15 मार्च 1999 चा दिवस, दोन कुटुंबं लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकाच्या समोरच्या टॅक्सी स्टँडवर टाटा सूमो चालक आणि मालकाबद्दल विचारपूस करत होते. ही टाटा सुमो हरचंदपूर येथील मनोज कुमार सिंहची होती आणि ती आलमबागमधील रवी श्रीवास्तव चालवत होता. हे दोघेही काही दिवसांपासून बेपत्ता होते. ते दोन्ही कुटुंब ज्या स्टँडवर विचारपूस करत होते तिथून अलाहाबाद म्हणजे आताच्या प्रयागराजसाठी गाड्या जायच्या. चौकशी करणारे कुटुंबं मनोज कुमार सिंह आणि रवी श्रीवास्तव यांचे होते. ते कुठे बेपत्ता झाले होते त्यांना कोणी पाहिलं की नाही याचीच चौकशी हे कुटुंब करत होतं.
त्यात त्यांना एक गोष्ट समजली की, त्या दोघांनीही शेवटचं भाडं हे प्रयागराजसाठीचच घेतलं होतं. त्या दोन्ही कुटुंबांनी बरीच चौकशी केली पण त्या दोघांबद्दल आणखी माहिती त्यांना मिळाली नाही. मग कुटुंबांनी स्टँड युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत नाका हिंडोला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. दिवस जात होते पण त्या दोघांचा काहीच पत्ता लागत नव्हता. एक वर्ष सरलं होतं पण त्या दोघांचा काही ठावठिकाणा लागला नाही.
एकामागोमाग एक गायब होत गेले…
तिथे त्या दोघांचा पत्ता लागत नव्हता आणि अशातच प्रयगराजच्या शंकरगढमध्ये राहणाऱ्या पत्रकार धीरेंद्र सिंह हा सुद्धा बेपत्ता झाला. दैनिक समाचार पत्र ‘आज’ मध्ये तो काम करायचा. त्या दिवशी देखील तो कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता. पण तो परत कधीच घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सर्व ठिकाणी शोधलं पण तो सापडलाच नाही. शेजारपासून ते ऑफिसपर्यंत, मित्रांपासून ते नातलगांपर्यंत सर्वांकडे चौकशी केली गेली. पण धीरेंद्र सिंह याच्याबद्दल काहीही हाती लागलं नाही. मग हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचलं. पोलिसांनी उशीर न करता कीडगंज पोलिस ठाण्यात पत्रकाराच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली आणि धीरेंद्रचा शोध सुरू केला.
संबंधित लेख वाचा: 1) ‘Adolescence’ सिरिजची जगभरातून इतकी चर्चा का होत आहे? |
मुडंकं आणि प्रायव्हेट पार्ट गायब असलेला एका पत्रकाराचा मृतदेह
आधीच बेपत्ता झालेल्या दोन जणांचा पोलिसांना शोध लागला नव्हता त्यात आता आणखी एका नावाची भर पडली होती. पण आता बेपत्ता झालेल्या धीरेंद्र सिंहचे पोलिस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते, म्हणूनच प्रयागराजचे तत्कालीन एसएसपी पीके तिवारी यांनी त्याच्या शोधात अनेक पथकं तैनात केली. चार दिवसांनंतर, 18 डिसेंबर रोजी, पोलिसांना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर एक मृतदेह सापडला. ज्याचं मुडंकं आणि प्रायव्हेट पार्ट छाटलेले होते. प्रयागराज पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या मृतदेहाची ओळख पटवली तो मृतदेह पत्रकार धीरेंद्र सिंह याचाच होता. युपी आणि एमपी पोलिसांनी संपूर्ण जंगलात शोध घेतला, पण त्या मृतदेहाचं मूडंकं सापडलं नाही.
पोलिसांनी धीरेंद्रच्या घरच्यांना धीरेंद्रचं कोणाशी वैर आहे का? अशी विचारपुस केली तेव्हा घरच्यांनी थेट कोणावर आरोप केले नाहीत. पुढे पोलिस तपासात समोरं आलं की, 14 डिसेंबरच्या संध्याकाळी धीरेंद्रला नैनीच्या राम सागर परिसरात राजा कोलंदरसोबत दुचाकीवर जाताना अनेकांंनी बघितलं होतं. राजा कोलंदर या माणसाला अटक केल्यानंतर, धीरेंद्रच्या घरच्यांनी धीरेंद्रचं याचं माणसाशी वैर असल्याचं सांगितलं.
राजा कोलंदरवर संशयाची सुई
राजा कोलंदर हा शंकरगड याच परिसरात राहायचा, 90 च्या दशकात राजा कोलंदर नैनी येथील सेंट्रल ऑर्डनन्स स्टोअर इथे कर्मचारी होता. त्याशिवाय त्याची पत्नी जिल्हा सदस्य होती. पोलिस रेकॉर्ड नुसार 1998 साली राजा कोलंदरने प्रयागराजमध्येच टीव्ही-व्हीसीआर भाड्याने देणाऱ्या एका तरुणाची हत्या केली होती. यानंतर तो फरार झाला होता. राम निरंजन कोल हे त्याचं खरं नाव होतं. तो आदिवासी ‘कोल’ समाजातला होता. त्याच्या दहशतीमुळे लोकं त्याला कोल जातीचा राजा मानू लागले होते. म्हणूनच त्याचं नाव राजा कोलंदर असं पडलं होतं.
त्याच्या चौकशी दरम्यान तो उडवाउडवीची उत्तर देत होता. पण नंतर त्याने गुन्हा कबूल केला. राजा कोलंदरने पोलिसांना सांगितलं की, घटनेच्या दिवशी त्याने पत्रकार धीरेंद्र सिंह याला विश्वासात घेऊन आपल्या पिपरी फार्म हाऊसवर बोलावलं होतं. जेव्हा धीरेंद्र सिंह तिथे पोहोचला, तेव्हा राजा कोलंदर आणि त्याचा मेहुणा बच्छराज कोल हे शेकोटी पेटवून तिथे बसेल होते. दोघांनी धीरेंद्र सिंहलाही आगीजवळ येऊन बसायला सांगितलं.
जसा धीरेंद्र आगीजवळ येऊन बसला तसं बच्छराजने त्याच्या पाठीत गोळी मारली आणि तिथेच त्याला ठार केलं. मग त्यांनी धीरेंद्रचा मृतदेह टाटा सुमोंमध्ये टाकला आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर गेले. जिथे दोघांनी आधी धीरेंद्रचे डोके आणि प्रायवेट पार्ट त्याच्या शरीरापासून वेगळं केले. त्यानंतर त्यांनी त्याचं शरीर आणि प्रायवेट पार्ट जंगलात गाडलं. तर त्याचे डोके फॉइलमध्ये गुंडाळून आपल्या फार्म हाऊसवर घेऊन गेले.
राजा कोलदंरची डायरी सापडली अन् पोलिसही सुन्न झाले
टाटा सुमो हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला बेपत्ता झालेले 2 जण आठवले असतील. त्यांचं काय झालं याचा खुलासा पोलिसांना राजा कोलंदरच्या घराची तपासणी करताना झाला. या तपासादरम्यान पोलिसांना एक डायरी मिळाली. जेव्हा पोलिसांनी ही डायरी उघडली तेव्हा पोलिसांना काळालं की, राजा कोलंदर हा साधा सुद्धा गुन्हेगार नव्हता. तो नरभक्षक होता. त्याने केलेल्या हत्यांची माहिती लिहिली होती. त्याशिवाय त्यात लिहिली होती एका सूपची रेसिपी. त्या डायरीतून पोलिसांना एक दोन नाही तर 14 हत्यांचा खुलासा झाला. जे राजा कोलंदर आणि त्याच्या मेहुण्याने केले होते.
(नेटफ्लिक्स वेबसिरीज Indian Predator: The Diary of a Serial Killer)
तो मानवी मेंदूपासून सुप बनवायचा आणि त्याच कवटीतून प्यायचा
तो लोकांना मारायचा त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करायचा. मृतदेहाच्या कवटीतून मेंदू बाहेर काढून तो त्याचा सूप बनवून प्यायचा. त्याला असं असं वाटायचं की हे सूप प्यायल्यावर तो आणखी हुशार आणि शक्तिशाली होईल. छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्याने या हत्या केल्या होत्या. राजा कोलंदरने त्याने केलेल्या हत्या त्या डायरीत लिहून ठेवल्या होत्या..
दोघांना जन्मठेपेची शिक्षा
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील न्यायालयाने सीरिअल किलर, नरभक्षक राजा कोलंदर आणि बच्छराज कोल या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या दोघांना वर्ष 2000 मध्ये एका दुहेरी हत्याकांडात कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. लखनऊ येथील कोर्ट क्रमांक-5 मधील न्यायाधीश रोहित सिंह यांनी शुक्रवारी दोन्ही आरोपींना ही शिक्षा सुनावली. दोघांना अडीच लाख प्रत्येकी दंडही भरावा लागणार आहे. नेटफ्लिक्सने याच राजा कोलंदरवर ‘Indian Predator: The Diary of a Serial Killer’ या नावाने वेबसिरीज बनवली आहे.






