- दासू भगत
माणसाने हळवे वा भाविनक असावे पण भावनेच्या पूरात वाहून जाऊ नये. संवेदनशील असणे हे मानवतेच्या मूल्यांपैकी एक मूल्य मात्र कधी कधी अती संवेदनशलता टोकाच्या भावनेत बदलते. जर ती व्यक्ती साहित्य,कला,विचारवंत असेल तर त्यांच्या लेखनातून विचारातून वा कलाकृतीतून हे सर्व झिरपत राहते. 1957 मध्ये प्रदर्शीत झालेल्या एका चित्रपटाची सुरूवात अशी आहे- ‘नायक एका बागेत झाडा खाली पहूडलेला आहे. त्याची नजर आकाशावर. आकाशात ढगांचे पांढरे पुजंके तर कधी पखं पसरून उडणाऱ्या घारी तो बघतोय. मग बागेतल्याच एका फुलावर त्याची नजर जाते ज्याच्यावर एक भूंगा घिरट्या घालतोय.
अचानक तो भूंगा जमिनीवर बसतो आणि त्यावर कुणाचा तरी बूट घातलेला पाय पडतो…… नायक एक क्षण त्या भूंग्याकडे बघतो आकाशाकडे एक कटाक्ष टाकतो आणि उठतो’…. आकाश हा आपल्या स्वप्नांच कॅनव्हासच असतो. तर आकाशात उंच विहरणारे पक्षी म्हणजे आपली स्वप्ने……..दिग्दर्शकाने या एकाच दृष्यातून चित्रपट खूप उंचावर नेऊन ठेवला. नायक आणि त्यांच्या स्वपनांचे पूढे नेमके काय होणार आहे हे या 2 मिनीटांच्या प्रसंगातून अत्यंत समर्पकपणे मांडणारा संवेदनशिल दिग्दर्शक अभिनेता म्हणजे गुरूदत्त. 
वसंतकुमार शिवशंकर पादुकोण झाला ‘गुरुदत्त’…
“प्यासा” मधील या पहिल्याच दृष्याने त्यावेळी सर्वांची मने जिंकून घेतली. लहानपणी आजी समईच्या प्रकाशात जेव्हा आरती म्हणत असे तेव्हा किशोरवयीन गुरूदत्त आरती समोर आपली बोटे नाचवून विविध मुद्रांची सावली भिंतीवर बघत बसत. यातून पूढे नृत्याची आवड निर्माण झाली. एकदा कोलकोत्ता येथे प्रख्यात सतार वादक रवी शंकर यांचे बंधू प्रख्यात नर्तक उदय शंकर यांच्याशी त्यांची गाठ पडली. दोघांनाही ऐकमेकांचे स्वभाव खूपच आवडले व गुरूदत्तने उदय शंकर यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवायला सुरूवात केली. बंगाली संस्कृतीचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर पडला आणि याच ठिकाणी त्यांनी आपले खरे नाव वसन्त कुमार शिवशंकर पादुकोण एवजी गुरूदत्त वापरायला सुरूवात केली. मग येथेच त्यांचा चित्रपट माध्यमाशी परीचय झाला.
पुढे ते पूणे येथील “प्रभात” या मान्यवर कंपनीत दाखल झाले. येथे ते नृत्य दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक व अभिनेते असे सर्वच कामे करत. येथेच त्यांना देव आनंद सारखा मित्र मिळाला. दोघांची मैत्री एकदम घट्ट झाली. दोघांमध्ये एक करार पण झाला तो असा –की जर देव निर्माता झाला तर दिग्दर्शक म्हणून गुरूदत्तला घेणार आणि गुरूदत्त निर्माता झाला तर नायक म्हणून देव आनंदला घेणार. आणि दोघांनीही आपापले वचन पाळले. गुरूदत्तच्या “सीआयडी” चित्रपटात देव आनंद मूख्य भूमिकेत होता तर देव आनंदच्या “बाजी” चित्रपटाचा दिग्दर्शक गुरूदत्त होता.
संबंधित लेख वाचा: 1) धार्मिक बंधनाखाली असूनही इराणमध्ये जगावर प्रभाव पाडणारे चित्रपट कसे निर्माण होतात…? |
चित्रपट आणि आयुष्यातील वास्तव जीवन यात कमालीचे साम्य
चित्रपटातील गाणे उत्कृष्टपणे कसे चित्रीत करावे यासाठी प्रसिद्ध असणारे दोन नावे म्हणजे विजय आनंद आणि गुरूदत्त. प्यासा मधील जाने वो कैसे लोग थे जिनको….. हे गाणे जर बारकाईने न्याहळले तर झूम इन आणि झूम आऊट या तंत्राचा अत्यंत प्रभावी वापर यात केलेला आहे. गाण्याच्या ओळीनुसार जेव्हा जेव्हा नायक तिच्याकडे कटाक्ष टाकतो तेव्हा तेव्हा फ्रेममधील नायिका हळूहळू फ्रेममधून लांब जाताना दिसते. शरीराने ती नजरेच्या टप्पयात आहे पण हृदया पासून दूर होत जातेय….. झूम इन आणि आऊट याचा अत्यंत सूरेख वापर सिनेमाटोग्राफर व्ही.के.मूर्ती यांनी केला आहे. मूर्ती आणि गुरूदत्त यांची नाळ अप्रतिम जुळलेली होती.
गुरूदत्त यांच्या मनातील सर्व संवेदना जणू काही मूर्ती यांच्या दृष्टीला दिसत असाव्यात इतक्या उत्कटपणे ते चित्रण करीत असत. गुरूदत्त यांनीच त्यानां स्वतंत्रपणे छायाचित्रण दिग्दर्शनाची पहिली संधी दिली आणि मग ते शेवट पर्यंत एकत्रच राहिले. गुरूदत्त खूपच कल्पक होते. पण त्यापेक्षा अधिक भावनाशील होते. “प्यासा” ही कवीची शेकांतिका तर “कागज के फूल” ही चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकाची शोकांतिका जी त्यांच्याही आयुष्यात सत्यात उतरली. 1959 मधील ‘कागज के फूल’ची चित्रपट कथा आणि त्यांच्या आयुष्यातील वास्तव जीवन यात कमालीचे साम्य रहिले.
जागतिक 100 क्लासिक चित्रपटात “प्यासा” आणि “साहब बीबी और गुलाम”चा समावेश
1944 ते 1964 या कालावधीत चाँद, लख्खा रानी, हम एक है, बाज, आरपार, मि. अण्ड मिसेस 55, प्यास, 12 ओ क्लॉक, कागज के फूल, चौदहवी का चाँद, सौतेला भाई, साहब बीबी और गुलाम, भरोसा, बहूराणी, सुहागन आणि साँज और सवेरा अशा अवघ्या 16 चित्रपटातुन त्यांनी अभिनय केला. पैकी फक्त 9 चित्रपटात ते प्रमूख नायक होते. तर बाजी, जाल, बाज, आरपार, मि. अण्ड मिसेस ५५, सैलाब, प्यासा आणि कागज के फूल अशा फक्त 8 चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. पण तरीही भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत महत्वाचा दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. परदेशातही त्यांचे नाव आदराने घेतले जाई. भारताचा “ऑर्सन वेल्स”( हे एक प्रतिभावान अमेरिकन अभिनेते, दिग्दर्शक, लेखक व निर्माते होते) अशीही त्यांची एक ओळख होती.
सहदिग्दर्शक अब्रारार अल्वी आणि जॉनी वॉकर हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र. मला नेहमी असे वाटते की इतरानां खळखळून हासविणारे कलावंत अत्यंत संवेदनशील असतात. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा सूड म्हणून की काय ते अवघ्या जगाला हसवतात. “तुम्ही माझी जितकी हेटाळणी कराल जितक्या वेदना द्याल त्या तुम्हाला मी परत करेन. तुम्ही दिलेल्या वेदनेने जसे माझ्या डोळ्याचे डोह भरतात तसेच हास्याच्या धबधब्यामुळे तुमच्याही डोळ्यातून पूर यायला हवा” अशी काही योजना बहूदा या हास्य कलावंताची असावी. गुरूदत्त आणि जॉनी वॉकर यांच्या अजोड मैत्रीचा हाच पाया असावा.
गुरूदत्त नायक असणारे चित्रपटाची यादी बघितली तर असे लक्षात येते की त्यांचे कमर्शिअल चित्रपट चांगलेच चालले आणि कलात्मक म्हणून गौरविले गेलेल्या चित्रपटांची जागतिक स्तरावर दखलही घेतली गेली. जागतिक 100 क्लासिक चित्रपटात त्यांच्या “प्यासा” आणि “साहब बीबी और गुलाम”चा अतंर्भाव आहे. म्हणजे ते यशस्वी कलावंत आणि दिग्दर्शक होते. मग असे का घडले असावे की त्यानां आपल्या आयुष्याला पूर्ण विराम द्यावासा वाटला.? अत्यंत भरात आलेली कारकिर्द एका झोताने भिरकावली का गेली? असे म्हणतात की प्रेमातली विफलता आणि आयुष्याचे वास्तव हे कलावंताचे दोन महाभयंकर शत्रू असतात. 
गुरुदत्त, गीता दत्त आणि वहिदा रेहमान… प्रेमाचा त्रिकोण
1951 मध्ये देवानंद बंधूच्या नवकेतन या संस्थेचा चित्रपट “बाजी”चे काम सुरू झाले. चित्रपटाचे सगीतकार एस. डी. बर्मन यांनी गायिका गीता रॉय कडून सहा गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचा दिग्दर्शक होते गुरूदत्त. गाणी रेकॉर्ड होत असताना गुरूदत्त गीताच्या आवाजाच्या आणि नंतर हळूहळू तिच्याच प्रेमात पडला. नंतर गीता रॉय पण त्यांच्या प्रेमात पडली. नंतर दोघांनी लग्न केले गीता रॉय त्यांची पत्नी गीता दत्त झाली.
अनेकजण गुरूदत्त यांच्या आत्महत्येला वहिदा रहमान या अभिनेत्रीला जबाबदार धरतात पण ते खरे वाटत नाही. वहिदा रहमान त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वीच त्यांचा प्रेम विवाह झाला होता व ते गीता दत्तवर मनापासून प्रेम करत. पण एकाच क्षेत्रातील दोन यशस्वी व्यक्ती जेव्हा पती पत्नी म्हणून एकत्र राहू लागतात तेव्हा बहूतेक वेळा इगोचे प्रश्न निर्माण होतात. या समस्येवरील अत्यंत सुंदर चित्रपट म्हणजे हृषिकेश मुखर्जी यांचा अमिताभ-जया अभिनीत “अभिमान” हा चित्रपट होय.
योगायोग म्हणजे गुरूदत्त यांचा शेवटचा चित्रपट “साँझ और सवेरा” हृषिदानीच दिग्दर्शित केला होता. गुरूदत्त यानां वाटायचे की गीता दत्त यांनी त्यांच्या चित्रपटा शिवाय इतरत्र गाऊ नये. बहूदा हाच मूद्दा वादाचा झाला असावा आणि ते ऐकमेकांपासून दूरावत गेले. अशा काळात नेमकी वहिदा रेहमान त्यांच्या आयुष्यात आली आणि पूढे मग हे सर्व घडले असावे. स्वत: वहिदाजीनां हे माहित होते की गुरूदत्त विवाहित आणि मुलांचे पिता आहेत. त्यांचा संसार विस्कटू नये म्हणून खरे तर त्या गुरूदत्त पासून लांब गेल्या असाव्यात. असो…..
गुरूदत्त आणि गीता दत्त यांना तरूण, अरूण आणि नीना ही तिन मुलं. गुरूदत्त आणि गीता दत्त यांच्या निधना नंतर या मुलांचा साभांळ गुरूदत्तचे बंधू आत्माराम आणि गीता दत्तचे बंधू मुकूल रॉय यांनी केला. आत्माराम हे देखिल चित्रपटसृष्टीत निर्माते दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. शिकार, चंदा और बिजली, उमंग,मेमसाहब, आरोप, रेशम की डोरी या सारखे यशस्वी त्यांनी केले मात्र गुरूदत्त यांच्या प्रतिभेच्या जवळपासही फिरकू शकले नाही. गुरूदत्त यांचा मोठा मुलगा तरूण दत्त यांनी 1984 मधील रेखा अभिनत “बिंदीया चमकेगी” हा चित्रपट दिग्दर्शीत केला होता.
दुसरा मुलगा अरूण दत्त यानां “साहब बीबी और गुलाम” चा रिमेक करायची इच्छा होती पण हे दोन्ही मुले आता हयात नाहीत. दुर्देवाने अरूण यांचा मृत्यू देखिल आत्महत्याच होता. गुरूदत्तची गादी ते चालवू शकले असते पण तेही दारूच्या आहारी गेले होते. प्रसिद्ध दिग्दर्शीका कल्पना लाजमी या गुरूदत्त यांची बहीण ललिता लाजमी यांच्या कन्या. ललिता लाजमी या प्रसिद्ध चित्रकार आहेत. अमीर खान यांचा प्रसिद्ध चित्रपट “तारे जमीन पर” यामध्ये त्या पाहूणे कलाकार म्हणून दिसल्या. दिपीका पडूकोण या गुरूदत्तच्या दूरच्या नातेवाईक आहेत. 
दारू, झोपेच्या गोळ्या अन् वयाच्या 39व्या वर्षी आलेले मरण
चित्रपट करतानां अत्यंत शिस्त बाळगणारे गुरूदत्त खाजगी जीवनात मात्र अत्यंत बेशिस्त होते. प्रचंड धूम्रपान आणि दारू यांचे व्यसन ही लागले. आपल्या खाजगी समस्ये बद्दल मात्र ते कोणालाच काहीच सांगत नसत अगदी जवळचे मित्र जॉनी वॉकर आणि अबरार अल्वी यांना देखिल. गुरदत्तच्या मृत्यू नंतर दूर्देवाने गीता दत्त यांनाही दारूचे व्यसन लागले त्यांचे निधन देखील वयाच्या 41 व्या वर्षीच झाले.
चित्रपटातला हळवा गुरूदत्त आणि वास्तवातला संवेदनशील गुरूदत्त् सारखेच निघाले. हे खरे आहे की वहिदा रहमान या अभिनेत्रीचे त्यांच्या पासून दूर जाणे ही त्यांच्या आयुष्यातली फार मोठी भळभळणारी जखम ठरली. 10 ऑक्टोबर 1964 च्या सकाळी गुरूदत्त मृत अवस्थेत आढळले. डॉक्टरांच्या अहवाला नुसार अती मद्यसेवन आणि अती झोपेच्या गोळ्या त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या. मृत्यूच्या वेळी ते अवघे 39 वर्षांचे होते “कागज के फूल” चा शेवटही असाच होता.






