- भागा वरखडे
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाचा गोपनीय तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते तसेच आजी आणि माजी मंत्रीदेखील ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे.
पोलिस उपनिरीक्षक, सहायक आयुक्त, पोलिस उपायुक्त, पोलिस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त अशा दर्जाच्या अधिकाऱ्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खंडणी मागणाऱ्या महिलेची आता गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामुळे फक्त नाशिकच नाही, संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास सुरू करण्यात आला आहे. नाशिकमधील या अधिकाऱ्याला ठाण्यातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या महिलेच्या मदतीने नाशिकमधील एका राजकीय कनेक्शन असलेल्या हॉटेल व्यावसायिकाने या प्रकरणात अडकवल्याच तपासात समोर आले आहे. अशातच या प्रकरणात ‘मास्टरमाईंड’कोण? याचा शोध घेतला जात आहे.
राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आल्यानंतर, या ट्रॅपचा ‘मास्टरमाईंड’ हा नाशिकचाच असल्याचे समोर येत आहे. तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी आहे. हा प्रकार ज्या हॉटेलमध्ये घडला, त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. 
72 सनदी अधिकारी आणि आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले?
यातून प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाच्या पुन्हा सुरू झालेल्या गोपनीय तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची वाच्यता होताच, राज्यातील अनेक अधिकारी समोर आले आहेत. यात महसूल विभागातील सर्वाधिक अधिकारी गुंतल्याची माहिती आहे.
महिलांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्याचे किंवा हवे ते काम करून घेतले असण्याची शक्यता आहे. त्यात काही नियमबाह्य कामेही असू शकतात. नाशिकमधील मुंबई नाका पोलिस ठाण्यात एका महिलेने तिच्याकडे संवेदनशील व्हिडीओ असल्याची तक्रार दाखल केली होती, तेव्हापासून ‘व्हीआयपी हनीट्रॅप’ चर्चेत आला. आता या प्रकरणात राजकारण सुरू झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते महेश तपासे यांनी ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरील मीडिया रिपोर्टस्चा हवाला देत म्हटले आहे, की वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी त्याचे बळी ठरले आहेत हे अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे राज्यात प्रशासनाची जबाबदारी असलेल्यांच्या सुरक्षिततेवर आणि असुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात.
‘हनी ट्रॅप’च्या घटनांचा आरोप करणाऱ्या मीडिया रिपोर्टस्वर सरकार गप्प का आहे? या व्यापक 'हनी ट्रॅप' मोहिमेत नोकरशहा आणि राजकारण्यांसह इतक्या मोठ्या संख्येने हाय-प्रोफाइल व्यक्तींना कसे लक्ष्य केले गेले? गुप्तचर संस्थांना वेळेत शोधण्यात किंवा हस्तक्षेप करण्यात अपयश का आले? आणि भविष्यात अशा गुन्ह्यांचा नाश करण्यासाठी कोणते उपाय राबवले जात आहेत? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
‘हनी ट्रॅप’ करणारे लोक स्वतःला आपत्कालीन परिस्थितीत असल्याचे सांगतात. ते डिजिटल आणि वैयक्तिक संवादांद्वारे विश्वास मिळवतात आणि नंतर बलात्काराचे खोटे आरोप लावण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यासाठी गुप्तपणे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करतात. हे संघटित गुन्हा करण्यासारखे आहे. या प्रकरणाच्या तपासात जनतेला पारदर्शकता हवी आहे.
सध्या महाराष्ट्रात वादळापूर्वीची शांतता आहे. काही संशयास्पद व्हिडीओ आहेत, ज्यांची शांतपणे चौकशी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांना अनेक मोठी नावे सापडली आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक अधिकारी आणि नेत्यांचे भविष्य उद्ध्वस्त होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
सरकार या प्रकरणात इतकी गुप्तता का पाळत आहे?
हे एक सुनियोजित ‘हनी ट्रॅप ऑपरेशन’ होते, की केवळ प्रभावशाली लोकांची रासलीला होती हे स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडीओ इतका संवेदनशील असल्याचे म्हटले जाते, की कोणताही अधिकारी या प्रकरणात पुढे येण्याचे धाडस करू शकत नाही. तपास यंत्रणादेखील अत्यंत गुप्ततेने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई आणि पुण्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी या सापळ्यात अडकू शकतात. आतापर्यंत कोणीही अधिकृत पातळीवर कोणतेही मोठे विधान केलेले नसले तरी, ज्या पद्धतीने हे प्रकरण 'गुप्त' ठेवले जात आहे त्यामुळे संशय निर्माण होत आहे. ना पीडित उघडपणे पुढे येत आहे ना आरोपी. अशा परिस्थितीत, हा घोटाळा हळूहळू राजकीय स्फोटाचे रूप घेऊ शकतो.
पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात काही माध्यमांनी ‘हनी ट्रॅप’च्या मालिका चालवून त्यात राजकीय नेत्यांना कसे ब्लॅकमेल केले गेले, त्याच्या सुरस कथा त्या वेळी सांगितल्या जात होत्या. राजकीय नेत्यांच्या नावाचे संकेत देत वृत्तमालिका चालवल्या गेल्या. नंतर त्यातून एक खून प्रकरण घडले होते. त्या वेळीही एका पोलिस अधिकाऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये कसे अडकवले होते, हे ही पुढे आले होते. रेखा जरे खून प्रकरण आणि त्यातला काहींचा सहभाग आणि त्यांचे ‘हनी ट्रॅप’शी असलेले अप्रत्यक्ष संबंध हा ही राज्यात चर्चेचा विषय झाला होता.
हनी ट्रॅप… हेरगिरीची ही नवीन पद्धत जगभरात यशस्वी
पाकिस्तान आणि चीनमधील युवतींचा वापर करून भारत, अमेरिकेतील लष्करी हालचालींची, लष्करी केंद्रांची तसेच अन्य माहिती कशी जमवली जात होती, हे अनेक घटनांतून उघड झाले होते. पुण्यातील ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यालाही ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवले होते. क्रिस्टीन फँग ही चीनची सुंदर गुप्तहेर आहे. तिने अमेरिकन नेत्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवले! जगभरातील गुप्त माहिती गोळा करण्यासाठी सुंदर चीनी महिलांच्या गुप्तहेर नेटवर्कचा वापर केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी असाच एक प्रकार उघडकीस आला होता, त्यात एका चीनी महिला गुप्तहेर क्रिस्टीन फँगवर अमेरिकेच्या वरिष्ठ नेत्यांशी शारीरिक संबंध ठेवून माहिती मिळवल्याचा आरोप आहे. क्रिस्टीन फँग ही एक चीनी नागरिक आहे, जी 2011 ते 2015 दरम्यान अमेरिकेतील अनेक नेत्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या जवळ आली. वृत्तांनुसार, तिने नेत्यांना लक्ष्य केले, जेणेकरून भविष्यात त्यांची माहिती चीनला देता येईल.
क्रिस्टीन फँग अमेरिकेतील अनेक कार्यक्रम आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली. या काळात तिने अनेक नेत्यांशी मैत्री निर्माण केली. तिने अमेरिकन कायदेकर्त्या एरिक स्वालवेलशीही जवळचे संबंध निर्माण केले.
स्वालवेल त्या वेळी अमेरिकन ‘हाऊस इंटेलिजेंस कमिटी’चे सदस्य होते, जिथून संवेदनशील माहिती लीक होण्याचा धोका होता. याशिवाय, फँगने अनेक महापौर आणि स्थानिक नेत्यांशीही संपर्क साधला. काही प्रकरणांमध्ये, तिने राजकारण्यांना निवडणूक निधी मिळवून देण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर केला, जेणेकरून ते त्याच्या जवळ जाऊ शकतील.
2015 मध्ये अमेरिकन गुप्तचर संस्थांना फँगच्या कारवायांवर संशय आला. तपास पुढे सरकला, तेव्हा असे आढळून आले, की ती चीनसाठी हेरगिरी करत होती. याबाबत एजन्सींना ठोस पुरावे मिळताच ती अमेरिकेतून पळून गेली. क्रिस्टीन फँग एकटी नाही.
अहवालांनुसार चीन सरकार सुंदर महिलांना विशेष प्रशिक्षण देते आणि त्यांना ‘हनी ट्रॅप’ ऑपरेशनमध्ये पाठवते. या महिला राजकीय नेते, शास्त्रज्ञ आणि व्यावसायिकांना त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि गुप्त माहिती मिळवतात. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि त्यांच्या नेत्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
या घटनेवरून असे दिसून येते, की जगात हेरगिरीच्या पद्धती बदलत आहेत आणि मोठ्या देशांच्या गुप्तचर संस्था अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी अधिकाधिक सतर्क होत आहेत. पाकिस्तान गेल्या कित्येक वर्षांपासून अशीच पद्धत वापरत आहेत. त्यात अनेक संशोधक, अनेक लष्करी जवान आणि वरिष्ठ संरक्षण अधिकारी गुंतले होते. भारतात या प्रकरणी अनेकजण गजाआड आहेत.






