विठ्ठल साबळे
पुण्यातून एक धक्कादायक बातमीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका महिलेनं तरुणावर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण आता या महिलेची कुंडली समोर आली आहे. महिलेवर याआधी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
भारतामध्ये पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक, मानसिक आणि आर्थिक अत्याचारांबाबत फार कमी तक्रारी नोंदवल्या जातात. मानसिक दबाव, पुरुषावर अत्याचार कसा होईल असा खोचक प्रश्न, कुटुंबीयांची भीती आणि न्याय प्रक्रियेबद्दलचा अविश्वास यामुळे अनेक पुरुष गप्प बसणं पसंत करतात. कायद्यात बलात्काराच्या पारंपरिक व्याख्येत पुरुष पीडितांसाठी स्वतंत्र तरतुदी नसल्या तरी गुंगीचं औषध देणे, धमकावणे, खंडणी, ब्लॅकमेल, मानहानी, गोपनीयतेचा भंग अशा अनेक कलमांखाली पुरुषांना संरक्षण मिळू शकतं. कोथरूड पोलिसांकडे नोंदलेलं हे प्रकरण अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचं स्पष्ट उदाहरण ठरू शकतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. गौरीमयी (नाव बदललंय) असं आरोपी महिलेचं नाव आहे. या महिलेनं एका पुरुषावर गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या इसमावर अत्याचार केला, असा आरोपी पीडित इसमाने दावा केला आहे. या प्रकरणी पीडित इसमाच्या तक्रारीवरून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली. अशी की, आपल्याकडे काल एक घटना घडली होती. या महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला आणि फिर्यादी इसमाची तुळजापूर देवी मंदिरात ओळख झाली. पाच महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात ही घटना घडली होती. मार्च महिन्यात फिर्यादी आणि आरोपीचे काही साथीदार हे तुळजापूरला फिरायला गेले होते, त्यानंतर काशी विश्वनाथ येथे गेले होते. ओळखीचा फायदा घेत काशी विश्वनाथ येथे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, हा माझा भाऊ आहे असे सांगत काही देवाण-घेवाण झाल्याची माहिती आहे. या महिलेवर एक अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती समोर आली आहे. काल गुन्हा दाखल झाला असून आरोपीला नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवलं आहे, अशी माहिती दिली.
सगळी प्रकरणं नवीन नाहीत. याआधीही मागील 1 ते 2 वर्षांत देशभरात महिलांकडून पुरुषांना फसवणं, ब्लॅकमेल करणं, हनीट्रॅपमध्ये अडकवणं आणि पैशांची उकळपट्टी करण्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. बेंगळुरूत एका महिलेनं विवाहित पुरुषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे फोटो-व्हिडिओ काढून तब्बल 2 कोटीपेक्षा जास्त रक्कम उकळली होती.
एडवोकेट बोधि रामटेके यांनी या प्रकरणावर बाईमाणूसशी बोलताना सांगितलं की, स्त्रियांवरील हिंसा ही केवळ वैयक्तिक पातळीवरील नाही, तर पितृसत्ता, जातव्यवस्था आणि ऐतिहासिक भेदभावाच्या खोलवर रुजलेल्या रचनेतून निर्माण झालेली संरचनात्मक समस्या आहे. त्यामुळे महिलांसाठी अस्तित्वात असलेल्या संरक्षणात्मक तरतुदी या केवळ अधिकार नसून, भूतकाळात झालेल्या अन्यायाची भरपाई आणि पुढील हिंसा रोखण्याची संस्थात्मक हमी म्हणून पाहिल्या जातात. याउलट, पुरुषांवरील हिंसा बहुतेक वेळा परिस्थितिजन्य असते आणि समाजातील पितृसत्ताक वर्चस्वामुळे ती संरचनात्मक स्वरूपात टिकत नाही. यामुळे दोन्ही अनुभवांचे स्वरूप वेगवेगळे राहते आणि कायद्याचं रूपही वेगळं दिसतं.
पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी स्वतंत्र कायदेशीर तरतूद अद्याप देशात अस्तित्वात नाही. संसदेमध्ये जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये विचारलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारने सांगितलं की पुरुष पीडित भारतीय न्याय संहितेच्या कलम 246 आणि 248 चा आधार घेऊ शकतात, परंतु ही कलमे फसवणूक किंवा शारीरिक इजा पुरती मर्यादित आहेत. मानसिक, आर्थिक, कौटुंबिक किंवा लैंगिक छळासाठी स्पष्ट चौकट यात नाही. संविधानातील अनुच्छेद 14 , 15 आणि 21 समानता, भेदभावविरहित संरक्षण आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी देतात, त्यामुळे पुरुष पीडितांसाठीही लैंगिक तटस्थ कायदे आणि स्वतंत्र तक्रार प्रणाली उभारणे आजच्या न्यायव्यवस्थेची आवश्यक गरज आहे.
तर जयपूरमध्ये 2 महिलांनी
तरुणाला खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ₹3 लाखांची मागणी केली होती आणि त्या दोघी प्रत्यक्ष पैसे घेताना पकडल्या गेल्या. गुजरातमध्येही एका महिलेने व्यावसायिकाला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि त्याचे अश्लील फोटो काढून लाखोंची उकळपट्टी केली होती. महाराष्ट्रातील नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर परिसरातसुद्धा महिलांनी पुरुषांना नात्यात अडकवून त्यांच्या फोटो-व्हिडिओंचा आधार घेत पैशांची मागणी करण्याची 3 ते 4 गंभीर प्रकरणं नोंदली गेली आहेत. या सर्व घटनांचा सार एकच दिसतो की छळ, फसवणूक आणि मानसिक, लैंगिक ब्लॅकमेलिंग हे गुन्हे आता एका बाजूचे राहिलेले नाहीत आणि पुरुषही अशा गंभीर गुन्ह्यांचे थेट बळी ठरत आहेत.
आरोपी महिलेवर याआधीही अट्रॉसिटीचा गुन्हा नोंद असल्याने या प्रकरणाकडे केवळ वैयक्तिक वाद म्हणून न पाहता संभाव्य पॅटर्न म्हणून तपास सुरू आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात गुंगीचं औषध, जबरदस्ती, अश्लील फोटो-व्हिडिओ, त्यावरून खंडणी, लग्नाची जबरदस्ती, खोट्या केसेसची धमकी अशा स्वरूपाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या केसमध्येही ओळख वाढवणे, बहिण-भाऊ, बेस्ट फ्रेंड, नातं सांगणे, मोठ्या ओळखींचा धाक दाखवणे, देवदर्शनाच्या नावाखाली प्रवास, लॉज आणि हॉटेल रूममधील प्रसंग, आणि शेवटी पैशांची उकळपट्टी असा गुन्हेगारीचा साखळी पॅटर्न दिसतो.
पीडित पुरुषाने एफआयआर मध्ये काय म्हटलं:
पीडित व्यक्ती हा सत्तेचाळीस वर्षांचा आहे, तो मुळचा कोल्हापूर इथं चंदगडमध्ये राहणारा आहे. पीडित इसमाला दोन मुलं आणि पत्नी असे कुटुंब आहे. आरोपी गौरीमयी (नाव बदललंय) ही पुण्यात राहणारी आहे. तिची आणि माझी ओळख अशी झाली की, मी व माझं कुटुंब सोबत तीन मित्र, त्यांचे कुटुंब तुळजापूर येथे दि. 7/11/2024 रोजी देवदर्शनासाठी गेले होतो, तेव्हा झाली आहे. त्यावेळी गौरीमयीने त्या ओळखीचा फायदा घेऊन माझ्या पत्नीस कॉल करून आमच्या घरी येवून राहायला लागली.घरी आल्यानंतर तिने सांगितलं की मी यापुढे मला भाऊ मानणार असून भावाचं नातं ठेवणार आहे. मी हायकोर्टला वकीलीची प्रॅक्टीस करत असून माझे खूप मोठमोठ्या ओळखी आहेत, त्या ओळखीने तुमचे जे काही काम असेल ते मी तुम्हाला भाऊ या नात्याने करून देईन.
दुसऱ्या दिवशी तिला कलावती मंदिर बेळगाव येथे दर्शनासाठी जायचे असल्यानं मला विनंती केल्याने मी तिला दुचाकीवरून घेऊन जात असताना त्यावेळी तिने सांगितलं की यापुढे तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात, तुमच्या अडचणीला मी नेहमी उभी राहीन. त्यावेळी ती माझ्या जवळीक करत असल्याने मी तिला झटकण्याचा प्रयत्न केला. जाताना तिने मला घाणेरडे वाक्य ऐकवण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी तिला असे मला चालणार नाही, यापुढे तू आमच्या गावी येऊ नको असं खडसावलं.
2000 रुपये दिले:
त्यानंतर दर्शन झाल्यानंतर मी तिला पुण्याला जाण्यास सांगितलं, तिने माझी माफी मागून यापुढे असं बोलणार नाही असं सांगून मला रिक्वेस्ट करून माझ्या दुचाकीवरून पुन्हा आमच्या घरी आली. त्यादिवशी ती घरी आल्यानंतर मला आणि माझ्या पत्नीला विनंती करून आमच्या घरी दोन दिवस राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी कामावर गेलो असताना मला कॉलवरून माझ्याकडे पैसे मागितले. असता मी तिला नकार दिल्यानंतर माझा लहान भाऊ महेश कदम यांस विनंती करून ऑनलाईन दोन हजार रुपये घेतले.
लॉजवर जवळ येण्याचा प्रयत्न:
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला तिच्या घरी जायचे असल्यानं मला चंदगड स्टँडपर्यंत सोडण्यासाठी विनंती केल्याने तिला माझ्या दुचाकीवर बसवून चंदगड स्टँडला गेलो. तिथे तिला वॉशरूमला जायचे असल्यानं मी उघड्यावर वॉशरूमला जात नाही, मला लॉजमधील रूममध्ये वॉशरूमला जायचं आहे, अशी विनंती केल्याने त्या ठिकाणी असलेल्या एका लॉजवर मी तिला जाण्यास बोलवलं. ती लॉजच्या रूममध्ये गेल्यानंतर मला रूममध्ये येण्यास विनंती करून बोलावून मी खूप मोठी वकील आहे, यापुढे मी तुमची साथ देईन, तुमच्या मुलाला मंत्रालयातील लोकांच्या ओळखीने नोकरीला लावेन अशी आशा दाखवून माझा हात धरून ओढण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी तिला नकार देत खाली येऊन थांबलो असता, थोड्या वेळाने ती देखील खाली आली. त्यावेळी ती स्वतः बस स्टँडवर जावून पुण्याची बस धरून पुण्याला गेली.
काशी विश्वनाथला जाण्याचा प्लॅन:
त्यानंतर 13 फेब्रुवारी 2025 ते 15 फेब्रुवारी 2025 रोजीपर्यंत आमच्या घरी थांबली. त्यानंतर ती पुण्याला गेल्यानंतर तिथून माझ्या पत्नीला कॉल करुन सांगितलं की आम्ही पुण्यातून माझी मैत्रीण स्वाती आणि तिची फॅमिली असे सर्वजण काशी विश्वनाथ दर्शनासाठी जाणार आहोत. मी तुमच्या पतीला भाऊ समजून सोबत घेऊन जाणार आहे, कारण सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळावा भरला आहे. विश्वनाथला माझ्या सोबत पाठवा. त्यावेळी माझ्या पत्नीने मला देवदर्शन करून या असं सांगून पुण्याला पाठवलं.25 फेब्रुवारी 2025 रोजी काशी विश्वनाथला जायचं असल्याने मी पुण्यात स्वारगेटवर आलो. तिथे बहीण या नात्याने एक मोबाईल दिला सांगितलं की तुम्ही एकटे राहू नका, माझ्या घरी चला. मी गौरीमयीच्या कोथरुडमधील घरी राहण्यास गेलो. त्यानंतर तिने माझा मोबाईल काढून घेतला आणि सांगितलं की स्वातीची सासू वारले असून त्यांचे येणे कॅन्सल झाले आहे, त्यामुळे आपण दोघेच विमानाने जायचे आहोत. आपल्या दोघांच्या विमानाचे तिकीट मी काढले आहे, असं सांगितलं आणि मला तिच्या बेडरूममध्ये झोपवलं.
गुंगीचं औषध देऊन अत्याचार:
त्यावेळी मी झोपलो असताना तिने मला काहीतरी प्यायला दिलं आणि माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी रागाच्या भरात तिथून निघून जात असताना माझा हात धरून माफी मागून जर येथून तू गेला तर तुला इथेच काहीतरी करीन. मी जे सांगेन, त्याच पद्धतीने राहायचे. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2025 रोजी काशी विश्वनाथला जायचं आहे असे सांगून धमकी देऊन जबरदस्तीने मला मुंबई एअरपोर्टवरून काशी एअरपोर्टला नेले. त्यानंतर तिने मला धमकावलं की आता तू माझ्या कब्जात आहेस, जर काही कुरकुर केली तर तुला तुझ्या घरी जाऊन देणार नाही, तुझे कुटुंब उद्ध्वस्त करेन. मी घाबरून देवदर्शनासाठी होकार दिला.
3 दिवस काशी विश्वनाथमध्ये मुक्काम आणि रूम:
त्यानंतर तिने मला देवदर्शनासाठी घेऊन तेथील पंडितांना माझ्या बाबतीत वाईट होणार आहे असं सांगण्यास सांगितलं; तेथील पंडितांनी मला शनी आहे, सोन्याची अंगठी घालावी लागेल असं सांगितलं. त्यानंतर तिने मला 3 दिवस जबरदस्तीने काशी विश्वनाथला ठेवून घेतले. मी वेगळी रूम करण्यास सांगितलं असता, तू जर शहाणपण दाखवला तर तुला तुझ्या घरी जाण्यास जागा ठेवणार नाही असं धमकावलं. मी ज्या रूममध्ये होतो, त्या रूममध्ये येवून माझ्यासोबत शारीरिक संबंधांची मागणी केली आणि जवळीक करत असल्यावर माझ्या पत्नीचा कॉल आला. आम्ही सर्वजण आहोत असं सांगण्यास भाग पाडलं.
दोन लाख रुपये देण्याची धमकी:
घाबरत घाबरत मी तिच्यासोबत पुण्याला आलो. पुण्यात आल्यानंतर जबरदस्तीने कल्याण ज्वेलर्स या ठिकाणी घेवून जावून एक सोन्याची अंगठी खरेदी करुन मला घालण्यास सांगितलं. जे काही झाले आहे ते कोणाला सांगितलं तर तुझी बदनामी करेन. तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मला आताच्या आता दोन लाख रुपये दे. नाहीतर तुझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये खोटी केस करेन असं धमकावलं. त्यानंतर कसा बसा मी तिच्या तावडीतून सुटका करून बसने चंदगडला माझ्या गावी गेलो. माझ्या घरी गेल्यानंतर झालेला सर्व प्रकार माझ्या पत्नीला सांगितल्यानं माझ्या पत्नीने तिला फोनवर सुनावलं.
त्यानंतर गौरीमयीने काही दिवस फोन केला नाही. थोड्या दिवसांनी पुन्हा कोणत्या ना कोणत्या नंबरवरून कॉल करून मला 2 लाख रुपये दे, नाहीतर माझ्याकडील फोटो व्हायरल करेल. मी खूप लोकांना असं फसवलं आहे. जर तुला या कचाट्यातून बाहेर पडायचे असल्यास आत्ताच 2 लाख रुपये पाठव अशी धमकी दिली. त्यानंतर गौरीमयीने कोल्हापूर येथे येऊन माझ्या पत्नीला फोन करून शिवीगाळ करुन सर्व खोटा प्रकार सांगितला आणि माझ्या सर्व वस्तू परत करण्यास सांगितलं. मी आणि माझी पत्नीने तिने दिलेल्या सर्व वस्तू कोल्हापूर येथे जाऊन परत केल्या आणि यापुढे कोणतेही संबंध न ठेवण्यास सांगितलं.
त्याचा राग मनात धरून गौरीमयीने माझ्या विरोधात खोटी तक्रार अर्ज दिला आहे. अखेरीस या प्रकरणी फिर्यादीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट दिसते:
पीडित पुरुष जवळपास अनेक महिने सतत चालणारा छळ, धमक्या, ब्लॅकमेलिंग आणि कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या भीतीत गप्प बसत राहतो आणि अखेर पोलिसांकडे धाव घेतो. अत्याचार चुकीचा फायदा घेणं, गुंगीचं औषध, देवदर्शनाच्या नावाखाली प्रवास आणि शेवटी पैशांची उकळपट्टी या सगळ्या प्रसंगांतून अत्याचाराला लिंग नसतं, पीडित कोणताही असू शकतो, हा कडू पण महत्त्वाचा संदेश समोर येतो. पुढील काळात तपासात काय नवं समोर येतं आणि न्यायालय या प्रकरणाकडे कशा दृष्टीने पाहतं, याकडे राज्यभरातील नागरिक आणि कायदेतज्ज्ञांचे लक्ष लागून राहणार आहे.






