राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी अलीकडेच नागपूर दौऱ्यात वणव्याचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले होते. परंतु, भारतीय वनसर्वेक्षणाची समोर आलेली आकडेवारी मात्र महाराष्ट्रात यावर्षी जंगलातील आगींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दर्शवत आहे. राज्यात एक जानेवारी ते सात एप्रिल 2025 या कालावधीत सुमारे एक हजाराहून अधिक आगीच्या घटनांची नोंद झाली. राज्यात यंदा लवकर सुरू झालेला उन्हाळा आणि तापमानात झपाट्याने होणारी वाढ देखील वणव्याच्या वाढत्या घटनांसाठी कारणीभूत मानली जात आहेत.
भारतीय वनसर्वेक्षणाने उपग्रहाच्या माध्यमातून दिलेली आकडेवारी मोठी आहे. 2024 मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या 515 जंगलातील आगींच्या तुलनेत 2025 मध्ये लागलेल्या आगीची संख्या जवळजवळ दुप्पट आहे. ज्यामुळे भारतातील वणव्यांमध्ये महाराष्ट्र मध्यप्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. छत्तीसगड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतातील वणव्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे राज्य
महाराष्ट्रात फेब्रुवारीपर्यंत 97 मोठ्या आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यानंतर म्हणजेच मार्च महिन्यात एक हजाराहून अधिक आगीच्या घटना घडल्या. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात 118 आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली. वणव्याचा सामना करण्यासाठी राज्याच्या वनखात्याने आगप्रवण क्षेत्रांचे निरीक्षण करण्यासाठी जीआयएसवर आधारित पोर्टल सुरू केले आहे. वणव्याचे अंदाज आणि प्रतिबंध घालण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे.
1 जानेवारीपासून राज्यात जंगलातील आगीच्या इशाऱ्यांची संख्या 14 हजार 106 वर पोहोचली आहे. तर देशात 11 हजार 908 घटनांची नोंद झाली. मध्यप्रदेशात 1743, महाराष्ट्रात 1245, तर छत्तीसगडमध्ये 1045 आगीच्या घटनांची नोंद आहे.
जंगलाला लागणारी 99 टक्के आग मानवनिर्मित आहे. अधिकाधिक आणि चांगला तेंदू व मोहफुले मिळावी म्हणून झाडाखाली गावकरी आग लावतात. ही आग पसरून त्याचे वणव्यात रूपांतर होते. उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा कमी होतो व वाळलेल्या गवताचे प्रमाण अधिक असते. यामुळे जंगलात ठिणगी पडली तरी वणवा पेटतो.
संबंधित लेख वाचा: 1) आदिवासींच्या ‘गैरसमजूती’ दूर नाही केल्या तर, जंगलांच्या या आगीत आपण सगळेच खाक होऊन जाऊ…! |
वाढतं तापमान जंगलाच्या आगीसाठी कारणीभूत
फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया (FSI)ने दिलेली माहिती चिंताजनक आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील जवळपास 36 टक्के जंगलांना वारंवार आग लागते. हिवाळा संपल्यानंतर आणि उन्हाळी हंगामात कोरड्या वातावरणामुळे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये आगीच्या मोठ्या घटना नोंदवल्या जातात. गेल्या काही वर्षांत तापमान प्रचंड वेगाने वाढत आहे. महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ते 48-50 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. हे तापमान जंगलाच्या आगीसाठी कारणीभूत ठरत आहे यात वाद नाही. तापमानात होणाऱ्या वाढीबरोबर जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढल्याचे दिसून आले.
उन्हाळ्यातील कोरडे तापमान आणि वेगात वाहणारे वारे यांमुळे जंगलात आगी पसरण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील 11 वर्षांत राज्यात तीन लाख 86 हजार 294.803 हेक्टर जंगल आगीत भस्मसात झाले आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) 2015 नुसार, देशाच्या जवळपास 6 टक्के वनाच्छादित भागात आग लागण्याची शक्यता जास्त आहे, ज्यात महाराष्ट्राचा चंद्रपूर आणि गडचिरोली हा पट्टा येतो. राज्यातील सर्वाधिक वनाच्छादित भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आणि त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात या हंगामात सर्वाधिक वणवे लागत आहेत.
गेल्या 12 वर्षांपासून सोनी पंधारे ताडोबाच्या जंगलात वनपाल म्हणून काम करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 1100 हेक्टर वनक्षेत्र असलेल्या भटाळी बीटचा चार्ज त्या सांभाळतात. जंगलाला आग लागण्याच्या घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागे फक्त वातावरण बदल हेच कारण नसून प्रामुख्याने जंगल परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या अंधश्रद्धा आणि गैरसमज याला अधिक कारणीभूत असल्याचे सोनी पंधारे सांगतात.
आग स्वतःहून कधीच लागत नाही, ती लावली जाते!
“जंगलात आग आपोआप कधीच लागत नाही, ती एकतर लावली जाते नाहीतर कुणाकडून तरी चुकून लागते’’ असे सांगताना सोनी पंधारे मुनुष्याला अधिक जबाबदार धरते. जंगलाला लागलेली आग ही बहुतांशवेळा मानवनिर्मित असल्याचा दावा ती करते. सोनी म्हणते की, जंगलाला लागणारा वणवा हा नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारचा असतो.
कधीकधी जंगलातून जाणाऱ्या विद्युत तारांमध्ये बिघाड झाल्यास ठिणगी पडूनही आग लागू शकते, उंच वाढलेल्या झाडांच्या मोठ्या फांद्यांचे एकमेकांवर घर्षण होऊन ठिणगी उडते आणि त्यातूनही वणवा पेटू शकतो. परंतू असे प्रकार अतिशय तुरळक घडतात असा माझा आजवरचा अनुभव आहे. तपासाअंती जंगलाला लागलेली आग ही शेवटी मानवनिर्मित असल्याचे उघडकीस येते. यामध्ये आदिवासी समाजात असलेल्या अंधश्रद्धाही काही अंशी जबाबदार असल्याचा आरोप सोनी पंधरे करते.
चंद्रपूर जंगल परिसरात राहणाऱ्या स्थानिक आदिवासींच्या काही अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. आदिवासींचं जगणं पूर्णपणे जंगलावर अवलंबून असतं. आदिवासी भागातील अत्याश्यक गरजा या जंगलातून भागवल्या जातात. एकीकडे जंगल वणव्यांचा काळ, मोहाची फुलं वेचण्याचा हंगाम आणि तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम एकाच वेळी येतो आणि म्हणूनच मोह फुल वेचण्याच्या काळात आणि तेंदुपत्ता संकलनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत असतात, असे आमचे आजवरचे निरिक्षण आहे, असल्याचे वनरक्षक पंधरे सांगतात.
अलीकडेच वन हक्क समितीच्या अध्यक्ष आणि सचिवानेच तेंदू पानासाठी जंगलात वणवा लावल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. चांगले गवत आणि तेंदूपाने येण्यासाठी जंगलात आगी लावण्याच्या घटना नेहमीच घडतात. पण, त्यात आजपर्यंत कुणीही सापडले नव्हते. या घटनेत वन हक्क समितीच्या अध्यक्ष आणि सचिवानेच आग लावल्याचे सिद्ध झाले.
मोठ्या आकाराची तेंदूपाने आणि महुआ मिळवण्यासाठी…
“सरसकट सगळ्याच आदिवासी समाजाला यासाठी जबाबदार धरता येणार नाही, मात्र आगी लागण्याच्या काही घटनांचा तपास केला असता असे आढळून आले की, तेंदूपत्ता संकलन हा आदिवासी भागातील सर्वात मोठा रोजगार आहे. दरवर्षी या हंगामादरम्यान मोठ्या आकाराची तेंदूपाने मिळवण्यासाठी जंगलांना विनाकारण आग लावण्यात येते. तेंदूपत्ता ज्या भागात आहे त्या भागातही काही लोकं जंगलातून तेंदूपत्ता उपटतात आणि नवीन पाने उगवण्यासाठी या झाडांनाही आग लावली जाते. ती लहान झाडे पूर्णपणे जळून जातात आणि त्यानंतर त्यातून नवीन कोंब निघतो’’ अशी माहिती सोनी देते.
तेंदूपत्तासारखं आदिवासींच्या उत्पन्नाचं आणखी एक साधन म्हणजे महुआ… आदिवासींचा उदरनिर्वाह याच महुआवर अवलंबून असतो. ‘मोह’ हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष असून ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून, साठवून ठेवली जातात. जेव्हा रोख पैशांची गरज असेल, तेव्हा ती बाजारात विकतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला या मोहाला कोंब फुटतो. त्यानंतर सारी पानं गाळून पडतात.
काही दिवसांतच फांद्यांच्या देठांतून कळ्यांचे झुंबरच्या झुंबर लटकू लागतात. त्यात हळूहळू मोहाची फुले फुलू लागतात. साधारण मार्चचा शेवटचा आठवडा ते मेचा पहिला आठवडा मोहाची फुलं गळत राहतात. म्हणूनच महुआच्या झाडाखालचा परिसर स्वच्छ करण्यासाठी, झाडांखालची जमीन साफ करण्यासाठी आणि महुआला कीटकांपासून वाचवण्यासाठी शेकोटी पेटवतात. त्यामुळे लोकांना महुआची फुलं गोळा करणं सोपं जातं.
आग लावण्याची ‘निन्जा टेक्निक’ आणि वनखात्याची तारांबळ…
आग लावण्याचे इथल्या लोकांचे, दलालांचे आणि व्यापाऱ्यांचे प्रकार इतके विचित्र असतात की आम्हालाच आश्चर्याचा धक्का बसतो, असे हसत हसत सोनी सांगते. ही लोकं काय करतात की, जिथे पालापाचोळा जास्त असतो, तिथे एक पेटती अगरबत्ती रोवतात, अगरबत्तीच्या आजूबाजूला आगपेटीच्या काड्या ठेवतात, त्यावर पालापोचाळा टाकतात आणि पळ काढतात. हळूहळू आगपेट्यांच्या काड्या पेटायला लागतात आणि पालापोचाळा लगेचच आगीत सापडतो. आम्ही गंमतीत त्याला ‘निन्जा टेक्निक’ म्हणतो, सोनी माहिती देत असते.
निव्वळ अंधश्रद्धेमुळेच नव्हे तर लोकांचा हलगर्जीपणामुळेही कधीकधी जंगलाला आग लागते. जंगलात अनेक पायवाटा असतात, अनेक महामार्ग हे जंगलाच्या मधून जातात. प्रवासादरम्यान अनेक जणं रस्त्याच्या कडेला उभे राहून धूम्रपान करतात. आगपेटीची जळलेली काडी, उरलेली सिगारेट रस्त्यावर टाकून देतात. पण उन्हाळ्याच्या दिवसात कोरडा पडलेला पालापाचोळा लगेच आग पकडतो, अशी पुस्ती सोनी जोडते.






