मॅच… चॅट… डेट…! म्हणजे अगोदर एकमेकांना पसंद करा मग गप्पा मारा आणि मग प्रत्यक्ष भेटा… तेही मोबाईलवर बोटं फिरवता फिरवता, अवघ्या काही सेकंदात. गेला तो जमाना जेव्हा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी महिने आणि वर्ष लागायची. कोणाशी बोलण्यासाठी आणि ‘डेट’ला घेऊन जाण्यासाठी मनाची मोठी हिंमत करावी लागायची. तंत्रत्रानाने जगाला इतकं वेगवान बवनून टाकलं आहे की कोणालाही शोधण्यासाठी अवघी काही सेकंदच लागतात, तुमच्या एका बोटावर ‘होय किंवा नाही’ हे ठरवता येतं.
होय आपण बोलतोय डेटिंग अॅप बद्दल… ही इंडस्ट्री भारतात झपाट्याने वाढतेय. 2018 मध्ये जवळपास 2 कोटी भारतीय तरुणाई हे हेडिंग अॅप वापरत होते, तर 2023 पर्यंत डेटिंग अॅप वापरणाऱ्यांची संख्या तब्बल 10 कोटींवर गेली. बरं फक्त शहरातच या डेटिंग अॅपचा ट्रेंड आहे असंही नाही, तर निमशहरात आणि आता जिल्ह्याच्या ठिकाणीही याचा वापर वाढला आहे. आकड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतात डेटिंग मार्केटमध्ये या घडीला तब्बल 783. कोटी डॉलर इतकी उलाढाल होतेय.

भारतात दहा कोटींपेक्षा अधिक तरुणाई ‘डेटिंग अॅप’वर
‘डेटिंग अॅप’ या संकल्पनेबाबत ‘मुक्त शरीरसंबंधांसाठीची सोय’ या मतापासून जिथे ‘सेटल’ व्हायला वेळच नाही, अशा आयुष्यात प्रेमाचे काही बंधमुक्त क्षण मिळवण्याची संधी, इथपर्यंतची वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात. डेटिंग अॅप्सच्या झपाटय़ानं वाढत्या बाजारपेठेत बहुराष्ट्रीय कंपन्यांची अॅप्स आहेत, तशीच अनेक भारतीय अॅप्सही आज आघाडीवर आहेत. अडीच कोटी युझर्स असलेल्या ‘क्वॅक क्वॅक’ या भारतीय डेटिंग अॅपच्या पाहणीनुसार 18 ते 22 वयोगटातली तरुणाई मैत्रीच्या शोधात अॅपवर येते. 23 ते 30 वयोगटातल्या लोकांना तात्पुरती किंवा दीर्घकाळ सोबत हवी असते, तर तिशीच्या पुढच्या सदस्यांना आयुष्यभराचा जोडीदार हवा असतो. कोणताही पूर्वग्रह न ठेवता ‘हुक अॅप्स’ पासून आणि समलैंगिक नातेसंबंधांपासून ते लग्नाच्या जोडीदारापर्यंत असे सर्व प्रकारचे पर्याय अॅपवर सदस्यांना मिळतात.
मात्र आपला विषय या डेटिंग अॅपचा नसून या डेटिंग अॅपच्या विश्वात राजकीय विचारसरणीने कसा शिरकाव केलाय आणि त्याचा प्रेमसंबंधांवर कसा परिणाम होत चाललायं हा आहे…
‘डेट’च्या अगोदर विचारतात, नरेंद्र मोदी की राहुल गांधी?
डेटिंग अॅपसंबंधी झालेल्या एका सर्व्हेमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देशात निवडणूकांचा मोसम जेव्हा सुरू होतो तेव्हा डेटिंग अॅपच्या कपल्समध्ये राजकीय मतमतांतरे अधिक वाढायला लागतात. नरेंद्र मोदी की राहुल गांधी, भाजप की कॉँग्रेस, उजवा की डावा, पुरोगामी की प्रतिगामी, आस्तिक की नास्तिक अशा विषयांवरून या जोडप्यांमध्ये डेटिंग अॅपमध्येच रणधुमाळी सुरू होत असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. विशेषत: आपली पार्टनर फेमिनिस्ट आहे की नाही यावरूनही मॅचमेकिंगवर फरक पडायला लागलाय.

OkCupid या लोकप्रिय ऑनलाइन डेटिंग ॲपने त्यांच्या सुमारे 10 लाख वापरकर्त्यांसाठी एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार 29% महिलांनी सांगितले की, त्यांना कट्टर-डाव्या विचारसरणीच्या लोकांशी डेट करणे आवडत नाही. तर 25 टक्के पुरुष असे होते ज्यांना कट्टरपंथी आणि उजव्या विचारसरणीच्या स्त्रियांना डेट करणे आवडत नव्हते.
लॉस एंजेलिसमधील ऑनलाइन डेटिंग तज्ञ जुली स्पिरा यांच्या मते, जगभरात महिलांच्या समस्या समोर आणि केंद्रस्थानी असल्याने महिला, विशेषत: लक्षाधीश महिला, त्यांच्या राजकीय विचारांबद्दल सर्वात जास्त बोलल्या आहेत. चेन्नईस्थित स्वेता प्रियदर्शिनी म्हणते की, जेव्हा तुम्ही इतके फरक पाहता तेव्हा ते प्राधान्य नसते. पण भारतातील सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार, अनेक राजकीय विचारधारा आहेत ज्यांच्याशी मी स्वतःला जोडू इच्छित नाही. 22 वर्षीय प्रियदर्शिनीने अलीकडेच एका डेटिंग ॲपवर एका व्यक्तीशी संबंध तोडले ज्याची राजकीय विचारधारा तिच्या पूर्णपणे विरुद्ध होती.
अलिकडच्या काळात, सर्व प्रमुख डेटिंग ॲप्स कंपन्यांनी वापरकर्त्यांसाठी त्यांच्या प्रोफाइलचा भाग म्हणून राजकारणाबद्दलचे प्रश्न समाविष्ट केले आहेत. यावरून या पर्यायाला मागणी असल्याचे दिसून येते. या मागणीला अगोदर अमेरिका, फ्रान्स इथून सुरूवात झाली आणि आता त्याचे लोण भारतातही पसरले आहे.

मोदींवरून नवरा-नवरीचे भांडण; लग्न मोडलं
हल्लीच्या काळात भिन्न राजकीय विचारधारेवरून अगदी संसार मोडण्यापर्यंतदेखील मजल गेली आहे. काही वर्षांपूर्वी कानपूर येथे एका व्यावसायिकाचे लग्न सरकारी कर्मचाऱ्याच्या एका मुलीसोबत ठरले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींवरून नवरा आणि नवरीत जोरदार भांडण झालं. भांडण इतकं टोकापर्यंत गेलं की शेवटी लग्नच मोडलं. लग्नाच्या तयारीवर अखेरची बोलणी करण्यासाठी मुलगा आणि मुलगी आपल्या परिवारासोबत मंदिरात गेले होते. सुरुवातीला सर्व काही ठिक होतं. पण काही वेळाने दोघांमध्ये देशाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा सुरू झाली. देशाची आर्थिक स्थिती बिघडल्याचे सांगत मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवलं. तर मुलगा मोदींविरोधात काहीही ऐकण्यास तयार नव्हता. यावरून दोघांमधील चर्चा विकोपाला गेली. लग्नासाठी विचार बदलणार नाही, अशी भूमिका मुलीने घेतली. जे विचार आहेत त्यानुसारच आपण वागणार. मुलाला जे योग्य वाटेल ते आपल्याला मान्य असेलच असं नाही, असं मुलीने स्पष्ट केलं. तर मोदींविरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही, असं मुलाने मुलीला सांगितलं. यानंतर दोघांमधील चर्चेचं रुपांतर वादात झालं आणि अखेर मुलीने लग्न न करण्याचं घोषित केलं.






