मातीशिवाय म्हणजेच केवळ पाण्यावर उगवणाऱ्या हायड्रो गांजाचे नवे भूत सध्या तरुणाईवर स्वार झाले आहे. सध्या हायड्रो गांजाची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारच्या यंत्रणांपुढे असून त्यासाठी विविध पातळ्यांवर कठोर उपाय योजले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधिमंडळात केले.
गेल्या चार-पाच वर्षांत मेथाअम्फेटामाइन म्हणजेच औषधांसाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांचा गैरवापर करून तयार होणाऱ्या एमडी या अमली पदार्थांच्या नशेचा विळखा तरुणाईला बसला होता. अगदी शाळाशाळांच्या नाक्यांवरही एमडी ड्रगची विक्री होऊ लागली होती. गेल्या वर्षभरात राज्यात चार हजार कोटींहून अधिक मूल्याची एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिली. एमडीला पायबंद घालणे कठीण होत असतानाच आता हायड्रोपोनिक गांजाचे एक नवे संकट येऊन ठेपले आहे.
थायलंड आणि अमेरिकेतून भारतापर्यंत त्याची तस्करी होते. विमानाची तिकिटे काढून द्यायची, आलिशान वास्तव्य व चैनीच्या वस्तूंची आमिषे दाखवायची आणि त्या बदल्यात हायड्रो गांजाची पाकिटे तस्करीसाठी हाती कोंबायची, असे प्रकार काही टोळ्यांनी सुरू केले आहेत. ठाणे जिल्ह्यातही विशाखापट्टणम, ओडिशा या राज्यांतून; तसेच महाराष्ट्राच्या नक्षली भागांतून आलेला गांजा पकडण्यात आला होता.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसारख्या बंदरांमध्ये कंटेनरमधून कोणत्यातरी जिन्नसांच्या आडून गांजा, केटामाइन, एमडी अशा अमली पदार्थांचा साठा दडवून पाठवला जातो. या तस्करीत माहीर असलेल्या नवीन जिचकार याने तर त्यातील पैशाच्या जोरावर ऑस्ट्रेलियातील एक बेटच विकत घेतल्याची माहिती धक्कादायक आहे. त्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला, तेव्हा त्यात टपाल खाते, पोलिस आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचेही साटेलोटे उघड झाले होते.
आरोपीने विकत घेतले चक्क एक बेट
भारतातून ऑस्ट्रेलियात पळून गेलेल्या नवीन जिचकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने ऑस्ट्रेलियात एक बेट विकत घेतले होते. ऑस्ट्रेलियाचा पासपोर्ट मिळवला होता. तो कुरिअरने भारतात हायड्रो गांजा पाठवत होता. त्याने फैलावलेल्या जाळ्यात पोस्ट, कस्टम आणि पोलिस सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्या सर्वांना गजाआड करण्यात आले आहे. पोस्टासह सर्व कुरिअरला राज्य सरकारने नोटीस पाठवली असून, जे पार्सल येतात त्याची पडताळणी करून घेतली पाहिजे, अन्यथा तुम्हाला या आरोपी करण्यात येईल असा इशारा देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कॅन्सर रुग्णांचा वापर
ड्रग्ज पेडलर्सबरोबर आता याच्या संबंधित फॉरवर्ड आणि बॅकवर्ड जी साखळी असते अशा आरोपींनाही पकडले जात आहे. पोलिसांनी त्यांना पकडणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, अखेरच्या घटका मोजणाऱ्या कॅन्सर रुग्णांचाही तस्करीत वापर केला जात आहे. या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून विक्रीची नवीन पद्धत वापरली जात आहे अशी खळबळजनक माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मातीविना उगवता येतो हायड्रोपाेनिक गांजा
हायड्रो गांजा उगवण्यासाठी मातीची गरज पडत नाही. मातीऐवजी पोषक तत्त्वांनी समृद्ध पाण्याच्या द्रावणात रोपे वाढवणे शक्य असते. ही पद्धत वनस्पतीच्या वातावरणावर अचूक नियंत्रण ठेवते. यामुळे पारंपरिक मातीआधारित लागवडीच्या तुलनेत संभाव्य जलद वाढ, उच्च उत्पादन आणि अधिक सुसंगत परिणाम मिळतात. थायलंडमध्ये जागोजागी हायड्रो गांजा विकला जातो. कारण तेथील सरकारने हा गांजा लागवड करणे, विकणे आणि सेवन करण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे. परिणामी तेथे हा व्यवसाय खूप वाढीस लागला आहे. तेथून हे लोण भारतात, महाराष्ट्रात आले आहे.
जनजागृतीपेक्षा कठोर शिक्षा केली तरच ड्रग्ज तस्करीला बसेल आळा
ड्रग्जच्या मूळ पुरवठादाराकडे अनेकदा पोलिस जातच नाहीत. परराज्यातून ड्रग्ज येत असतील तर तेथील पोलिसांना सोबत घेऊन छापे टाकले पाहिजेत. ड्रग्ज तस्करीची मोठी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली पाहिजेत. तसे होत नसल्याने खटले वर्षानुवर्षे रखडतात. आरोपी जामिनावर सुटून पुन्हा हाच धंदा करतात. मोक्काच्या केसेसमध्ये डीसीपी किंवा एसपीसमोरील कबुलीजबाब ग्राह्य धरला जातो. तशीच तरतूद एनडीपीएस कायद्यात केली तर आरोपी सुटणार नाहीत.
एनडीपीएस कायद्यानुसार ड्रग्ज व्यापाऱ्याला मदत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला 10 वर्षे शिक्षेची तरतूद आहे. प्रत्येक उपविभागात नार्कोटिक कंट्रोल युनिट हवे. तेथे 1 पीआय, 2 पीएसआय असावेत. शाळा, कॉलेजांत जनजागृती महत्त्वाची आहे. पण माझ्या मते अधिकाधिक ड्रग्जवाल्यांना कठोर शिक्षा झाली तरच तरुणाईला वाचवता येईल.
नशेची तस्करी ही अशा चौकड्यांचे जाळे विणूनच फोफावत असते. अन्न व औषध प्रशासनाकडूनही टोळीबहाद्दरांवर अंकुश आणला जात नाही. केंद्र आणि पोलिसांचा अमलीपदार्थविरोधी विभाग यांच्याकडून सज्जड कारवाया होण्याची गरज आहे. नशा करणे हे विद्यार्थ्यांना फॅशनेबल वाटते, तर कधीकधी नैराश्यावर, अभ्यासाच्या ताणावरचा, नोकरीतील तणावावरचा उपाय म्हणून तरुण या जीवघेण्या वनस्पतींच्या आहारी जातात. तरुणाईला वाचवण्यासाठी तस्करीला खतपणी घालणाऱ्या चौकड्यांवर घणाघाती घाव घालण्याची गरज आहे. आतली कीडच व्यवस्थेला पोखरत असते व हायड्रो गांजालाही पाणी घालून वाढविणारे हात शोधण्याखेरीज या किडीचा निःपात शक्य होणार नाही.






