- संजना खंडारे
"मी आदिवासी आश्रमशाळेत शिकले. आमच्या इथे जास्त मुली शिकत नाही..माझ्या गावातील माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्यासोबत शाळेत नव्हत्या. मोजून दोन-चार जणी होत्या. मी बारावी मध्ये असतांना पुढे आपण शिक्षण घेऊ की नाही हा विचार पण नव्हता केला.. पण शाळेत एक कार्यक्रम झाला आणि मग ठरवलं शिक्षण घ्यायचं..पण माझे आई बाबा दोघे ही मजुरी काम करतात. माझ्यावर शिक्षणासाठी खर्च करायला यांच्याकडे 500 रुपये पण नसतात..पण मला शिकायचं होतं..
नागपूर मध्ये एकलव्य संस्थेचा तीन महिन्यांचा कोर्स केला आणि त्या तीन महिन्यात बऱ्याच गोष्टी समजल्या..आज निर्मला निकेतन सारख्या संस्थेत बॅचलर इन सोशल वर्कला प्रवेश मिळाला आहे. मेळघाट ते मुंबई हा प्रवास विचार करायला ही सोपा नव्हता मात्र आता हा प्रवास मी जगतेय...
भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे..मी कोरकू आदिवासी समाजातून येत असल्यामुळे माझी बोली भाषा कोरकू आहे मराठी काही मी जास्त बोलत नव्हते..पण मनात जिद्द आहे म्हणून मी इथपर्यंत पोहचू शकले." हे शब्द आहे मेळघाटमधील माखला या गावातील 19 वर्षीय तरुणी भूमिका भेटेकर जी सध्या मुंबईतील निर्मला निकेतन इथे उच्च शिक्षण घेत आहे.
अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांतील हिरवाईने नटलेला, पण सामाजिक-आर्थिक अडचणींशी झुंजणारा मेळघाट. या भागात कोरकू आणि गिंडे आदिवासी समुदायाचे प्रमाण अधिक आहे. अनेक वर्षे उच्च शिक्षणापासून दूर असलेल्या या भागात आता बदलाची चाहूल लागली आहे. मेळघाटातील तरुणाई शिक्षणासाठी शहरांचा रस्ता पकडत, भौगोलिकच नव्हे तर सामाजिक, आर्थिक व मानसिक अडथळे पार करत पुढे सरसावत आहे.
मेळघाटातील शिक्षणाचं वास्तव आजही चिंताजनक आहे. जंगल डोंगराळ भाग आणि दुर्गम भूभागामुळे अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत शाळा पोहोचतच नाहीत, आणि जिथे शाळा आहेत, तिथेही शिक्षकांची कमतरता, भाषेचा अडथळा आणि सातत्याचा अभाव ही मोठी समस्या आहे. कोरकू, गोंड अशा जमातींमध्ये गरिबी, कुपोषण आणि रोजीरोटीची धडपड यामुळे शिक्षणाला दुय्यम स्थान मिळतं. अनेक मुले लहान वयातच मजुरी, शेती किंवा जनावरं राखण्याकडे वळतात. सरकारी योजना आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांनंतरही शाळेत नियमित हजेरी आणि दर्जेदार शिक्षण ही अजूनही मेळघाटातील सर्वात मोठी गरज आहे.
अश्यातच एकलव्य इंडिया फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रातील दुर्गम भागातील मुलांना उच्च शिक्षणासाठी शहरापर्यंत आणि नामांकित विद्यापीठापर्यंत पोहचवण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहेत. 
दुर्गम भागातील पाच लाख मुलांपर्यंत एकलव्य पोहोचलं...
यावर्षी एकलव्य इंडिया फाउंडेशन या संस्थेने मराठवाडा, विदर्भातील दुर्गम भागातील 400 विद्यार्थ्यांना नामंकित विद्यापीठात पोहचवलं. यामध्ये मेळघाटमधील आदिवासी पाड्यांवरील 150 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकलव्य इंडिया फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक राजू केंद्रे आहेत. स्वतः आर्थिक व सामाजिक अडचणींवर मात करून TISS आणि SOAS (University of London) येथे उच्च शिक्षण घेतलेल्या राजू यांनी Chevening, German Chancellor Fellowship यांसारख्या आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत.
राजू केंद्रे यांच्याशी बाईमाणूसने संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले, "एकलव्य इंडिया फाउंडेशन ही एक समुदाय-आधारित संस्था आहे, जी वंचित समुदायांमधील (SC, ST, OBC, NT-DNT आणि इतर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांतील) पहिल्या पिढीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही या युवा चेंजमेकर्ससोबत सारथी म्हणून काम करतो आणि त्यांना भारतात तसेच परदेशात जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संधी मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. मार्गदर्शन, संसाधने आणि अतूट पाठिंब्याद्वारे आम्ही त्यांना अर्थपूर्ण करिअर घडवण्यास मदत करतो. यामुळे केवळ त्यांच्या व्यक्तिगत यशापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि समुदायासाठीही नवीन संधींचे दरवाजे उघडतात. एकजुटिने, आपण पिढ्यानपिढ्यांच्या अन्याय आणि गरिबीच्या साखळ्या तोडत आहोत आणि वंचित समुदायांच्या हृदयातून धाडसी, सक्षम नेतृत्वाची एक नवीन पिढी घडण्यासाठी प्रयत्नशील आहोत .
2017 पासून, आम्ही 800 हून अधिक कार्यशाळांद्वारे 5,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत, आणि 2000 हून अधिक विद्यार्थ्यांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी, अशोका, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया यांसारख्या प्रसिद्ध शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मदत केली आहे. आतापर्यंत, आमच्या विद्यार्थ्यांनी एकूण ₹60 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या शिष्यवृत्त्या मिळवल्या आहेत, ज्यामध्ये चेव्हनिंग, इरास्मस मुंडस, कॉमनवेल्थ आणि टीच फॉर इंडिया यांसारख्या अत्यंत स्पर्धात्मक शिष्यवृत्त्या आणि फेलोशिप्सचा समावेश आहे. आज आमचे अनेक माजी विद्यार्थी यशस्वीरित्या वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. ते आपल्या समुदायासाठी नुसतेच आदर्श ठरत नसून समाजाला परतफेड सुद्धा करत आहेत, ज्यामुळे सामाजिक गतिशीलता आणि सक्षमीकरणाचा साखळीप्रमाणे विस्तारणारा सकारात्मक परिणाम (ripple effect) निर्माण होत आहे.
यावर्षी तीन आयटीडीपीच्या (Integrated Tribal Development Project) माध्यमातून अभ्यासक्रम चालले. याचे मॅनेजर म्हणून प्रकाश शेंडे, मेळघाट मध्ये कॉर्डिनेटर रजनी भांगे आणि किनवट मध्ये कॉर्डिनेटर प्रथमेश चव्हाण, पांढरकवडा आयटीडीपीला कॉर्डिनेटर पियुष गांग्रेड्डीवार आणि एकलव्य इंडिया फाऊंडेशनचे सह-संस्थापक आकाश मोडक यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी त्यांच्या वस्त्यातून,पाड्यातून निघून शहरांपर्यंत पोहोचले."

कोरकू आदिवासी मुलांमधील भाषिक न्यूनगंड...
कोरकू आदिवासी मुलांमध्ये भाषेचा न्यूनगंड प्रामुख्याने त्यांच्या मातृभाषा व शिक्षणाच्या माध्यमातील भाषेतील फरकामुळे निर्माण होतो. घरी कोरकू भाषा बोलली जाते, परंतु शाळेत मराठी किंवा हिंदी माध्यम असल्यामुळे त्यांना स्वतःची अभिव्यक्ती सहजपणे करता येत नाही. चुकीचे उच्चार, मर्यादित शब्दसंग्रह, आणि इतर विद्यार्थ्यांच्या चेष्टा यामुळे ते वर्गात बोलण्यास कचरतात. परिणामी, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि भाषेतील सक्रिय सहभाग घटतो. मात्र मेळघाटातील आदिवासी मुले या अडथळ्याला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
मेळघाटातील वीटभट्टी वरून ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज...
सचिन पोरते हा मेळघाटात त्याचं शिक्षण घेत असतांनाच वीटभट्टीवर काम करणारा मुलगा. आज तो पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मध्ये मायक्रोबायोलॉजी विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. बाईमाणूसने त्याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने सांगितले, "आमच्या भागातील अनेक मुलं हे पोलीस भरतीची तयारी करतात. मला ते करायचं नव्हतं. पण बाहेर जाऊन शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही म्हणून मी वीटभट्टी वर काम करून घरी हातभार लावायचो आणि शिक्षणासाठी ही पैसा जमा करायचो. एका मित्राने सांगितल्यामुळे एकलव्य सोबत जोडलो गेलो..
आणि तिथून माझा शिक्षणासाठीचा प्रवास सुरु झाला. आधी कशामध्ये शिकायचं हा प्रश्न होता शेवटी मायक्रोबायोलॉजी मध्ये शिक्षण घेण्याचं ठरवलं. पुणे हे माझ्यासाठी तर मला वेगळंच जग वाटतं.. इथले मुलं, त्यांची भाषा , त्यांची राहण्याची पद्धत एकदम टापटीप आहे, या सगळ्यामुळे आधी खूप विचार करायचो आपण इथे टिकू शकू की नाही.. पण मग मला काही नागपूरमधली मित्र भेटली ज्यांनी मला समजावून सांगितलं, की सगळे शिक्षणासाठीच आले आहे. आपल्यात आणि त्यांच्यात ही एक गोष्ट सारखी आहे.. त्यामुळे हळूहळू सगळं काही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण एवढं नक्की समजलं की, मला माझ्या आदिवासी पाड्यांपर्यंत शिक्षण पोहचवायचं असेल तर मला इथे खूप मेहनत घ्यावी लागेल." 
या मुलांना इथपर्यंत पोहचवणारा निखिल मोटघरे
निखिल मोटघरे हा नागपूर मधील वाकेश्वर गावातील असा मुलगा ज्याला बारावीनंतर काय करावं असा प्रश्न पडतो आणि एकलव्य संस्थेत विद्यार्थी म्हणून येतो. समोर तोच एकलव्य मध्ये व्हॉलेंटिअर म्हणून काम करतो, आपण शिक्षण घेतो पण असे कित्येक विद्यार्थी आहेत जे शिक्षणापर्यंत पोहचत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी काम करायचं तो ठरवतो आणि एकलव्य संस्थेतच स्टुडन्ट कोऑर्डिनेटर पासून ते कोर्स कोऑर्डिनेटर होतो.. यावर्षी निखिलने आणि त्याच्या सोबत काम करणाऱ्या टीम ने दुर्गम भागातील 400 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीची दारे उघडून दिली.
त्याच्याशी बाईमाणूसने संपर्क साधल्यावर तो सांगतो, "मी स्वतः यावर्षी पंधरा दिवस मेळघाट मध्ये राहिलो, स्वतः आदिवासी वाड्या वस्त्यांवर फिरलो, तेव्हा समजलं या मुलांमध्ये जिद्द आहे, मेहनत करण्याची तयारी आहे पण फक्त आर्थिक आणि भाषेची अडचण आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर ही मुले खूप समोर जाऊ शकतात. मग त्याच भागात या मुलांकडून नामंकित विद्यापीठांसाठी द्यायला लागणाऱ्या परीक्षेची तयारी करून घेतली. आणि आज ही 400 मुले नागपूर, पुणे, मुंबई, हैद्राबाद, बंगळूरला उच्च शिक्षण घेत आहे. ते ही वेगवेगळ्या क्षेत्रांत..ही मुलं उच्च शिक्षण घेऊन त्यांच्या गावात लीडरशिप करून त्यांच्यासारख्याच अनेकांना शिक्षणापर्यंत पोहचवतील ही खात्री आहे."






