नेत्यांना आपुलकीने घरातल्या माणसांसारखी टोपणनाव द्यायची महाराष्ट्राची खासियत आहे. त्यांना दिलेल्या नावातून त्यांची जनतेशी असणारी जवळीक कळून येते. दादा, बाबा, बाप्पा, दाजी, ताई अशा नावांनी नेत्यांना आपण ओळखत असतो. पण एखाद्या लेखक माणसाला तेवढ्याच आपुलकीच्या नावाने संबोधने फार कमी लोकांच्या वाट्याला आले आहे. अगदी प्रचंड लोकप्रिय असणारे लेखक आणि कवी त्यांनाही हे भाग्य लाभले नाही. पण वादग्रस्त असूनही ज्या माणसावर लोकांनी जीवापाड प्रेम केलं आणि आपुलकीने “भाऊ” म्हणून संबोधलं असा माणूस म्हणजे भाऊ पाध्ये.
त्यांचं संपूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. जन्म दादरचा, 06 नोव्हेंबर 1926. मुंबईची नसन्नस त्यांना आपल्या शिक्षणातच उमजून चुकली. मुंबई विद्यापीठातून 1948 साली पासआउट झाले तो काळ मुंबईच्या कम्युनिस्ट वाऱ्यांचा होता. तेव्हा 1949 ते 51 या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. त्यांच्या राजकारण आणि कार्यकर्ते यांचे संदर्भ येत. त्या काळच्या तरुण मनाची खदखद समजून घेणारा हा लेखक होता.
आमच्या ओळखीत मुंबईतल्या लोकांना एवढं ओळखणारा एकमेव माणूस होऊन गेला तो मंटो. सआदत हसन मंटोच्या लेखनात दिसणारी मुंबई ही फक्त गरीब माणसाला दिसायची. त्या मुंबईशी साध्या माणसांचा रोजचा झगडा सुरु असायचा. फक्त समुद्र आणि इमारती यांच्यापलीकडील वस्त्या, चोरबाजार, मोहल्ले, पक्षांची कार्यालये, तरुणांचे अड्डे, नाक्यावरच्या गप्पा यापलीकडची मुंबई लोकांना ठाऊक नव्हती. लिहिणाऱ्या माणसांनी कायम तिला झाकूनच ठेवलं. नेमकं त्याचंच वर्णन भाऊ पाध्येंनी आपल्या लेखनात केलं.
मंटो, भाऊ पाध्ये आणि 'वासूनाका’...
मंटोला फाळणीनंतर मुंबई सोडून जावं लागलं. घराच्या भिंतीवरचं तुकारामांचं चित्रही त्याला पाकिस्तानात नेता आलं नाही. पण त्याचा सगळा वारसा भाऊ पाध्येंकडे होता असं वाटतं. उर्दूचं नुकसान व्हायचं ते झालंच, पण भाऊंमुळे किमान मराठी माणसाला ती मुंबई हमेशा भेटत राहिली. 1955 मंटो निवर्तले त्या नंतर तब्बल 10 वर्षांनी भाऊंची सर्वाधिक चर्चा झालेली 'वासूनाका' ही कादंबरी प्रकाशित झाली आणि एकच गजहब उडाला. पाध्येंनी आपल्या लेखनाचं मोल ठाऊक असावं. किमान लिहिण्यामागची प्रचंड मेहनत करणारे ते लेख होते. आपल्या कादंबरी लेखनाला ते “एक ब्लडी हार्ड वर्क !” म्हणून संबोधतात. याच लेखनामुळं ते अडचणीत मात्र आले होते.
नपेक्षा या पुस्तकात अशोक शहाणे यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. तेव्हा ते मनातली सगळी अस्वस्थता ओतून लिहीत असत. त्यामुळं त्यात सत्तारूढ लोक आणि पोलीस यांच्याविषयी उल्लेख येत. वासूनाक्यातील काही गोष्टी छापताना एका जागी "पोलिसांचे लफडे मागे लागले की समजेल" असं छापून आलं होतं. खरं म्हणजे ही मुद्रण करणाऱ्यांची चूक होती असं शहाणे म्हणतात. कदाचित भाऊंची प्रुफे वाचणाऱ्या कुणीतरी कमेंट म्हणून ते लिहिलं होतं आणि छापणाऱ्याने त्यालाच लेखाचा भाग म्हणून छापून टाकलं!
सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाऊंच्या ‘वासूनाका’चा वापर
1965 साली त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. नुकत्याच झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून अनेक नेते सभागृहात आले होते. त्यांचा काँग्रेसला कायम विरोध होता. त्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. त्यांना कचाट्यात धरायला विरोधी पक्षाने पाध्येंची कादंबरी वापरायचं ठरवलं.
आचार्य अत्रे यांनी कादंबरीचा संदर्भदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. “सरकारचे कुठं लक्ष नाही" असा सूर आळवत आरोप केले गेले. भाऊंच्या लेखनावर नेहमीप्रमाणे अश्लीलतेचा आरोप केला गेला. महाराष्ट्रात वातावरण पेटलं. भाऊंच्या बाजूनेही काही लोक वादात उतरले. विजय तेंडुलकर, वसंत शिरवाडकर आणि दुर्गा भागवत अशा दिग्गज लोकांनी भाऊंची बाजू घेतली. पण मागे सरतील तर अत्रे कसले! त्यांनी आपल्या 'नवा मराठा' पेपरमधून 24 एप्रिल 1966 रोजी अग्रलेख लिहिला. त्यात भाऊ पाध्येंना जोरदार लक्ष्य केलं. नेमाडे, उद्धव शेळके यांनाही यात ओढत अत्रेंनी लिहिलं ‘’साहित्यातल्या हिडिस बीभत्सपणावर जर सर्वांत कोणी किळसवाणा कळस चढविला असेल, तर तो भाऊ पाध्ये ह्याच्या 'वासूनाका'ने’’
अत्रेंनी लिहिलं,’’संडासात आपली लेखणी बुडवून 'वासूनाका' लिहिलं’’
आचार्य अत्रे ज्याचे संपादक होते त्या 'नवा मराठा'ने 26 एप्रिल 1966रोजी अग्रलेखातून भाऊंना ज्या डागण्या दिल्या त्यावरून त्यांना काय काय सहन करावे लागले असेल याची पुसटशी कल्पना येते. लोकांनी कोणत्या स्तराला जाऊन टीका केली. भाऊंच्या लेखनास अश्लील ठरवताना आचार्य अत्रे यांनी देखील टीकेची पातळी सोडल्याचे स्पष्ट जाणवते. असा काय अपराध भाऊंनी केला होता की तत्कालीन समाज आणि सभ्यतेचे स्वयंघोषित रक्षक चडफडून गेले होते ! अत्रे लिहितात,
प्र.के. अत्रे
-
श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताशी पैजा जिंकणारी आमची मराठी भाषा निर्माण केल्यानंतर गेल्या सात शतकांत ह्या मराठी भाषेत चांगले वाईट लिखाण करणारे पुष्कळ लेखक अन् कवी होऊन गेले. पण भाऊ पाध्ये ह्याच्यासारखा घाणेरडा कागदखराब्या ह्या महाराष्ट्रभूमीत आजपर्यंत कधई जन्माला आला नसेल. ह्याचा जन्म आपल्या मातेच्या कुशीत झालेला नसून, कोठल्या तरी बावनखणीच्या वा फोरास रोडच्या गटारात झाला असला पाहिजे, ह्याबद्दल आता आमच्या मनात तिळमात्र शंका नाही.
-
"संडासात आपली लेखणी बुडवून भाऊ पाध्याने जेव्हा हे भयानक 'वासूनाका' लिहिले, तेव्हा त्याची बोटे महारोगाने का झडली नाहीत किंवा त्याच्या मेंदूला कॅन्सर का झाला नाही, असे ते चोपडे वाचताना वाचकांना वाटू लागते."
-
‘अहो, भाऊ पाध्यासारख्या फोरास रोडवरच्या एखाद्या भडव्याने मराठी भाषेत काय वाटेल तो मात्रागमनीपणा केला असेल. पण ते बेवारशी पाप मुंबईच्या ‘पॉप्युलर प्रकाशन’सारख्या नामवंत आणि प्रतिष्ठित प्रकाशनकाने आपल्या अंगाखांद्यावर खेळवून लोकांच्या हाती ठेवण्याचा बेजबाबदार पागलपणा काय म्हणून करावा? भरबाजारात देहविक्रिय करणाऱ्या धंदेवाईक वेश्येला कुटुंबवत्सल गृहस्थाने आपल्या घरात हळदीकुंकवाला वा सत्यनारायणाला काय म्हणून बोलवावे?
-
ह्या ‘वासूनाक्या’तला काही बीभत्स भाग इतका हिडीस आणि गलिच्छ आहे की त्याचा सामान्य नामनिर्देश देशील करणे आम्हाला शक्य नाही. स्त्री जातीच्या शरीराच्या सर्व अंगोपांगाची आणि तिच्याशी होणाऱ्या पुरुषसंबंधांची साद्यंत वर्णने कधी एखाद्या शब्दात, एखाद्या वाक्यात वा टप्प्यात पुनःपुन्हा मिटक्या मारीत ह्या भाऊ पाध्याने केलेली आहेत. आई आणि बहीण ह्यांच्या संदर्भातल्या हिडीस शिव्यांची तर समग्र पुस्तकात खैरात केलेली आहे.
-
‘भ्यांचोद’, ‘मादरचोद’, आणि ‘च्यायला’ ह्या शिव्या वाक्या वाक्यागणिक लेखकाने उधळलेल्या आहेत.‘भ्यांचोद’ ही शिवी तर आम्ही ह्या पुस्तकात दीडशे वेळा मोजली. अन् ‘च्यायला’ सव्वाशे वेळा. ‘ती मुलगी बारा ** ची आहे’, ‘तिचा ** फारच भरलेला किंवा टरारला होता’, (फुल्या आमच्या). असली या चोपड्यातली महाबीभत्स शिमगा वाक्ये वाचताना वाचकांच्या माना शरमेने खाली मोडून पडतील आणि त्यांच्या मनात असाही विचार येऊन जाईल की ती वाक्ये भाऊ पाध्येच्या कुटुंबातील स्त्रियांच्या संदर्भाने कोणी तरी वापरावीत. हे चोपडे वाचून आमच्या सर्वांगाचा असा काही भटका उडाला की, ‘केशवसुतांच्या जन्मोत्सव सभे’त बोलताना ह्या भाऊ पाध्याला जोड्याने मारावयाला पाहिजे, असे आम्ही संतापाने म्हणालो.
वास्तविक पाहता भाऊ पाध्ये अत्रेंकडे काही काळ कामाला देखील होते आणि ही गोष्ट अत्रेंच्याही लक्षात होती. "वासूनाका' मागवून तासाभरात घाईघाईने ते वाचून टाकले. ते वाचून आमच्या सर्वांगाचा भडका उडाल्याचे" त्यांनी आपल्या लेखनात म्हंटले आहे. असे पुस्तक मराठीत प्रकाशितच होऊ शकत नाही अशी भूमिका अत्रेंनी घेतली.
पुस्तकात भाऊ पाध्येंनी ‘पोक्या’ या आपल्या कादंबरीतील पात्रामार्फत मुंबईतल्या सामान्य पोराची भाषा वापरली होती. त्यामुळं त्यात शिव्या असणे साहजिक होते. आचार्य अत्रेनी त्यातल्या शिव्यांची संख्या मोजून काढली. ही बाब इंग्रजी पेपरांमध्येही पोहोचली आणि 'फायनॅन्शल एक्सप्रेस'मधे 'जे-वॉकर' या नावाने कुणीतरी लेख लिहून अत्रेंवर टीका केली.
पुस्तकावर बंदी घालावी की नाही, सरकारपुढे प्रश्न
वसंतराव नाईक यांना साहित्यात काही रस नव्हता. त्यामुळं त्यांनी यात लक्ष घालायचं टाळलं. पण विरोधी गट सरकारला निशाणा बनवू लागल्यावर त्यांनी याची जबादारी राज्यपाल नियुक्त आमदार ग. दि. माडगूळकर यांच्याकडे सोपवली गेली. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1962 मध्ये राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार नियुक्ती झाली होती. त्यात ‘गीतरामायणकार’ गदिमा आमदार झाले होते.
अत्रेंनी "गलिच्छ चोपड्यावर कायदेशीर कारवाई महाराष्ट्र सरकार काय करील ते काही आम्हाला माहीत नाही. कारण, सरकारच्या वाङ्मयीन सल्लागार मंडळींत दुर्गा भागवत किंवा 'अडाणेश्वर' ह्यांचेच भाऊबंद घुसलेले आहेत. म्हणूनच गलिच्छ चोपड्यांना महाराष्ट्र सरकार सालोसाल पारितोषिके देते. " असे म्हणून थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं.
तेव्हा ही साहित्याची धोंड वसंतरावांनी ग. दि. माडगूळकर यांच्याकडे सोपवली. "पुस्तक वाचून साहित्याची धोंड काय ते कळवा म्हणजे पुढील कारवाई करता येईल" असं त्यांनी सांगितलं. गदिमा स्वतः एक साहित्यिक होते, म्हणून फक्त शब्दांच्या पलीकडे कादंबरी आणि लेखन काय असतं हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळेच त्यांनी या पुस्तकात काहीही अश्लील नसल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर विरोधकांच्या मताला न जुमानता वसंतरावांनी गदिमांचा शब्द अंतिम मानून या पुस्तकावर बंदी आणली नाही. म्हणूनच भाऊंची ही कादंबरी लोकांपर्यंत पोचू शकली. मुंबई आणि महाराष्ट्रातील तरुणाईत एकेकाळी भाऊ हे एवढ्या आपुलकीचं नाव बनलं. त्याला अनेक कारणं होती. त्यांच्या कादंबरीवर अनेक वादळं उठली. पण त्यात सत्याचे एवढे मार्मिक चित्रण होते की ते आयुष्य रोज जगणाऱ्या माणसांना ते सगळं आपुलकीचं वाटत असे.
दिलीप चित्रे म्हणायचे, ‘नोबेल पुरस्कारासाठी मी भाऊंचं नाव सुचवेन’
म्हणनच तुकारामाला युरोपात नेणाऱ्या दिलीप चित्रेनी भाऊ पाध्येंविषयी म्हणून ठेवलं आहे:
"नोबेल पुरस्कारासाठी एखाद्या भारतीय लेखकाचं नाव सुचवायचं झालं तर बिनदिक्कत मी भाऊंचं नाव सुचवीन. दुर्दैव हेच की मराठीतही भाऊंचं महात्म्य कोणी ओळखत नाही."
भाऊ पाध्ये यांचा अल्प-परिचय
भाऊ उर्फ प्रभाकर नारायण पाध्ये यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1926 चा. ते दादरचे. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी तथाकथित लेखन सभ्यतेच्या अक्षरशः चिंधडया उडवल्या. सआदत हसन मंटोंनी जे काम हिंदीत केलं होतं तेच थोड्या फार फरकाने भाऊंनी मराठीत केलं होतं. मंटोंना निदान मृत्यूपश्चात अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर कवने रचली. त्या मानाने भाऊ कमनशिबी ठरले. त्या काळात साधनांची वानवा असूनही भाऊंचे शिक्षण चांगलेच झाले होते. 1948 साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली. पदवी संपादनानंतर काही काळ (1949-51) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम केलं. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली.
1956 मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(1 वर्ष) व 'नवशक्ती'(10 वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ त्यांनी 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन केलं. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं.1989 पासून अर्धांगाच्या आघाताने त्यांना लेखन अशक्य झालं. 30 ऑक्टोबर 1996 रोजी त्यांचं निधन झालं.
प्रसिद्ध लेखक आणि ब्लॉगर समीर गायकवाड लिहितात की, वासूगिरी हा शब्द आजही रूढ आहे तेंव्हाही होता, पुढे असेल की नाही हे सांगता येणार नाही. पण येणाऱ्या काळात देखील स्त्रियांचे शोषण सुरूच असेल असं आताच्या काळाच्या वाटचालीवरून ठळक जाणवतं. मग स्त्रियांच्या शोषणावर आणि त्यांना हीन समजण्यावर कुणी लिहिलं तर त्यावर दोन्ही बाजूंनी पडसाद हे उमटणारच. भाऊंच्या लेखनसंपदेत 'अग्रेसर', 'ऑपरेशन छक्का', 'एक सुन्हेर ख्वाब', 'करंटा', 'गुरुदत्त', 'डोंबार्याचा खेळ', 'दावेदार', 'पिचकारी', 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरक', 'भाऊ पाध्ये यांची कथा', 'भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा' - संपादित संकलन लोकवाङ्मय गृह, 'मुरगी', 'राडा, 'वॉर्ड नंबर 7-सर्जिकल', 'वासूनाका', 'वैतागवाडी', 'होमसिक ब्रिगेड' या साहित्यकृतींचा समावेश होतो. मंटोंच्या वाट्याला उपेक्षा आणि प्रसिद्धीही आली पण भाऊ त्याबाबतीतही मागेच राहिले. आजही काही समीक्षक नाकाने कांदे सोलताना त्यांचा उल्लेख विशिष्ट शिक्के मारूनच करताना आढळतात.
'आम्ही म्हणू तिच संस्कृती', 'आम्ही ठरवू तिच सभ्यता' हे आपण घटकाभर खरेही मानू पण मग या संस्कृतीत आणि या सभ्यतेत जे राजरोसपणे स्त्रियांचे दमण चालू असते ते काय आहे ? ती कुठली संस्कृती ? वेश्यांच्या नावाआडून ते एका अबला आणि असहाय्य नारीचेच शोषण होय. मग समाजाला सगळं काही कापूर आरतीनं ओवाळून सोवळ्यातलं साजूक गोडच आवडत असेल तर या शोषित घटकावर समाज का मौन बाळगून आहे याचे उत्तर तेंव्हाच्या टीकाकारांनीही दिले नाही आणि आताच्या टीकाकारांबद्दल तर न बोललेलं बरं. बुडाखाली कितीही अंधार असला तरी चालेल पण वरकरणी माणूस सोज्वळ हवा या ढोंगाचे पाखंड उघड केलेच पाहिजे त्यात काही गैर नाही.
भाऊ पाध्ये तर हिंदू होते जे मुस्लिमांहून दोन पावले अधिक सुधारणावादी आणि नवमतवादी समजले जातात. पण मंटो तर कर्मठ समजल्या जाणाऱ्या इस्लाम धर्मात जन्मलेले होते. ते ही भाऊंच्या लेखनकाळाच्या दशक भर आधी सक्रीय होते. मग त्यांना किती तीव्र व दाहक विरोध तत्कालीन धर्ममार्तंड आणि समाजधुरीणांकडून झाला असेल याची कल्पना यावी.
आजही काळ फारसा बदललेला नाही. आजच्या धर्ममार्तन्डांना आणि समाजधुरीणांना न पटणाऱ्या विचारांची पाठराखण करणारं लेखन प्रकटन कुणी जरी केलं तर आजही त्याला अमानुष त्रास सोसावा लागतो. काळ बदलायचा असेल तर आधी स्वतःला बदलावे लागेल आणि मग कालबाह्य झालेले मापदंड मोडीत काढावे लागतील. या साठी समाजमनाचा कठोर निग्रह हवा ज्याला वैचारिक प्रगल्भतेचे बळकट अधिष्ठान अनिवार्य आहे....
जनतेनं त्यांना न ओळखल्याबद्दल अशोक शहाणेंनी “आम्ही मराठी माणसं मुर्दाड आहोत" अशा शब्दांत आपली निंदा केलीय. भाऊंसारखा कुणी लेखक होवो न होवो, किमान त्यांचे स्मरण ठेवणं एव्हढं तरी सरसाध्य माणसाने करावं ही रास्त अपेक्षा आहे.
(संदर्भ- बोल भिडू आणि sameerbapu.blogspot.com)






