एका बहिणीने आपल्या एचआयव्ही बाधित सख्ख्या भावाचा गळा दाबून खून केल्याची संतापजनक घटना कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात उघडकीस आली आहे. 'कुटुंबाची बदनामी होईल' या भीतीने तिने आणि तिच्या पतीने मिळून 23 वर्षीय मल्लिकार्जुनचा खून केल्याची कबुली दिली आहे.
अपघातानंतर रुग्णालयात उपचार घेत असताना तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजले, आणि त्यानंतर काही तासांतच त्याचे आयुष्य संपवण्यात आले. या घटनेमुळे समाजातील एचआयव्ही बाबत अज्ञानी मानसिकतेचे भीषण वास्तव समोर आले आहे.
(मल्लिकार्जुन)
ही आहे नेमकी घटना?
23 जुलै 2025 रोजी 23 वर्षांचा मल्लिकार्जुन आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून गावाकडे परतत होता. समोरून अचानक आलेल्या ट्रकने त्यांची गाडी धडकवली. मल्लिकार्जुन खाली कोसळला आणि रक्तबंबाळ झाला. मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दावणगेरेच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.
अपघातात टायची हाडं मोडली होती. रक्त तपासणीत समोर आलं की मल्लिकार्जुन एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. डॉक्टरांनी हे त्याच्या नातेवाईकांना सांगितलं आणि त्याला उपचारासाठी बंगळूर किंवा मणिपालला हलवायला सांगितलं,
निशा ही मल्लिकार्जुनची सख्खी बहीण. ती आणि तिचा नवरा त्यावेळेस दवाखान्यात उपस्थित होते. "आपल्या भावाला HIV झालाय... जर गावात कळलं तर लोक काय म्हणतील? आपली इज्जत जाईल!" असं ती तिच्या नवऱ्याला म्हणाली "तो जिवंत राहिला, तर बदनामी होईल. आपल्याला काहीतरी करावं लागेल..."
25 जुलैच्या रात्री, निशा आणि मंजुनाथ मल्लिकार्जुनला घेऊन गाडीने बेंगळुरूच्या दिशेने निघाले असं ते घरच्यांना सांगतात. मात्र ते दोघे गाडी एका सुनसान ठिकाणी नेऊन थांबवतात निशा आणि मंजुनाथ मल्लिकार्जुनचा गळा दाबतात. काही सेकंदातच त्याचा श्वास थांबतो.
26 जुलैच्या सकाळी मल्लिकार्जुनचा मृतदेह घरी आणला जातो. त्याची बहीण धाय मोकलून रडत सगळ्यांना सांगत असते हॉस्पिटलमध्ये काही उपयोग झाला नाही...घरच्यांना धक्का बसतो. सगळे दुःखात असतात. पण...तेवढ्यात एक वृद्ध आजोबा म्हणतात "याच्या मानेवर खुणा का आहेत? हा अपघात वाटत नाही..." हे एकूण मल्लिकार्जुनच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली. एफआयआर झाली. शवविच्छेदनात सत्य बाहेर आलं की गळा दाबल्याने मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी निशा ला ताब्यात घेतलं. तिने गुन्हा काबुल केला आणि सांगितलं, " मीच मारलं माझ्या भावाला. कारण, मला माहिती पडलं तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे समजत हे कळलं तर आमची बदनामी होईल या भावनेतून मी त्याला मारलं." पोलिसांनी निशाला अटक केली असून तिचा नवरा मंजुनाथ फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे एक मोठं कटूसत्य समोर येतं की, अजूनही समाजात एचआयव्ही संदर्भात जनजागृतीचे प्रमाण कमी आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते जिल्हापातळीवर यासंदर्भात अनेक मोहिमा चालू असल्या तरी असे प्रकार समाजात घडतच आहे.
HIV वर अजूनही अज्ञानाचा अंध:कार.. या आहेत घटना..
1. मुंबईतील बालहत्येचा संतापजनक प्रकार
मुंबईतील चेंबूर परिसरात 22 जुलै 2025 रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. HIV पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यानंतर, एका 43 वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या 6 महिन्यांच्या मुलाचा गळा दाबून खून केला. पोलिस तपासात महिलेने सांगितले की तिला समाजाच्या टीकेची भीती वाटत होती. एचआयव्हीवरील अज्ञान आणि सामाजिक कलंक यामुळे ही दुदैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले.
2. एचआयव्ही जनजागृती मोहीम राबवणाऱ्या काही संस्थेच्या संशोधनानुसार गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील शाळांमधील HIV बाधित मुलांना विविध ठिकाणी भेदभावाचा सामना करावा लागला. लातूर, अंजणगाव व पुणे जिल्ह्यांमध्ये यासारख्या ठिकाणी सुमारे 64 विद्यार्थ्यांना शाळा सोडण्यास भाग पाडले गेले.
"एचआयव्ही: रोगापेक्षा भीती अधिक घातक.. " - डॉ. भारती पाटील
या घटना आपल्या समाजाच्या आरोग्यविषयक मानसिकतेचं प्रतिक आहेत. एचआयव्ही जनजागृतीसाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील आधार संस्था गेल्या 25 वर्षांपासून काम करत आहे. या आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांच्याशी बाईमाणूसने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले,
"एचआयव्ही, टीबी, एड्स असे जे काही आजार आहेत ना या आजरांसोबत समाजात आता आपल्याला वेगळे करतील का अश्या भावना ही येतात. त्यामुळे WHO याला वैद्यकीय रोग म्हणून नाही तर सामाजिक रोग म्हणून ही बघतात. कारण या रोगांवर जर काम करायचं असेल तर त्याच्याकडे एक सामाजिक आजार म्हणून बघावं लागेल आणि त्यापध्दतीनेच काम करावं लागेल.
(डॉ. भारती पाटील )
एक तर एचआयव्ही हा आजार लैंगिकतेशी संबंधित असल्याकरणाने याच्याबरोबर कलंकतेची भावना असते . मुळात हा आजार चार कारणांनी होतो, 87% लोकांना हा आजार असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे होतो, दुसरं कारण असं के पालकांकडून त्यांच्या मुलांना होतो मात्र याच प्रमाण फक्त 5% आहे.
आता तर हे प्रमाण जवळजवळ एका टक्क्यावर आलं आहे. तिसरं कारण असं की, रक्त पुरवठ्याच्या मार्फत 2% लोकांना एचआयव्ही होतो याचं ही प्रमाण ब्लड बँकेमुळे आता कमी होत चाललं आहे. सुईद्वारे जे लोक नशा करतात त्यात 2% लोकांना हा आजरा होतो."
डॉ. भारती पाटील पुढे सांगतात, "90% लोकांमध्ये तर असुरक्षित शारीरिक संबंधामुळेच एचआयव्ही होतो आणि त्यामुळे हा जो कर्नाटक मधील प्रकार घडला तो याच भीतीपोटी घडला असेल की हा सेक्स वर्कर कडे जात असेल, म्हणून याला एचआयव्ही झाला, समजत माहिती पडलं तर या घटनेमुळे मान खाली जाईल, या सगळ्या चुकीच्या भीतीपोटी की समाज आपल्याला स्वीकारणार नाही आणि खोट्या प्रतिष्ठेपोटी त्या मुलाला त्याचा जीव गमवावा लागला असेल.
एचआयव्ही ग्रस्त माणूस आपल्यासोबत राहिल्याने, सोबत बसल्याने, उठल्याने, फिरल्याने हा आजार काही लगेच आपल्याला लागत नाही हे अजून समाजात रूढ झालं नाहीये. त्यामुळेच असे प्रकार घडतात."
एचआयव्ही हा आजार आहे, अपराध नाही. पण दुर्दैवाने अजूनही अनेक कुटुंबांमध्ये "काय लोक म्हणतील?" या भीतीपोटी माणुसकी हरवते. यासाठी गरज आहे ती केवळ औषधोपचारांची नव्हे, तर व्यापक सामाजिक शिक्षणाची. एचआयव्हीबाबतच्या गैरसमजांना दूर करणं, आणि या आजाराने बाधित व्यक्तींच्या सन्मानाचं रक्षण करणं ही सामूहिक जबाबदारी आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा पुन्हा घडतील... आणि समाज ‘आजार’ नष्ट करण्याऐवजी माणूसच संपवेल...






