(योगिनी राऊळ)
मुंबईतल्या माणसाचे सरळ दोन भाग पडतात; एक - ज्याला मुंबई आवडते आणि ती त्याच्या रक्तातून वाहते. दुसरा - कितीही वर्षं मुंबईत राहिलं तरी ज्याच्या स्वप्नात गाव येतं आणि झोपेतही मुंबईला शिव्या. तुम्ही कुठचे असं विचारल्यावर जो इथलाच, असं म्हणतो, तो खरा मुंबईकर. अशा खऱ्या मुंबईकरांचं जगणं दाखवणारा एक सिनेमा सध्या हाऊसफुल्ल सुरू आहे - आता थांबायचं नाय! आणि यातले एक अंतर्बाह्य मुंबईकर - सखाराम मंचेकर अर्थात भरत जाधव.
भरत जाधव यांची या सिनेमातली फ्रेम आणि फ्रेम अप्रतिम आहे. नातवाने रागाने परत फेकलेल्या चेंडूचा वास घेऊन बघणं, मोठ्या पाईपलाइनवर बसून दारू पिणं, चष्मा डोळ्यांवर लावताना हाताची बोटं थरथरणं, जवळच्या मित्राचं मॅनहोलमधून बाहेर आलेलं प्रेत बघून चवताळून उठणं आणि अखेरीस त्याच्या आठवणीत फोडलेला टाहो.
खांदे पाडून, चपला ओढत, हरलेल्या देहबोलीने शाळेतून निघालेले मंचेकर जेव्हा परत कामगार लढ्यात तेवढ्याच उत्साहाने सामील होतात, आपलीही विझलेली आशा उगाच पालवते, मुंबई पुन्हा कामगारांच्या घोषणांनी दुमदुमेल असं क्षणात वाटून जातं. गलगले निघाले, अण्णा जेवायला जेवायला जेवायला, श्रीमंत दामोदरपंत.... या सगळ्याच्या पार हा सखाराम मंचेकर आपल्याला घेऊन जातो आणि सिनेमाभर तुमच्या हातातला रूमाल डोळे पुसून ओला होत राहतो. 
सखाराम मंचेकर हा 2017 मध्ये एस.एस.सी. पास झालेल्या रात्रशाळेतल्या 23 विद्यार्थ्यांपैकी एक - वय वर्ष अवघे 57. इतर 22 जणसुध्दा असेच बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे आपल्या बीएमसीतले चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शिकण्याच्या वयात हातातलं पेन-पुस्तक हरवलेले पण जगण्याच्या लढाईत अव्वल ठरलेले, कोणी पस्तीशीत, कोणी चाळीशीत. यांच्या खाकीला कडक वर्दीची शान नाही, उलट घामाचा, कचऱ्याचा वास. पण या बीएमसीचा पसारा आणि त्याने तोलून धरलेला महामुंबईचा डोलारा, हा या कामगारांच्या अभिमानाचा विषय.
एका बाजूला सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून तिच्या तिजोरीवर राजकारण्यांचा डोळा तर 'चहापाणी दिल्याशिवाय इथे कागद हलत नाही' अशी सर्वसामान्यांच्या डोक्यातली प्रतिमा. पण यातही हाडामांसाची, भावभावना असलेली, क्वचित आदर्शवाद जपणारी माणसं आहेत. चौकटीत राहूनच पण थोडा वेगळा विचार ही माणसं करतात अन् अनेकांच्या आयुष्याला विधायक वळण देतात.
संबंधित लेख वाचा: 1) बॉलिवूडला आरसा दाखवणारे स्त्रीप्रधान चित्रपट तर येत आहेत, पण भारतीय प्रेक्षकांना अशी स्त्री-पात्रं बघायला आवडतील? |
असेच एक उदय शिरूरकर - माजी साहाय्यक महापालिका उपायुक्त. आपल्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतलेल्या शिरूरकरांना 2016 मध्ये कळलं की आपल्या विभागातली एक रात्रशाळा विद्यार्थी नसल्यामुळे बंद पडणार आहे. एक शाळा बंद म्हणजे एका शिक्षकाची नोकरी जाणार किंवा बदली म्हणून कुठेतरी फेकलं जाणार (बदलीला 'फेकणं' हा खास महाराष्ट्र सरकारच्या बोलीभाषेतला शब्द आहे, केंद्रीय पातळीवरची फेकाफेक नाही.)
अशा वेळेस आपल्याच विभागातल्या दहावी नापास विद्यार्थ्यांना रात्रशाळेत शिकवलं तर? दहावी नापास म्हणजे ओघानेच आलं - चतुर्थ श्रेणी कर्मचारी. कोणी चावीवाले, कोणी पाणीखात्यात, कोणी झाडूखात्यात, कोणी गटारखात्यात....(जलनि:सारण व पाणीपुरवठा विभाग, घनकचरा विभाग, मलनिःसारण अशी या खात्यांची कागदोपत्री नावं आहेत, जी फक्त बीएमसीवाल्यांना माहित आहेत.) तर अशांना शाळेत भरती केलं तर शाळाही चालू राहील, मास्तरची नोकरी वाचेल आणि कामगारही शिकतील, असा सहज विचार करणारे हे विरळा उच्चपदस्थ.
योगायोगाने या नोकरीची शाश्वती नसलेल्या शिक्षकालासुध्दा ध्येयवादी मास्तरकीचा कीडा चावलेला. सरांच्या स्वप्नात सामील झालेले हे तरूण 'माळी मास्तर' आणि अजिबात अभ्यास न आवडणारी २३ वांड मुलं-मुली यांचं रात्रशाळेतलं दहावीचं वर्ष कसं होतं ते उलगडत जाणारी ही नर्मविनोदी शैलीतली सत्यघटना. शिवराज वायचळ, ॐकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.
यातले खरे हिरो आपल्या कहाण्या सांगायला अजून आहेत म्हणून असेल किंवा या सगळ्या कलाकारांना शिक्षणाचं महत्त्व कळलंय म्हणून असेल पण यातला प्रत्येकजण खरा वाटतो. अनेक ओळखीचे दिग्गज चेहरे एकामागून एक दिसत जातात आणि मुंबईवर बेहद्द प्रेम करणारे आपण या मुंबईचा खरा चेहरा अनेक दिवसांनी दिसल्याचं समाधान घेऊन घरी जातो. 
झाडू खात्यातल्या विद्यार्थ्यांबरोबर दोन विद्यार्थीनीपण आहेत, पण वर्गातल्या पोरींची छेड काढण्याचा विचार कोणाच्या डोक्यातही येत नाही. एक विद्यार्थी पूर्ण वर्ष पहिल्या बाकावर बसलाय, पण तोंडातून अवाक्षर काढलेलं नाही. 'अरे याला बोलता येतं की नाही?' असा प्रश्न डोक्यात आल्यावर प्रेक्षकच स्वतःची समजूत घालतात...'एखादा असतो ना आपल्याही वर्गात असा घुम्या, पास झाला ना? बास मग! प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे - कोणाच्या नवऱ्याचा पाय कामावर असताना तुटलाय (ही टीपिकल पिटी केस) तर कोणाचा तरणाताठा मुलगा गेलाय आणि सुनेच्या जीवावर जगणं नको झालंय.
सर्वांमधलं समान सूत्र एकच - काम करताना खिशात बाटली हवी. याला व्यसन वगैरे म्हणतात पुस्तकी अभ्यासक्रमात, पण इथले अभ्यासक्रम वेगळे आणि यातल्या डिग्र्याही वेगळ्या. मॅनहोलमध्ये तरंगत असलेली वस्तू टीशर्ट आहे की रबर आहे की आख्खा माणूस यावर इथे पैज लागते आणि तीपण वीस-वीस रुपयांची. ती जिंकल्यावर प्यायची तीपण दारूच आणि गटारात उतरण्याचं धाडस करण्यासाठीपण दारूच.
या शालेय विद्यार्थ्यांच्या बरोबरीने उलगडत जातं एक असं जग, जे आपल्याला माहीत आहे पण बघायचं नाहीये. सहज जाता जाता अनेक गोष्टी पटकथेत पेरलेल्या आहेत... बायकोचा पगार जास्त असला तर नवऱ्याला लाज वाटते का? लग्नानंतर बाईने शिकायचं असेल तर आवड म्हणून शिकावं की जास्त पैसे मिळतील म्हणून? तरूणपणी नवरा गेला तर बाईने इतर पुरुषांशी मैत्री करावी का? परीक्षेत कॉपी करावी का? याची होकारार्थी वा नकारार्थी उत्तरं सिनेमा देत नाही, तो फक्त खरी परिस्थिती दाखवतो. एक मार्मिक वाक्य जयश्रीताईंच्या तोंडी येतं - मशिनवर काम करायला बायकांना मिळतंच कुठे? मशीन आली की पहिल्या नोकऱ्या जातात बायकांच्या. असा हा सिनेमा 'अभ्यास आणि मेहनत' यापलीकडे कुठेही आदर्शवादी होत नाही.
आईवडिलांचं ऋण, थोरामोठ्यांच्या कहाण्या, टिळे-बुक्के लावलेली माणसं, परमेश्वरी नवस-चमत्कार... काही या कथेत येत नाही. किंबहुना प्रेक्षकांच्या डोक्यातच येत नाही, हे सगळं मिसिंग आहे सिनेमात. शिक्षण हे सर्व भेदांच्या, धर्माच्या पार आहे आणि ते आपल्याकडे सहजसाध्य आहे, फक्त मेहनत करायची तयारी हवी, असं साधं तत्त्वज्ञान सिनेमा सांगतो. नवं शिकायला वयाची, भाषेची कसलीच अडचण नसते. जपानचा अभियंता इथल्या पाणीखात्यातल्या कामगाराकडूनपण शिकायला तयार आहे आणि आपण कसले इंग्रजीचे बागुलबुवा घेऊन बसलोय? एक चित्र भाषेपेक्षा जास्त बोलतं आणि जगभर चित्रं सारखीच असतात, विशेषतः यंत्रांची, तांत्रिक उपकरणांची. अशा छोट्या छोट्या गोष्टी सिनेमा दाखवत जातो.
सिध्दार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, प्रवीण डाळींबकर, नंदू माधव, दीपक शिर्के, अशांबरोबरच छाप पाडून जाते चुणचुणीत किरण खोजे. आणि चक्क डोक्यावर केस असलेला आशुतोष गोवारीकर.... कितीतरी वेळ हा आशुतोष गोवारीकर आहे हे पटतच नाही. आपल्या तरुणपणातला पल्लवी जोशीबरोबरचा आशुतोष गोवारीकर, नंतर लगानच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणि आता एकदम उदय शिरूरकर - एका शिक्षिकेच्या घरातला आदर्श मुलगा.
नेत्याने डाव्या हाताने धरलेला हात केवळ नजरेने नाकारणारा हा प्रशासकीय अधिकारी. असे अधिकारी आहेत म्हणून आमचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरचा विश्वास कायम आहे. पाय जमिनीवर असणारे उच्चपदस्थ कसे असतात, हे गोवारीकर यांच्या संयत अभिनयातून फार सुंदर खुलून आलं आहे. सेवाक्षेत्रात कोणी हाताला धरून सांगत नाही, बदल कसे करायचे. तुमचे तुम्ही ते करायचे असतात.
आणि घरी जाताना लक्षात राहतो मॅनहोलमधून मृत बाहेर आलेला सागर - किशोर बच्छाव. या लोकांबद्दल, त्यांच्या कंत्राटी पद्धतीबद्दल, त्यातल्या सक्तीच्या आरक्षणाबद्दल इतक्या जणांनी इतक्या ठिकाणी लिहिलंय तरी अजून machine scavengers, mechanical drainage cleaning आलेलंच नाही या महानगरात. पद्मश्री सुधारक ओलवे यांची या विषयावरची छायाचित्र आठवली एकदम, भाषा सिंह यांचं अदृश्य भारत नावाचं पुस्तक आठवलं, माटुंग्याच्या कासारवाडीला खेटून असलेलं माझं जुनं घर आठवलं, तो चिरपरिचित कचऱ्याचा आंबूस वास आठवला आणि असे किती सागर ही मायानगरी उदरात घेणार आहे, या विचाराने गलबलून आलं.
कचरा उचलला नाही तर मुंबई ठप्प होते, हे लक्षात आल्यावर कायमस्वरूपी सफाई कामगार घेणंच बंद केलं बीएमसीने. ते कामगार नकोत, कामगार कायदे नकोत, त्यांचे आक्रस्ताळे नेते नकोत आणि त्यांचे संपही नकोत. साधारण 2000 सालापासून सर्वपक्षीय सहमतीने राबविण्यात येणारा विकास कार्यक्रम म्हणजे कंत्राटदाराशी मैत्री. बीएमएसीतल्या Standing Committeeच्या अध्यक्षपदासाठी महापौरपदापेक्षा जास्त चुरस असण्याचा हा काळ. सगळ्या सामाजिक सुरक्षेच्या कायद्यांतून, देण्यांतून स्थानिक स्वराज्य संस्थांना अभय देऊन या व्यवस्थेने सरकारी सेवांची अलगद सुटका केली पण अशिक्षित, अकुशल, गरीब कामगार मात्र यात अडकला.
कंत्राटदार साधे गमबूट, safety gloves देत नाही, तो मेडिकलचं बिल काय देणार? नगरसेवक आणि कंत्राटदारांनी गळ्यात गळे घातल्यावर बीएमसीच्या युनियन लीडरची जी वट होती एकेकाळी, ती पार धुळीला मिळाली. कामगारांना वाऱ्यावर सोडून केवळ कट मारणं वा तोंड बंद ठेवण्यासाठी कट मागणं एवढंच काम युनियनला उरलं. त्यामुळे 2017 मधला बीएमसीचा युनियन लीडर कसा दात-नखं काढलेला सिंह झालाय आणि त्यांच्या डरकाळ्यांना आता कसं कोणीच घाबरत नाही, तेही जाता जाता सिनेमा दाखवून जातो.
आपली लाडकी मुंबई, खारची पाईपलाईन, भायखळा स्टेशन, जुन्या चाळी असं बरंच बरंच ओळखीचं पडद्यावर सरकत राहतं. गोड गोड लग्नाच्या गोष्टी सांगणारे तेलातुपातले, मराठी संगीत नाटकांचे, नटांचे nostalgic biopic बघून बघून अस्सल मुंबईकर कंटाळला होता. कष्टकरी मुंबईने कधीच एका विशिष्ट जातीची तळी उचलली नाही, किंबहुना मुंबईत जात-धर्म-चालीरिती लोकलच्या फूटबोर्डवरच कायम लटकत राहिल्या. त्यांना भर गर्दीत लोकलमध्ये घुसायलाच मुंबईकरांनी कधी दिलं नाही.
कोणाच्या तरी चालीरीती, जगण्याची लढाई संपल्यानंतरचे गोड गुलकंदी सिनेमे आणि त्यांच्या पाणचट जाहिराती बघून खरा मुंबईकर विटला होता. तर हा दाणकन् जमिनीवर आपटणारा एक सिनेमा हवाच होता सगळ्यांना. मराठी सिनेमाच्या प्रेक्षकाला गजरा-शालींतून बाहेर काढून साध्या कपड्यात, साध्या स्लीपर्स घालून थिएटरमध्ये आणायची ताकद या सिनेमात आहे.... तर आता खरंच थांबायचं नाय.... आपल्या बीएमसीची शपथ आहे तुम्हाला.... मुंबई आहे तशी ठेवायची, कोणाला घाबरायचं नाय, कोणाकडून खोटं ऐकायचं नाय.... आता थांबायचं नाय!






