- प्रा.अपूर्वानंद
आपण भारतातील अनेक ठिकाणी पोलिस आणि हिंदुत्ववादी जमाव यांना एकाच पद्धतीने काम करताना पाहिले आहे, विशेषतः मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या बाबतीत. पण जेव्हा न्यायालये देखील हिंदुत्ववादी राष्ट्रवाद्यांसारखे तर्क करू लागतात, तेव्हा सावध होणे आवश्यक आहे आता पाणी डोक्यावरून वाहू लागले आहे. मुंबई आणि दिल्लीतील दोन घटनांमधून हा इशारा मिळाला आहे.
एक घटना मुंबई उच्च न्यायालयाच्या टिप्पणीशी संबंधित आहे आणि दुसरी दिल्लीतील नेहरू प्लेसमधील जमावाची प्रतिक्रिया. दोन्हींचा संदर्भ गाझामध्ये इस्रायलकडून होणाऱ्या नरसंहाराशी आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा खटला आणि दिल्लीतील नेहरू प्लेस यांच्यात काय साम्य आहे?
‘पॅलेस्टिनींच्या नरसंहाराविरुद्ध भारतात आवाज का उठवायचा? आपल्याकडे आपल्याच इतक्या समस्या आहेत!’ 
हे कुणी रस्त्यावरून जाणारी व्यक्ती बोलत नाहीये, तर मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (मार्क्सवादी) अशा कानपिचक्या दिल्यात. जेव्हा त्यांनी गाझामधील इस्रायलच्या नरसंहाराविरुद्ध निदर्शनासाठी परवानगी मागितली होती. पोलिसांनी या निदर्शनाला परवानगी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर सीपीआय (एम) ने न्यायालयात परवानगी मागितली होती. न्यायालयाने परवानगी देणे तर दूरच, उलट याचिकाकर्त्यांना ‘देशभक्त’ बनण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी आपल्या देशातील समस्यांवर लक्ष केंद्रित करावे, गाझामध्ये इतक्या दूर काय घडत आहे याच्याशी त्यांचा का संबंध असावा? असे विचारले.
देशभक्ती आणि पॅलेस्टिनींसाठी एकजुटीत विरोध का असावा, असा प्रश्न न्यायालयाला विचारता येईल.
‘देशभक्त व्हा!’ या आदेशाचा अर्थ असा आहे का की इतरांच्या दुःख,वेदनेशी कसलाही संबंध ठेवू नये आणि स्वार्थी बनावे? देशभक्ती आपल्याला आत्मकेंद्रित होण्यास आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे डोळे-कान बंद करण्यास शिकवते का? देशभक्तीच्या जितक्या परिभाषा जगभरातील महान तत्त्वज्ञांनी केल्या आहेत, त्यात संकुचितपणाला कुठेही थारा नाही. ती वेगळेपणाची नाही. पॅलेस्टाईन हा शब्द विशेष काही आहे का जो देशभक्त कानांना खटकतो?
संबंधित लेख वाचा: 1) कोण आहेत बी. एन. राव, ज्यांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ ठरवण्याचा अजेंडा काही हिंदुत्ववाद्यांनी सुरू केलाय…? |
काही जण म्हणू शकतात की ही न्यायाधीशांची केवळ स्वयंस्फूर्त प्रतिक्रिया होती आणि त्यांनी आपल्या आदेशात हे नमूद केले नाही.आमच्यासाठी चिंतेची बाब ही स्वयंस्फूर्तता आहे. कोणालाही देशभक्त होण्याचा सल्ला देण्याचा अधिकार आहे, हीच गोष्ट चिंतेची आहे. पण त्यापुढे चिंतेची बाब अशी आहे की न्यायमूर्ती म्हणतात की. देशभक्त होण्यासाठी इतरांबद्दल सहानुभूती दाखवू नये.
सीपीआयएमकृत याचिकेला नाकारताना न्यायालयाने म्हटले, ‘आपल्या देशात अनेक समस्या आहेत.… मला हे सांगताना दुःख होते की तुम्ही अदूरदर्शी आहात. तुम्ही गाझा आणि पॅलेस्टाईनकडे पाहता पण इथल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. तुम्ही आपल्या देशासाठी काही का करत नाही? आपला देश पाहा. देशभक्त व्हा. लोक म्हणतात की ते देशभक्त आहेत, पण ही देशभक्ती नाही. आधी आपल्या देशातील नागरिकांकरिता देशभक्ती दाखवा.’
न्यायालयाने असेही म्हटले की पक्षाने आधी कचरा, प्रदूषण, गटारे यांसारख्या समस्यांवर निदर्शने करावीत. त्यांनी हेही सांगितले की बाहेर काय घडत आहे, हा परराष्ट्र खात्याकडचा विषय आहे आणि ते सरकारवर सोपवावे.
टीकाकारांनी बरोबरच म्हटले आहे की, न्यायालये संवैधानिक अधिकार विसरुन गेल्यासारखे वाटते. भारतातील लोकांना आपले विचार मांडण्याचा आणि व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोक आपला हा अधिकार सरकारकडे गहाण ठेवू शकत नाहीत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्याविषयीच्या सरकारी धोरणाला विरोध करण्याचा अधिकार भारतातील लोकांना आहे आणि त्यांचा तो अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही.
मुंबईतील न्यायालय जे बोलत होते, तेच दिल्लीतील नेहरू प्लेसमधील जमाव बोलत होता. सुमारे तीस लोक नेहरू प्लेसमधील पॅलेस्टिनींच्या नरसंहाराविरुद्ध निदर्शनासाठी एकत्र आले होते. त्यांच्या हातात पॅलेस्टिनी झेंडे होते. ते एकत्र होताच, आजूबाजूच्या दुकानांमधून काही लोक बाहेर आले आणि त्यांनी पॅलेस्टिनी झेंडे हिसकावून फाडले. ‘आपल्या देशाचा झेंडा कुठे आहे?’ असे त्यांनी निदर्शकांना विचारले.
या जमावाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रश्नापेक्षा वेगळा नव्हता. ‘आपल्या देशाचा झेंडा दाखवा, दुसऱ्या देशाचा झेंडा का फडकावता?’ हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘देशभक्त व्हा! हजारो मैल दूर दुसऱ्या देशाचा मुद्दा का घेता?’ या टिप्पणीपेक्षा वेगळा नाही.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मते सीपीआयएमने कचरा, बेरोजगारी, प्रदूषण यांवर बोलावे. नेहरू प्लेसमधील जमावाच्या मते निदर्शकांनी बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवर बोलावे. दोन्हींमध्ये कोणताही मूलभूत फरक नाही.
न्यायालय आणि रस्त्यावरील भेद मिटणे ही एक चिंतेची बाब आहे.पण दुसरी मोठी चिंता अशी की नव्या देशभक्त किंवा राष्ट्रवादी स्वयंस्फूर्ततेचा जन्म! नेहरू प्लेसमधील जमाव संघटित नव्हता. ते लोक बजरंग दल किंवा आरेसेसचे सदस्य असतीलच असे नाही. पण ते पॅलेस्टाईनचा झेंडा पाहताच भडकले. ज्याप्रमाणे न्यायालयाने गाझाविषयी सहानुभूतीची चर्चा ऐकताच संताप व्यक्त केला.
या दोन्ही प्रतिक्रिया सुनियोजीत किंवा संघटित नव्हत्या. या प्रतिक्रिया काहीशा इस्रायली प्रतिक्रियांप्रमाणे आहेत. न्यूयॉर्क असो वा लंडन, रस्त्यावर कोणाच्या गळ्यात पॅलेस्टिनी रुमाल दिसताच इस्रायली लोक त्यांच्यावर तुटून पडतात. भारतातही एक असा मोठा वर्ग तयार झाला आहे जो कफिया किंवा पॅलेस्टिनी झेंडा पाहताच हिंसक होतो. तो नेहरू प्लेसमध्ये कोणत्याही प्रयत्नाशिवाय किंवा आवाहनाशिवाय एकत्र आला. तो जमाव निदर्शकांना तिरंगा दाखवण्यास सांगत होता, ज्याप्रमाणे न्यायालय सीपीआयएमला देशभक्त होण्यास सांगत होते.
या स्वयंस्फूर्ततेला हिंदुत्ववादी स्वयंस्फूर्तता म्हणणे चुकीचे ठरेल का? पॅलेस्टाईनचा झेंडा असो, हिरवा झेंडा असो, बुरखा असो वा गोल टोपी, हे पाहताच किंवा अजान ऐकताच कोणी भडकले तर त्याला स्वाभाविक म्हणावे का? नेहरू प्लेसमध्ये पॅलेस्टिनी झेंड्यामुळे ही प्रतिक्रिया उमटली.
पुण्यात 2014 मध्ये मोहसीन शेख याच्या वेशभूषेमुळे काही लोक भडकले आणि त्यांनी त्याची हत्या केली. न्यायालय मारेकर्यांविषयी सहानुभूती राखून होते कारण त्यांची प्रतिक्रिया, ज्यामुळे मोहसीन शेख यांची हत्या झाली, ती स्वयंस्फूर्त होती. त्यामागे कोणतीही योजना नव्हती. 2014 पासून 2025 पर्यंत या हिंदुत्ववादी स्वयंस्फूर्ततेचा विस्तार खूप वाढला आहे. काही विशिष्ट आवाज, रंग, इमारती, वेशभूषा यांमुळे एक विशिष्ट प्रकारची हिंसक प्रतिक्रिया होते. आता त्या प्रतिक्रिया देणाऱ्यांवर कसलेही नियंत्रण राहिले नाही.
ही हिंदूंच्या मोठ्या वर्गाच्या संवेदन तंत्राच्या संकुचित होण्याची सूचना आहे. आणि ही हिंदूंसाठी वाईट बातमी आहे. कारण मानवी संवेदना इतर प्राण्यांपेक्षा भिन्न आणि परिष्कृत आहे याच अर्थाने की ते आपल्या शारीरिक आणि जैविक मर्यादांचे उल्लंघन करते. मानवी संवेदना मानवी का आहे? ते केवळ स्वतःच्या शरीराला जखमेमुळे दुखावत नाही, तर दुसऱ्याच्या जखमेमुळेही हळहळते. व्हिएतनाममधील नापाल्म बॉम्बने जळत पळणाऱ्या मुलीच्या चित्राने आपण सगळे विचलित झालो. यासाठी व्हिएतनामी असण्याची अट नव्हती. मानवी संवेदन तंत्रात आपल्या शारीरिक मर्यादांचे अतिक्रमण करण्याची क्षमता आहे. ती नंतर सहानुभूतीपर्यंत जाते.
आपण फक्त रामधारी सिंह दिनकर यांची कविता वाचून प्रभावित होत नाही, तर महमूद दरवेश यांची कविता वाचूनही हवालदिल होतो. भारतातील हिंदूंचा एक भाग आता सहानुभूतीची क्षमता गमावत चाललाय. भुकेने तडफडणारी मुले किंवा बॉम्बस्फोटाने उद्ध्वस्त झालेला गाझा पाहून तो विचलित होत नाही, तर तो फिदी फिदी हसतो. अशा हसण्याने कोणता मनुष्य घाबरणार नाही? हे हसणे त्या समाजाच्या अमानवीकरणाची खूण आहे.
(या लेखात व्यक्त करण्यात आलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. लेखक दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. )
मूळ हिंदी लेख - द वायर, मराठी अनुवादः भरत यादव






