- संजना खंडारे
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील महिलांवर मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि आर्थिक छळाविषयीच्या बातमीनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे.
गेल्याच आठवड्यात बाईमाणूसने मायक्रोफायनान्स बँकांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या महिलांना कोणत्या अडचणीतून जावे लागते यावर सविस्तर ग्राउंड रिपोर्ट करून प्रकाशित केला होता. त्याच बातमीचा आढावा घेऊन परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्याचे तहसीलदार सुनील कावरे यांनी दखल घेतली आहे.
बाईमाणूसने केलेला ग्राउंड रिपोर्ट (https://baimanus.in/mr/article/microfinance-debt-trap-climate-change-crisis-rural-women-marathwada)
“महिलांना दिलासा देण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करू”
"मायक्रोफायनान्स कंपन्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या देखरेखीखाली नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) श्रेणीत येतात आणि RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांचे नियमन होते. पण तालुक्याच्या पातळीवर आम्हाला ज्या उपायोजना करता यायेतील आणि त्या महिलांची मदत करता येईल ते आम्ही नक्कीच करू. जर आमच्या पातळीवर काही करता नाही आलं तर हे प्रकरण वरिष्टांपर्यंत आम्ही नक्कीच पोहचू आणि यावर लवकरात लवकर काय उपायोजना करता येईल यावर चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करू." - सुनील कावरे 
हवामान बदलामुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने मराठवाड्यातील ग्रामीण महिलांच्या आयुष्यावर परिणाम झाला असून मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या जाळ्यात त्या अडकल्या आहेत. अतिवृष्टी, ढगफुटी व दुष्काळामुळे शेतात काम नाही, उत्पन्न नाही, पण कर्जवसुलीची दडपशाही वाढत असून महिलांना मानसिक-शारीरिक छळ सोसावा लागत आहे. परभणीतील सारिकाने आर्थिक ताणामुळे आत्महत्या केली, तर सोनपेठच्या ललिता घोडके कर्जामुळे गाव सोडून गायब झाल्या. 99% मायक्रोफायनान्स कर्जदार महिला असून 25-40% व्याजदर व आठवड्याचे कठोर हप्त्यांनी त्या उद्ध्वस्त होत आहेत. तज्ञांच्या मते मायक्रोफायनान्स ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ‘संस्थात्मक सावकारी’ ठरत असून तातडीने कठोर नियंत्रणाची गरज आहे.
सोमनाथ नागुरे हे सोनपेठचे स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत बाईमाणूसशी बोलतांना त्यांनी सांगितले की, " गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मायक्रोफायनान्सच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या बायका कशाप्रकारे बाहेर निघू शकतील यावर काम करत आहोत. बाईमाणुसने केली बातमी आम्ही गावातील व्हॉट्सअप ग्रुप वर शेअर केली आणि कोणीतरी ती तहसीलदार साहेबांपर्यंत पोहचवली. आता बघुयात त्यांच्या माध्यमातून जर या महिला जर या जाचातून बाहेर निघू शकल्या तर बरं होईल."






