- सागरिका किस्सू
एका लहानशा, साऊंडप्रूफ स्टुडिओमध्ये, एक पुरुष आणि एक महिला माईकसमोर बसले होते, दोघांच्याही कानांवर हेडफोन होते. काचेच्या पलीकडून इशारा मिळताच, त्या पुरुषाचा भारी आवाज गुंजायला लागला…“रोम रोम भाई, लो मैं आ गया थारा ताऊ और यो थारी ताई भी आ गई है और हम शुरू करेंगे यो पंचायत का प्रोग्राम.”
दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले. हे दोघं आता नोएडामधील ‘ताऊ-ताई’ म्हणून ओळखले जातात, आपला आवाज नोएडाच्या गावांपर्यंत पोहोचवणारे…शहरातील चर्चेमधून ज्यांना कायमच वगळलं जातं अशा गुज्जर, जाट समुदायापर्यंत या ‘ताऊ-ताई’चा आवाज व्यवस्थित पोहचतो.
महिला माईकवर सांगते, “आणि आजचा विषय आहे - हुंडा… जो आजही आपल्या समाजाला पोखरण्याचं काम करतोय.”
नोएडाचं नाव आजपर्यंत प्रॉपर्टी वाद, ट्रॅफिक जाम आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांपुरतंच मर्यादित होतं, पण सेक्टर-16 मधील फिल्म सिटीच्या एका शांत कोपऱ्यातील मारवाह स्टुडिओमध्ये असलेल्या कम्युनिटी रेडिओ स्टेशन 107.4 FM ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘पंचायत’, ‘नो टू व्हायोलन्स’, ‘संजीवनी’ यांसारख्या कार्यक्रमांव्यतिरिक्त मानसिक आरोग्यावर आधारित शो देखील इथे चालतात. 2009 पासून या स्टेशनने केवळ नोएडाच नव्हे, तर स्वतःलाही बदलले आहे, दिल्ली उपनगरापासून NCR पर्यंत कशी बदलली अगदी तसं…
107.4 FM… नोएडाच्या उच्चभ्रूंसाठी नव्हे तर मजुरांसाठी, झोपडपट्ट्यांसाठी
107.4 FM हे रेडिओ चॅनेल SUV मधून ऑफिसला जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी नाहीये तर ते नोएडा परिसरातील अशा गावांसाठी आहे, जी कधी नकाशावरही दिसत नाहीत. नोएडा परिसरात अशा कित्येक झोपडपट्ट्या आहेत, कित्येक स्थलांतरित मजुरांच्या वसाहती आहेत, जिथे घुरगुती हिंसाचार आणि हुंडा यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात असल्या तरी त्या दडपल्याही जातात आणि मुख्य प्रवाहातील मीडियाला या समस्याशी काही घेणंदेणंही नसतं. अशा लोकांपर्यंत 107.4 FM हे रेडिओ चॅनेला आवाज पोहचतो.
चकचकीत नोएडापेक्षा हे रेडियो स्टेशन पूर्णपणे वेगळं आहे. आज नोएडात उंच गगनचुंबी इमारती, मॉल्सची गर्दी झालीये, येत्या काही काळातच हे शहर गुडगावला मागे टाकेल, मात्र जसं नोएडा हे शहर पन्नास वर्षांचे होत आहे, तसं हे स्थानिक रेडिओ स्टेशन आपली मुळं घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय.
संबंधित लेख वाचा: 1) हे ‘असुरां’च्या आकाशवाणीचे केंद्र आहे, आणि आपण ऐकत आहात… |
इथले श्रोते आहेत, ट्रक ड्रायव्हर, IT कर्मचाऱ्यांना ऑफिसला नेणारे कॅब ड्रायव्हर, फॅक्टरी वर्कर्स जे चहाच्या गप्पांमध्ये रेडिओ ऐकतात, यूपीमधील विद्यार्थी आणि रोजगारासाठी आलेले तरुण... गटारांची समस्या असो किंवा घरगुती भांडणं - इथे प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने चर्चा होते. लोकं आपले प्रश्न आणि समस्या गुप्तपणे पाठवतात आणि रेडिओ स्टेशन त्यांना उत्तर देतो, त्यांच्या आवाजाचा प्रतिनिधी बनतो. इथले रेडिओ जॉकीही नोएडाच्याच वेगवेगळ्या भागांतून आलेले आहेत हे विशेष.
वंचित समुदायाला जोडणारे कम्युनिटी चॅनेल
107.4 FM चे संचालक सुशील भारती सांगतात, “हे नोएडाचं पहिलं आणि एकमेव कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. एका अनियोजित टाऊनशिपपासून कॉस्मोपॉलिटन हबपर्यंतचा या शहराचा प्रवास 107.4 FM ने पाहिला आहे. शहराच्या धावपळीत हे स्टेशन लोकांना आपली जागा देतं, त्यांना जोडतं. कम्युनिटी रेडिओचं उद्दिष्ट आहे, लोकांशी जोडणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि सरकारी योजना योग्य लोकांपर्यंत पोहोचवणं.”
अमिता शर्मा दोन वर्षांपूर्वी 107.4 FM शी जोडल्या गेल्या. त्यांच्या आयुष्यातील हा एक स्वातंत्र्याचा क्षण होता. 25 वर्षे गृहिणी म्हणून राहिल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक नवीन ओळख निर्माण केली. आज नोएडा त्यांना ‘RJ अमिता’ म्हणून ओळखतो. अमिता म्हणाल्या, “आता मी जिवंत आहे असं वाटायला लागलयं. माझ्यात एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालाय. आधी माझी कोणतीही ओळख नव्हती, पण आता लोक मला स्वतंत्र स्त्री म्हणून ओळखतात. माझ्या दोन्ही मुली त्यामुळे सर्वाधिक आनंदी आहेत.”
अमिता शर्मा तीन शो होस्ट करतात, भारत की वीरांगनाएं’, ‘वीमेन: द अचीवर्स’ आणि ‘एक मुलाकात’. त्यांना रेडिओचा यापूर्वी कोणताही अनुभव नव्हता. हे सर्व त्या इथेच शिकल्या, स्टेशन डायरेक्टर सुशील भारती यांच्या मार्गदर्शनाखाली. अमिता म्हणाल्या, “सुशील भारती सर दररोज अर्धा तास माझ्यासोबत बसायचे. बोलण्याची पद्धत, श्रोत्यांशी संवाद साधणं आणि योग्य गाणी निवडणं - सर्व काही त्यांनी शिकवलं.”
ते नेहमी हेच म्हणतात की, “असं बोला जसं समोर बसलेल्या व्यक्तीशी गप्पा मारत आहात, तेव्हाच ते खरं वाटेल.”
‘’आई, तु तर अगदी प्रोफेशनल वाटतेय! असं वाटतच नाही की तु नवखी आहेस.”
पहिल्यांदा जेव्हा अमिताच्या 17 वर्षांच्या मुलीने आईला रेडिओवर ऐकलं, तेव्हा तिला विश्वासच बसला नाही. अमिता हसत सांगतात, “आई, तु तर अगदी प्रोफेशनल वाटतेय! असं वाटतच नाही की तु नवखी आहेस.”
आज अमिताचे शो केवळ माहितीचं साधन नाहीये, तर त्यांच्या मुलींसाठी रात्रीच्या गोष्टींचं चॅनेलदेखील बनलं आहे. गेल्या आठवड्यात ‘भारत की वीरांगनाएं’ साठी अमितांनी लक्ष्मी कायला यांच्यावर संशोधन केलं. लक्ष्मी कायला या राणी झांसी रेजिमेंटच्या सदस्य होत्या. राणी झांसी रेजिमेंट म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजची महिला तुकडी. अमिता म्हणाल्या, “मी कधीच त्यांच्या विषयी ऐकलं नव्हतं. जेव्हा त्यांच्याविषयी वाचलं, तेव्हा मन भरून आलं. असं वाटलं की आपल्या इतिहासातून अनेक महिला योद्ध्या, नेते आणि परिवर्तन घडवणाऱ्या स्त्रिया गायब केल्या गेल्या आहेत.”
लक्ष्मी कायला यांच्या लहान वयात सैन्यात सहभागी होण्याच्या संघर्षाने अमितांना नवीन प्रेरणा दिली. अशा महिलांच्या कथा समोर आणण्याची, ज्या संघर्षातून आपली ओळख निर्माण करतात…
आता हा शो त्यांच्या आयुष्यात आणखी व्यक्तिगत झाला आहे. अमितांनी सांगितलं, “जसं मी माझी ओळख निर्माण केली, तसं मी या विस्मृतीत गेलेल्या महिलांची ओळख निर्माण करते. त्यांच्या शौर्य आणि धैर्याच्या कथा सांगून.”
107.4 FM चॅमेलच्या कार्यक्रमासाठी सुशील भारती आणि त्यांच्या टीमने नोएडामधील विविध भागांमध्ये शोधाशोध केली, फेरफटका मारला आणि त्यांना इथल्या शिव नगरी नावाच्या झोपडपट्टी विषयी समजलं. इथे अनेक मुलांनी शाळा सोडून दिली होती. त्यांनी एका एनजीओच्या मदतीने "आपला शाळा" नावाचा शिक्षण प्रकल्प सुरू केला, जो बांधकाम कामगारांच्या आणि इतर श्रमिकांच्या मुलांसाठी आहे. सध्या नोएडामध्ये अशा 10 शाळा चालू आहेत.
रेडिओ स्टेशन स्वतःच्या स्रोतांमधून या शाळांमध्ये शिक्षकांचे वेतन, पंखे, स्वच्छतागृह यांसारख्या आवश्यक सुविधा पुरवतो. भारती सांगतात, "एकदम पॉश आणि चकचकीत असलेल्या फिल्म सिटीमध्ये आपण बसतो. इथे काचेच्या इमारती आहेत, उंचच उंच बिल्डिंग्स आहेत, रुंद रस्ते आहेत. पण नोएडा म्हणजे इतकंच नाही. संशोधनातून आम्हाला कळलं की, या चमकदार शहराच्या मागेही एक वेगळा नोएडा आहे - सेक्टर, झोपडपट्ट्या आणि स्थलांतरित वसाहती, जिथे शहराची मोठी लोकसंख्या राहते."
सामाजिक दबाव दूर करणे हेच ध्येय
या वस्तींसाठीच रेडिओ स्टेशनने "उडान जिंदगी" आणि "हौसलों की उड़ान" सारखे कार्यक्रम सुरू केले, जिथे मुलंच पंचायतसारख्या चर्चांमध्ये भाग घेतात. त्यांच्या समस्यांवर आणि आजूबाजूच्या गोष्टींवर चर्चा करतात. भारती सांगतात, "आमची कल्पना होती की, समुदाय भावना वाढवली पाहिजे. त्यामुळे रेडिओ चॅनेलचे अँकरही मुलंच असतात,पाहुणे आणि होस्टही मुलेच असतात."
"वीमेन: द अचीवर्स" नावाचा आणखी एक कार्यक्रम महिलांच्या कथांवर आधारित आहे, ज्या आपल्या जीवनाची दुसरी इनिंग सुरू करत आहेत, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारती सांगतात, "आम्ही अशा महिलांना शोधून त्यांच्या कहाण्या सांगतो, जेणेकरून इतर महिलांनाही प्रेरणा मिळेल."
भारतात कम्युनिटी रेडिओ स्टेशनला बातम्या प्रसारित करण्याची परवानगी नाही, किंवा राजकारण किंवा धर्मावर बोलण्याची मुभाही नाही. मात्र, 107.4 FM चे आरजे सांगतात की, ते जाणूनबुजून अशा सामाजिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतात, जे संपूर्ण समुदायाला एकत्र आणू शकतील.
अनुपमा भारद्वाज माईक हातात घेऊन सौम्य आवाजात "लज्जा" या विषयावर बोलायला सुरुवात करते. विषय असतो घरगुती हिंसा, मासिक पाळी आणि प्रजनन आरोग्य.
"तुम्ही गावात राहता का शहरात, प्रजनन आरोग्याची काळजी घ्या." ती बोलत असते. "आज आपल्या सोबत एक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत, जे सांगणार आहेत की कमी स्रोतांमध्ये देखील स्वतःची काळजी कशी घ्यावी." ती म्हणते, "माझ्यासाठी खरे श्रोते त्या ग्रामीण महिला आहेत, ज्यांचं आयुष्य पितृसत्ताक चौकटीत अडकले आहे आणि ज्या दिवसभराच्या कष्टांमध्ये स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत."
नोएडाच्या 107.4 FM वर अनुपमा अशा महिला आरजेंपैकी एक आहे, जी आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांवर उघडपणे बोलते. ती स्वतःला "स्त्रीवादी" म्हणवते आणि आपल्या कार्यक्रमांद्वारे महिलांच्या आरोग्याशी संबंधित जो सामाजिक टॅबू पसरला त्यावर चर्चा करते. "आपल्याला ही शांतता मोडावी लागेल. सार्वजनिक आरोग्यामध्ये लाजेसाठी जागा नाही," ती ठामपणे आपले म्हणणे मांडते
अनुपमाचे कार्यक्रम "संजीवनी" आणि "नो टू व्हायोलन्स" या विषयांवर आधारित आहेत. ती घरगुती हिंसा आणि हुंडा पीडित महिलांचे खाजगी संदेश वाचते आणि त्यावर चर्चा करते. अनुपमा देखील नोएडामधीलच आहेत. सुशील भारती सांगतात, "कम्युनिटी रेडिओचा हेतूच हा आहे की समुदायातील लोक स्वतः बोलावेत, जेणेकरून ते मनापासून आपल्या समाजाच्या समस्या मांडू शकतील."
स्टेशनचे कार्यक्रम संपूर्ण दिवसाच्या घरगुती वेळापत्रकानुसार आखलेले आहेत. सकाळी 8 ते 11 दरम्यान "व्हॉट्स न्यू इन नोएडा" हा शो असतो, जिथे पिंक ऑटो, ट्राफिक नियम आणि रोड डायव्हर्जन यासारख्या गोष्टी सांगितल्या जातात. दुपारी 11 नंतर, जेव्हा घरी बहुतेक महिला किंवा वृद्ध असतात, तेव्हा "वीमेन: द अचीवर्स" आणि "नो टू व्हायोलन्स" यासारखे कार्यक्रम प्रसारित होतात. सायंकाळी, जेव्हा लोक आपल्या कामावरून घरी परततात, तेव्हा "संजीवनी" मध्ये डॉक्टर आरोग्यविषयक चर्चासत्र घेतात. दिवसाचा शेवटचा शो असतो "एक मुलाकात" - जिथे प्रेम, एकटेपणा, अपूर्ण प्रेमकथा आणि महानगरातील मानसिक तणाव यावर चर्चा केली जाते.
आणि महिन्यातून एकदा, "ताऊ-ताई" ची जोडी पुन्हा परत येते, नोएडाच्या ‘अनकही’ गल्ल्यांतील कहाण्या घेऊन… एका शो मध्ये ताऊ विचारतात, "अगं ताई, हुंडा घेणं बरोबर आहे का?"
ताई जोरात म्हणते, "कसले बरोबर! बाई कोणतं सौदा नाही, जी विकत घेता येईल."






