- कैलाश म्हापदी
2002 हजार ते 2019 या वीस वर्षात भारतात 12 लाख लोकांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा राष्ट्रीय अवल अहवाल सांगतो. अद्यापि ‘वाइल्ड लाइफ ॲक्ट’मध्ये सापांचा उल्लेख नसला तरी देशभरात उपलब्ध झालेल्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे सापाने चावल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या आटोक्यात येत असताना जगणाऱ्यांचे प्रमाणही आता 99% सरकत असल्याची दिलासा देणारी बातमी यंदाच्या नागपंचमीनिमित्त हाती आली आहे.
ठाणे जिल्हा हा अर्थातच आशिया खंडातला सर्वाधिक सर्प बळींचा जिल्हा आहे. तो विषारी सापांचा गड आहे, जगातल्या एकूण सापांच्या जाती पैकी 99% जाती ह्या कोकणात सापडतात आणि कोकणातली प्रत्येक विषारी सापाची जात ही ठाणे जिल्ह्यात आहेच आहे. विशेषतः शहापूर, मुरबाड आणि भिवंडी हे तीन तालुके सापांच्या दहशतीखालचे आहेत .इथे आजही थोडी थोडी शेती शिल्लक असल्यामुळे व दाटी-वाटीचे क्षेत्र वनक्षेत्र असल्यामुळे येथे सापांची पैदास मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यांचे अधिवास आणि प्रजननाचा आकडा मोठा आहे. 2024- 25 या कॅलेंडर वर्षात ठाणे जिल्ह्यातल्या चौदा तालुक्यांमध्ये 1971 जणांना साप चावला होता, यातील बहुतांश सर्पदंश हे विषारीच होते मात्र मृत्यूचे प्रमाण हे केवळ १२ व्यक्ती असल्याचंही या अहवालात नमूद केले आहे. याचाच अर्थ जगणाऱ्यांचे प्रमाण हे 99.39 टक्क्यांवर पोहोचलेले दिसते.
तर यंदाच्या 2025 च्या एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात 492 जणांना सर्पदंश झाला होता, त्यातही मृत्यूचा आकडा केवळ एक दाखवला आहे. वेळेत सर्पदंशाच निदान न होणे, उडवाउडवीची नेणे, टाळाटाळ करणे, दवाखाने वस्तीपासून दूर अंतरावर असणे, काळोखातून नक्की कुठला साप चावला हे न कळल्याने अशी यामागची कारणे आहेत. सर्पदंशाबद्दलचे अज्ञान आणि झोळीत बसून हॉस्पिटलला जाण्याची दुर्गम वस्त्यांची नेहमीची शोकांतिका हे पाहता सदर मृत्यूंचे आकडे हॉस्पिटलच्या बाहेरचे असण्याची अधिक शक्यता आहे.
कोकणात सर्वाधिक सर्पबळी
देवगड तालुक्यात पार पडलेल्या एका सर्वेक्षणात कुडाळ, देवगड या तळ कोकणातल्या ग्रामीण दवाखान्यांमध्ये साप चावलेल्या 1140 रुग्णांना तपासण्यात आले होते. कोकण किनारपट्टीत आशिया खंडातील सर्वात जास्त सर्पबळी आहेत आणि त्यातही ठाणे जिल्हा अग्रेसर आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर, भिवंडी, खर्डी, उल्हासनगर आणि मुरबाड येथे जास्त प्रमाणात सर्पदंशावरील रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
नजीकच्या पाच वर्षात मात्र आजवरच्या सर्प बळींचा रिपोर्ट बदलला आहे, साप चावणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी वेळेत उपचार होऊन त्यातून वाचणाऱ्यांचे प्रमाण आता 99% पर्यंत पोहोचत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास पवार यांनी दिलेल्या माहिती अहवालात दिसते आहे.
अलीकडच्या वीस वर्षात ठाणे जिल्ह्यात शहरांची झालेली सुसाट वेगातली वाढ पाहता मोकळ्या जमिनींचे प्रमाण आता कमालीचे कमी झाले आहे. गेल्या वीस वर्षात पनवेल, नवी मुंबई, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, नेरळ, कल्याण, टिटवाळा, भाईंदर, ठाणे, डोंबिवली अगदी वाड्यापर्यंतचा ठाणे आणि पालघर मधला काल-परवाचा ग्रामीण भाग आता शहरी झाला आहे. प्रत्येक शहराने आता महाकाय रूप घेतले असून प्रत्येक शहराचे तीन-तीन चार-चार उपविभाग झाले आहेत. उपनगर मोठ्या नगरांचा आकार घेऊ लागले असून सतत रात्रंदिवस उभे राहत असलेले सिमेंट काँक्रीट जंगल, विविध रस्ते मार्ग, महामार्ग कॅरिडॉर समृद्धी सारखे महाकॅरिडॉर यांच्या उत्खननामुळे सापांच्या अधिवासाला मोठा फटका बसतोय.
संबंधित लेख वाचा: 1) साप चावल्याने भारतात दरवर्षी किती मृत्यू होतात माहितीये…? |
सापांचे अधिवास संपले... प्रजनन घटले…
पिढ्यानपिढ्या आपली टेरिटेरी निर्माण करून गंध सोडून त्यात वस्ती करून राहणाऱ्या सापांना मात्र त्यांचे अधिवास हरवल्याचे भयंकर परिणाम भोगावे लागत आहेत. बीळ नष्ट झाल्यामुळे आणि छोट्याशा पावसाच्या सरीने रस्ते पाण्याने भरत असल्यामुळे सापांची वहिवाट संपत चालली आहे. याचा फटका हा नाग आणि घोणस या जातींना बसला आहे शहरी भागात कांडर, मण्यार किंवा अजगर या जमाती यापूर्वीच कमी झाले आहेत, मात्र ठाणे- कल्याण सारख्या ऐतिहासिक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागांचे कुळ आजही अस्तित्वात आहेत.
ठाणे, कल्याण, भाईदर, भिवंडी आदी शहरांना शेत आणि खाडीचा वेढा होता. पाणथळ जमिनी होत्या त्यामुळे या सापांच्या जाती प्रजाती मोठ्या प्रमाणात होत्या, आता मात्र त्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर नष्ट झाला आहे त्यामुळे त्यांच्या परिणाम त्यांच्या प्रजननावरही दिसून येत आहे. 
पाच महिन्यांपैकी उन्हाळा ते पावसाळा असा 90 दिवसाचा काळ हा सापांच्या प्रजननासाठी ब्रीडिंग पिरियड म्हणून ओळखला जातो. तीन महिन्यानंतर साधारणतः सापांची पिल्लं आसपास रांगायला सुरुवात करतात, मात्र बांधकामांची जत्रा, रस्त्यांवरची वाहतूक, रोषणाई, आवाज प्रदूषण, दाटीवाटीचे क्षेत्र या हजार भानगडींमुळे त्यांचं प्रजननच संकटात आले आहे.
अनेक सापांच्या जाती प्रजनन सुलभ वयात येऊनही बदललेल्या आणि बुचकाळ्यात टाकणाऱ्या वातावरणामुळे त्यांचे प्रजनन पूर्वीप्रमाणे होत नसल्याचंही सर्पमित्रांचं म्हणणं आहे. जैव साखळीसाठी जसे कीटक, मुंग्या, बेडूक हे अतिशय गरजेचे आणि महत्त्वाचे आहेत तसेच सापदेखील महत्वाचे आहेत. तो नामशेष होऊ नये म्हणून प्राणी-पक्षी अभयारण्यांप्रमाणे सापांच्यादेखील काही जातींचं संगोपन करावे लागेल, असे जैवविविधतातज्ञ वारंवार सांगत आहेत.
ज्याप्रमाणे समुद्र शेतीत माशांचा 25 मे ते 25 ऑगस्ट हा 90 दिवसांचा कालावधी प्रजननाचा कालावधी म्हणून पिढ्यानपिढ्या पाळला जातो आणि मासेमारी बंद केली जाते त्याच पद्धतीने कासव आणि सर्प प्रजनन नोंदणीकृत व काळजीपूर्वक हाताळायला हवेत. विशेषत: सर्पआणि माशांच्या दोन वेगवेगळ्या जाती आहेत काही मासे अंडी घालतात तर अनेक मासे तोंडावाटे गर्भात तयार केलेले मासे पाण्यात सोडतात. सापांच्यादेखील अंडी घालणारे आणि प्रत्यक्षात शरीरातून पिल्लू बाहेर सोडणे अशा दोन जाती आहेत.
घोणससारखा साप प्रत्यक्षात सापाचे पिल्लू बाहेर सोडतो, मात्र मोठ्या प्रमाणावर इतर सर्व साप सर्व अंडी घालतात. ही अंडी घालणेच आता कष्टाचं काम झालं आहे. सुरक्षित अधिवास संपल्यामुळे अंडी घालण्याचे प्रमाण कमी झाले असून घातलेली अंडी नष्ट होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सापांचे जन्मदर घटले आहेत. बदलत्या शहरी अत्याचारांमध्ये या कीटकांचा जीव जाऊ नये यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्नशील आहेत.
सर्पदंशाने मृत्युमुखी पडणाऱ्यांना नुकसान भरपाईसाठी टाळाटाळ का?
बिबट्या, हत्ती, अस्वल यासारख्या वन्यप्रण्यांनी हल्ला केल्यास अथवा मृत्यू ओढावल्यास नुकसान भरपाई मिळते मग हजारोंच्या संख्येने सर्पदंशाने मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांना नुकसान भरपाई टाळाटाळ का करीत आहात, असा सवाल ग्रामीण भागातील नागरिक विचारत आहेत. माणसाच्या निष्काळपणामुळेच सर्पदंश होतात, अशी टीका करणाऱ्यांनीच काही दिवस येऊन शेतात काम करून बघा, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी सर्वेक्षणात व्यक्त केली आहे.
गरीब कुटुंबातील एखाद्या कमावत्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास खर्च परवडत नाही, म्हणून त्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघत राहणारी कुटुंबांचे दुःख कधी कळणार, अशी भावना व्यक्त करतानाच सापांना इतर वन्यप्राण्यांसारखे ‘ग्लॅमर’ नाही, म्हणून नुकसान भरपाईची आमची मागणी दुर्लक्षित राहिली आहे, असेही मत नागरिकांनी सर्वेक्षणात नोंदवले आहे.
सर्पदंश हा ‘वन्यप्राण्याचा हल्ला’ या सदरात मोडतो कारण साप हा वन्यजीव आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये सर्पदंशावर उपचार मोफत असले, तरी औषधे आणि यंत्रणाच उपलब्ध नसल्याने बहुतांश नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्येच उपाचर घेण्याची वेळ येते. या रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करून प्रचंड पैसे मोजावे लागतात. कित्येकदा सर्पबाधा झालेला हात अथवा पायही कापावा लागतो. या उपचारांचा खर्च अनेक घटनांमध्ये लाख रुपयांच्या घरात जातो. तरीही सर्पदंश हे माणसाच्या निष्काळजीपणामुळेच होतात, असे आरोप अभ्यासक करीत आहेत.
खेड्यांमध्ये पहाटे मिणमिणत्या प्रकाशात चूल पेटवण्यासाठी लाकूड काढणाऱ्या महिलेने हातात जाड हातमोजे घालायचे का, शेतात काम करताना रबरी मोजे घालून काम करायचे का किंवा सर्पदंश होतो म्हणून जमिनीवर न झोपता बाजेवर झोपायचे का, असा सवाल नागरिकांनी मुलाखतीदरम्यान उपस्थित केले आहेत.






