‘’दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर एक भलंमोठं वडाचं झाड होतं… लोकं म्हणतात की त्या झाडावर भूतं राहतात आणि जर का एखादी गरोदर महिला त्या झाडाखालून गेली तर तिच्या पोटातल्या मुलाला भूत खाऊन तरी टाकतं किंवा त्याचे हात-पाय तोडून टाकतं...
हळूहळू हे लक्षात आलं की ज्याला लोकं भूत समजतात ते यूरेनियममधून निघणारे किरणोत्सार म्हणजे रेडिएशन आहे. या रेडिएशनमध्ये पहिला बळी जातो तो गरोदर मातेच्या पोटात असलेल्या बाळाचा. या भागात असलेल्या खाणींमुळे हे रेडिएशनचे भूत सबंध परिसरात पसरलं आहे.’’
12 गावांतील 47 टक्के महिला आई होऊ शकणार नाहीत…
ही कहाणी ऐकायला मिळते झारखंडच्या जादूगोडा भागात… याच गावात संजय गोपे नावाच्या एका मुलाची कहाणीही ऐकायला मिळते. आजवर संजय गोपेचं एकही पाऊल कधीच अडखळलं नाहीये… कारण त्याने आजवर एकही पाऊल जमिनीवर टाकलं नाहीये.
18 वर्षांचा हा मुलगा चाकाच्या खुर्चीला खिळलेला आहे. दोन वर्षांचा झाला तरी संजय चालत नव्हता म्हणून काळजीत पडलेल्या त्याच्या आई-वडलांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात आणि आई भाताच्या खाचरात कामाला जाते.
डॉक्टरांनी संजयच्या आई-वडलांना सांगितलं की काळजीचं काहीही कारण नाहीये. त्यामुळे तेही तो चालेल याची वाट पाहत राहिले. पण त्यांच्या लेकाने पहिलं पाऊल काही टाकलं नाही. पहिलंच नाही तर एकही पाऊल संजय टाकू शकला नाही.
झारखंडच्या पूर्बी सिंघभुम जिल्ह्याच्या याच जादुगुडा गावाबद्दल आमदार जयराम कुमार महातो यांनी अलीकडेच विधानसभेत एक धक्कादायक माहिती उघड केली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील 12 गावांमधील ४७ टक्के महिला आई होऊ शकत नाहीत. या महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढत आहे आणि त्यामागील कारण युरेनियम खाणींमधून निघणारे रेडिएशन आहे.

झारखंडच्या जादुगुडा गावाची शोकांतिका
झारखंडच्या पूर्बी सिंघभुम जिल्ह्याच्या जादुगुडा गावात. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या खाणींपासून हे गाव फक्त सहा किलोमीटरवर आहे. यूसीआयएल ही सरकारी कंपनी असून त्यांची पहिली खाण 1967 साली खोदली गेली. जादुगुडापासून सुरू झालेल्या या खाणी भाटिन, नरवापहाड़, बागजाता, बांदुहुरंगा, तुरामडीह आणि मोहुलडीह अशा आसपासच्या भागातही सुरू झाल्या.
खाणींमधून निघणाऱ्या खनिजावर प्रक्रिया करून त्यापासून ‘यलोकेक’ (युरेनियम ऑक्साइडचं मिश्रण) तयार करून आणि हैद्राबादमधील न्यूक्लियर फ्युएल कॉम्प्लेक्स इथे पाठवलं जातं. 1967 पासून नव्वदच्या दशक संपेपर्यंत येथील शेकडो लहान मुलं अपंग जन्माला आल्याचे आढळून आले.
800 लोकसंख्या (जनगणना, 2011) असलेल्या बांगोमध्ये संजयसारख्या अनेक मुलांना जन्मतःच व्यंग आहे किंवा काही दगावली आहेत. या गावातली बहुतेक कुटुंबं संताल, मुंडा, ओराँव, हो, भूमीज आणि खरिया आदिवासी आहेत. 2007 साली शांती आणि विकासासाठी भारतीय वैद्यक (Indian Doctors for Peace and Development) या संस्थेने केलेल्या एका अभ्यासानुसार खाणींच्या जवळ (०-2.5 किमी) राहणाऱ्या मुलांमध्ये जन्मजात व्यंगांमुळे मृत्यू येण्याचं प्रमाण खाणींपासून दूर (30-35 किमी) राहणाऱ्यांपेक्षा 5.86 पट अधिक आहे. गर्भ पडून गेल्याचं प्रमाणही जास्त असल्याचं इथल्या बाया सांगतात.
यूरेनियम खाण आणि रेडिएशन… अनेक मुलं जन्मतःच व्यंग
खाणीतून यूरेनियम जेव्हा काढतात तेव्हा त्याच्यासोबत खुप सारा विषारी मैला देखील निघत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर एक किलोग्राम यूरेनियम जेव्हा निघतं तेव्हा 1750 किलोग्राम रेडियोऐक्टिव कचरा तयार होतो. हा यूरेनियम कचरा जिथे गोळा होतो त्याला टेलिंग पाँड म्हणजे (युरेनियम खनिजावर प्रक्रिया केल्यानंतर जो विषारी मैला मागे राहतो त्याची तळी असे म्हटले जाते. आणि विशेषत: खाणींमध्ये काम करणाऱ्या किंवा प्रक्रिया केंद्रात आणि टेलिंग पाँडजवळ काम करणाऱ्या अनेकांना कॅन्सर आणि टीबीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
ही व्यंगं आणि आजार अधिक किरणोत्सर्जन आणि किरणोत्सारी कचऱ्याशी संबंधित असल्याचं अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ सांगत आले आहेत. खासकरून विषारी पाण्याच्या तळ्यांच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांना हा धोका अधिक असतो कारण काही ना काही कारणाने त्यांचा या पाण्याशी संपर्क येतो. पण, युसीआयएल मात्र आपल्या वेबसाइटवर असा दावा करतं की “हे आजार... किरणोत्साराशी संबंधित नसून कुपोषण, हिवताप आणि गलिच्छ राहणी वगैरेंमुळे होत आहेत.”
रेडिएशनचा महिलांवर होणारा गंभीर परिणाम
52 वर्षांच्या सोना हेंब्रोम यांनी तर आपल्या पायांवर उभं राहण्याची आशाच सोडून दिलीये. सोना ही जादुगोडा येथील अनेक लोकांपैकी एक आहे ज्यांनी भारताच्या अणुऊर्जा आणि अणुऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी स्वप्नांसाठी स्वत: किंमत मोजली आहे. सोनाच्या वैद्यकीय अहवालात उल्लेख केलेला आजार अज्ञात आहे, परंतु कुटुंबाला खात्री आहे की तिची ही स्थिती युरेनियम कचऱ्यातून निघणाऱ्या किरणोत्सर्गामुळे आहे.
सोना हेंब्रोम यांचा मुलगा अर्जुन हेंब्रोम म्हणतो की, आईच्या मेंदूवर रेडिएशनचा परिणाम झाला आहे. त्याची लक्षणे बऱ्याच काळापूर्वीच दिसू लागली होती. सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार ओळखता येत नव्हता. ज्या काही चाचण्या केल्या गेल्या, त्या सर्व सामान्य घोषित करण्यात आल्या.
पण हळूहळू आईच्या हालचाली कमी होऊ लागल्या. त्यांच्या पायातील ताकद कमी होत चालली होती. परंतू युरेनियम कचऱ्यातून निघणारे रेडिएशन हेच या आजाराचे खरे कारण आहे असे पुराव्यानिशी सांगणारी वैद्यकीय प्रणाली अजून विकसित झालेली नाही.’’
ज्यांनी कधी ना कधी USIL कंपनीत काम केले आहे ते देखील रेडिएशनचे बळी ठरले आहेत. या बाबतीत मेघराय मुर्मू यांचेउदाहरण देता येईल. ते 17 वर्षांपासून टेलिंग पाँडवर मेकॅनिक म्हणून काम करत होते.. मात्र गेल्या दोन वर्षांपासून टीबीने ग्रस्त आहे. पैशांअभावी कसा तरी उपचार सुरू आहेत.
ते म्हणतात, USIL द्वारे चालवल्या जादुगोडा रुग्णालयात तपासणीसाठी गेल्यावर एक्स-रे करायला सांगितले. एक्स-रे रिपोर्ट घेतला तेव्हा मला सांगण्यात आले की औषधे संपली आहेत. जादुगोडा येथील चाटीकोचा गावातील सीता टुडू देखील युरेनियम कचऱ्यातून निघणाऱ्या किरणोत्सर्गाची बळी ठरली आहे. सीता टुडू चाटीकोचामध्ये मुलांना शिकवणी देऊन घर चालवते.
सीता टुडू म्हणाली की तिच्या शरीराच्या खालच्या भागात तीव्र वेदना होत आहेत. काही दिवसांपासून माझा एक पायही वाकडा झाला आहे. सीताच्या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की ती लहानपणापासून अशी नव्हती. तिला रेडिएशनचा त्रास झाला आणि आता तिची अवस्था अपंग व्यक्तीसारखी झालीये. या गावातील खाणींमुळे बाधित महिलांना गर्भधारणा आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या येत असल्याची तक्रार आहे.
एका गावकऱ्याने असेही सांगितले की गर्भवती महिलांचा अकाली गर्भपात होण्याचे प्रकार देखील येथे दिसून येतात. एवढेच नाही तर येथील महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होते किंवा विशिष्ट वयाच्या आधी थांबते.
रोजगार हिरावला, नुकसान भरपाई नाही…
जादुगोडाच्या खाणींमधून निघणाऱ्या युरेनियम कचऱ्यामुळे पसरणाऱ्या किरणोत्सर्गामुळे केवळ लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले नाही तर स्थानिक आदिवासींचा रोजगारही हिरावून घेतला आहे. पूर्वी लोक शेती आणि मासेमारी करून उपजीविका करत असत, पण आता हे सर्व कठीण होत चालले आहे. गावकरी म्हणतात की आता त्यांच्या भागात शेती नाही कारण सिंचनासाठी पाणी नाही. तलावाचे आणि नदीचे पाणी घाणेरडे झाले आहे.
एवढेच नाही तर तलावात युरेनियमच्या कचऱ्यामुळे दगडांचा रंगही पांढरा झाला आहे. येथील पाण्यापासून साबणाचा फेसही तयार होऊ शकत नाही. या कारणांमुळे, परिसरातील लोकांना इतर राज्यात स्थलांतर करण्यास भाग पाडले जात आहे. अनेकांनी सांगितले की, चाटीकोचामध्ये पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट आहे. यूएसआयएल कंपनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पाठवते.
पण त्या पाण्याला दुर्गंधी येते. पाणी कापडाने गाळून घ्यावे लागते. अनेकांनी सांगितले की कंपनीने त्यांची जमीन खाणीसाठी घेतली होती. त्या बदल्यात रोजगार आणि भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. लोक तक्रार करतात की त्यांना रोजगार आणि भरपाई मिळाली नाही. एका महिलेने तिचे नाव न सांगता सांगितले की कंपनीने तिच्या कुटुंबाची जमीन घेतली आहे.
कुटुंबातील सर्व सदस्यांना नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु फक्त दोनच जणांना नोकरी देण्यात आली. आजपर्यंत जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. महिलेचे म्हणणे आहे की कंपनीने पुनर्वसनाचे आश्वासनही दिले होते, परंतु तेही पूर्ण झाले नाही. पूर्बी सिंघभुममध्ये युसीआयएलच्या सात खाणी आहेत – जादुगुडा, भातिन, नरवापहार, बागजाता, तुरामडीह, माहुलडीह आणि बांडुहुडांग.
किरणोत्सर्गाच्या जीवघेण्या परिणामांविरोधात इथल्या न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 2004 साली तीन न्यायमूर्तींच्या एका खंडपीठाने आण्विक ऊर्जा आयोगाच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही याचिका रद्द केली. यात आयोगाने म्हटलं होतं की “युरेनियमच्या कचऱ्यातून होणारा किरणोत्सर्ग टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी पुरेशी पावलं उचलण्यात आली आहेत.”
देशाची युरेनियमची गरज भागवली जात असताना इथल्या गावकऱ्यांना किती मोठी किंमत चुकवावी लागत आहे याकडे जादुगुडा आणि आसपासच्या झारखंडी ऑर्गनायझेशन अगेन्स्ट रेडिएशनसारख्या (किरणोत्सारविरोधी झारखंडी संघटना) जन संघटना मात्र सातत्याने लक्ष वेधून घेत आल्या आहेत.
रेडिएशनमुळे होणारे नुकसान
-

रेडिएशनचा गर्भवती महिला आणि मुलांवर सर्वात जास्त परिणाम होतो. गर्भपात, अकाली जन्म किंवा मृत जन्म हे रेडिएशनचे परिणाम असू शकतात. -

यामुळे कर्करोग, ट्यूमर, मोतीबिंदू आणि अनुवांशिक रोग होऊ शकतात. -

पांढऱ्या रक्त पेशींना नुकसान होऊ शकते. याचा आजारांशी लढण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. -

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 50-100 मिलिसिव्हर्ट्सच्या संपर्कात आल्याने मुलांमध्ये कर्करोग होऊ शकतो. -

अमेरिकेच्या रेडिएशन सुरक्षा मानकांनुसार, कोणत्याही रेडिएशन डोसच्या संपर्कात येणे धोकादायक असू शकते. -

जागतिक अणु संघटनेच्या मते, दरवर्षी 100 मिलिसिव्हर्ट रेडिएशनच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका वाढतो.
(संदर्भ - बीबीसी, गांव कनेक्शन)






