कोणतंही काम करायचं असल्यास त्या कामासाठीचं कौशल्य व्यक्तीच्या अंगी असणं आवश्यक असतं. या कौशल्याला शिक्षणाची जोड मिळाली तर ती व्यक्ती म्हणजे त्या राज्यासाठी किंवा व्यापक अर्थाने देशासाठी महत्त्वाची ‘ॲसेट’ होऊन जाते. अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी या व्यक्तीच्या शिक्षण व कौशल्याचा अप्रत्यक्षपणे हातभार लागत असतो. पण काही अपरिहार्य कारणांमुळे, अंतर्गत किंवा बाह्य घटकांमुळे, कौटुंबिक वा आसपासच्या परिस्थितीमुळे अशा कोणत्याही गोष्टीमुळे असं कुशल व सुशिक्षित मनुष्यबळ जर एखाद्या देशातून दुसऱ्या देशात वा एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात असेल, तर त्याला ‘ब्रेन ड्रेन’ असं म्हणतात.
सत्तरच्या दशकात भारतामध्ये ‘ब्रेन ड्रेन’ या शब्दाने धुमाकूळ घातला होता. या शब्दाचा अर्थ मानवी किंवा मानवरूपी भांडवल घटणे. सामान्य माणसाच्या भाषेत, चांगल्या संधींसाठी विकसनशील देशांकडून विकसित देशांकडे होणारे कुशल मनुष्यबळाचे स्थलांतर म्हणजे ब्रेन ड्रेन. हे होण्याची अनेक कारणे आहेत. पण यातली महत्त्वाची कारणे म्हणजे राजकीय अस्थिरता, संधींची कमतरता, संघर्ष, आणि आरोग्य विषयक समस्या. याच्या विरुद्धार्थी शब्द आहे ब्रेन गेन. म्हणजे देशात होणारे कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे स्थलांतर. थोडक्यात ब्रेन ड्रेनमुळे आपल्याकडील कुशल, बुद्धिमान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ देशाच्या बाहेर जाते, तर ब्रेन गेनमुळे असे मनुष्यबळ आपल्या देशात येते. सहाजिकच पाश्चिमात्य राष्ट्रांना ब्रेन गेनमुळे बराच फायदा झालेला आहे.
ब्रेन-ड्रेनचा भारतीय महिलांवर काय परिणाम होतो?
मात्र या ब्रेन-ड्रेनच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा विषयाकडे दुर्लक्ष होतयं ते म्हणजे भारतीय स्त्रियांवर काय परिणाम होतोय याचा लिंगदृष्टीने विचार करणे.
ब्रेन-ड्रेन हे तस लिंग-तटस्थ मानलं जातं, म्हणजे स्त्री-पुरुष दोघेही संधींच्या शोधात बाहेर जातात. पण यातही लिंगप्रभाव आहे हे दिसून आलं आहे. त्यामुळे प्रवास करण्याच्या पद्धती, वेळाही बदलतात. 1990 च्या दशकात 26 लाख स्त्रिया बाहेर गेल्या तर 2024 मध्ये 66 लाख स्त्रिया बाहेर गेल्या. पुरुष मुख्यतः आखाती देशांमध्ये जातात तर स्त्रिया अमेरिकेत जास्त जातात. विदेश मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताबाहेर 13.6 दशलक्ष अनिवासी भारतीय (एनआरआय), 18.68 दशलक्ष भारतीय मूळ वंशीय (पीआयओ) आणि 32.3 दशलक्ष भारताचे विदेश नागरिक (ओसीआय) राहतात आणि प्रवासी भारतीय जगातील सर्वांत मोठा प्रवासी समुदाय आहे. दरवर्षी 25 लाख भारतीय विदेशात जातात. ही जगातील प्रवाशांची सर्वांत जास्त संख्या आहे.
संबंधित लेख वाचा: 1) मेटा, गुगल आणि एमेझॉनचा पुरुषांना एक न्याय आणि महिलांना दुसरा… |
संधींचा शोध की व्यवस्थेचं अपयश?
कामातील संधींची मर्यादा, लैंगिक वेतन विषमता, उच्च शिक्षणाच्या कमी संधी, कौटुंबिक अपेक्षा, कार्यस्थळाच्या ठिकाणी लैंगिक भेदभाव, निरूत्साही कार्यस्थळ वातावरण व विना-मोबदला कामांचं ओझं इत्यादी कारणांमुळे स्त्रिया बाहेर जाण्याची संधी शोधत असतात. अनेक पश्चिमी देशांमध्ये मातृत्त्व सुट्टी, कामाच्या चांगल्या जागा, लिंगसमानता इत्यादी लाभ मिळतात ज्यामुळे भारतीय स्त्रिया फ्रान्स, अमेरिका, जर्मनी इत्यादी देशांत काम करायला प्राधान्य देतात.
याविषयी आम्ही डॉ. वर्षा जैन (नाव बदललंय) यांच्याशी बोललो ज्या विज्ञानात संशोधन करत आहेत. त्यांनी भारतात पीएच.डी. केली पण त्यानंतर त्यांच्या पुढच्या संशोधनासाठी त्यांना मदतनिधी मिळाला नाही. त्यांना शीर्ष स्थानावर काम करण्याची संधीही लाभली नाही. निराश होऊन त्यांनी फ्रान्सला जाण्याचा निर्णय घेतला. तिथं त्या आज त्यांच्या आवडत्या प्रकल्पावर काम करत आहेत आणि एका संशोधक टीमचं नेतृत्त्वही. ही वर्षा यांच्यासारख्या हजारो भारतीय स्त्रियांची गोष्ट आहे ज्या भारतात संधी मिळत नाही म्हणून विदेशात पलायन करत आहेत. अर्थात विदेशात जाऊन स्त्रियांना चांगलं शिक्षण व करियरच्या संधी मिळत असल्या तरीही त्यांची आव्हानं कमी होत नाहीत. 
अश्वेत महिलांना परदेशातही फटका
मात्र शिक्षित असल्या तरी स्त्रियांचं प्रतिनिधित्व कमीच आहे. 2023 च्या हार्वर्ड बिजनेस रिव्ह्यू अहवालानुसार अश्वेत स्त्रिया, विशेषतः दक्षिण आशियाई स्त्रियांना योग्यता असूनही कार्यकारी पदांवर नियुक्ती मिळत नाही. त्यामुळे उच्च कौशल्यप्राप्त स्त्रियांचं करियर एका वळणावर येऊन थांबतं. भारतात राहणाऱ्या प्रतिभावंत स्त्रियांच्या अडचणींविषयी तर बोलायलाच नको. प्रतिभावंत तरुणांसाठी महिला रोल मॉडेल्सचीही उणीव आहे. त्यामुळे संशोधन व विकास तसेच कॉर्पोरेट जगात लिंगभेद वाढतो आणि स्त्रियांचा सहभाग मर्यादित राहतो.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम-2024 अहवालात भारताला 146 देशांमध्ये 129 वी जागा मिळाली आहे. आर्थिक भागीदारीतील लिंग विषमतेमुळे स्त्रियांना कमी नेतृत्त्व-संधी तसेच तरुण स्त्रियांना प्रोत्साहनही लाभत नाही. देशात स्त्रियांसाठी बरोबरी साधण्याच्या संधी अजून कमी आहेत. यावर आम्ही देवांगी गुप्ता यांच्याशी बोलणं केलं. त्यांची कहाणी लिंग विषमतेची कहाणी आहे.
त्यांनी पब्लिक पॉलिसी कन्सल्टेंट म्हणून भारतात आपलं करियर करण्याचं ठरवलं होतं. पण त्यांच्या लक्षात आलं की या क्षेत्रात मार्गदर्शक, सहयोग, संधी यांची फारच उणीव आहे. त्यामुळे त्यांनी विदेशात जाण्याचा निर्णय घेतला. त्या सांगतात, “मला तिथं उत्साहवर्धक व मदतपूर्ण असं कामाचं वातावरण मिळालं ज्यात माझ्या योगदानाची कदर केली जात होती व पुढे जाण्याची संधीही मिळत होती.”
त्यांच्या गोष्टीतून दिसून येतं की भारतात भलेही प्रतिभावंत स्त्रियांचा जन्म होत असेल आणि त्यांना सुरूवातीच्या काळात तयार करत असेल, पण धोरणात्मक व नीति आधारीत बदल झाल्याशिवाय देश त्यांना इथं थोपवून धरण्यात व कार्यक्षम श्रमबळात सामावून घेण्यास अपयशी ठरत राहिल. कामकरी स्त्रियांना त्यांचा योग्य वाटा देण्यात आलेलं हे अपयश आपल्या राजकीय व सामाजिक उणीवा जाहिर करतात. त्यामुळेच स्त्रियांना चांगल्या संधी व कामासाठी देश सोडावा लागत आहे.
ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी काय सुधारणा कराव्या लागतील?
विकास व स्वातंत्र्य यांच्यासाठी झालेल्या या ब्रेन-ड्रेनमुळे भारतीय स्त्रियांवर सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रभाव पडले आहेत. बाहेर जाण्यात अजूनही आव्हानं आहेत ज्यात सुधारणांची गरज आहे. त्यांचा उद्देश केवळ ही प्रवृत्ती बदलण्याचा नसावा तर स्थानिक, राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर स्त्रियांना सशक्त बनवण्याचा असला पाहिजे. कामाच्या ठिकाणी नीतिगत बदल गरजेचे आहेत. तिथे भेदभाव रहीत वातावरण निर्मितीची गरज आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही एकाच कामासाठी समान पगार मिळायला पाहिजे व कामाच्या योग्यतेनुसार पदोन्नतीच्या संधीही लाभल्या पाहिजेत.
2015 चा मॅककिन्सी अहवाल सांगतो की भारतातील कामकरी स्त्री-पुरुष यांच्यातील भेदभाव नष्ट झाला तर भारतीय अर्थव्यवस्थेत 700 अब्ज डॉलर्सची भर पडू शकते. मॅटरनिटी लिव्ह, कामाचं चांगलं वातावरण, कामकरी आयांसोबत होणारा भेदभाव यासाठी कमी होणं गरजेचं आहे. संशोधन व नव-तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी निधीची उपलब्धता असणंही आवश्यक आहे. जर भारतातच संशोधनासाठी चांगली स्कॉलरशिप व संधी मिळणार असेल तर देश सोडून जाण्याची कोणाला गरज वाटणार नाही.
भारताबाहेर जाणाऱ्या स्त्रियांना देशातच संधी मिळवून देण्यासाठी एखादं नेटवर्कही तयार करता येऊ शकतं. ज्यामुळे त्यांना देशातील नवीन संधींची माहिती मिळेल. भारतातील अनेक प्रतिभावंत स्त्रिया चांगल्या कामाच्या शोधता विदेशात जात आहेत. हा केवळ त्यांच्या यशाचा प्रवास नाही आहे तर भारतात त्यांना न मिळणाऱ्या संधी व कामाची अनुपलब्धता यांचं अपयशही यातून दिसून येतं. आम्ही या वास्तवाकडे डोळेझाक करत राहिलो तर देशाला प्रतिभावंत, योग्य स्त्रियांना मुकावं लागेल.
स्त्री प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या संधी, योग्य व समान पगार इतकंच देणं गरजेचं नाही तर, समाजातही बदल होण्याची गरज आहे. ज्यामुळे स्त्रियांना त्यांच्या कामासाठी योग्य सन्मान मिळेल. आम्हाला अशी धोरणं तयार करावी लागतील ज्यात स्त्रियांना योग्य व समान पगार, नेतृत्त्व-संधी तसेच सुरक्षित व सहयोगी कार्यस्थळ असे पायाभूत अधिकार मिळतील. ज्यामुळे त्यांनी बरोबरीची संधी लाभेल व त्या पुढे जाऊ शकतील. जोवर असे बदल घडणार नाहीत तोवर प्रतिभावंत भारतीय स्त्रियांचं विदेश जाणं हे केवळ ब्रेन-ड्रेन असणार नाही.






