‘’अमृता ही एक स्वतंत्र्य व्यक्ती आहे. त्यामुळे तिला तिचे विचार मांडण्याचे हक्क आहेत. मी अमृताला कोणत्याही टिप्स आणि ट्विट पण देत नाही. माझ्या बायकोची सगळीच मतं मला पटतात असे नाही, मी तिला नेहमी एवढेच सांगतो की, अभिव्यक्ती केली तर त्याचे परिणाम हे भोगावेच लागणार. ते परिणाम भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याप्रमाणे अमृता अनेकदा आपल्या ट्विट किंवा वक्तव्याचे परिणाम भोगतेही…!’’
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडच्या काळात त्यांच्या पत्नीबाबतीत म्हणजेच अमृता फडणवीस यांच्याबाबतीत व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया… मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांच्याबाबतीत खुप काही सांगून जाते. धारदार राजकीय वक्तव्यं आणि टीका, वेगवेगळ्या कार्यक्रमांना लावलेली हजेरी आणि म्युझिक व्हिडिओज यामुळे अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून त्यांच्या प्रत्येक कृतीचं विश्लेषण होत असतं.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून त्यांच्या प्रत्येक कृतीचं विश्लेषण
मात्र स्वत: अमृता फडणवीस असल्या गोष्टींची जराही पर्वा करत नसल्याचे आजवर अनेकदा दिसून आलं आहे. 'मी गाणी म्हणते, माझे विचार व्यक्त करते तेव्हा लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा "एक वेगळा चष्मा" असतो. मुख्यमंत्र्यांची पत्नी या चश्म्यातून लोक माझ्याकडे पाहतात. पण मी जे व्यक्त होते ते मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बोलते, मांडते.
ते माझे विचार आहेत. ट्विटरवर मी जे काही लिहिते तेव्हा मला जे म्हणायचं तेच मी म्हणते. लोक त्या साऱ्या गोष्टींचं राजकारण करतात. पण तो त्यांचा चष्मा आहे. मी मात्र मला हवं तेच करते.
‘’गाण्याच्या बाबतीतही माझे हेच मत आहे. गाणं हे माझं पेंशन आहे. एक बँकर, गायिका, सामाजिक कार्यकर्ती, देवेंद्र फडणवीस यांची पत्नी, दिविजाची आई हे सारं मिळून 'मी' मी आहे. यापैकी एकही गोष्ट नसेल तर मी अमृता फडणवीस कशी असेल? हे सर्व मिळून माझी 'एक ओळख' बनते..'
‘’प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानले पाहिजे’’
अमृता फडणवीस यांची ही अशी रोखठोक भूमिका आहे आणि म्हणून विरोधी पक्षातील नेतेही त्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करतात. मध्यंतरी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी याच संदर्भात अत्यंत महत्वाचे विधान केले होते. ‘’प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानले पाहिजे. तसेच महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे’’ असे विधान पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले होते.
आमदार प्रणिती शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की, त्या राजकारण्यांच्या बायकोच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देत आहेत आणि हा खरंच खूप स्वागतार्ह बदल आहे. शोभा डे यांनीही अमृता फडणवीस यांच्याबद्दल लिहिलं होतं, की अमृता या मॉडर्न आहेत. अतिशय सहजपणे त्या 'स्पॉटलाइट'मध्ये वावरतात. मनोरंजन क्षेत्रात करिअर करणारी व्यक्ती जशी स्वतःला 'ग्रूम' करेल तसंच त्या करत आहेत. त्या स्वतःवर मेहनत घेतात. फोटोशूट करून घेणं, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं सगळं त्या करत आहेत.
‘’प्रत्येक स्त्रीला स्वत:ची मतं मांडण्याचा अधिकार असलाच पाहिजे’’
अमृता फडणवीस म्हणतात, प्रत्येक स्त्रीला स्वत:ची मतं मांडण्याचा अधिकार असलाच पाहिजे, मात्र त्याच वेळी स्त्रियांनी सारासार विचार करून निर्णय घेण्याची हिंमत, परिणामांना सामोरं जाण्याचं धाडसही दाखवावं. एखाद्या महिलेच्या यशाच्या प्रवासात, तिच्या करिअर ओरिएंटेड विचारसरणीची जडणघडण होण्यात कौटुंबिक वातावरणाचा मोठा वाटा असतो. तिला ज्या पद्धतीनं, ज्या विचारात वाढवलं गेलंय ती बाब तिच्या भविष्याची दिशा ठरवण्यात महत्त्वाची असते. जिथे संस्काराचा, वैचारिक बैठकीचा पाया पक्का असतो तिथे, सहसा ‘चॉइस’ चुकत नाही’’.
नोकरी, करिअर करणा-या स्त्रिया आज व्यावसायिक पातळीवरच्या चर्चेत निर्भीड मत व्यक्त करतात. आपले विचार, संकल्पना स्पष्टपणे मांडतात. कंपनीच्या भविष्यातील नियोजनात, धोरणात्मक पातळीवरील निर्णयाच्या अंमलबजावणीत सक्रिय योगदान देतात. मात्र त्याच स्त्रिया करिअरविषयक स्वत:चे काही निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा कौटुंबिक अथवा भावनात्मक पातळीवर विचार करतात, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
उदा. पदोन्नती घेताना अनेक जणी घराचं कसं होईल, हा विचार करून पदोन्नतीला हो किंवा नाही, बहुतेक वेळा नाहीच, म्हणतात. ही स्थिती बदलण्यासाठी भावनात्मक पातळीवरही स्त्री सक्षमतेचा आग्रह अमृता धरतात.
'महाराष्ट्रात कमी आहे ते हेच की, स्त्रिया आपले विचार व्यक्त करण्यात मागे राहतात. किंवा मग लोकं स्त्रियांना त्यांचे विचार मांडू देत नाहीत. मला वाटतं कोणत्याही स्त्रीने असे मागे राहण्याची गरज नाही. महिलांनी काय करावं काय नाही यासाठीच्या नियमांचे बंधारे लोकांनी बांधलेत, आपण ते तोडणं गरजेचं आहे.
लोकांना ट्रोलिंगमध्ये मजा येते. जे वाईट कॉमेंट्स करतात त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दोष दिसून येतो. मी त्याचा विचार करत नाही, मला माहिती आहे की, मी काय करु शकते. मी जे ही काही करतेय ते सकारात्मकतेने करतेय. माझं गाणं, माझं काम लोकांसमोर आणायचं म्हणून करते. त्यातून अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळावी, त्यांच्याही व्यक्तिमत्त्वाचे उत्तम पैलू लोकांसमोर यावेत, त्यांना उमेद मिळावी म्हणून मी धडपडते.' असं अमृता सांगतात.
'मिसेस मुख्यमंत्री' म्हणून प्रसिद्धी आणि संधी मिळत गेल्या का?
टीकाकार म्हणतात त्याप्रमाणे अमृता फडणवीस यांना केवळ 'मिसेस मुख्यमंत्री' म्हणून प्रसिद्धी आणि संधी मिळत गेल्या, की एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांची ही जडणघडण झाली आहे? अमृता फडणवीस या मूळ नागपूरच्या. त्यांचे वडील शरद रानडे हे नेत्ररोगतज्ज्ञ आहेत तर चारुलता रानडे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी जी.एस.कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतली.
त्यानंतर फायनान्स या विषयात MBA पूर्ण केलं. 2003 साली त्यांनी अॅक्सिस बँकेमध्ये एक्झिक्युटीव्ह कॅशिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. त्या अॅक्सिस बँकेमध्ये व्हाईस प्रेसिडन्ट-कॉर्पोरेट हेड (वेस्ट इंडिया) या पदावर कार्यरत होत्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. त्यानंतर बँकिंगमधली आपली कारकीर्द सांभाळतानाच त्यांनी गायनातही आपलं करिअर घडवलं.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेला अल्बम, प्रकाश झा यांच्या 'जय गंगाजल' या चित्रपटात गायलेलं गाणं, विविध कार्यक्रम अशी गायनातलंही त्यांचं करिअर सुरू होतं. अगदी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांनी रँपवॉकही केला. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला.
‘’राजकारण्याची बायको म्हटलं, की साडी नेसून येणाऱ्या-जाणाऱ्यांचं स्वागत करणं’’
अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांवरून वारंवार ट्रोल करण्यात येत असतं. पण त्यांनी गाण्याचा छंद जोपसलाच नाही तर त्याचं करिअरमध्ये रूपांतर केलं. गायक अनिरुद्ध जोशी हे अमृता फडणवीस यांना गाणं शिकवायला जायचे. नागपूर ते मुंबई असा त्यांचा प्रवासही अनिरुद्ध जोशी यांनी पाहिला आहे. अनिरुद्ध जोशी यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलं, की त्यांना खूप आधीपासून गाण्याची आवड होती.
पण एक काळ असा होता, की त्यांना गाण्यात करिअर करायचं होतं. काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. त्यांनी ती पॅशन सोडली नाही. त्या गाणी गात राहिल्या. त्यामध्ये काही गैर आहे, असं मला वाटत नाही. आता प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये कुठपर्यंत जाईल, हे आपल्याला माहीत नसतं. त्यांनी चित्रपटांसाठी गायलेली गाणी चांगली आहेत. पण आपल्याकडे राजकारण्यांना नावं ठेवण्याची सवय आहे आणि त्यांच्या बायकोनं काही केलं की नाकं मुरडतो.
"व्यक्ती म्हणून खूप डायनॅमिक आहेत. हुशार आहेत. त्यांना खूप काही करायचं आहे. पण दुर्दैवानं आपल्याकडे राजकारण्याची बायको म्हटलं, की साडी नेसून येणाऱ्या-जाणाऱ्यांचं स्वागत करणं एवढंच त्यांचं काम आहे, अशी गेल्या पन्नास वर्षांपासूनची आपली धारणा आहे. जेव्हा एक बाई स्वतःच्या भरवश्यावर काही वेगळं करायला जाते, तेव्हा त्यांना नाव ठेवायची आपल्याकडे पद्धत आहे." असं गायक अनिरुद्ध जोशी म्हणतात.
वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखती असोत की सोशल मीडियावर आपली मतं मांडणं असो, अमृता फडणवीस या कायम ठामपणे व्यक्त होत राहिल्या. केवळ मुख्यमंत्र्यांची बायको एवढीच आपली ओळख मर्यादित न ठेवता स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या त्या प्रयत्नांचं कौतुक झालं.
‘’महाराष्ट्राला एक 'आऊट ऑफ बॉक्स' मिसेस सीएम मिळाल्या’’
अमृता फडणवीस या मुक्तपणे विचार व्यक्त करतात, म्हणून त्यांच्यावर टीका होते का? यावर एबीपी माझाच्यासंपादक सरिता कौशिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "देवेंद्र फडणवीस हे जेव्हा आमदार, प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा अमृता फडणवीस या नागपूरमध्येच होत्या. राजकारणात त्या सक्रिय नव्हत्या. प्रचारापुरताच त्यांचा सहभाग असायचा. पण तेव्हाही त्या नेत्याची बायको जशी कायम त्याची सावली बनून राहते, तशा नव्हत्या. त्यांचं स्वतःचं करिअर होतं. Young Professional म्हणून त्यांची स्वतःची ओळख होती. तेव्हाही त्या संगीताची आवड जोपासत होत्या आणि राजकारणाच्या पलीकडे त्यांचे स्वतंत्र असे एक सोशल लाईफ होते. त्यांच्या आई-वडिलांच्या प्रोफेशनल बॅकग्राऊंडमधून ते घडले होते. फक्त नागपुरामध्ये त्यांच्यावर स्पॉटलाइट नव्हता."
"नागपूरमधून मुंबईमध्ये आल्यानंतरही त्यांच्या व्यक्तिमत्वात फारसा बदल झाला नाही. त्यांच्या ज्या आवडी-निवडी नागपूरमध्ये होत्या, त्या त्यांनी मुंबईमध्येही जोपासल्या. केवळ त्याचा अवकाश अधिक विस्तारला होता. त्यांनी स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जोपासलं आणि देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना वाव दिला. पण आता मुख्यमंत्र्यांची बायको म्हणून आता मात्र त्यांच्या प्रत्येक कृतीकडे मीडियाचं लक्ष होतं. हा त्यांच्या आयुष्यात झालेला बदल होता. महाराष्ट्राला एक तरुण, 'आऊट ऑफ बॉक्स' मिसेस सीएम मिळाल्या. कदाचित त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची चर्चा झाली. त्यांनी ग्रामीण विकास किंवा कॅन्सर रुग्ण ह्यासाठी केलेल्या कामांपेक्षा मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्यांचे जे वेगळेपण होते ते त्यांचं ग्लॅमर, कपडे, इन्स्टाग्राम पोस्ट्स, अल्बम, गाण्याचे शो ह्यात असल्यामुळे त्या बाबींवर स्वाभाविक जास्त फोकस होता," असं सरिता कौशिक म्हणतात.
‘’मी निवडणुकीला उभी राहणार असेन तर तो त्या महिलांवर अन्याय होईल’’
अमृता यांच्या माहेरी, रानडे परिवारात राजकारणाचा कुठलाच वारसा नाही. घरी सगळे डाॅक्टर. याउलट देवेंद्र यांच्या रूपात फडणवीस कुटुंबातली तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्यास, तो आपल्याच घरात राहावा यासाठी आपल्याच पत्नीला तिकीट मिळवून देण्याचा प्रघात हल्ली सर्वच पक्षांत आहे.
त्या पार्श्वभूमीवर, जर अशी वेळ आली तर काय कराल, यावर त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या वैचारिक स्पष्टतेची साक्ष देऊन गेलं. ‘पक्षासाठी विविध पातळ्यांवर तळमळीनं राबणा-या अनेक महिला कार्यकर्त्या आहेत. आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे या महिलांनी पक्षासाठी दिलेली आहेत.
अशा वेळी जर केवळ माझा नवरा राजकारणात आहे म्हणून मी निवडणुकीला उभी राहणार असेन तर तो त्या महिलांवर अन्याय होईल. त्यामुळे परििस्थती निर्माण झालीच तर अशा कार्यकर्तींपैकी एखादीला संधी द्यायला मला जास्त आवडेल,’ असं अमृता म्हणतात.






