वर्षा कोडापे (चंद्रपूर)
चंद्रपूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 8 दिवसांत 4 जणांचा बळी वाघाने घेतला आहे.
चालू वर्षात वाघाच्या हल्ल्यात तब्बल 36 बळी आतापर्यंत गेले आहेत. चंद्रपुर शहरातच वाघाची दहशत आहे असं नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील गावंच्या गावं वाघांच्या दहशतीत जगत आहेत. कारण, वाघांच्या हल्ल्यात बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ऑक्टोबर महिन्यात 8 दिवसांत वाघाच्या हल्ल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला. वनविभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारीपासून महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 34 मृत्यू एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. तसेच केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, वाघाच्या हल्ल्यात 2020-2024 या 5 वर्षांच्या काळात 378 मृत्यू झाले. यापैकी 218 मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.
वाघांच्या या हल्ल्यात अधिकांश महिला आणि लहान मुलं बळी पडले आहेत किंवा जखमी झाले आहेत. यामुळे गावागावांत प्रचंड दहशतीचे वातावरण असून अनेक शाळा ओस पडायला सुरूवात झाली आहे. विशेषत: सध्याच्या हिवाळी दिवसात अंधारदेखील लवकर पडत असल्याने दुपारच्या शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या रोडावली आहे.
राज्यात एकीकडे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असताना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्ली वनपरिक्षेत्रात मात्र काही महिलांनी त्यांच्या धाडसाचा परिचय दिला आहे. वाघांपासून शाळकरी मुलांना धोका होऊ नये म्हणून सकाळ आणि सायंकाळ अशा दोन्ही वेळी या महिला मुलांच्या संरक्षणासाठी सज्ज असतात.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली परिक्षेत्रातील सितारामपेठ गावाभोवती तब्बल 13 वाघांचे अस्तित्व आहे. जंगलालगत 400 मीटरचा रस्ता अंधारलेला आहे. तरीही गावातील एकाही मुलाला धोका होऊ नये, या दृढ निश्चयाने या महिला रोज सकाळ-संध्याकाळ मुलांच्या संरक्षणासाठी उभ्या आहेत.
किरण चरण गेडाम, वेणू दिलीप रंदये, रिना मंसराम नाट व सीमा राजू मडावी या चारही महिलांनी उपसंचालक (बफर), ताडोबा प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःहून पुढाकार घेत हा उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्या कोणताही मोबदला घेत नाहीत. तर फक्त मुलांचे भविष्य आणि गावाची सुरक्षितता यासाठी त्यांनी हे धाडसाचे पाऊल उचलले आहे.
सितारामपेठ येथील मुले चंद्रपूर येथे शिक्षणासाठी येतात. हा जंगलव्याप्त परिसर असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. विशेषत: वाघांचा वावर या परिसरात आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव टाळण्यासाठी मोहर्ली वनपरिक्षेत्रातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरीही चार महिलांनी ‘आमच्या गावातील मानव वन्यजीव संघर्ष’ आम्हीच सांभाळू या अनुषंगाने स्वत:हून पुढाकार घेऊन मुलांची दररोज सकाळी व संध्याकाळी ने-आण करत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सीतारामपेठ परिसरात 13 वाघांचा वावर असताना अशा भीतीदायक वातावरणात येथील या चार महिला 'आमचे रक्षण, आमची जबाबदारी' या भावनेने गावातील शाळकरी मुलांचे रक्षण करीत आहेत. वाघांपासून मुलांना धोका होऊ नये म्हणून त्या गावापासून फाट्यापर्यंत 1 किमी अंतर दररोज सकाळी मुलांसोबत पायी जाऊन मुलांना एसटी बसवर पोहोचवतात आणि सायंकाळी पुन्हा फाट्यावर जाऊन त्यांना परत आणतात. जंगलालगत 400 मीटरचा रस्ता अंधारलेला आहे. या गावातील विद्यार्थी दररोज एसटी बसने चंद्रपूरमधील शाळेत जातात. गावापासून फाट्यावरील बस थांब्यापर्यंत साधारण एक किमी अंतर आहे. सकाळी आणि संध्याकाळी 6.30 वाजता हे अंतर कापणे धोकादायक आहे.
या चार महिलांनी वनखात्याशिवाय गावातील मानव वन्यजीव संघर्षांचा लढा आम्हीही लढू या निर्धाराने स्वतःहून पुढाकार घेतला आहे. बचावासाठी वन विभागाने दिलेल्या इलेक्ट्रिक स्टिक तसेच टॉर्च एवढीच उपकरणे या महिलांची शस्त्रे बनली आहेत. असा उपक्रम इतर गावातील व्यक्तींनी राबवल्यास वन विभागाच्या वतीने प्रति व्यक्ती दरमहा 1 हजार रुपये मानधन वन विभागाकडून देण्यात येईल, अशी माहिती मोहर्ली क्षेत्राचे आरएफओ संतोष थिपे यांनी दिली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली परिक्षेत्रात जवळपास 13 वाघ आहेत. त्यामुळे मानव–वन्यजीव संघर्षाची टांगती तलवार कायम असते, पण आमच्या गावाचा संघर्ष आम्हीच सांभाळू अशी हिम्मत या महिलांनी दाखवली आहे. वनविभागाला सहकार्य करत, गावकऱ्यांचा जीव सुरक्षित ठेवत आणि मुलांना संरक्षित ठेवत या मातृशक्तीने दाखवलेली उमेद व धैर्य ताडोबा परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मानव-वन्यजीव टाळण्यासाठी मोहली वनपरिक्षेत्रातर्फे येथे विविध उपाययोजना केल्या आहेत. पण असा संघर्ष टाळणे ही केवळ वन विभागासोबतच सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे. सीतारामपेठमधील या चार महिलांचे धाडसी कार्य वनसंरक्षण आणि सामाजिक जबाबदारीचा उत्तम आदर्श आहे. या चार महिलांप्रमाणे इतरांनीही पुढाकार घेत वन विभागाला सहकार्य केले तर मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे सहज शक्य होईल, अशी प्रतिक्रिया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ल यांनी व्यक्त केली आहे.
मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे म्हणतात की, मानव–वन्यजीव संघर्ष टाळणे ही केवळ वनविभागाची नव्हे, तर समाजाचीही सामूहीक जबाबदारी आहे. सितारामपेठमधील या चार धाडसी मातृशक्तीने दररोज जीवाचा धोका पत्करून विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याचे जे काम हाती घेतले आहे, ते वनसंरक्षण आणि सामाजिक जबाबदारीचा उत्तम आदर्श आहे. वनविभागाकडून त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेला मनःपूर्वक सलाम.





