पुनम चौरे
- 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री
- लग्नाच्या नावाखाली नाशिक येथे जबरदस्तीचं लग्न
- गर्भावस्थेत शारीरिक-मानसिक छळ
पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय आदिवासी तरुणीला लग्नाचं आमिष देऊन तीन लाख रुपयांमध्ये तिची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेची विक्री आणि छळ केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिला कातकरी समुदायातील आहे.
2024 मध्ये नाशिकमधील एका व्यक्तीसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला. प्राथमिक तपासानुसार समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलीची तस्करी करून तिचे लग्न लावून देणाऱ्या दोन लोकांना आरोपी आणि आरोपीच्या आईने कथित स्वरुपात तीन लाख रुपये दिले होते
गर्भावस्थेत मारहाण आणि जेवणही दिलं नाही
2024 मध्ये नाशिकमधील एका व्यक्तीसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला. मुलीची तस्करी करून तिचे लग्न लावून देणाऱ्या दोन लोकांना आरोपी आणि आरोपीच्या आईने कथित स्वरूपात तीन लाख रुपये दिले होते. असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. महिला गरोदर असतांना पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. वारंवार जातीवाचक शिवीगाळही करायचा. गरोदर असतांना पतीने मारहाण केली होती. इतकंच नाही तर तिला वेळेवर जेवणही दिलं जात नव्हतं.
संबंधित लेख वाचा:
बालविवाह : कायदे, आकडे आणि सामाजिक वास्तव यातील दरी…
बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न
यांनतर बाळाच्या जन्मानंतर महिला जून 2025 रोजी आपल्या आईच्या घरी परतली. 6 जानेवारी रोजी आरोपीने तिचे बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी, त्याची आई आणि दोन मध्यस्थांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात कोवळ्या मुलींच्या विक्रीचा बाजार
पालघरच्या आदिवासी भागात एजंटच्या माध्यमातून अनेक मुलींचा बळी घेतला जातो. एजंट लाखो रुपये घेऊन आदिवासी समाजातील मुलींचं लग्न लावून देतात, मात्र त्या मुलींच्या भविष्यात काय होतं, त्या कशा राहतात याकडे कोणताही गंभीर दृष्टिकोन नाही. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागातील दुर्दैवी परिस्थितीमुळे इथली कुटुंबं आपल्या मुलींचं लग्न फक्त 40 ते 50 हजार रुपयांसाठी लावून देतात. त्यांना आपली मुलगी कुणाशी लग्न करत आहे, तो कुठे राहतो, याची अगदी साधी कल्पनाही नसते.
आदिवासीबहुल या भागातल्या वाडा, मोखाडा, जव्हार, भिवंडीत अशी अनेक प्रकरणं आहेत. ज्यात अल्पवयीन मुलींची लग्न करून त्यांचा सौदा केला जातोय.देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या परिसरात पालघर आणि ठाण्याचा आदिवासी भाग आहे. या आदिवासी भागाला अनेक समस्यांनी ग्रासलंय. बालमृत्यू आणि कुपोषण इथल्या आदिवासींच्या पाचवीला पुजलंय. आईच्या पोटात असल्यापासून इथल्या आदिवासींच्या वाट्याला संघर्ष येतो. जन्मताच जगण्याचा संघर्ष... तिथंही मृत्यूला हुलकावणी दिली की कुपोषणाचा विळखा पडतो. त्यावरही मात केली की इथल्या आदिवासी मुलींचा चक्क सौदा मांडला जातो.






