांना मिळाला. तेव्हाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते इंदुरीकर यांचा सत्कार करण्यात आला होता. तमाशा परिषदेने दादूला विनोदमूर्ती ही पदवी बहाल केली तर जनता दादूंना ‘सोंगाड्यांचा दादा’ म्हणून संबोधू लागली.
दादू इंदुरीकर यांनी लोककलेची जोपासना करताना सामाजिक कार्याच भानही ठेवलं. गाढवाचं लग्न या लोकनाट्याच्या माध्यमातून मिळालेला पैसा त्यांनी शाळा बांधणे धर्मशाळा बांधल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक पुरवणे अशी बरीच कामे केली.
मात्र इतकं करूनही या महान कलावंताची अवहेलनाच झाली. दादू इंदुरीकर ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला कलेच्या माध्यमातून आपली ओळख करून दिली. आणि नुसतीच ओळख नाही तर राष्ट्रपती पदक खिशात घालून हे दाखवून दिलं की कलेच्या क्षेत्रात आम्हीच वरचढ आहोत. त्याची मक्तेदारी कुणाचीही नाही. अशा या माणसाला इतके दिवस अंधारकोठडीत रहावं लागलं.
त्याच्या नावाने काही-काही नाही. कोणत्या नाट्यमंचाला, किंवा कोणत्या नाट्य पुरस्काराला त्याच्या नावाने संबोधण्यात आलं नाही. याचं कारण एकच हा वगनाट्य सम्राट तथाकथित उच्चवर्णिय समजणाऱ्या समाजातील नव्हता. नाहीतर आज त्याच्या नावाने एकतरी नाट्यसंकूल उभारलं गेलं असतं किंवा स्मारक तरी…
13 जून 1980 रोजी लोकांना खळखळून हसवणाऱ्या या हुरहून्नरी कलाकाराने जगाचा निरोप घेतला. या महान कलाकाराला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…






