टीम बाईमाणूस
- देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात देशभरात संतापाची लाट आहे.
- नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व केवळ सोनम वांगचुक यांच्यापर्यंत मर्यादित राहिले नव्हते.
- वांगचुक यांच्यासोबतच या लढ्याचा खरा कणा ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे तीन विद्यार्थी नेते होते, जे सलग २३ दिवस अन्नाचा एकही कण न खाता बेमुदत उपोषणाला बसले होते. अखेर प्रकृती अत्यंत खालावल्याने २३ व्या दिवशी त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे.
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. याच संतापाला मूर्त स्वरूप देण्याचे काम जंतरमंतरवर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाने केले.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व केवळ सोनम वांगचुक यांच्यापर्यंत मर्यादित राहिले नाही.
वांगचुक यांच्यासोबतच या लढ्याचा खरा कणा ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे तीन विद्यार्थी नेते होते, जे सलग २३ दिवस अन्नाचा एकही कण न खाता बेमुदत उपोषणाला बसले होते. नेहा, अमीन अमितोज आणि मनीष कुमार अशी या तीन संशोधक विद्यार्थ्यांची नावे आहेत. सलग २३ दिवसांच्या संघर्षानंतर प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांनी हे उपोषण सोडले आहे.
नीट परीक्षेच्या निकालातील घोळ ही केवळ एकमेव घटना नाही. गेल्या काही वर्षांपासून देशातील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यंदाच्या नीट परीक्षेत उत्तरपत्रिका आणि स्कोअर कार्ड यांमधील तफावत, काही ठराविक केंद्रांवरील विद्यार्थ्यांचे संशयास्पद उच्चांक आणि पेपरफुटीचे पुरावे समोर आल्यानंतरही प्रशासनाकडून सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

या साऱ्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य आले. याच नैराश्याला वाचा फोडण्यासाठी आणि व्यवस्थेला उत्तरदायी बनवण्यासाठी ‘आयसा’ या विद्यार्थी संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला निदर्शने आणि मोर्चे काढण्यात आले, परंतु सरकार आणि प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यामुळे या आंदोलनाचे रूपांतर बेमुदत उपोषणात झाले होते.
सलग २३ दिवस चाललेल्या या उपोषणाची प्रशासकीय पातळीवर ज्या गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती, तशी ती घेतली गेली नाही. तरीही हे तीन विद्यार्थी शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम होते. या तिन्ही विद्यार्थ्यांची राजकीय आणि सामाजिक आंदोलनांची पार्श्वभूमी पाहता, त्यांचा हा लढा एका वैचारिक संघर्षातून उभा राहिल्याचे स्पष्ट होते.
कोण आहे 'आयसा'ची राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा…?
या उपोषणातील एक प्रमुख आणि महत्वाचा चेहरा म्हणजे नेहा बोरा. नेहा ही 'आयसा'ची राष्ट्रीय अध्यक्षा असून ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्स अंतर्गत थिएटर अँड परफॉर्मन्स स्टडीज या विषयात पीएचडी करत आहे. मूळची उत्तराखंडची असलेली नेहा दिल्लीत आल्यानंतर विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाली. दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि आंबेडकर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तिने विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवला.
नेहाचा संबंध केवळ राजकारणाशीच नाही तर ती एक उत्तम थिएटर आर्टिस्ट देखील आहे. कलेचा आणि सादरीकरणाचा वापर तिने नेहमीच सामाजिक प्रश्नांची मांडणी करण्यासाठी केला आहे. जेएनयू सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात संशोधनाचे काम करत असताना, देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर ती सातत्याने अभ्यासपूर्ण भाष्य करत आली आहे.
तिच्या नेतृत्वाखाली 'आयसा'ने देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे संघटन केले आहे.
२३ दिवसांच्या उपोषणामुळे तिची शारीरिक स्थिती अत्यंत नाजूक झाली होती. तिचे वजन जवळपास साडेसात किलोने कमी झाले असून, रक्तातील साखरेची पातळी धोकादायक वळणावर पोहोचली होती. जोपर्यंत एनटीए बरखास्त करून नीट प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे तिने स्पष्ट केले होते, मात्र वैद्यकीय परिस्थितीमुळे अखेर तिला उपोषण थांबवावे लागले.
नेहा बोरा
शेतकरी आंदोलनातही सक्रिय होता अमीन अमितोज..
याच आंदोलनातील दुसरा महत्त्वाचा कणा म्हणजे अमीन अमितोज. अमीन हा मूळचा पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी आहे. पंजाबच्या मातीतच विद्रोह आहे आणि अमीनचा आतापर्यंतचा प्रवास याचाच पुरावा देतो. त्याने दिल्लीतील एसजीटीबी खालसा कॉलेजमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि सध्या तो डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली येथे अर्बन स्टडीज या विषयात आपला पीएचडीचा शोधप्रबंध पूर्ण करत आहे.
अमीन हा याच विद्यापीठातील 'आयसा'चा उपाध्यक्ष देखील आहे. अमीनसाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेविरुद्ध लढणे नवीन नाही. २०२०-२१ या काळात देशात जेव्हा ऐतिहासिक शेतकरी आंदोलन उभे राहिले, तेव्हा अमीनने त्या आंदोलनात विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून अतिशय सक्रिय आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. शेतकरी आंदोलनातील त्या प्रदीर्घ आणि संयमी लढ्याचा अनुभव अमीनच्या पाठीशी आहे.
याच कारणामुळे, २३ दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणातही त्याचा संयम ढळला नव्हता. या बेमुदत उपोषणामुळे अमीनचे वजन नऊ किलोहून अधिक कमी झाले. त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन स्नायूंमध्ये प्रचंड वेदना सुरू झाल्या होत्या.
तिघांमधील सर्वात आक्रमक चेहरा म्हणजे मनीष कुमार.
या तिघांमधील तिसरा आणि आक्रमक नेता म्हणजे मनीष कुमार. मनीष हा आयसाचा उत्तर प्रदेश राज्याचा अध्यक्ष आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी असून, सध्या तो अलाहाबाद विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात पीएचडी करत आहे.
उत्तर प्रदेशसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्यात विद्यार्थी राजकारण करणे हे सोपे काम नाही. मनीषने हे आव्हान अत्यंत समर्थपणे पेलले आहे. अलाहाबाद विद्यापीठात जेव्हा प्रशासनाने भरमसाठ फी वाढ केली होती, तेव्हा मनीषने त्याविरोधात एक मोठे आंदोलन छेडले होते. हे आंदोलन इतके तीव्र होते की, विद्यापीठ प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली होती. मात्र, व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवल्याची किंमतही त्याला मोजावी लागली. या आंदोलनादरम्यान त्याच्यावर काही गुन्हे दाखल करण्यात आले आणि विद्यापीठाने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली होती.
मनीष कुमार
पण अशा कारवायांनी मनीष खचून गेला नाही, तर त्याचा लढा अधिक तीव्र झाला. जंतरमंतरवर झालेल्या या उपोषणाचा मनीषच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम झाला. त्याचे वजन तब्बल साडेदहा किलोने कमी झाले. त्याच्या हिरड्यांमधून रक्त येण्यास सुरुवात झाली होती आणि डॉक्टरांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा इशारा दिला होता. अखेर प्रकृती अधिकच खालावल्याने २३ व्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आले.
सध्या उपोषण सोडण्यापूर्वी जंतरमंतरवरील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आणि चिंताजनक बनली होती. वैद्यकीय पथकाने दिलेल्या अहवालानुसार, या तिन्ही विद्यार्थ्यांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. किटोसिससारख्या गंभीर स्थितीत त्यांची शरीरे पोहोचली होती, जिथे शरीर ऊर्जेसाठी स्वतःच्याच स्नायूंना खाऊ लागते.
सोनम वांगचुक यांनाही त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे काही काळासाठी रुग्णालयात हलवावे लागले होते. या सर्वांसोबत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही याच ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केले होते, ज्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती आणि तीव्रता अधिक वाढली होती.
देशभरातील विविध विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते जंतरमंतरवर येऊन या विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शवत होते. मात्र, एवढे सगळे होऊनही केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाने जो असंवेदनशीलता आणि अलिप्तपणा दाखवला, तो चिंताजनक आहे.





