भागा वरखडे
‘इंडिगो एअरलाइन्स’च्या कामकाजातील अडचणींमुळे आतापर्यंत नऊशेहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या अचानक आणि मोठ्या प्रमाणात रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय आहेत. ‘इंडिगो’ संकटामुळे विमानांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. ‘डीजेसीए’च्या फटकारानंतर, एअरलाइनने प्रवाशांची गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे. ‘इंडिगो’ कोसळण्याच्या मार्गावर आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवासी नाराज आहेत. देशभरातील विमानतळांवर गोंधळ आहे.
उड्डाणे रद्द झाल्यामुळे संतप्त प्रवाशांकडूनही एअरलाइन्सविरुद्ध निदर्शने केली जात आहेत. तथापि, ज्या प्रवाशांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे, त्यांना नवीन प्रवास व्यवस्था किंवा आवश्यक असल्यास परतफेड दिली जात आहे, असे एअरलाइनचे म्हणणे आहे. हिवाळा, खराब हवामान, वाढलेली हवाई वाहतूक कोंडी आणि नवीन क्रू रोस्टरिंग नियमांमुळे वेळापत्रकात लक्षणीय व्यत्यय आला आहे. वक्तशीरपणाच्या बाबतीत ज्या ‘इंडिगो’ची ओळख होती, त्या ‘इंडिगो’मध्ये क्रूच्या तीव्र कमतरतेमुळे उड्डाणांवर गंभीर परिणाम झाला आहे.
इंडिगोबद्दलच्या तक्रारींमध्ये वाढ
‘इंडिगो’ने नोव्हेंबरमध्ये 1,232 उड्डाणे रद्द केली, त्यापैकी 755 उड्डाणे क्रू आणि ‘एफडीटीएल’ नियमांमुळे होती. भारतीय विमान बाजारपेठेत 60 टक्के वाटा असलेल्या ‘इंडिगो’चे प्रवासी उड्डाण विलंबामुळे नाराज आहेत. गेल्या वर्षी तक्रारींमध्ये 63 टक्के वाढ झाली आहे. ‘लोकल सर्कल’च्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे, की ‘इंडिगो’च्या 54 टक्के प्रवाशांनी उड्डाण विलंब आणि कर्मचाऱ्यांच्या वाईट वर्तनाबद्दल तक्रार केली आहे.
सर्वेक्षणात गेल्या १२ महिन्यांत प्रवाशांनी उड्डाण रद्द, विलंब आणि सेवा समस्यांबद्दल सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या. ‘लोकल सर्कल’च्या सर्वेक्षणात, प्रवाशांना 15 समस्या निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता. 45 टक्के प्रवाशांनी उशिरा किंवा अपूर्ण माहिती मिळाल्याचे सांगितले. 42 टक्के लोकांनी सामान हाताळणीबद्दल तक्रार केली. 32 टक्के लोकांनी ग्राहक सेवेबद्दल असमाधान व्यक्त केले. 27 टक्के लोकांनी विमानाची गुणवत्ता आणि देखभाल खराब असल्याचे सांगितले. 23 टक्के लोकांनी अन्नाच्या गुणवत्तेबद्दल तक्रार केली आणि 14 टक्के लोकांनी मनोरंजन व्यवस्थेबद्दल तक्रार केली. अहवालांनुसार, 2021 मध्ये ‘ओटीपी’ 92.4 टक्के होता, जो 2023 मध्ये 85.4 टक्क्यांपर्यंत घसरला. 2024 मध्ये ‘इंडिगो’च्या फक्त 69.69 टक्के उड्डाणे वेळेवर येतील. सध्या, वेळेवर आगमन दर सुमारे 80-82टक्के आहे.
उड्डाण रद्द झाल्यामुळे इंडिगोला आर्थिक फटका
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या ‘इंडिगो’ला गेल्या काही दिवसांपासूनच्या विमान उड्डाण रद्द करण्याच्या निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. कंपनीला सुमारे सात हजार 160 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) लागू केलेल्या ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’ (एफडीटीएल) च्या नवीन नियमांमुळे कंपनीला वैमानिक आणि केबिन क्रूचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. यामुळे मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादसह प्रमुख शहरांमध्ये दोनशेहून अधिक विमाने रद्द करावी लागली. त्यामुळे हजारो प्रवाशांचे मोठे हाल झाले आणि कंपनीच्या शेअर बाजारातील किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे.
गेल्या काही दिवसांत, एअरलाइनच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हस्तक्षेप करून या प्रकरणावर एअरलाइनकडून स्पष्टीकरण मागितले आहे. कंपनीला पीक सीझनमध्ये तिचे कामकाज कसे सुव्यवस्थित करायचे याचा तपशीलवार आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘इंडिगो’च्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण दिसून आली. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या वेळी मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. या सहलींचे नियोजन अनेकदा महिने आधीच केले जाते. तिकिटे बुक केली जातात. ‘इंडिगो’ संकटामुळे आता लोकांना त्यांच्या सुट्ट्या वाया जातील, अशी भीती वाटत आहे.
इंडिगोला सुधारणांचा आराखडा सादर करण्याच्या सूचना
दरम्यान, ‘इंडिगो एअरलाइन्स’च्या कामकाजातील व्यत्ययावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव सूचना सादर केली आहे. ‘इंडिगो’ने त्यांच्या ए 320 फ्लीटसाठी काही ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’ (एफडीटीएल) तरतुदी तात्पुरत्या स्वरूपात माफ करण्याची विनंती केली आहे आणि सांगितले आहे, की ऑपरेशन्स सामान्य करण्यासाठी तीन महिने लागू शकतात. ‘डीजीसीए’ने ‘इंडिगो’ला सुधारणेच्या अनेक प्रमुख पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. ‘डीजीसीए’ने इंडिगोला क्रू भरती, प्रशिक्षण रोडमॅप, रोस्टर पुनर्रचना, सुरक्षा योजना आणि दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी वैमानिक आणि क्रू सदस्यांना पुरेशी विश्रांती देण्यावर नवीन नियम भर देतात. यामुळे विमान कंपन्यांसाठी अचानक वैमानिक आणि क्रू सदस्यांची कमतरता निर्माण झाली आहे. नियामकाने एअरलाइनला सध्याच्या परिस्थितीची कारणे, कामकाज सुधारण्यासाठी उचलण्यात येणारी पावले आणि येत्या काळात कामकाज सामान्य करण्यासाठीची योजना यांचा तपशीलवार आराखडा सादर करण्यास सांगितले आहे.
वाढीव उड्डाणे आणि नियमाच्या चौकटीमुळे इंडिगो अडचणीत
‘इंडिगो’ संकटामुळे विमान भाड्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ‘डीजेसीए’च्या फटकारानंतर, एअरलाइनने प्रवाशांची गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे. दरम्यान, ‘इंडिगो’ कोसळण्याच्या मार्गावर आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संकटामुळे देशातील सर्वात मोठी एअरलाइन मानल्या जाणाऱ्या ‘इंडिगो’च्या प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी, लोकांना भीती आहे, की त्याचे भवितव्य ‘जेट एअरवेज’सारख्या इतर प्रमुख खासगी एअरलाइन्ससारखेच होऊ शकते. ‘डीजीसीए’ने बनवलेल्या या नियमांअंतर्गत, वैमानिकाचे कामाचे तास 48 वरून 36 करण्यात आले आहेत. शारीरिक आणि मानसिक थकवा कमी व्हावा हा यामागील उद्देश.
याशिवाय रात्री विमाने उतरवण्याची मुभा सहावरून दोनवर करण्यात आली आहे. दैनिक कामाचे 8 तास, साप्ताहिक कामाचे 35 तास, मासिक कामाचे 125 तास आणि वार्षिक एक हजार तास अशा मर्यादा घालून देण्यात आला आहेत. वैमानिकांना थकवा येऊन उड्डाणांमध्ये जोखीम निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात असली, तरी या व्यवस्थेमध्ये अधिक संख्येने वैमानिक आणि कर्मचारी लागणार हे उघड आहे. ‘इंडिगो’ची या बदलासाठी तयारीच पुरेशी नव्हती. तशात नोव्हेंबर-डिसेंबर हा वाढीव उड्डाणांचा काळ मानला जातो. सुट्ट्यांच्या काळात जवळपास सहा टक्के उड्डाणे अतिरिक्त असतात. एकीकडे ही वाढीव उड्डाणे आणि दुसरीकडे नियमांच्या मर्यादेतून घटलेले वापरण्याजोगे मनुष्यबळ अशा दुहेरी कात्रीत ‘इंडिगो’ सध्या अडकली आहे. 
भारतीय प्रवासी विमान वाहतूक बाजारपेठेत ‘इंडिगो’चा हिस्सा 60 टक्के इतका आहे. केवळ देशातच नव्हे, तर आशियातही दिवसाला 2300 उड्डाणे इतका या कंपनीचा अजस्र पसारा आहे. देशांतर्गत 90 आणि परदेशातील 45 शहरांमध्ये ‘इंडिगो’ची विमाने जातात. यासाठी मोठ्या संख्येने विमाने लागतात आणि त्यासाठी मनुष्यबळही लागते. सध्या ते कमी पडत आहे. इतर कंपन्या म्हणजे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअरलाइन्स आणि स्पाइस जेट यांचा आकार ‘इंडिगो’इतका नाही. शिवाय या कंपन्यांची रात्रीची उड्डाणे तुलनेने कमी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील मर्यादांची फारशी झळ या कंपन्यांना ‘इंडिगो’च्या तुलनेत कमी प्रमाणात पोहोचली. गेल्या वर्षांमध्ये कार्यक्षम सेवेमुळे ‘इंडिगो’चा बाजारहिस्सा वाढत गेला.
अधिकाधिक विमानेही घेतली गेली. तितक्या प्रमाणात वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे, झटपट ‘टर्न अराउंड टाइम’मुळे एका दिवसभरात त्यांचे वैमानिक नेहमीपेक्षा अधिक उड्डाणे हाताळू शकतात. आतापर्यंत याविषयी काही नियम नव्हते. ते करण्याविषयी गेल्या वर्षी जून महिन्यात विमान कंपन्यांची ‘डीजीसीए’बरोबर बैठक झाली. त्या वेळी नवीन नियमांच्या अंमलबजावणीस इंडिगोसह सर्वच कंपन्यांनी विरोध केला आणि अधिक मुदत मागितली; मात्र यंदा दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात ‘डीजीसीए’ला निर्देश दिल्यामुळे नियमांची अंमलबजावणी तातडीने करावी लागली. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती ‘इंडिगो’कडून होऊ शकली नाही.






