(नितिका झा),
ती म्हणाली होती – ‘तो माझा नवरा आहे.’ पण तिचं हे साधं वाक्य तिचं आयुष्य वाचवू शकलं नाही. धर्म, इज्जत आणि समाजाच्या ठरवलेल्या चौकटी तिच्या निवडीवर गदा आणू लागल्या. गाझियाबादमधल्या या घटनेत प्रश्न केवळ दोन तरुणांच्या प्रेमाचा नाही – इथे एक स्त्रीच्या निर्णयक्षमतेवर, तिच्या इच्छेवरच संशय घेतला जातो आहे. ती कोणावर प्रेम करणार, कुठे राहणार, हे ठरवण्याचा अधिकार समाज पुन्हा तिच्याचकडून हिसकावत आहे.”
ती आणि तो – दोघं एकाच कॉलनीत वाढले, एकाच शाळेत शिकले, आणि तीन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले. पण आज ती पतीच्या प्रेमाला नव्हे, तर पोलिसांच्या चौकशाला सामोरी जाते आहे. तिच्या नवऱ्याच्या बहिणींना तुरुंगात डांबलं जातं, दुकान फोडलं जातं, आणि एका व्हिडिओनंतर तिच्या कथेला अचानक ‘धर्मयुद्धा’चं नाव दिलं जातं.
हा लेख केवळ गाझियाबादचा घटनाक्रम सांगत नाही, तर आपल्या समाजात एका महिलेला ‘स्वतंत्र निर्णय घेणारी व्यक्ती’ म्हणून मान्य करण्यास अजून किती अंतर शिल्लक आहे, याचा आरसा दाखवतो.”
एक माणूस म्हणून ओळख की केवळ धर्म म्हणून?
ते शेजारी होते, एकाच शाळेत गेले आणि सहा वर्षांपूर्वी प्रेमात पडले. 29 ऑगस्ट 2022 रोजी, या दोघांनी पूर्व दिल्लीतील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन विशेष विवाह कायद्यान्वये विवाह केला. पण 24 मे 2025 रोजी, अकबर खान (29) आणि सोनिका चौहान (25) – तीन वर्षांपासून वैवाहिक नात्यात असूनही – केवळ धर्माच्या ओळखीने ओळखले जाऊ लागले.
25 मे रोजी सोनिकाचे वडील लक्ष्मणसिंह चौहान यांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील इंदिरापूरम पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी अकबरवर त्यांच्या मुलीचे अपहरण केल्याचा आणि तिला बळजबरीने अडकवून ठेवल्याचा आरोप केला. दुसऱ्याच दिवशी, गाझियाबाद पोलिसांनी प्रथम अकबरच्या दोन बहिणींना, वहिनीला आणि एका शेजाऱ्याला अटक केली – आणि नंतर स्वतः अकबरला. सध्या अकबर आणि त्याच्या दोन बहिणी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर इतरांना एक आठवड्यानंतर सोडण्यात आले आहे.
“या दोघांचं एकत्र असणं आम्हाला नवीन नव्हतं”
या दोघांचे मित्र आणि अकबरचे कुटुंबीय सांगतात की, “ते कायम एकत्र असायचे, त्यामुळे हे नातं आम्हाला अनपेक्षित नव्हतं.” “ही कॉलनीतीलच प्रेमकथा होती. सोनिका आणि अकबर इंदिरापूरमच्या न्यायखंड भागात मोठे झाले. एकाच शाळेत गेले – खोडा (गाझियाबाद) येथे. नंतर अकबर श्यामलाल कॉलेज (शाहदरा) मध्ये गेला, आणि सोनिका विज्ञान विहार स्कूलमध्ये शिफ्ट झाली,” असं त्यांचा मित्र आशीष बिष्ट सांगतो.
कॉलेजनंतर अकबर आणि त्याचा भाऊ मोहम्मद आरिफ यांनी जन सेवा केंद्रे (जिथे आधार, पॅन वगैरे सरकारी सेवा मिळतात) चालवायला सुरुवात केली. सोनिका दिल्लीतील एका मोठ्या सलूनमध्ये नोकरी करून, नंतर स्वतःचं ब्यूटी पार्लर अकबरच्या दुकानाशेजारी सुरू करत होती.
विवाह आणि त्यानंतरचा काळ
2022 मध्ये या दोघांनी विशेष विवाह कायद्यान्वये लग्न केलं. अकबरच्या कुटुंबीयांनी काही फोटो शेअर केले, ज्यात सोनिकाचा भाऊ साहिल (23) विवाहानंतर त्यांच्या बरोबर दिसतो. सोनिकाचे वडील मात्र म्हणतात, “मला त्यांच्या नात्याबद्दल काही माहिती नव्हती. अकबर फक्त ओळखीचा होता. लग्न झालंय हे मला 24 मे रोजीच कळलं.”
ही माहिती त्यांना कशी मिळाली यावर ते काही सांगत नाहीत. पण इंदिरापूरममधील बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे “सक्रिय सदस्य” प्रवीण नगर सांगतात, “23 मे 2025 रोजी आम्हाला एका आंतरधर्मीय जोडप्याबद्दल समजलं. रात्री 8:30 ला आम्ही पोलिसांकडे गेलो. मीही तिथे होतो.” त्यानंतर 24 मे रोजी एफआयआर दाखल झाला.
“सोनिका आमच्या घरचाच एक भाग होती”
अकबरचे भाऊ आरिफ (31) सांगतात, “आम्हाला हे नातं आधीपासूनच माहित होतं. आम्ही विरोध केला नाही. ती आमच्या घरचाच भाग होती.” बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून त्यांचे कुटुंब 40 वर्षांपूर्वी गाझियाबादला स्थलांतरित झाले. सोनिकाचे मूळ उत्तराखंडच्या पौडी गढवालमधील. 2014 मध्ये अकबरच्या आईचं, आणि 2019 मध्ये वडिलांचं निधन झालं. “त्या कठीण काळात सोनिका नेहमी अकबरच्या पाठीशी उभी राहिली,” असं आरिफ सांगतात.
“ईदला ते आमच्या घरी, दिवाळीला आम्ही त्यांच्या घरी – धर्म कधी अडथळा ठरला नाही. पण आता धर्माचे ‘ठेकेदार’ त्यांच्या प्रेमावर ताव मारू लागले. लग्नानंतर तीन वर्षांनी ही पहिलीच वेळ होती, जेव्हा कुठलाही वाद झाला.”
एफआयआर आणि पोलिसांची धडक
इंदिरापूरम पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत सोनिकाचे वडील लिहितात, "शनिवार, 24 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता माझी मुलगी – जी एका सलूनमध्ये काम करते – अकबर आणि त्याचा भाऊ मकसद खान यांनी अपहरण करून त्यांच्या दुकानात कैद केली. आम्ही तेथे गेल्यावर त्यांच्या घरातील चार-पाच महिलांनी आम्हाला पकडून ठेवले आणि अकबर व मकसद म्हणाले की, 'तुमच्या मुलीचं आमच्याशी लग्न लावा नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू'. नंतर अकबर तिला घेऊन पळून गेला.माझी मुलगी अकबरच्या धमक्यांमुळे घाबरली आहे आणि त्याच्या दबावाखाली आहे.”
त्यावर आधारित पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत अपहरण, बेकायदेशीर बंदिस्त ठेवणे आणि दंगल घडवण्याचे कलम लावून अकबर, त्याचा भाऊ मकसद, आणि चार-पाच अनोळखी महिलांविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी इंदिरापूरममधील अकबरच्या घरी छापा टाकून चार महिलांना अटक केली, मग अकबरला अटक केली, आणि सोनिकाला तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं. शेजारी म्हणाले की, चौहान कुटुंबीयांनी लगेचच सोनिकाला घेऊन उत्तराखंडमधील पौडी गढवालला स्थलांतर केलं.
एक व्हिडिओ… सोनिकाची साक्ष
अकबरला अटक होण्याआधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला. एका गाडीमध्ये अकबर आणि सोनिका आहेत. त्या व्हिडिओत सोनिका स्पष्टपणे म्हणते, "हा माझा नवरा आहे, अकबर… गेली नऊ वर्षं आम्ही एकत्र आहोत. तीन वर्षांपूर्वी आम्ही स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत लग्न केलं. माझ्या आईवडिलांना थोडीफार कल्पना होती. पण आज त्यांनी मला मारलं. मला भीती वाटते आहे, म्हणून मी माझ्या नवऱ्याबरोबर राहायला निघते आहे. माझ्या पतीच्या कुटुंबावर कोणतीही कारवाई होऊ नये. माझ्या कुटुंबावरही नाही. मी पूर्ण इच्छेने माझ्या नवऱ्यासोबत जात आहे."
पोलिसांचा दावा
27 मे रोजी इंदिरापूरमचे एसीपी अभिषेक श्रीवास्तव सांगतात, "एफआयआर दाखल झाल्यावर आम्ही त्वरीत कारवाई केली. सोनिकाला गाझियाबादमधून ताब्यात घेऊन तिच्या पालकांकडे दिलं. अकबर आणि त्याच्या दोन बहिणींना अटक झाली आहे. सोनिकाची वैद्यकीय तपासणी झाली असून, ती दोन-तीन दिवसांत मजिस्ट्रेटसमोर जबाब देणार आहे." मात्र अकबरचा भाऊ आरिफ म्हणतो, "पोलिसांनी त्यांना पकडलं नाही, ते स्वतः पोलिसांसमोर शरण आले." त्यासोबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात अकबर आणि सोनिका गाझियाबाद पोलिस कमिशनरच्या घराबाहेर दिसतात.
"लव्ह जिहाद"च्या नावाखाली हल्ला
अकबरला अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 26 मे रोजी त्याच्या दुकानावर हल्ला झाला. इंदिरापूरम युवा मोर्चा आणि उत्तराखंड समाज अधिकाऱिक नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर संदेश फिरू लागले. "इंदिरापूरममध्ये लव्ह जिहादचे प्रकार वाढत आहेत… आपल्या मुलींच्या सन्मानासाठी आपण रस्त्यावर उतरायला हवे. 7 वाजता अकबरच्या दुकानासमोर जमत आहोत."
सुमारे 60 जणांच्या जमावाने दुकान फोडले, तोडफोड केली.पोलिसांनी 27 मे रोजी 50-60 अज्ञातांवर दंगल, हिंसाचार वगैरे कलमांखाली गुन्हा नोंदवला. घटनेविषयी गाझियाबादचे ट्रान्स-हिंदोन विभागाचे डीसीपी दसरथ पाटील म्हणतात, "10 लोक ओळखले गेले आहेत, लवकरच अटक होईल." पण अद्याप अटक झालेली नाही. गाझियाबाद पोलिसांनी अजूनही सोनिकाला कोर्टात हजर केलेले नाहीत. "तपास सुरू आहे. ती तयार झाल्यावरच तिचा जबाब नोंदवू," असं डीसीपी पाटील सांगतात. दरम्यान, अकबर आणि त्याच्या दोन बहिणी तुरुंगातच आहेत.
(सौजन्य - इंडियन एक्स्प्रेस)






