भारतीय समाजात मूल होणं हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. मात्र, ज्या महिलांना गर्भधारणा होण्यास अडथळा येतो. गर्भधारणा होण्यास पुरुष आणि महिला या दोघांमध्ये समस्या उद्भवते, समाजाकडून त्याचा दोष मात्र महिलांचा दिला जातो. त्यांना समाजाकडून विविध प्रकारचे अत्याचार आणि भेदभाव सहन करावे लागतात. वंध्यत्व म्हणजे गर्भधारणा होण्यास असमर्थता, जी पुरुष किंवा स्त्री दोघांमध्येदेखील असू शकते. तरीही, भारतीय संस्कृतीत याचे सर्व दोष महिलांवरच टाकले जाते. हे वंध्यत्व केवळ शारीरिक समस्या नसून, सामाजिक कलंक बनते, ज्यामुळे महिलांना मानसिक, शारीरिक आणि सामाजिक अत्याचारांना सामोरे जावे लागते.
आजही अशा घटना वारंवार घडताना दिसतात. नुकतीच पुण्यात घडलेली एक घटना… “मुलं होत नाहीत” एवढ्याशा कारणावरून सुरू झालेला छळ, हिणवणूक आणि हिंसाचार अखेर प्रियांकाच्या मृत्यूवर जाऊन थांबला. पुण्यातील भेकराईनगरात घडलेली ही घटना केवळ एका घरातील वैवाहिक वाद नाही, तर आपल्या समाजातील खोलवर रुजलेल्या चुकीच्या मानसिकतेचे भयावह चित्र आहे.एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि पुन्हा एकदा समाजासमोर प्रश्न उभा राहिला. अपत्य न होणे हा गुन्हा आहे का? की मानसिकतेत बदल होण्याची वेळ आली आहे?
मुल होत नसल्याने प्रियांकाचा गळा दाबून खून
प्रियांका आकाश दोडके (वय २७, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फुरसूंगी पोलिसांनी पती आकाश विष्णु दोडके (वय ३५) याला अटक केली आहे. ही घटना त्यांच्या भेकराईनगर येथील राहत्या घरी रात्री साडेदहा वाजता घडली आहे. याबाबत प्रियंका यांचा भाऊ सागर रामदास अडागळे (वय ३५, रा. नानगांव, दोंड) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश वाहनचालक म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी प्रियांका गृहिणी होती. १८ फ्रेब्रुवारी २०१८ मध्ये प्रियांकाचा आकाशसोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून आकाश प्रियांकावर संशय घेत होता. मुलबाळ होत नसल्याने त्यांच्यात वाद होत होते. तो सतत प्रियांकाला शिवीगाळ करून मारहाण करत होता. प्रियांकाने याबाबत कुटूंबाला कल्पना दिली होती. त्यामुळे मागील ३ वर्षापासून प्रियांका आकाश सोबत न राहता भावाकडे राहत होती. आठ दिवसापुर्वीच आकाशने प्रियांकाला नांदण्यासाठी ये म्हणून फोन केला होता. त्यामुळे ती त्याच्याकडे पुण्यात राहण्यास आली होती. २५ डिसेंबर रोजी परत प्रियांका नानगांव दौंड येथे भावाच्या घरी आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता पुण्याला निघून गेली. त्या दिवशी सागरच्या पत्नीने प्रियांकाच्या मोबाईलवर फोन केला. मात्र तिने तो उचलला नाही. त्यामुळे तिने आकाशच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी त्याने प्रियांका घरातून निघून गेल्याचे सांगितले. आकाशने प्रियांकाचा रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास राहत्या घरी हाताने व रस्सीने गळा आवळून खून केला. नंतर आकाश स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. फुरसूंगी पोलिस त्याच्या राहत्या घरी आकाशला घेऊन गेले. प्रियांकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. परंतू तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपत्य न होणे हा गुन्हा आहे का?
निसर्गाने बाळंतपण आणि मुलांचे संगोपन ही जबाबदारी मुख्यतः स्त्रीवर टाकली आहे. त्यामुळे गर्भावस्था, बाळंतपण आणि मुलांचे पालनपोषण यामुळे स्त्रीच्या शरीराला कमजोरी येते आणि तिच्या आयुष्यावर काही मर्यादा येतात. या गोष्टींपासून पुरुष पूर्णपणे मुक्त राहतो.निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा जास्त शारीरिक ताकद आणि कणखरपणा दिला आहे. पूर्वीपासून, पुरुषाने या नैसर्गिक फरकाचा गैरफायदा घेतला. आपली जास्त शारीरिक ताकद वापरून त्याने समाजात स्वतःला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ ठरवले.पुण्यात घडलेली घटना मनाला चटका लावून जाते .
पुण्यातील भेकराईनगरात घडलेली ही घटना केवळ एका घरातील वैवाहिक वाद नाही, तर आपल्या समाजातील खोलवर रुजलेल्या चुकीच्या मानसिकतेचे भयावह चित्र आहे. “मुलं होत नाहीत” एवढ्याशा कारणावरून सुरू झालेला छळ, हिणवणूक आणि हिंसाचार अखेर प्रियांकाच्या मृत्यूवर जाऊन थांबला. एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि पुन्हा एकदा समाजासमोर प्रश्न उभा राहिला. अपत्य न होणे हा गुन्हा आहे का? की मानसिकतेत बदल होण्याची वेळ आली आहे?

या घटनेच्या मध्यवर्ती कारणांपैकी एक म्हणजे वैवाहिक नात्यात मुलं न होण्याचा विषय. आजही समाजामध्ये “आई न होणं ‘स्त्रीचा- दोष’ अशी अत्यंत कटू आणि अन्यायकारक समज रुजलेली आहे. अपत्य न होणे हे ज्या अनेक कारणांमुळे घडू शकते, त्यामध्ये स्त्री-पुरुष दोघांनाही साम्याने जबाबदारी असते, हे विज्ञानाने सिद्ध केले असताना, महिला या जबाबदारीच्या बाहेर ठेवल्या जातात. अशा विचारसरणीमुळे अनेक स्त्रिया मानसिक, भावनिक आणि शारीरिक छळाच्या तळाला जातात.
घरात लेकरू नाही म्हणून जीवन जगणाऱ्या एका तरुणीला सतत अपराधी ठरवले गेले, प्रश्न विचारले गेले, दोष दिला गेला आणि अखेर त्या असह्य मानसिक-शारीरिक छळाचा शेवट तिच्या मृत्यूमध्ये झाला. पुण्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा समाजासमोर एक कडू वास्तव उभं केलं आहे, अपत्य नाही म्हणजे स्त्रीच दोषी, ही रूढ मानसिकता आजही जिवंत आहे.
योग्य वेळेत आधार न मिळाल्यामुळे…
या घटनेमध्येही प्रियांका आणि तिचा पती यांच्यात वैवाहिक तणावाची सुरुवात कदाचित या नैराश्याच्या कारणांमुळे झाली. तरीही, त्या तणावाचा सामना करणं, संवाद साधणं, किंवा समुपदेशन घेणं याऐवजी, हिंसा आणि छळाचा मार्ग स्वीकारला गेला. या प्रकरणातून आपल्याला समजते की विवाहात वाद किंवा संघर्ष सामान्य असू शकतो, पण त्याचे समाधान हिंसात्मक पद्धतीने होणे खूपच धोकादायक आहे.
पुढे पाहिलं तर, आपला समाज अजूनही वैवाहिक समस्यांना “घरची गोष्ट” म्हणून पाहतो आणि अनेक वेळा या गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून दबाव आणतो. त्यामुळे बऱ्याच वेळा महिलांना मदत मिळत नाही किंवा न्याय मिळवण्याचा मार्ग अवघड होतो. या घटनेमुळे लक्ष वेधणारा आणखी एक मुद्दा म्हणजे महिलांच्या मानसिक आरोग्याची आणि सामाजिक सुरक्षा याकडे दुर्लक्ष. अनेकदा घरगुती तणावात महिलांचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येते; तरीही त्यांना कुठेही मदत मिळत नाही. योग्य वेळेत आधार न मिळाल्यामुळे या घटनांचा गंभीर परिणाम होतो.
पुण्यातील ही घटना सर्वांसाठी एक मोठी शिकवण आहे. जेव्हा समाजाच्या सर्व स्तरावर जागरूकता, समानता आणि न्याय प्रस्थापित होईल, तेव्हाच अशी भीषण घटना टाळता येईल. शेवटी, हा प्रश्न पडतो की, आपण एक समाज म्हणून कधी बदल घडवून आणणार? जो समाज स्त्रीला आई होण्याची एवढी मोठी जबाबदारी देतो, पण तिला आधार, समानता, सुरक्षितता आणि न्याय देण्यास मागे राहतो, तो समाज पुढे कसा जाईल?
प्रेम हवं, समानता हवी, स्वातंत्र्य हवं…
मिळून साऱ्याजणी मासिकच्या गीताली मंदाकिनी सांगतात , 'गेल्या पन्नास वर्षात स्त्री चळवळ सतत चालू आहे. हडपसरमध्ये घडलेली हिंसा आणि एकूणच हिंसाचार हे एक चक्रच आहे. पहिल्यांदा सासरचे लोक त्रास देतात म्हणून मुलगी माहेरी येते. काही दिवस माहेरचे लोक समजावतात, आणि मग ती परत सासरी जाते. अशा वेळी वाटतं की माहेरच्यांनी थोडा तरी आधार दिला. पण मग ती का जाते परत सासरी? हे कळत नाही. मोबाईलमुळे हेही कळत नाही की सासरच्यांनी तिला धमकी दिली की, 'तुझ्या माहेरच्यांना मारून टाकू.' ती हे आई-वडिलांना सांगू शकत नाही, आणि या धमक्यांमध्येच अडकते. पहिल्या काळात हुंडाबळी खूप होत असत. यासाठी सासर जबाबदार असतं, पण माहेरही तितकंच जबाबदार असतं. कारण मुलीला ठेवून घ्यायचं नसतं, लगेच सासरी पाठवून द्यायचं. मग परत सासरी छळ सुरू होतो. संख्या कमी झाली तरी अजूनही महिलांचा छळ चालूच आहे.
यात मुख्य मुद्दा असा आहे की, स्त्रीला मूल होत नाही म्हणून तिलाच दोषी ठरवतात. पण पुरुषाने कधी टेस्ट केली का? मूल न होण्याचं कारण पुरुषही असू शकतो. पण पुरुषांना टेस्ट करणं म्हणजे त्यांच्या मर्दानगीला आव्हान देण्यासारखं वाटतं. मूल न होण्यामुळे चारित्र्यावर संशय घेतला जातो. एकूणच पुरुषांच्या मनात बाईच्या चारित्र्यावर संशय असतोच.दोघांमध्ये परस्पर विश्वास असला तर संशय बाजूला पडेल. त्यासाठी प्रेम हवं, समानता हवी, स्वातंत्र्य हवं. पण आजच्या लग्नाच्या संस्थेत या गोष्टी नसतात. हे सगळं व्यवस्थेमुळे होतं. व्यवस्था बदलायची असेल तर आधी माणसं बदलायला हवीत. त्यासाठी पुरुषांबरोबर संवाद करायला हवा. पुरुषांच्या मनात जी मर्दानगीची कल्पना आहे, जी सत्तेकडे नेते, त्यामुळे त्यांना आपला कमीपणा वाटतो. हे मनातून काढून टाकायला हवं. म्हणूनच सहजीवन खूप गरजेचं आहे.’






