हरियाणाचा एक युट्यूबर 2024-2025 मध्ये पाकिस्तानला गेला होता. मात्र त्यामागचं कारण हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रासारखं नव्हतं की आपल्या युट्यूब चॅनलचे सबस्क्रायर वाढवण्यासाठीही नव्हतं. त्याचं कारण पूर्णपणे वेगळं होतं. अर्धांगवायू असलेल्या त्याच्या 90 वर्षांच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की, ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता तिथली माती त्यांच्या कपाळाला लावावी.
आपल्या वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी तो युट्यूबर पाकिस्तानला गेला. तो म्हणतो की, “लहानपणी ते आम्हाला पाकिस्तानातील कबीरवालाँ गावच्या त्यांच्या आयुष्याबद्दल सांगायचे. त्यांचे डोळे तेव्हा भरून यायचे. मी त्यांना तिथं नेऊ शकत नव्हतो. पण त्यांच्या जन्मगावची माती आणू शकलो. ज्यावेळी त्यांनी ती त्यांच्या कपाळाला लावली आणि लवून नमस्कार केला तेव्हा आम्ही सारेच भावूक झालो होतो.”
हेरगिरीच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशातील 11 जणांच्या अटकेमुळे त्या हरियाणवी युट्यूबर्सवर संशयाची सुई आली आहे जे वाघा सीमा पार करून कॅमेरे घेऊन पाकिस्तानात गेले होते. पाकिस्तानला जाणाऱ्या युट्यूबर्समध्ये जाट आणि पंजाबी समाजाच्या लोकांचा जास्त समावेश होता. दोन्ही देशांत तणाव निर्माण होण्याआधीच्या काळात ते ‘क्रॉस-कल्चरल’ व्हिडीयो तयार करत होते.
पाकिस्तानात जाणं त्यांच्यासाठी फक्त सीमा ओलांडणं नव्हतं तर फाळणीमुळे तुटलेल्या पाळंमुळांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्नही होता. त्यांच्यासाठी पाकिस्तान हा एक सांस्कृतिक व पैतृक वारसा आहे ज्याच्या शोधात ते पाकिस्तानला जायचे.
हरियाणाचे ‘जाट’ युट्युबर्स पाकिस्तानात का जातात?
ज्योती मल्होत्राचे आई-वडील पाकिस्तानातून आले होते. तिने आपल्या ‘ट्रॅव्हल विद जो’ या अकाउंटवरून ही शोधयात्रा दाखवली आहे ज्याचे 3.77 लाख सबस्क्रायबर्स आहेत. या व्हिडियोची लोकप्रियता यासाठी आहे कारण फाळणीमुळे जी दरी तयार झाली आहे ती यामुळे कमी होते. “हरियाणवी दर्शकांना हे व्हिडीयोज् जास्त भावतात कारण त्यांच्यासाठी पाकिस्तान हे हरवलेलं घर आहे,” सेंटर फॉर स्टडी ऑन डेव्हलपिंग सोसायटीज् (सीएसडीएस) रिसर्च स्कॉलर असलेली ज्योती मिश्रा सांगते.
हरियाणाच्या जाट बहुसंख्य भागातील विकास श्योराण व त्यांची पत्नी रितू खोखर यांनी 1947 मध्ये हरियाणातून पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिम जाटांवर लक्ष केंद्रीत करून आपल्या पाकिस्तानी प्रवासाचं दस्तऐवजीकरण केलंय. देश आणि धर्माच्या पलीकडे असलेल्या त्यांच्या काही परंपरा भारतातील एका पिढीने बघितलेल्याच नाहीत. यात पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील लोकही आहेत जे हरियाणवी भाषा बोलतात. कुस्ती खेळतात, पारंपरिक जाट नाच करतात.
हरियाणवी लोक विनोदासाठी प्रसिद्ध आहेत. ते प्रत्येक प्रसंगात काहीतरी मजेशीर बोलतात आणि जोरजोरात हसतात. श्योराणच्या एका व्हिडीयोत, मुलतान येथील मुस्लिम जाटांचा एक समुह आपल्या परंपरा सांगताना दिसतो. ते विनोद करतात, जोरानं हसतात आणि सांगतात की हसणं ही गोष्ट अशी आहे की जी कोणालाही आपलसं करून घेते. फाळणीचा हरियाणातील पंजाबी लोकांवर मोठा प्रभाव पडला आहे ज्यांचे पूर्वज पाकिस्तानात गेले होते.
जाट समुदायाचे मुस्लिम जाट मित्र, शेजारीही पाकिस्तानात निघून गेले. त्यांच्या आठवणी तेवढ्या मागे राहिल्या. ज्योती मल्होत्राचे पाकिस्तान यात्रेचे व्हिडीयो म्हणूनच त्या लोकांना आवडले ज्यांच्या पूर्वजांना फाळणीच्या झळा पोहोचल्या होत्या. पण तिच्या अटकेनंतर पाकिस्तानला जाणाऱ्या तिच्यासारख्या सर्वच प्रवाशांवर संशय येऊ लागलाय ज्यांनी आपल्या इतिहासाच्या शोधात पाकिस्तानची यात्रा केली होती.
हरियाणाचे विकास श्योराण आणि रितु खोखर हे युट्युबर दाम्पत्य जानेवारी महिन्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते.
पाकिस्तानचे मुस्लिम जाट आणि भारताचे हिंदू जाट… काय आहे संबंध?
सिडनीतील आयटी व्यावसायिक पवन टोकस याने मार्च 2024 व मार्च 2025 मध्ये पाकिस्तानमधील मुलतानची यात्रा केली होती. टोकस दिल्लीतील एका गावातील मूळ निवासी आहे. त्याची बायको रितू सांगवान जी चॅनेल चालवते, ती हरियाणातील चरखी-दादरी मधील चंदेनी गावाशी संबंधीत आहे. टोकस सांगतो, “माझ्यासाठी पाकिस्तानात जाणं हे बंजी जंपिंग करणं, आगीवर चालण्यासारखंच एक साहस होतं. कारण तिथं जाणं हीच भारतीयांसाठी नवलाची गोष्ट असते.”
त्याच्या चॅनेलचं नाव ‘पवन टोकस व्लॉग’ आहे. त्यात नानकाना साहिब व अन्य ऐतिहासिक जागांचे व्हिडीयो आहेत. त्यात हरियाणवी भाषा बोलणारे समुदाय दिसतात. टोकस, पाकिस्तानातील मुस्लिम जाट लोकांनी आपली हरियाणवी संस्कृती जपली यामुळे प्रभावित झाला होता. तो सांगतो, “हरियाणातील युवा पिढी आता हिंदी बोलत आहे. पण पाकिस्तानात हरियाणवी बोलली जाते. तिथे अजूनही सर छोटू राम यांच्यासारख्या जाट नेत्यांचा आदर्श ठेवला जातो व त्यांच्या नावाची एक शाळाही मला बघायला मिळाली.”
एका फेसबुक पोस्टमध्ये टोकसने खलील अहमद जाट याच्यासोबत एक व्हिडीयो टाकला होता. यात बॅकग्राऊंडला गाणं वाजतंयः रहे चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहें दोस्ताना हमारा. व्हिडीयो आता काढून टाकला आहे. रोहतकच्या डॉक्टर ते व्लॉगर प्रवास केलेला नवांकुर चौधरी, ज्याची ‘यात्री डॉक्टर’ अशी ओळख आहे, त्यानंही पाकिस्तानातील जाट समुदायाशी जोडलं जाण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याला आपल्या पासपोर्टवर प्रत्येक देशाचा शिक्काही लावून घ्यायचा आहे. तो सांगतो, “पाकिस्तानात जाणारा मी एकटा नाही. तिथं 700-800 लोक गेले होते तेव्हा. भारतातून 500 लोक होते व बाकीच्या देशांमधून 50-60 राजकीय पुढारी आले होते. मी युट्यूबर आहे म्हणून लोकांचं माझ्यावर जास्त लक्ष असतं. पण दरवर्षी हजारो लोक पाकिस्तानात जातात. ज्यात हिंदू, शिख आहेत. मी एक अभिमानी भारतीय आहे, माझ्या घरचे सशस्त्र दलांत आहेत. कोणत्याही चौकशीला मी तयार आहे.”
भूतकाळाशी असलेलं एक नातं शोधण्याचा प्रयत्न
आपली स्थिती स्पष्ट करण्यासाठी टाकलेला हा व्हिडीयो त्यानं आता काढून टाकला आहे. हरियाणातील रोहतक, झज्जर, हिसार, बहादूरगढ या जाट प्रदेशांचा पाकिस्तानातील पंजाब प्रांताशी जवळचं नातं आहे जिथं फाळणीनंतर बहुसंख्य मुस्लिम जाट वसले होते. ते हरियाणवीशी मिळणाऱ्या बोलीभाषा बोलतात आणि हरियाणवी लोकसंस्कृती टिकवून ठेवत आहेत.
याच गोष्टी श्योराण, खोखर, सांगवान, टोकस यांच्यासारख्या युट्यूबर्ससाठी मेन कंटेंट आहे. त्यांतून पाकिस्तानी लोकांशी भावनिक बोलचाल दिसते, फाळणीच्या गोष्टी सांगितल्या जातात, ज्या त्यांच्या कौटुंबिक इतिहासापासून वेगळ्या नाहीत. टोकस याची एक आठवण सांगतात, “माझा मित्र जयबीर सिंह हरियाणातील गुडा गावचा आहे आणि सध्या अमेरिकेत राहतोय. मार्चमध्ये तो मुलतानला गेला होता.
तो जेव्हा तिथल्या आपल्या सलीम अली या यजमानांकडे गेला, तेव्हा गुडा गावातून पाकिस्तानात आलेले मोहम्मद अली त्याची वाट बघत होते तिथं. त्यांनी जयबीरला मिठी मारली आणि रडत म्हणाले की मागील ३५ वर्षांत ते पहिल्यांदाच गुडा गावातील कोणालातरी भेटत आहेत.” यातून या लोकांची ‘मूळ जमिनीची ओढ’ दिसून येते. यासाठीच अनेक लोक पाकिस्तानात जात असतात.
“हरियाणवी लोकही त्याला अपवाद नाहीत. फाळणीत पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून 70-80 लाख हिंदू व शिख हरियाणा, पंजाब व दिल्लीत येऊन वसले. तितकेच मुस्लिम पाकिस्तानात गेले. फाळणीमुळे सीमा बनली असली तरीही त्यांची एकत्रित संस्कृती आजही जीवंत आहे. हे युट्यूबर्स आपल्या भूतकाळाशी असलेलं एक जीवंत नातं शोधतात त्यामुळे एकाचवेळी त्यांचा कंटेंट व्यक्तिगत व सामुहिकही असतो,” असं ज्योती मिश्रा सांगतात. हा कंटेंट त्यामुळेच सांस्कृतिक गोष्टींवर जास्त असतो ज्यात पाकिस्तानचे बाजार, धार्मिक स्थळं, स्थानिक लोकांशी बोलणं यांचा समावेश जास्त असतो.

विकास श्योराण आणि रितु खोखर यांनी लाहोरच्या दयाल सिंह कॉलेजला भेट दिली.
‘’ज्योती मल्होत्रामुळे आता आमच्यावरही संशय’’
ज्योती मल्होत्राचा लाहोरवरचा व्हिडीयो लाखो वेळा पाहिला गेलाय कारण त्यात पाकिस्तानी जगण्याचं जिवंत चित्रण आलं आहे. इतरांच्या व्हिडीयोतही असाच जुन्या काळच्या गल्ल्यांमधल्या प्रवास व लोकांशी अनौपचारिक बोलणं असतं ज्यामुळे अनेकांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. पाकिस्तानात हरियाणा, पंजाब पाहिल्याचा भास होतो असं अनेकजण सांगतात. टोकस, पाकिस्तानातील ‘नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर हरियाणवी रेस्टिट्यूशन ऑफ आर्ट्स’ या संस्थेशी जोडलेले आहेत.
तो सांगतो की पाकिस्तानी शाळांमध्ये हरियाणवी संस्कृती व भाषा वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर हरियाणवी युट्यूबर्सवरून वाद उफाळला आहे- पाकिस्तानात जाणं व तिथले व्हिडियो तयार करणं भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे का यासंबंधीचा. टोकस सांगतो की केवळ युट्यूबर्स पाकिस्तानात जात नाहीत. “पूर्वीही लोकं पाकिस्तानात जायचे.
तिथंही पर्यटन स्थळं आहेत, अनेकजण आपल्या पूर्वजांच्या गावांना भेटी देण्यासाठी जातात. अटल बिहारी वाजपेयी देखील तिथं गेले होतेच ना? व्हिसाच्या अटी निवळल्या तर मोठ्या संख्येनं लोक दोन्ही देशांत येणं-जाणं करणारच आहेत.” पण या युट्यूबर्सना आता ऑनलाईन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमी होत आहे. नवांकुर चौधरीचे ज्योतिसोबतचे जुने फोटो समोर आले आहेत.
त्यामुळे त्याच्यावरही लोक संशय घेत आहेत. त्याचे वडील नवीन धनखड, जे रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत, सांगतात की त्यांच्या मुलाचा ज्योतिशी काही संबंध नाही. जो फोटो व्हायरल होत आहे तो एका समारंभातला आहे जिथे ज्योति स्वतः त्याची फॅन म्हणून त्याला भेटली होती. हरियाणा केंद्रीय विश्वविद्यालयातील कायद्याचे प्राध्यापक व माजी भारतीय वायू सैनिक असलेले राजेश मलिक सांगतात, “या यात्रांचा चुकीचा फायदा घेतला जाऊ शकतो.
युट्यूबर्स कळत नकळत संवेदनशील जागांची माहिती देऊ शकतात. ते दबावातही येऊ शकतात. विशेषतः तिथे जिथली भू-राजकीय परिस्थिती फार गुंतागूंतीची आहे. सांस्कृतिक शोध व सुरक्षेला धोका यांच्यातील सीमारेखा फार धुसर आहे त्यामुळे त्यांना सावध राहणं गरजेचं आहे.” 13 मे 2025 रोजी भारत सरकारने पाकिस्तान उच्च आयुक्तालयातील एका कर्मचाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली देश सोडण्यास सांगितलं होतं.
सांस्कृतिक उद्देश असला तरीही सीमेपलिकडे सुरक्षेचे धोके वाढतात हे सत्यच आहे. हरियाणा पोलिसांनी नवांकुर चौधरीच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. मिश्रा सांगतात, “हे युट्यूबर्स एक विभागलेली गोष्ट सांगत आहेत. पण त्यांना खूप सांभाळून काम करावं लागेल. यांच्या कामामुळे दोन्ही देशांतील अंतर कमी होऊ शकतं तसंच ते स्वतः संशयात सापडू शकतात- ते आपला कंटेंट कसा तयार करतात यावर हे अवलंबून आहे.”
सौजन्य - द प्रिंट
अनुवाद - प्रतिक पुरी






