साक्षी तांगडे
मानद डॉक्टरेट मिळणं म्हणजे मोठा सन्मान. टाळ्यांचा कडकडाट, मंचावरून नावाची घोषणा आणि पदवी स्वीकारताना डोळ्यांत दाटून येणारे भाव हे क्षण कोणाच्याही आयुष्यात अभिमानाचे असतात. मात्र २५ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात मानद डॉक्टरेट स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन चाकी वाहनावरून पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदान गाठणारी व्यक्ती म्हणजे चाँद तडवी. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील पारलिंगी सामाजिक कार्यकर्ता डॉ. चाँद जयबून बी. सरवर तडवी यांचा प्रवास याच वास्तवाची साक्ष देतो. सन्मान मिळाला आहे, पण पोलीस भरतीच्या अंतिम यादीत नाव येईल का, हा प्रश्न आजही त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे...
‘बाईमाणूस’ने चाँद तडवी यांच्याशी संपर्क साधला. "मी २०२२ आणि २०२३ या दोन्ही वर्षांमध्ये पोलीस भरतीची तयारी केली, मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दोन्हीकडे उत्तीर्ण झाले, मात्र अंतिम यादीमध्ये माझं नावच लावलं नाही..परीक्षा फॉर्म भरतांना तिसरा कॉलम पारलिंगींसाठी आहे. मात्र, अंतिम यादीमध्ये नाव नाही..यासाठी कोर्टात याचिका पण दाखल केली, पण अजून काही निर्णय आलेला नाही...आता पुन्हा एकदा तयारी करत आहे..पण हे शेवटचं आहे. नाव आलं तर बरं नाही तर पुन्हा भिक्षुकीकडेच वळावं लागेल… मानद डॉक्टरेट मिळाली ते ठीक आहे पण रोजच्या भाकरीचा प्रश्न तर त्याने मिटणार नाही ना..." चाँद तडवी अत्यंत उद्वेगाने बोलत होती.
समाजाच्या कडेला ढकलल्या गेलेल्या, दुर्लक्षित आणि गैरसमजांच्या सावलीत जगणाऱ्या पारलिंगी समुदायासाठी चाँद तडवी गेली अनेक वर्षे आवाज उठवत आहेत. त्या संविधान प्रचारक असून पारलिंगी समुदायामध्ये संविधान जनजागृतीचे काम करतात. हक्क, अधिकार, कायदे आणि शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. पारलिंगी उमेदवारांसाठी पोलीस भरतीची तयारी करून देण्यासाठी अकॅडमी सुरू करण्याचा पुढाकारही त्यांनी घेतला आहे. स्वतः संघर्ष करत असतानाच इतरांसाठी मार्ग मोकळा करण्याचं काम त्या करत आहेत.

या अथक कार्याची दखल घेत नालंदा NIRC युनिव्हर्सिटी (Global Honorary Research Institution), पंजाब यांच्या वतीने चाँद तडवी यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. २५ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, चाँद तडवी यांचे कार्य केवळ ट्रान्सजेंडर समुदायापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण समाजाला समावेशकतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे आहे. हा सन्मान संपूर्ण पारलिंगी समुदायाच्या अस्तित्वाची आणि संघर्षाची पावती ठरला आहे.
बालपणापासून सुरू झालेला संघर्ष..
चाँद तडवी यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार असताना पारलिंगी असल्यामुळे शाळेत शिकताना त्यांना सातत्याने हिणवले जायचे. मानसिक छळामुळे अनेकदा शाळा बदलाव्या लागल्या. शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या आई जयबून तडवी यांना कर्करोगाने ग्रासले. वडील रेल्वेत नोकरीला असले तरी उपचारांचा खर्च परवडणारा नव्हता. आईवर योग्य उपचार व्हावेत, यासाठी चाँद रस्त्यावर उतरल्या आणि त्यांच्या आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली.
जोगवा, रेल्वे आणि शिक्षण...
आईच्या उपचारासाठी चाँद कधी रेल्वेत, तर कधी समाजात यलम्मा देवीच्या नावाने डोक्यावर जोगवा घेऊन पैसे मागत होत्या. या काळात त्यांना अपमान, हिणवणूक आणि वेगवेगळ्या नजरा सहन कराव्या लागल्या. मात्र मिळालेला प्रत्येक रुपया आईच्या उपचारासाठी वापरला गेला. या परिस्थितीतही त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तब्बल आठ ते दहा वर्षांच्या उपचारानंतर अखेर २०२१ मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले.आईच्या निधनानंतर चाँद तडवी यांच्यावर दोन बहिणी आणि एका भावाची संपूर्ण जबाबदारी आली. त्यांच्या भावंडांसाठी चाँद आई बनल्या. रेल्वेत भीक मागत, जोगवा मागत त्यांनी घर सांभाळलं. याच काळात त्यांनी ब्युटीपार्लरचा कोर्स पूर्ण केला आणि शिक्षण सुरूच ठेवलं.

समाजाने वेळोवेळी हिणवलं. नातेवाईकांकडून टोमणे ऐकावे लागले. मात्र या प्रवासात नीलू गुरु,पारलिंगी कार्यकर्ता शमीभा पाटील यांसारखी माणसं भेटली, ज्यांनी त्यांना आधार दिला. “आई-वडिलांचं नाव रोशन होईल असं काहीतरी करायचं,” हा निर्धार अधिक ठाम झाला आणि त्याच दिशेने त्यांचा प्रवास सुरू राहिला.
पोलीस भरती : नवा संघर्ष, नवी आशा
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पारलिंगीयांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी, या निर्णयानंतर चाँद तडवी यांनी धुळे जिल्हा पोलीस दलात शिपाई पदासाठी अर्ज भरला. त्या खान्देश विभागातून एकमेव पारलिंगी उमेदवार ठरल्या. विशेष म्हणजे, पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी पूर्ण करणाऱ्या त्या राज्यातील एकमेव पारलिंगी उमेदवार ठरल्या. एकदा नाही तर दोनदा.. मात्र सरावाच्या काळात मैदानावर हिणवणूक, अकॅडमी कडून प्रवेश नकार अशा अडचणी कायम राहिल्या.
NALSA निकालानंतरही प्रतीक्षा : पारलिंगीयांसाठी आरक्षण कागदावरच
भारतामध्ये पारलिंगी व्यक्तींनाही इतर नागरिकांप्रमाणे समान हक्क मिळावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १५ एप्रिल २०१४ रोजी नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी (NALSA) विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक निकालात महत्त्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार पारलिंगीय व्यक्तींना स्वतंत्र लिंग ओळख म्हणून कायदेशीर मान्यता देण्यात आली आणि शिक्षण, रोजगार, आरोग्य तसेच शासकीय सेवांमध्ये समान संधी देणे राज्य आणि केंद्र सरकारांवर बंधनकारक करण्यात आले. या निर्णयानंतरच पोलीस भरतीसह सर्व शासकीय नोकऱ्यांमध्ये ‘थर्ड जेंडर’ म्हणून अर्ज करण्याचा मार्ग पारलिंगीयांसाठी खुला झाला. मात्र, निर्णयाला एक दशक उलटूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी, समावेश आणि संवेदनशीलता याबाबत अजूनही अनेक अडथळे कायम असल्याचे चित्र दिसून येते.

मुंबई उच्च न्यायालय व MAT च्या आदेशांनंतर पोलीस भरती अर्जात ‘पारलिंगी’ हा पर्याय देण्यात आला असला तरी तो केवळ अर्ज करण्यापुरताच मर्यादित असून स्वतंत्र आरक्षण लागू झालेले नाही; सर्वोच्च न्यायालयाने २०१४ च्या NALSA निकालात पारलिंगीय व्यक्तींना SEBC म्हणून आरक्षण देण्याचे निर्देश दिले आणि MAT ने PSI भरतीत जागा राखीव ठेवण्याचे आदेश दिले असतानाही राज्याने अद्याप व्यापक आरक्षण धोरण अंतिम केलेले नाही; एप्रिल २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस भरतीत पारलिंगीय व्यक्तींना वगळणे व आरक्षणाच्या अभावाबाबत राज्याकडून उत्तर मागितले असून, तसेच शारीरिक चाचण्यांचे स्वतंत्र व स्पष्ट निकष नसल्यामुळे पारलिंगीय उमेदवारांना पुरुष किंवा महिला निकषांनुसार स्पर्धा करावी लागत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आज विरोधाभास असा आहे की ज्यांना मानद डॉक्टरेट मिळाली आहे, ज्यांचे संशोधन आणि सामाजिक कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झाले आहे, त्या चाँद तडवी आजही पोलीस भरतीच्या अंतिम यादीत नाव येईल का, याची वाट पाहत आहेत…






