- मेधा कुळकर्णी
या गावात एखाद्या मुस्लिम गावकऱ्याची तुटलेली चप्पल शिवण्यासाठी गावाबाहेर जावं लागतं, कारण गावातल्या चप्पल शिवणाऱ्याला ती चप्पल तुरुस्त करण्याची परवानगी नाही…तसं जर का त्याने केलं तर त्याला दोन हजार रु दंड ठोठावला जातो… या गावात केस कापायलाही मुस्लिमांना गावाबाहेरच जावं लागतं. नाही तर सलूनवाला दंडास पात्र…
या गावाचं नाव आहे ‘गुहा’...अहिल्यानगरच्या राहुरी या तालुक्याच्या ठिकाणापासून गुहा गाव साधारण बारा किलोमीटरवर आहे. गावातील मुस्लिमांसोबत असा भेदभाव का आणि त्यातून काही मार्ग काढता येईल का याची चाचपणी करण्यासाठी ‘हम भारत के लोग’ या संघटनेतर्फे तुषार गांधी, फिरोज मिठिबोरवाला, शरद कदम, इरफान इंजिनिअर, नरेंद्र डुंबरे अशा सामाजिक वर्तुळात काम करणाऱ्या एका शिष्टमंडळाने ‘गुहा’ या गावाला अलीकडेच भेट दिली. या प्रतिनिधींमध्ये माझाही सहभाग होता.
आम्ही गुहा गावात गेलो तेव्हा तिथल्या मुस्लिम नागरिकांच्या धरणे आंदोलनाचा तो 512 वा दिवस होता. राहुरी तहसिल कार्यालयासमोर ही मंडळी रोज कार्यालयीन वेळात नेमाने धरण्याला बसतात. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या राहुरी तालुक्यातल्या गुहा या गावाने मुस्लिम गावकर्यांवर सामाजिक, आर्थिक बहिष्कार घातलायं. गावात एकूण 120 मुस्लिम कुटुंबं आहेत. 
‘गुहा’ गावात हिंदू-मुस्लिमांमध्ये इतका विखार का निर्माण झाला?
गावातील या तणावाचे निमित्त आहे गावातील अनेक शतकांपासून अस्तित्वात असलेला बाबा रमजान शाह माही सवार बाबांचा दर्गा. गुहा गावात दर्ग्यातले उत्सव वर्षानुवर्ष हिंदू-मुस्लिम सलोख्याने करत होते. गावकरी गुहा गावात मिळून-मिसळून राहात होते. गावामध्ये अल्लाउद्दीनचे 88 वर्षांचे अब्बा, मकबूल शेख आम्हाला भेटले. या गोड म्हातार्याने तर गावाच्या मातीत सद्भावनेचं शिंपण केलंय.
गावातल्या कुठल्याही घरात जराशी कुरबुर झाली तरी ते वडीलकीच्या नात्याने समजावत आणि लोक या बुजुर्गाचा शब्द खाली पडू देत नसत. गावातल्या हॉटेलात दलितांना वेगळा कप देण्याची भेदभावाची रीत त्यांनीच मोडून काढली. पण आता या अब्बांचा शब्द देखील चालेनासा झालाय. गावातल्या आत्ताच्या विखारी वातावरणाचं अतोनात दुःख त्यांना होतंय.
संबंधित लेख वाचा: 1) ‘बाईमाणूस’चा स्पेशल रिपोर्ट : मुस्लिम कर्मचाऱ्यांवरून शनि शिंगणापूरमध्ये आज नेमकं काय घडलं…? |
हा विखार तयार झाला तो घटनाक्रम थोडक्यात असा… 2023 साली फाल्गुनातील उरुसाचं परंपरेने चालत आलेलं यजमानपद मुस्लिमांकडून हिसकावून घेणं, कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट तयार करून त्याची नोंदणी करणं, जून 2023 मध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव भरवणं, त्यात 17 जूनला सनातन संस्थेचे श्रीहरी आंबेकर यांनी केलेलं चिथावणीखोर भाषण, गावातल्या मुस्लिमांचा उल्लेख ‘जिहादी’ असा करून, बाराशे वर्षांपूर्वी इथे मंदिरच होतं असं सांगत आता ‘आपला’ देव परत मिळवायची घोषणा करणं… हिंदू गावकर्यांनी 28 डिसेंबर 23 रोजी दर्ग्यात बसवलेली कानिफनाथांची मूर्ती, तिथे नित्यनेमे सुरू केलेली पूजा, आक्रस्ताळी आरती, मुस्लिमांविषयी अर्वाच्य भाषेतील घोषणाबाजी अशा अनेक घटना गुहा गावातील विखाराला कारणीभूत ठरल्या…
'धार्मिक वास्तूवरुन वाद'
‘बीबीसी’ने गुहा गावातील सध्याच्या परिस्थितीवर अलीकडेच एक वृत्तांत प्रसिद्ध केला आहे. मुस्लिम समाजावर उपसण्यात आलेल्या बहिष्काराच्या अस्त्रामागे गावातल्या मुस्लीम वस्तीलगत असणारा हा 'कान्होबा देव अथवा हजरत रमजान शाह बाबा दर्गा' ही काही शतकं जुनी वास्तू आहे, आणि इथल्या मुस्लीम समुदायाकडे ती पिढ्यान पिढ्या आहे असे ‘बीबीसी’ इथल्या मुस्लिम गावकऱ्यांनी सांगितले. 
सुफी आणि नाथसंप्रदायाशी जोडलेल्या दर्ग्याची सनद मुस्लीम कुटुंबांकडे पहिल्यापासून आहे आणि 1854 च्या ब्रिटिशकालिन गॅझेटमध्येही तसा उल्लेख असल्याचं ते सांगतात. वर्षानुवर्षं दोन्ही समुदाय इथं एकत्र उरुस साजरा करायचे.
याच वस्तीत असलेल्या मशिदीत शेख ईस्माईल पापामियां आणि बाकी राहणारे स्थानिक त्यांची बाजू ‘बीबीसी’ ला सांगतात. त्यांच्या मते या वास्तूची जबाबदारी इथल्या मुस्लीम कुटुंबांकडेच होती आणि दर कालांतरानं एकेक कुटुंब ती आपल्याकडे घेत असे.
"2015 मध्ये दर्गा आणि मस्जिद यांचं रजिस्ट्रेशन आम्ही केलं आहे. ते करण्याचं कारण असं आहे की शासन निर्णय आला 1995 साली की ज्यांच्या अशा प्रॉपर्टीज आहे मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च इत्यादी त्यांनी आपापल्या संस्थांकडे जाऊन याचं रजिस्ट्रेशन करावं. म्हणून आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी त्याचे कागदपत्रं करुन ते वक्फकडे टाकले. त्यांचे लोक आले. त्यांनी पाहणी केली. पेपर व्हेरिफिकेशन केलं. हे सगळं केल्यावर मस्जिद आणि दर्ग्याला रजिस्ट्रेशन नंबर 2015 साली मिळाला," शेख ईस्माईल काही कागदपत्रं दाखवत सांगतात.
गेल्या काही वर्षांपासून मात्र याच वास्तूवरुन वाद सुरू झाला. गावातल्या काहींचं म्हणणं आहे की तो दर्गा नसून ते कानिफनाथ देवस्थान आहे. "1854 पासून कानिफनाथ देवस्थानच्याच नावावरतीच कागदपत्रं आहेत. तिथं दर्गा असल्याचा कुठे उल्लेख नाही. ग्रामपंचायतीत नाही. उताऱ्यावर नाही की तिथं दर्गा आहे. पहिल्यापासून कानिफनाथ देवस्थान आहे. हे गावचं देवस्थान आहे," या 'कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट'चे अध्यक्ष नंदकुमार सौदागर म्हणतात.
गावातल्या मुस्लिमांशी संबंध ठेवल्यास 2 हजार रु. दंड
या परस्परविरोधी दाव्यांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही समुदायांमध्ये तणाव वाढत गेला. दरम्यानच्या काळात झेंडे, मूर्तीची पूजा, उरुसाचा कार्यक्रम यावरुनही वाद झाले. पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. या सर्व बळजबरीविरोधात मुस्लिमांनी कायदेशीर कारवाईची, न्यायाची मागणी करायला सुरुवात केली. त्यामुळे मुस्लिमेतर गावकर्यांनी थेट बहिष्काराचं अस्त्र वापरल्यामुळे आता मुस्लिमांवर उपासमारीची किंवा गाव सोडून जाण्याची वेळ आणली आहे. 
आम्ही आधी दर्ग्याशीच पोचलो. तिथेच जवळ गावातली मशिददेखील आहे. मशिद आणि दर्गा यांची देखभाल पिढ्या न पिढ्या करणारी मुजावरांची 35 घरं या परिसरात आहेत. सय्यद, बागवान, पठाण ही अन्य मुस्लिम कुटुंब गावात इतरत्र राहातात. चिंचेची बरीच झाडं दर्ग्याच्या परिसारात आहेत. या झाडांच्या गारव्यातच आम्ही त्यांच्याशी बोलायला बसलो. ते सांगत असलेल्या घटना मात्र चटका लावणार्या होत्या. झाडांना सर्व बाजूंनी चिंचा लगडलेल्या होत्या, पण मुस्लिमांना त्या काढण्यास मनाई केली आहे.
दर्ग्यालगतच आता कायमस्वरूपीच म्हणावी अशी पोलिस चौकी तयार केली आहे. ड्युटीवरच्या पोलिसांच्या साक्षीनेच मुस्लिम बाया-पुरुषांबरोबर आमची चर्चा झाली. अशीच चर्चा आम्हाला हिंदू गावकर्यांसोबतही करायची असल्याचं आम्ही पोलिसांना सांगितलं आणि त्यासाठी त्यांना आमंत्रण द्यावं किंवा आम्ही त्यांच्या घरी जायला तयार आहोत, हेही कळवलं. पण प्रतिसाद मिळाला नाही. तेवढी एक कमतरता राहिली.
ऑक्टोबर 2023 मध्ये गुहा ग्रामसभेने मुस्लिमांवरच्या बहिष्काराचा ठराव केला. नियम मोडणार्याला दोन हजार रु दंड ठोठावण्यार्या या ठरावाची वैधता तपासली पाहिजे, असं मुस्लिम गावकरी म्हणतात. अर्थात, ही बहिष्काराची कृतीच बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे. खुद्द आपल्या राज्याचे, मुख्यमंत्री फडणवीस यांनीच केलेला सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा आहे, महाराष्ट्र अधिनियम 2017. भारतात पहिल्यांदाच सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवणारा अशा स्वरुपाचा कायदा महाराष्ट्राने केला आहे.
तरीही गुहा गावात कुटुंबियांना स्वतःच्याच शेतजमिनीत कामं करायला रोखलं जातंय. पेरणीचा काळ आला तरी अजून त्यांना नांगरणी करता आलेली नाही. गावातले ट्रॅक्टर्स तर त्यांना दिले जातच नाहीयेत. म्हणून त्यांनी बाहेरून ट्रॅक्टर्स आणले तेव्हा जमाव चालून आला. ड्रायवरला मारहाण करण्याचा, शेतकाम करणार्या बायकांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.
गावातील मुस्लिम गावकऱ्यांवर बहिष्कारामुळे उपासमारीची वेळ
गानातील मैमूना आपा हे सगळं आम्हाला सांगत होत्या. त्या जमावापुढे आडव्या पडल्या. मैमुना हिंमतबाज आहेत, खणखणीत बोलतात. पण आता हताश झाल्यात. शेळ्या विकण्याचा व्यवसाय करणार्या एका विधवा बाईंना त्यांचं काम बंद करायची वेळ आलीये. कारण गावात कोणत्याही बांधावर त्यांच्या शेळ्यांना चरायला बंदी केली आहे.
राजू बागवानचं भेळ,चिवडा,वडा, चहा देणारं गावातलं हॉटेल बंद करायला लावलं. मग त्याने गुहा-सिबलापूर मार्गे संगमनेर इथल्या एसटी स्टॅंडवर तशी गाडी लावायला सुरुवात केली. तर तिथूनही त्याला हाकलून लावलं. वेल्डिंग, फॅब्रिकेशन करणारा मन्सूर सय्यद. त्याला केवळ पोटासाठी संगमनेरला स्थलांतरित व्हावं लागलं. मुस्लिम स्त्रिया शेतमजुरी करून दिवसाला दोन-तीनशे रु मिळवायच्या. बहिष्कारामुळे हा मार्ग आता बंद झालायं. दर किलो चिंचोक्यांमागे दहा रु दराने चिंच फोडायचं काम त्या करत असत, आता तेही बंद. एकाचं झेरॉक्सचं दुकान त्याला रोजचे तीन-चार हजार मिळवून देत असे. आता दुकान गेलं. झेरॉक्स मशीन घरी आणून ठेवलंय. मिळकत शंभर-दोनशेवर आलीये. 
अलाउद्दीनच्या भावाला गावातल्या त्याच्या हिंदू मित्राने घरातल्या लग्नाची आमंत्रणपत्रिका दिली. तर त्या मित्राला दंड ठोठावला गेला. गावच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर बहिष्काराचे आदेश उघडपणे दिले जातात.
या वातावरणाचा गावातल्या लहान मुलांवर काय परिणाम होत असेल, याची तर कल्पनादेखील करवत नाही. या विखारातून वाट काढू शकणारे एक हिंदू सज्जन गावात होते. पण त्यांचा इंतकाल झाल्याचं कळलं. सगळे हळहळले. मुस्लिम मंडळी म्हणत होती की जे घडतंय ते सगळ्याच हिंदूंना मान्य आहे, असं नाही. पण गावातल्या आणि गावाबाहेरून येणार्या दांडग्यांना लोक घाबरतात. सकाळी नऊ आणि संध्याकाळी सातला आरती करायला दर्ग्यात जमावाने लोक येतात. दर्ग्यात परवानगीविना स्पीकर्स लावले आहेत. आवाजाची कोणतीही मर्यादा सांभाळली जात नाही. हे पोलिसांदेखत घडतंय.
आता सगळी भिस्त न्यायालयावरच…
गुहा गावाच्या भेटीने 80 आणि 90 च्या दशकातल्या ‘लग्न गडी’ या वेठबिगारी प्रथेविरोधात संघटित होणार्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासींवर तिथल्या जमीनदारांनी आणि मराठवाड्यात जातीआधारित वेठबिगारीतून मुक्त होऊ पहाणार्या दलितांवर गावातल्या सवर्णांनी घातलेला बहिष्कार याची उजळणी झाली. एक प्रथा आपल्याकडच्या सरंजामी व्यवस्थेतून आलेली आणि दुसरी हिंदू धर्मातल्या जातींच्या उतरंडीतून तयार झालेली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या वेठबिगार निर्मूलन आणि दलित अत्याचार प्रतिबंधक अशा दोन कडक कायद्यांची मदत तेव्हा झाली.
गुहा गावातला मुस्लिमांवरचा बहिष्कार हा आता नवीन प्रकार आहे. हा सरळ ‘आपण विरुद्ध ते’ असा धार्मिक दुभंग आहे. देशातल्या मुस्लिमविरोधी नियोजनबद्ध कटाचा भाग आहे. कारण मशिदी आणि दर्गे यांच्याभोवती संशयाचे भोवरे तयार करणं गेली दहा-बारा वर्ष सुरू आहे. दर्ग्यासारख्या अनेक सामायिक जागा, हिंदु आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांचे लोक अनेक पूर्वग्रह बाजूला ठेवूनही इथे एकत्र येतात. कट्टर हिंदुत्ववादी नेते या सामायिक जागा आणि अवकाश नष्ट करायच्या मागे लागले आहेत.
महाराष्ट्रात जिल्ह्याजिल्ह्यात सलोख्याच्या सुरेल कहाण्या सांगणारे दर्गे आहेत. तिथल्या जमिनींवर, उत्पन्नावर डोळा ठेवून तिथे संघटितपणे विष पसरवलं जातंय. मुस्लिमांना अडकवण्यासाठी नवेनवे सापळे रचले जातायत. आपल्याकडच्या मुस्लिमविरोधाला शासन-प्रशासनच हवा देत आहे. गुहाच्या मुस्लिम गावकर्यांनी तहसिलदारापासून जिल्हाधिकार्यापर्यंतच्या, धर्मादाय आयुक्त, वक्फ बोर्ड अशा सगळ्या प्रशासन यंत्रणांकडे न्यायासाठी साकडं घातलंय. न्यायलयातही ते पोचले आहेत. पण अजून तरी स्थिती जैसे थे आहे.
(साभार - मेधा कुलकर्णी यांच्या फेसबुक वॉलवरून)






