रितेश सिसोदे
आजचा विषय थोडा वेगळा आहे. वाहन क्षेत्रात ज्या मारुती 800 ने क्रांती घडवून आणली, तिचा वाढदिवस काल (14 डिसेंबर) साजरा झाला. त्या गाडीची ही कथा आहे. पहिल्या-वहिल्या मारुती 800 चे मालक होते इंडियन एअरलाइन्सचे कर्मचारी हरपाल सिंग. त्यांनी ही कार 1983 मध्ये खरेदी केली. त्याच आठवड्यात म्हणजे 14 डिसेंबर 1983 रोजी तिची चावी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते हरपाल सिंग यांना देण्यात आली. त्यानंतर हरपालसिंग हे सेलेब्रिटी बनले होते. त्यांचे इंदिरा गांधी यांच्याकडून चावी घेतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते आणि हरपाल सिंग संपूर्ण देशाच्या नजरेत आले. हरपालसिंग यांनी मारुती 800 आयुष्यसभर चालवली आणि त्यानंतर इतक्या गाड्या आल्या तरीही त्यांनी ती कार विकली नाही. त्यानंतर मध्यमवर्गाची ही लाडकी कार बनली. ती स्वस्त होती आणि तिने अनेक मध्यमवर्गीयांचे कार खरेदीचे स्वप्न पूर्ण केले होते.
47.5 हजारात देशातील पहिली मारुती कार विकत घेणारे हरपाल सिंग
हरपाल सिंग हे मारुती विकत घेणारे पहिले असामी ठरले होते आणि त्यासाठी त्यांनी मोजले होते 47,500 रुपये. हरपाल सिंग जेव्हा आपल्या मारुतीतून नवी दिल्लीची सैर करायला निघायचे, तेव्हा ते जणू रोल्स रॉइसमधूनच निघाले आहेत, असे दिल्लीकरांना वाटे. अमेरिकेत फोर्डच्या मॉडेल टी आणि युरोपात फोक्सवॅगनच्या बीटलने जो इतिहास घडवला त्याचीच पुनरावृत्ती मारुतीने भारतात केली. 2010 मध्ये जेव्हा हरपाल सिंग यांचे निधन झाले, तेव्हा अनेकांनी या कारचे पुनरूज्जीवन करण्यासाठी ती खरेदी करण्याचा प्रयत्न केला. पण हरपाल सिंग यांच्या कुटुंबीयांनी ती विकण्यास नकार दिला. त्यानंतर या कारची अवस्था बिकट झाली. ही गाडी दयनीय अवस्थेत पोहचण्यापूर्वीच तिचा लूक बदलण्याची कल्पना सूचली आणि तिचा चेहरामोहरा बदलण्याचे ठरविण्यात आले. देशातील पहिल्या मारुतीच्या बिकट स्थितीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर कंपनीने ही गाडी पुन्हा जून्या फार्मात आणण्याचा निश्चिय केला. गाडीत मूळ स्पेअर पार्ट आणि इतर साहित्य लावण्यात आले. मारुती शान असलेल्या या गाडीला कंपनीच्या मुख्यालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
त्यानंतर मध्यमवर्गाची ही लाडकी कार बनली. ती स्वस्त होती आणि तिने अनेक मध्यमवर्गीयांचे कार खरेदीचे स्वप्न पूर्ण केले होते. ‘मारुती 800’चे मालक असणे हे त्या काळी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई आणि पंजाबात तर ‘मारुती मॅरेज’ म्हणजेच विवाह निश्चित करताना मारुती हुंड्याचा अविभाज्य घटक बनला. एका अर्थाने भारतातील वाहन उद्योगाला मारुतीने जन्माला घातले असे म्हटले, तर ती अतिशयोक्ती ठरू नये. सुझुकीमुळे भारतात जपानी तंत्रज्ञानच नव्हे, तर त्यांच्या कामाची संस्कृतीही रुजली आणि त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन पद्धतीच्या अवलंबामुळे कार्यक्षमतेचा जणू वस्तुपाठच भारतीयांना मिळाला.
मारुतीच्या जन्माचे श्रेय संजय गांधी यांना
संजय गांधींनी सत्तरच्या दशकात जेव्हा भारतात मध्यमवर्गीयांसाठी कार निर्मितीचे स्वप्न पाहिले, तेव्हा तो कुचेष्टेचा विषय होता. शिवाय त्यांच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे हा प्रकल्प सरकारसाठी पांढरा हत्ती ठरेल असेच भाकीत अनेकांनी वर्तवले होते. ‘मारुती 800’ हे मॉडेल जेव्हा लाँच झाले त्या वेळेस सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला परवडेल अशा किमतीत ते उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्या वेळेस ‘मारुती 800’ची किंमत होती 55,000 रुपये. भारतात त्या काळी फक्त हिंदुस्थान मोटर्सच्या अॅम्बेसेडर आणि प्रीमियर पद्मिनीचे उत्पादन होत असे. संजय गांधींनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला, तेव्हा कार निर्मितीसाठीचे तंत्रज्ञान मिळवण्याचे कठीण आव्हान उभे ठाकले होते. भारतात जागतिक दर्जाच्या कारची निर्मिती होऊ शकते या बाबतीत वाहन उद्योगातील अनेक जागतिक कंपन्यांना खात्री वाटत नव्हती.
त्यामुळेच हा प्रकल्प तब्बल एक दशक रखडला. प्रकल्पाला सरकारने दिलेल्या भांडवल आणि कर सवलतींमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. संजय गांधींच्या हट्टामुळे इंदिरा गांधींना मनस्ताप सहन करावा तर लागलाच; पण ‘माँ रोती’ असे विरोधी पक्षाचे वाक्बाणही सहन करावे लागले. संजय गांधींमुळेच हा प्रकल्प प्रचंड अडचणीत सापडूनही गुंडाळण्यात आला नाही आणि त्यांच्या विमान अपघातातील आकस्मिक मृत्यूनंतरही सरकारने त्याला पाठबळ पुरवण्यात कसर ठेवली नाही, तरी मारुतीच्या जन्माचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.
आज फार थोड्या लोकांना हे माहीत असेल की, संजय गांधींनी कधीकाळी रोल्स रॉइसमध्ये उमेदवारी केली होती. आॅटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये त्यांना प्रचंड रस होता. संजय गांधींना वाहन निर्मिती प्रकल्पात प्रचंड रस असल्याने सरकारने त्यांना त्यासाठी लागणारा परवाना, जमीन, कर सवलती अशा सर्व प्रकारचे पाठबळ देऊ केले; पण दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. त्याच वेळी भारतात जागतिक दर्जाची कारनिर्मिती होऊ शकत नाही याविषयी फोक्सवॅगन, फियाट आणि टोयोटा या बलाढ्य कंपन्यांना खात्री होती आणि त्यामुळे त्यांनी या प्रकल्पात फार स्वारस्य दाखवले नाही. त्या काळी तुलनेने लहान असलेल्या सुझुकीने मारुतीला तंत्रज्ञानाचे साहाय्य देऊ केले आणि नंतरच्या तीन दशकात भारतीय वाहन उद्योगाचा चेहरामोहराच बदलून टाकण्याचा चमत्कार मारुतीने करून दाखवला. ‘मारुती 800’ हे मॉडेल लाँच झाल्यानंतरच्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेत कार विक्रीत दुपटीने वाढ झाली.
मेरा सपना… मेरी मारुती!
पुढे अनेक बाबतींत ‘मारुती 800’ने नवा पायंडा घातला. त्या काळी बाजारात उपलब्ध असलेल्या अॅम्बेसेडर आणि पद्मिनीच्या तुलनेत ‘मारुती 800’ मध्ये डिस्क ब्रेक, फ्रंट व्हील ड्राइव्ह आणि फ्लोरशिफ्ट गिअर्स, बकेट सीट्स, प्लास्टिक मोल्डेड डॅशबोर्ड आणि चालणारे वायपर्स हे म्हणजे भारतीयांसाठी रॉकेट टेक्नॉलॉजी हाती येण्यासारखे होते. त्यामुळे अल्पावधीतच ‘मारुती 800’ने लोकांना वेड लावले आणि बाजारपेठ काबीज केली. यात नवल वाटण्यासारखे काहीच नव्हते. ‘मारुती 800’ चालवणे सहज सोपे असल्यामुळे महिलांमध्येही तिला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्या काळी जपानी दर्जाच्या या गाडीसाठी लोक कंपनी किमतीच्या दुप्पट किंमत मोजण्यास तयार होते.
पी.व्ही. नरसिंह राव यांनी जेव्हा देशाची अर्थव्यवस्था खुली केली, तेव्हा मध्यमवर्गाला त्याचा सर्वात लाभ झाला. मध्यमवर्गीयांची स्थिती सुधारली. पण मारुती 800 चे स्थान अबाधित राहिले. 1980 मध्ये मारुती कारचा प्रवास सुरू झाला. संजय गांधी यांच्या काळात भारत सरकार आणि मारुती सुझुकी यांच्यातील मारुती 800 हा संयुक्त प्रकल्प करण्यात आला होता. 9 एप्रिल 1983 रोजी कारचे बुकिंग सुरू झाले आणि दोन महिन्यांत कारची संख्या 1.35 लाखपर्यंत पोहचली. स्वस्त किमत आणि चालवण्यास अत्यंत सोपी अशी ही कार होती. त्यामुळे ती भारतीयांची लाडकी बनली. भारतीय बाजारपेठेत तब्बल 31 वर्षे ही कार आपला ठसा उमटवून होती. 2014 मध्ये कंपनीने मारुती 800 चे उत्पादन बंद केले. पण या कारमुळे मध्यमवर्गीयांचे स्वतःचे कार असण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
‘मेरे डॅड की मारुती’
त्यानंतर कितीतरी स्वस्त कार आल्या. टाटांनी नॅनो आणली. तिची जाहिरात प्रचंड झाली. पण ती चालली नाही. कारण ती भारतीय रस्त्यांसाठी चांगली असली तरीही फारच लहान होती. मारुती 800 नंतर वाहन क्षेत्रही सेलेब्रिटी बनले आणि आजही त्याची जादू कायम आहे. आजही स्वतःच्या मालकीची कार असणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. याच कारने बजाज स्कूटरची जागा घेतली. भारतातील स्थानिक औद्योगिक चित्र आणि भारताला वाहन क्षेत्रातील अग्रगण्य बनवण्यात मारुती 800 ने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. मारुती 800 च्या नंतरच्या प्रवासात अनेक मनोरंजक कथा आहेत. या कारसाठी 1 लाख 20 हजार ग्राहकांनी दहा हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले होते.
जेव्हा ही कार सुरू झाली, तेव्हा तिची किमत दिल्लीत 52 हजार रुपये होती. त्यावेळचे भारताचे दरडोई उत्पन्न पहाता तेव्हाही ती महागच होती. पण मध्यमवर्गीयांसाठी ती परवडण्यासारखी होती. या कारची स्पर्धा ज्या परदेशी मोटारींशी होती, त्यात इम्पाला आणि शेवरोलेट, ब्रिटिश सेडान या कार होत्या. पण त्यांना मागे टाकून या कारने बाजारपेठेवर कब्जा केला होता. आपल्या कारकिर्दीत मारुती 800 च्या 27 लाख कार विकल्या गेल्या. पण बीएसफोर हे कार्बन उत्सर्जनाचे निकष आल्यानंतर मात्र कंपनीने या कारला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
आर. सी. भार्गव यांचे श्रेय
मारुतीचे नेतृत्व आर. सी. भार्गव यांनी 16 वर्षे केले आणि त्यांच्या कारकीर्दीत या कंपनीने गगनभरारी घेतली. सुरुवातीच्या कालखंडात सरकारने पूर्ण ताकद या प्रकल्पाच्या मागे उभी केली. त्यामुळेही लालफितीचा फटका त्यांना बसला नाही. त्यामुळे मारुतीने वाहन उद्योगात अनेक मानदंड प्रस्थापित केले. भारतात वाहन उद्योगाला आवश्यक असणार्या सुट्या भागांच्या निर्मितीला मोठी चालना मारुतीमुळेच मिळाली. मारुतीने विक्रीच्या बाबतीतही अनेक नवे मार्ग चोखाळले. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवत विक्रीपश्चात सेवेकडेही मारुतीने पूर्ण लक्ष दिल्याने जीवघेण्या स्पर्धेतही त्यांनी बाजारपेठेतील आपली पकड कायम ठेवली. अखेरीस मारुती उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून व्ही. कृष्णमूर्ती यांची नेमणूक करण्यात आली. व्ही. कृष्णमूर्ती आणि आर. सी. भार्गव यांच्या नेतृत्वाखाली मारुती उद्योगाने भरारी घेतली. जपानच्या सुझुकीने तंत्रज्ञान देऊ केले आणि त्यानंतर मारुतीने कधीच मागे वळून बघितले नाही.
मारुतीची इतर सेगमेंट्समध्ये एंट्री
मारुती 800 ही कार लाँच झाल्यानंतर कंपनीने वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये एंट्री करण्याचा निर्णय घेतला. 1984 साली कंपनीने त्यांची ओम्नी मिनिव्हॅन आणि 1985 मध्ये कंपनीने लोकप्रिय ऑफ रोडर जिप्सी कार लाँच केली. या कार्सना देखील ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 1990 मध्ये मारुतीने त्यांची पहिली सेडान कार म्हणजेच मारुती 1000. मारुती कंपनीने 1994 मध्ये या कारचं नवीन फेसलिफ्टेड माॉडेल लाँच केलं. या कारला मारुती एस्टीम असं नाव देण्यात आलं होतं. या कारने भारतातल्या सेडान कार्सचा पाया रचला.
मारुतीने 1993 मध्ये त्यांची प्रीमियम हॅचबॅक कार झेन देखील लाँच केली होती. मारुती 800 ही कार बाजारात आपला दबदबा निर्माण करत होती. तेव्हा दसऱ्या बाजूला इतरही अनेक वाहनं लाँच होत होती. कंपनीचा वारू चौफेर उधळला असताना कंपनीने आपले इरादे स्पष्ट केले होती. कंपनीला देशातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी बनायचं होतं. त्यामुळे 1995 मध्ये कंपनीने आणखी एक प्लांट उभारला आणि बरोबर ४ वर्षांनी म्हणजे 1999 मध्ये त्यांची असेम्बली लाईनची फॅसिलिटी सुरू केली होती.
मारुतीच्या यशाने भारतीय वाहन उद्योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. मारुतीमुळे वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीला मोठी चालना मिळाली. मारुतीचे अनेक पुरवठादार आज जगभरातल्या अनेक आघाडीच्या वाहन कंपन्यांना सुटे भाग पुरवतात. मारुतीमुळेच भारतातली वाहनांची बाजारपेठ प्रचंड विस्तारली. भारत वाहन उद्योगात जागतिक स्तरावर दर्जाच्या बाबतीत स्पर्धेत तग धरू शकतो, हे आत्मभान केवळ आणि केवळ मारुतीच्या निर्मितीने दिले. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘मेरे डॅड की मारुती’ ही मारुतीला दिलेली मानवंदनाच म्हणावी लागेल. एका अर्थाने मारुती उद्योगाने भारतीय उद्योग, अर्थव्यवस्था, सामाजिक मन्वंतर घडवले, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.






