- संजना खंडारे, गडचिरोली
"ब्रेन मलेरियाने माझा मुलगा अन् नवरा बी मेला, दोघे बी पोलीस होते. मुलगा जंगलात पेट्रोलिंग करायचा त्यातच त्याला ताप आला. हफ्ता भर त्याचा ताप गेलाच नाही. सरकारी दवाखान्यात जाऊन रक्त-लघवी चेक केली तर मलेरिया निगेटिव्ह दाखवलं. पोरानं घरीच गोळ्या घेऊन आराम केला. किती दिवस घरी राहू म्हणून ड्युटी वर गेला तर तिथेच चक्कर येऊन पडला. त्याला आलापल्लीला नेलं दवाखान्यात तर तो बेडवरनं खाली पडला. त्याला चंद्रपूरला नेल्यावर डॉक्टरनं सांगितलं, ब्रेन मलेरिया झाला अन् तो बेड वरून पडल्यामुळे कोमात गेला. लय पैशांची जुळवाजुळव करून कर्ज घेऊन वाचवायचा प्रयत्न केला पण, मलेरियामुळं नाय राह्यला जिवंत."
पार्वती जगन्नाथ मडावी यांची ही कहाणी… पार्वती महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा अहेरी भागात राहते. ‘माडिया’ या आदिवासी समुदायातून येणाऱ्या पार्वतीचे पती जगन्नाथ मडावी आणि मुलगा महेश मडावी या दोघांचाही मृत्यू ब्रेन मलेरियामुळे (Cerebral malaria) झाला. पार्वती यांचे पती आणि मुलगा दोघेही पोलीस होते. जगन्नाथ मडावी यांचा मृत्यू 2018 मध्ये ब्रेन मलेरियामुळे झाला. त्यांच्या जागेवरच जगन्नाथ यांचा मुलगा नोकरीला लागला होता. मात्र ब्रेन मलेरियामुळे पुढे 2021 मध्ये त्याचाही मृत्यू झाला.
पार्वती यांच्या घरातले दोन कर्ता पुरुष गेल्यामुळे दोन्ही मुलांना शिकवण्याची आणि सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांना स्वतःची शेती नाही. नवऱ्याच्या मिळणाऱ्या पेन्शनवर त्यांनी त्यांच्या दोन मुलांना मोठं केलं. त्यांचा एक मुलगा पोलीस भरतीसाठी तयारी करत आहे तर, एक मुलगा पुण्यामध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. कमी वयात नवऱ्याची साथ सुटणं, वयात आलेल्या 28 वर्षाच्या मुलाला गमावणं हे दुःख अजूनही पार्वती मडावी यांना पचवता येत नाही. 
(पार्वती मडावी यांच्या घरातील फोटो..)
अहेरी तालुक्यात मलेरियामुळे मृत्यृ झाल्याच्या या दोन घटनांव्यतिरिक्त आणखीही काही घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे अवघे साडे तीन वर्ष आणि सहा वर्ष वय असलेल्या दोन चिमुकल्यांचा बाजीराव वेलादी आणि दिनेश वेलादी या भावंडांचा सप्टेंबर 2024 ला दोन तासांच्या अंतराने मलेरियामुळे मृत्यू झाला. रमेश वेलादी यांच्या मुलांनी एकापाठोपाठ एक जीव सोडल्यानंतर सैरभैर झालेल्या जन्मदात्यांनी जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं होतं.
मात्र, पत्तीगाव येथील मोठ्या रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध करून देण्यात आली नाही. रुग्णवाहिका नसल्याकारणाने या दोन चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावर घेऊन रमेश वेलादी यांनी 15 किलोमीटर पायपीट केली. रुग्णवाहिका नसल्याने या दाम्पत्यास चिखल, नाल्यातून 15 किलोमीटर पायपीट करावी लागली. सरकारच्या अपुऱ्या सोयीमुळे आणि मलेरियाचे लवकर निदान न झाल्याने दोन चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले.
महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मलेरिया-डेंग्यूचे रुग्ण गडचिरोली भागात सापडतात. गडचिरोलीत कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले नसतील तेवढे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि हिवतापमुळे झाले आहेत. वरील दोन घटना तर फक्त त्याचे प्रातिनिधिक उदाहरणं आहेत.
युएनडीपीने (संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम) प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात 2022 मध्ये 24.9 कोटी लोकांना मलेरियाची बाधा झाली. तसेच 6 लाख 8,000 लोकं मलेरियामुळे मृत्युमुखी पडले. 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 7 ऑगस्ट 2024 पर्यंत डेंग्यूचे 6751 रुग्ण, हिवतापाचे 8730 तर चिकनगुनियाचे 1515 रुग्ण आढळून आले आहेत. हिवतापाच्या एकूण रुग्णांपैकी गडचिरोलीत एकूण 3557 रुग्ण आहेत. महाराष्ट्रात एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण गडचिरोली भागात आढळतात.
संबंधित लेख वाचा: 1) हवामान बदल : जगात डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होण्याचं कारण काय? |
मलेरिया म्हणजे काय? कशामुळे होतो?
या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासाचे नाव आहे ॲनोफेलीस. जगामध्ये या डासाच्या 532 प्रजाती आहेत. त्यांपैकी भारतामध्ये एकूण 62 प्रजाती आढळून येतात. त्या 62 प्रजातींपैकी नऊ प्रजाती या मलेरियाच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. महाराष्ट्रामध्ये ॲनोफिलिस या डासाच्या तीन प्रजातींपासून मलेरिया पसरतो. हा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. या डासाच्या पंखावर पांढरे ठिपके असतात. रात्री किंवा पहाटे हे डास चावतात. थंडी वाजून ताप येणे, तो 24 किंवा 48 किंवा 72 तासांनी परत येणे, फक्त थंडी वाजणे, डोकेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, त्वचा कोरडी पडणे, घाम येऊन ताप उतरणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
तापमान बदलाचा मलेरियाशी काय संबंध आहे?
सध्या जगाला सर्वाधिक धोका आहे हवामान बदलाचा. हवामान बदलामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून त्यामुळे विविध विकारांचाही प्रादुर्भाव वाढत आहे. मलेरियाचा प्रादुर्भाव वाढण्यासही हवामानातील बदल कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती अहवाल आता अनेक संशोधकांनी प्रसिद्ध केले आहेत.
तापमान बदलामुळे जगभरात ऋतुचक्रात अनेक बदल घडत आहेत. तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमान यातील मोठ्या चढउतारांमुळे हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या ॲनाफिलस डासांच्या जीवनचक्रावर मोठा परिणाम होत आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होऊन हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक हिवताप अहवालातून हे सत्य समोर आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने वार्षिक हिवताप अहवाल जाहीर केला आहे. त्यात प्रामुख्याने तापमान बदलामुळे हिवतापाच्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार, मागील वर्षी जगभरात 2 कोटी 49 लाख जणांना हिवतापाचा संसर्ग झाला. त्याआधीच्या वर्षापेक्षा ही रुग्णसंख्या सुमारे 50 लाखांनी अधिक आहे. हिवतापाचा प्रतिबंध करण्यात औषधे आणि कीटकनाशकांचा प्रतिरोध, मानवी संकटे, अपुरी साधने, तापमान बदलाचे परिणाम ही मुख्य कारणे आहेत.
तापमानात वाढ झाल्यास डासांचे आयुर्मान वाढते. पाऊस जास्त झाल्यास डासोत्पत्ती ठिकाणे वाढतात. पाऊस कमी झाल्यास पाण्याची टंचाई होऊन अनेक भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवले जाते. अशा भांड्यातूनही डासांची उत्पत्ती वाढते. तसेच, दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरक वाढल्यासही डासांची उत्पत्ती वाढते. यामुळे तापमान बदल हे डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरत आहेत.
तापमान बदलामुळे तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमानात मोठे चढउतार होत आहेत. यामुळे हिवतापाच्या विषाणूचे वाहक असलेले ॲनाफिलस डासांचे जीवनचक्र बदलले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तापमान बदलामुळे बिघडलेल्या ऋतुचक्राचा फटका हिवताप नियंत्रणाला बसत आहे. डासांचा प्रतिबंध करणारी औषधे व इतर साधनसामग्री पोहोचविण्यास नैसर्गिक आपत्तीच्या काळात अडचणी येत आहेत. मच्छरदाणी, औषधे आणि लस यांसारख्या आवश्यक गोष्टीही रुग्णांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने हिवतापाचा धोका आणखी वाढत आहे.
(पाच वर्षांखालील मुलांना लसीकरण करतांना आरोग्यसेविका)
गडचिरोलीमध्येच मलेरियाचे प्रमाण जास्त का?
डॉ. भूषण दिवाकर चौधरी हे गडचिरोलीच्या भामरागडचे तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत. वातावरण बदलाचा आणि मलेरियाच्या डासांचा एकमेकांशी कसा सबंध आहे हे स्पष्ट करताना भूषण सांगतात की, "मलेरिया या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक उपाययोजना करून त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. जसे की, घरा-घरात मच्छरदाणी पुरवणे, पाणी साठलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे, लोकांना ओडोमॉस (डासांपासून बचाव करण्यासाठी शरीरावर लावण्यात येणारी क्रीम) लावण्यास सांगणे, इ. गोष्टी आम्ही करतो. मात्र, या सगळ्या उपाययोजना केल्या तरी पूर्णपणे मलेरिया हा आजार काही आमच्या भागातून जात नाही. याचे कारण आहे बदलते हवामान. तापमान वाढ डासांची प्रजनन शक्ती वाढवते आणि डास नेहमीच त्यांच्या अळ्या पाण्यावर देत असल्याकारणाने पावसाळ्यात तर डासांची संख्या वाढतेच आणि जेव्हा अवकाळी पाऊस येतो तेव्हा ही डासांची नवीन पिढी जन्माला येते. त्यामुळे मलेरिया डेंग्यूचे रुग्ण वाढतात. अवकाळी पावसानंतर जे सौम्य वातावरण तयार होतं त्या वातावरणात डास किमान दोन-तीन किलोमीटर प्रवास करू शकता. हा प्रवास करतांना त्याच्या सानिध्यात येणाऱ्या माणसांना ते चावतात आणि मलेरिया-डेंग्यू च्या रुग्णात वाढ होते डासांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी गावा-गावात आम्ही 'ड्राय-डे' पाळतो. म्हणजे घरामध्ये किंवा घराभवती ज्यामध्ये पाणी भरून (साठवून) ठेवले आहे. ते सर्व रिकामे करायला लावतो. अशामुळे घराच्या आजूबाजूला जी काही डासांनी दिलेली अंडी असतील ती नाहीशी होतील आणि मलेरिया-डेंग्यू पासून पूर्णपणे नाही पण, काहीश्या फरकाने बचाव होईल. "
(सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने झोळीतून रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेले जाते)
सरकारला गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करायचा आहे..
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा देशातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील स्पेशल टास्क फोर्सने सादर केलेल्या गडचिरोली मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत 25 कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 फेब्रुवारी 2025 ला विधानसभेत दिली होती.
स्पेशल टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ अभय बंग यांना विचारले असता, गडचिरोलीतील मलेरियाचे प्रमाण आगामी तीन वर्षात शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले. अर्थात हे एक मोठे आव्हान असून आरोग्य विभागाच्या मदतीनेच हे पार पाडले जाणार असल्याचेही डॉ बंग म्हणाले. प्रामुख्याने येथील 27 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मलेरियाचे प्रमाण जास्त आहे. त्यातही भामरागड आणि धानोर येथे मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. दरवर्षी पावसाळ्यात येथील सुमारे 212 गावांचा संपर्क तुटतो. तसेच येथील 1675 गावांपैकी 766 गावांची लोकसंख्या तीनशेपेक्षा कमी असल्याने आरोग्यसेवा तेथे पोहोचणे हे एक आव्हान असते. अनेक गावांमध्ये कायमस्वरुपी आशा कार्यकर्त्या नाहीत त्यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे.
मरेलियाग्रस्त गावांमध्ये औषधभारित मच्छरदाण्यांचे वाटप करणे, मलेरियांच्या डासांच्या निर्मूलनासाठी नियमित औषध फवारणी, आदिवासींना त्यांच्या भाषेत आरोग्यविषयक माहिती देणे तसेच ताप आल्यास तात्काळ रक्ततपासणी करणे अशा गोष्टींना प्रधान्य देण्यात येईल. तीन वर्षांसाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी व प्रभावी अंमलबजावणी याला महत्त्व द्यावे लागणार आहे असेही डॉ. बंग म्हणाले.
आजारी पडल्यास आदिवासी वर्ग प्रामुख्याने गावातील पुजारी वा वैदुकडे जातो हे लक्षात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मदतीने हे रुग्ण उपचारासाठी आरोग्य विभागाच्या रुग्णालयात येण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही डॉ. बंग म्हणाले. गडचिरोलीची लोकसंख्या 11 लाख 32 हजार एवढी असून 2023 मध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या ही 5866 एवढी होती तर दहा जणांचे मृत्यू झाले. 2024 मध्ये ती वाढून 6698 एवढी झाली तर 13 जणांचे मृत्यू झाले.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशभरातील मलेरियग्रस्त जिल्ह्यांचा अभ्यास करून मलेरिया निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या धोरणानुसार 2017 पासून मलेरियाग्रस्त जिल्ह्यांमध्ये मलेरिया निर्मूलनाला प्राधान्य देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील मलरिया निर्मूलनासाठी डॉ अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांचा विशेष कृती गट स्थापन केला असून गडचिरोली जिल्ह्यातील मलेरियाच्या परिस्थितीचा अभ्यास व विश्लेषण करणे, किटकनाशक फवारणी व औषध भारित मच्छरदाणी वाटप तसेच मनुष्यबळाचे योग्य नियोजन , स्थानिक भाषेमधून आदिवासींशी संवाद साधून त्यांचे सहकार्य मिळवणे, आगीम तीन वर्षात मलेरिया निर्मूलनासाठी कृती आराखडा तयार करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
(घरोघरी जाऊन डेंग्यू-मलेरियाच्या रुग्णांची तपासणी करताना आरोग्य सेविका)
‘’सगळ्यांचे लक्ष फक्त गडचिरोलीच्या खाणींंकडेच…’’
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष प्राजक्ता पेडापल्लीवार यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले, "गडचिरोली जिल्ह्यात बाकीच्या भागांपेक्षा अहेरी भागात मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. याला अहेरीचे भौगोलिक परिस्थिती, लोकांचे राहणीमान अपुऱ्या सोयीसुविधा अशी अनेक कारणं आहेत. मलेरियापासून वाचण्यासाठी काय करायला हवं? मलेरियावर उपाय काय? ह्या गोष्टी अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. सर्वांना गडचिरोलीत असलेल्या खाणीमुळे गडचिरोलीचा विकास करायचा आहे. पण, विकास तर लांबची गोष्ट आहे. आदिवासींना अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध नाहीयेत. सरकारच्या म्हणण्यानुसार लोकसंख्येच्या निकषांमध्ये बसत नसल्याकारणाने आरोग्य केंद्र उभं करता येत नाही. पण, आदिवासी लोक वस्ती करून राहतात. जिथे त्यांना शेती उपलब्ध आहेत तिथे ते राहतात. सरकारने त्यांचे निकष बदलून जिथे लोक राहतात तिथे त्यांना आरोग्य संदर्भातील उपाययोजना करून दिल्या तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये थोड्या-फार प्रमाणात फरक पडू शकेल."
प्राजक्ता पुढे सांगतात, "हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस पडतो, उन्हाचं प्रमाण वाढल्याने तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अहेरी भागात भात शेती केली जात असून त्याच्या पेंढ्या मात्र शेताच्या बाजूलाच पडलेल्या असतात. त्या पेंढ्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि त्याठिकाणी डासांचे प्रमाण वाढते. मलेरिया हा फक्त पावसाळ्यातच होतो हे सर्वात आधी डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे. मलेरिया कधी ही होऊ शकतो याची खबरदारी आपण घेऊन लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे."
गडचिरोली भागातील पर्यावरण अभ्यासक डॉ. कैलास निखाडे म्हणतात की, "पहिला पाऊस जेव्हा पडतो ते वातावरण डासांसाठी पोषक वातावरण असल्याकारणाने डासांचे प्रमाण वाढते. मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण पावसाळ्यात आढळून येतात. असे रुग्ण आढळून आले की, सरकारी दवाखान्यांमार्फत त्यांना तीन दिवसांच्या गोळ्या दिल्या जातात. मृत्यूचे कारण, मलेरिया तर आहेच पण, मलेरिया झाल्यानंतर वेळेवर औषधी उपचार न मिळणे, एक तर मलेरिया झाला हेच लवकर समजत नाही, जेव्हा हिवताप भरून येतो तेव्हा लगेच लोक औषधी-उपचार करत नाहीत, सतत-पाऊस असल्याकारणाने नदी-नाले ओसंडून वाहतात त्यामुळे दवाखान्यापर्यंत रुग्ण पोहोचू शकत नाही, आशा वर्कर्सकडे ही गोळ्या असतात. पण, नदी-नाले ओलांडून त्या ही रुग्णापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे मलेरिया अजून जास्त प्रमाणात वाढतो आणि आटोक्याच्या बाहेर गेल्यावर रुग्णावर उपचार केले तरी ती व्यक्ती मरण पावते. गडचिरोली जिल्ह्यात जंगलामध्ये ज्या पोलिसांची ड्युटी असते. त्यातील ही अनेक जणांना मलेरिया होतो. मात्र, त्यांच्यासाठी लगेच हेलिकॉप्टर येऊन त्यांना उपचारासाठी नेल्या जातं. एकाही सामान्य माणसासाठी आजपर्यंत एकही हेलिकॉप्टर आमच्या भागात आलं नाही."
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी भूषण दिवेकर पुढे सांगतात, "डेंग्यू-मलेरिया संदर्भात गाव पातळीवर काम होणं गरजेचं आहे. सरपंच, तहसील, पोलीस पाटील यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करायला हवी. लोकांना फक्त मच्छरदाणी वाटून चालणार नाही. तर, तिचा उपयोग कसा आणि का करायचा याचं महत्व त्यांनी पटवून द्यायला हवं. समजावून लोकं ऐकत नसतील तर जो मच्छरदाणी वापरणार नाही त्यासाठी 100 रुपये दंड ठोठवायला हवा. जो कोरडा दिवस पाळणार नाही त्याच्याकडून ही दंड आकारायला हवा. गावातल्या मुखियाने पुढाकार घेऊन ही कामं करणं गरजेची आहेत. मलेरियामुक्त गाव करण्यासाठी फक्त सरकारने नाही तर, त्या गावातील प्रत्येकाने पुढाकार घेऊन नियमांचं पालन करून स्वतःची काळजी घ्यायला हवी."
(गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मधील पालकांना रुग्णवाहिकेअभावी त्यांच्या मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किमी पायपीट करावी लागली)
'भाषा, अंधश्रद्धा,अपुऱ्या सोयीसुविधा' ही मुख्य कारणं आहेत...
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात 'होप फॉउंडेशन' आदिवासींच्या आरोग्यावर काम करतं. होप संस्थेचे अध्यक्ष नागेश मादेशी यांच्याशी संवाद साधल्यावर ते सांगतात, "गडचिरोली भागात आजही किमान 40% लोकं भोंदूबाबांवर विश्वास ठेवतात. ताप आल्यावर कोण्या बुवाकडे किंवा कोण्या महाराजांकडे नेणं आदिवासींसाठी काही नवीन नाही. त्या मुळे आजाराचे निदान लागत नाही आणि अनेक जण उपचाराअभावी मरण पावतात. अनेकदा भाषा ही अडचण ठरते. गावातल्या आरोग्य केंद्रात जर बाहेरचे डॉक्टर असतील आणि त्यांना आदिवासी गोंडी माडिया भाषा येत नसेल तर मलेरिया आदिवासींसाठी किती घातक आहे हे त्यांना समजावून सांगता येत नाही. समजावून सांगण्याचं काम गावातील सरपंच किंवा इतर महत्वाचे व्यक्ती ही करत नाहीत.
सदर रिपोर्ट English मध्ये वाचण्यासाठी : Click Here
(101Reporters यांच्या हवामान बदल विषयक रिपोर्टिंग ग्रँट अंतर्गत सदर रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे..)






