विकास मेश्राम
- राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्याच्या घाटोल तालुक्यात लंबा घाटा नावाचं एक गाव आहे. या गावाने गेल्या काही वर्षांत जो प्रवास केला आहे, तो कोणत्याही मोठ्या बदलाचे बेमिसाल उदाहरण ठरावा असा आहे.
- आज इथल्या महिला शेतात भाजीपाला पिकवत आहेत, पशुपालन करत आहेत, बाजारात जाऊन स्वतःचा माल स्वतः विकत आहेत आणि आपल्या कुटुंबासाठी स्थायी उपजीविकेचा मार्ग स्वतःच घडवत आहेत.
- पण हे चित्र नेहमीच असं नव्हतं… पाच वर्ष मागे वळून पाहिलं तर लंबा घाट्याची जमीन पावसाच्या थेंबांशिवाय इतर कोणत्याही आधाराला ओळखत नव्हती. मग कसा झाला हा बदल…?
राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्याच्या घाटोल तालुक्यात लंबा घाटा नावाचं एक गाव आहे. या गावाने गेल्या काही वर्षांत जो प्रवास केला आहे, तो कोणत्याही मोठ्या बदलाचे बेमिसाल उदाहरण ठरावा असा आहे. आज इथल्या महिला शेतात भाजीपाला पिकवत आहेत, पशुपालन करत आहेत, बाजारात जाऊन स्वतःचा माल स्वतः विकत आहेत आणि आपल्या कुटुंबासाठी स्थायी उपजीविकेचा मार्ग स्वतःच घडवत आहेत.
पण हे चित्र नेहमीच असं नव्हतं… पाच वर्ष मागे वळून पाहिलं तर लंबा घाट्याची जमीन पावसाच्या थेंबांशिवाय इतर कोणत्याही आधाराला ओळखत नव्हती. सिंचनाची साधने इतकी तुटपुंजी होती की नाल्यांचे थोडंफार पाणीही केवळ मोजक्याच शेतकऱ्यांच्या रब्बी पिकापर्यंत पोहोचू शकत असे. बाकीच्यांसाठी शेती ही स्थायी उपजीविका नव्हतीच. पाऊस आला की शेत हिरवं, पाऊस गेला की शेत ओसाड... या ओसाडपणाने गावातील बहुतांश कुटुंबांना नाइलाजाने घर सोडण्यास भाग पाडले. मध्य प्रदेशातील मंदसौरपासून गुजरातमधील अहमदाबाद आणि सूरतपर्यंतची ही औद्योगिक शहर लंबा घाट्याच्या मजुरांचे दुसरे आश्रयस्थान बनली होती. दरवर्षी एक ठरलेले चक्र सुरू राहायचं, पावसाळ्यात गावी परतायचं, थोडीफार शेती करायची, आणि पीक कापताच पुन्हा बाडबिस्तरा बांधून शहराची वाट धरायची.
लंबा घाटा गावातील माजू देवी त्या दिवसांची आठवण सांगताना म्हणतात,
“पती निघून गेले की महिनोन्महिने काहीच खबर येत नसे. शेत ओसाड पडून राहायचे, आणि मी फक्त वाट पाहत राहायची कधी पावसाची, कधी पतीच्या परतण्याची.”
सक्षम समूह महिलांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना वागधाराच्या सामुदायिक सहजकर्ती इंदिरा देवी (छायाचित्र सौजन्य – मुकेश मईडा, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
माजू देवी सांगतात, ‘’घरामध्येही परिस्थिती तितकीच कठीण होती. २०२१ साली वागधारा संस्थेने गावात सामुदायिक बैठकांना सुरुवात केली, तेव्हा महिलांची उपस्थिती जेमतेम ३० ते ४० टक्क्यांच्या दरम्यान राहत असे आणि ज्या येत असत, त्याही गप्प बसून फक्त ऐकत राहायच्या, स्वतःचे मत मांडण्याचे धाडस त्यांच्यात नसे.’’
कला देवी त्या काळाची आठवण सांगताना म्हणतात, “आधी बैठकीला जाणं हीच मोठी गोष्ट वाटायची. तिथं बोलण्याचा तर आम्ही विचारही करू शकत नव्हतो. वाटायचं, आपल्याला काय कळतं, आपलं बोलणे कोण ऐकणार.”
ओसाड शिवारातून हिरव्या भविष्याकडे
वागधारा संस्था ‘सच्चा स्वराज’, ‘सच्ची खेती’ आणि ‘सच्चा बालपण’ यांसारख्या संकल्पनांभोवती सक्षम समूह, ग्राम स्वराज आणि बाल स्वराज यांसारख्या गटांची उभारणी करत काम सुरू करत होती. पण संस्थेसमोर दुहेरी आव्हान होतं. एका बाजूला महिलांना घराच्या उंबरठ्याबाहेर बैठकीपर्यंत आणणं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मनात इतका आत्मविश्वास जागवणं की त्या मोकळेपणाने बोलू शकतील, प्रश्न विचारू शकतील आणि स्वतःचे मत मांडू शकतील.
पण सामुदायिक सहजकर्ती इंदिरा देवी यांनी हार मानली नाही. त्यांनी घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधला, वडीलधाऱ्यांना आणि पुरुषांनाही समजावलं आणि इतर गावांतील अशी उदाहरणं सोबत आणली जिथं सिंचन सुधारल्याने आणि भाजीपाला उत्पादन वाढल्याने स्थलांतराची सक्ती हळूहळू कमी होत गेली होती. बैठकांमध्ये त्या वारंवार सांगत, “जोपर्यंत आपल्या शेतात पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत आपली मुलं धुळीतच भटकत राहतील. एखादी विहीर जरी झाली, तरी दहा कुटुंबांचे नशीब बदलू शकते.”
हीच विश्वासाची भाषा हळूहळू महिलांच्या मनात रुजू लागली. सततच्या संवादातून आणि प्रयत्नांतून रचलेल्या या पायावर पहिलं ठोस उदाहरण तेव्हा उभं राहिलं, जेव्हा काही महिलांनी एकत्र येऊन आपल्या शेताभोवती सामूहिकरीत्या विहीर खोदण्याचा पुढाकार घेतला. मनरेगा योजनेअंतर्गत हा प्रस्ताव मंजूर झाला आणि नवीन विहीर बांधणीसाठी सुमारे २.५ लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली.
मनरेगा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नवीन विहीर बांधणीसाठी सुमारे २.५ लाख रुपयांची मंजूर रक्कम आणि विहिरीसमोर सक्षम समूहाच्या महिला (छायाचित्र सौजन्य – मुकेश मईडा, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
विहिरीतून उगम पावली नवी वाट
पाणी आलं आणि त्याबरोबर उन्हाळी पिकांच्या शेतीची शक्यताही आली. या नव्या वाटेची पहिली वाटसरू ठरली ती सक्षम समूहाची सदस्य सपना देवी, जिनं आपल्या शेतात दुधी भोपळा, काकडी, गवार, तीळ, मूग, वांगी आणि भेंडी पिकवायला सुरुवात केली. तिच्या आवाजात आजही आनंद वाटतो “आधी आम्हाला वाटायचं की ही जमीन फक्त पावसाच्या भरवशावरच आहे. पण पाणी मिळालं तेव्हा कळलं की खरी ताकद आपल्याच हातात होती. पहिल्यांदा जेव्हा मी माझी दुधी भोपळ्याची भाजी बाजारात विकली, तेव्हा तो पैसा माझा होता, माझ्या कष्टाचा होता.”
सपना देवीच्या यशाची चर्चा गावाच्या गल्लीबोळांत पसरली आणि इतर महिलाही पुढे आल्या. कला देवी, पूजा देवी, रमा देवी, सुका देवी, माजू देवी, राधा देवी, जीव देवी, तोली, मीरा, केसर देवी, जीजा आणि कतुरी एकामागोमाग एक महिला आपल्या शेतात भेंडी, गवार, काकडी, खीरा, दुधी भोपळा, तुरई, गिलकी, मिरची, वांगी आणि तिळाच्या लागवडीत उतरत गेल्या. पाणी भरण्याच्या जागी, मुलांना शाळेत सोडताना, संध्याकाळच्या बैठकांमध्ये गप्पांचा सूरच बदलून गेला होता.
आपल्या वांग्याच्या पिकासह सपना देवी (छायाचित्र सौजन्य – मुकेश मईडा, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
पतींच्या स्थलांतरापासून बाजारपेठेपर्यंत
पूजा देवी हा बदल अगदी साध्या शब्दांत सांगतात, “आधी आम्ही विहिरीवर भेटायचो तेव्हा बोलणे व्हायचे कोणाच्या घरी रेशन आहे, कोणाच्या पतीने पैसे पाठवले. आता गप्पा होतात की कोणाची भेंडी जास्त निघाली, कोणी किती रुपयांना विकली. हा बदल छोटा नाही, हा आमच्या विचारांचा बदल आहे.”
जसजशी शेती हिरवीगार होत गेली, तसतसा बैठकांमधला महिलांचा आवाजही ठाम होत गेला. सक्षम समूहातील कला देवी आपला अनुभव सांगताना म्हणतात, “आता बैठकीत बोलताना भीती वाटत नाही. आधी वाटायचं आपण काय बोलणार. आता वाटतं की बोलणं गरजेचे आहे, नाहीतर आपलं म्हणणे कोण मांडणार.”
हे सांगणं जितकं सोपं वाटतं, त्यामागे तितकाच खोल बदलाचा प्रवास दडलेला आहे. इतर कुटुंबही परस्पर सहकार्यातून विहिरी बांधू लागली. शेती आता पावसावर अवलंबून असलेली हंगामी कृती राहिली नाही, तर वर्षभर चालणाऱ्या उपजीविकेचे प्रमुख साधन बनली.
समुदायाची ही एकजूट २०२३ साली आणखी एका टप्प्यापर्यंत पोहोचली, जेव्हा ग्राम स्वराज समूहाच्या बैठकीत पाण्याचा प्रश्न औपचारिकपणे मांडला गेला आणि पंचायत स्तरावर विहीर बांधणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. समूहातील सदस्यांनी बैठकांमध्ये गरजेची आकडेवारी मांडली, गावातील अडचणी कागदोपत्री नोंदवल्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद ठेवला. ऑगस्ट २०२४ मध्ये ही विहीर बांधून पूर्ण झाली, आणि आसपासच्या दहाहून अधिक कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली.
आपल्या भेंडीच्या पिकासह सपना देवी (छायाचित्र सौजन्य – मुकेश मईडा, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
'पाणी असेल तर आशा असते'; लंबा घाट्यात महिलांनी घडवलेलं परिवर्तन
आज सक्षम समूहाशी जोडलेली जवळजवळ प्रत्येक महिला आपल्या घरी आणि शेतात हंगामी भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे आणि सरासरी दररोज ६०० ते ७०० रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहे. बहुतांश कुटुंबांनी पशुपालनालाही उपजीविकेचा भाग बनवलं आहे. घरांमध्ये अधिक चांगले अन्न पोहोचत आहे, मुलांची पुस्तके वेळेवर येत आहेत आणि कर्ज काढण्याची सक्ती कमी झाली आहे.
पण या आर्थिक बदलापेक्षाही मोठा बदल झाला आहे, तो म्हणजे महिलांच्या ओळखीत झालेला बदल. सुका देवी यांच्या बोलण्यात हा बदल स्पष्टपणे जाणवतो “आधी घरात काहीही विकत घ्यायचं असेल तर पतीकडे मागावं लागायचं, आता मी स्वतः बाजारात जाते, स्वतः पैसे आणते आणि घरात काय गरजेचे आहे हे स्वतः ठरवते.” महिला आता स्वतःच्या उत्पन्नाचा हिशेब स्वतः ठेवतात, बाजारात भाजीपाला विकण्याची जबाबदारी स्वतः सांभाळतात आणि या आर्थिक स्वावलंबनाने घरातील निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग आपोआपच वाढवला आहे.
या संपूर्ण कार्याचा सर्वांत माणुसकीचा पैलू म्हणजे स्थलांतरात झालेली लक्षणीय घट. ज्या मुलांचे शिक्षण वारंवार खंडित होत असे, ती मुले आता एकाच शाळेत सातत्याने पुढे जात आहेत. राधा देवी आज सांगतात, “आता माझी मुलगी रोज शाळेत जाते, तिची पुस्तके वेळेवर येतात. आधी वाटायचे की तीही माझ्यासारखीच शेतात राबत राहील. आता वाटतं की ती आणखी काहीतरी बनू शकते आणि हाच विचार माझी सर्वांत मोठी कमाई आहे.”
आपल्या वांग्याच्या पिकासह सपना देवी (छायाचित्र सौजन्य – मुकेश मईडा, ब्लॉक सहजकर्ता, वागधारा)
या संपूर्ण बदलाच्या शिल्पकार इंदिरा देवी मोठ्या नम्रतेने सांगतात, “आम्ही काही फार मोठं काम केलं नाही. फक्त इतकंच केलं की प्रत्येक महिलेला हा विश्वास दिला की ती स्वतःचे आयुष्य स्वतः बदलू शकते. एकदा विश्वास निर्माण झाला की बाकी सगळं आपोआप घडत गेलं.” या संपूर्ण प्रवासाचे सार सपना देवी यांच्या शब्दांत सर्वांत सुंदररीत्या सामावते “आम्ही तेच आहोत, जमीन तीच आहे, पण आता पाणी आहे आणि जेव्हा पाणी असतं, तेव्हा आशा असते आणि जेव्हा आशा असते, तेव्हा सर्व काही असतं.”






