- प्रकाश खांडगे
पद्मश्री शाहीर साबळे, महाराष्ट्राच्या लोककलेचे आधारस्तंभ, यांनी आपल्या शाहिरीतून तीन पिढ्यांचे सांस्कृतिक संचित घडवले. लोकगीते, प्रहसने आणि मुक्तनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील प्रश्नांवर मार्मिक भाष्य केले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या लोककलेला एक वैचारिक अधिष्ठान मिळाले आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. शाहीर साबळे यांनी केवळ कला सादर केली नाही, तर समाजात आत्मभान आणि विवेक जागृत करण्याचे कार्य केले.
‘शाहिराचा पोवाडा म्हणजे लहानापासून थोरापर्यंत, खेड्यापासून शहरापर्यंत, अशिक्षितांपासून विद्वानांपर्यंत शहारे उठविणारा वीजांचा कडकडाट. त्यांनी इतिहास उभा करावा आणि मनोरंजाबरोबरच श्रोत्यांच्या मनाची मशागतही,’ असे म्हणणारे शाहीर होते कृष्णाजी गणपतराव साबळे...ज्यांना रसिकांच्या प्रेमाने 'महाराष्ट्र शाहीर' बनवले. पद्मश्री शाहीर साबळे, ज्यांचे खरे नाव कृष्णा गणपत साबळे होते, यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाईजवळच्या पसरणी या निसर्गरम्य गावात झाला.
पसरणी गावात शाहीर साबळे यांचे स्मारक
रविवारी त्याच पसरणी गावात महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार, अनेक प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि पसरणीचे गावकरी उपस्थित होते, निमित्त होते लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिलेच्या अनावरणाचे. गेल्या काही वर्षांपासून शाहीर साबळेंचे स्मारक त्यांच्या मूळ गावी म्हणजे पसरणी येथे व्हावे अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती आणि राज्य सरकारनेही ही मागणी त्वरित मान्य केली होती. 
लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांचे सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती देशभरात पोहोचवली. त्यांच्या जन्मगावी पसरणी येथे स्मारक उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शाहीर साबळे यांच्या नावाला शोभेल व महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे स्मारक उभे करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात केले. लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिलाचे अनावरण पसरणी (ता. वाई) येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 ला झाला. साबळे कुटुंब मुळचे सातारा जिल्ह्यातील शिवथर या गावचे. त्यांचे वडील गणपतराव हे त्याकाळी रेल्वेमध्ये नोकरीला होते. वॅगनमधलं सामान उतरवण्याच्या कामावर ते होते. पण नंतर गणपतराव भावंडांसहित शिवथर गाव सोडून साताऱ्यामधल्या वाईतल्या पसरणी या गावात स्थायिक झाले. बालपणीच त्यांना जरंडेश्वराच्या यात्रेतील भजन, कीर्तन आणि भारुडांचे संस्कार मिळाले.
संबंधित लेख वाचा: केदार शिंदे म्हणतात, ‘पणजीच्या भूमिकेत पणती’ |
आईच्या जात्यावरच्या ओव्या ऐकून त्यांना लोकगीतांची गोडी लागली. श्रावणात आयाबाया नागपंचमीचे फेर धरताना गात असलेली लोकगीते त्यांनी बारकाईने टिपली. पुढे मामाकडे अमळनेरला गेल्यानंतर त्यांना साने गुरुजींचे मार्गदर्शन लाभले. साने गुरुजींकडूनच त्यांना राष्ट्रभक्तीपर गीते रचण्याची आणि सादर करण्याची प्रेरणा मिळाली. खानदेशचे प्रसिद्ध शाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे यांच्या प्रभावानेही त्यांच्या शाहिरीला नवी दिशा मिळाली.
साने गुरूजी आणि शाहीर साबळे यांचे ऋणानुबंध
गाणं विसरावं म्हणून शाहिरांना त्यांच्या आई-वडिलांनी अमळनेरला पाठवलं होतं. पण तिथे गेल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळणार होती. अमळनेरमधल्या प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरूजी शिक्षक होते. एकदा अमळनेरमध्ये गुरूजींच्या सभेत शाहीर साबळेंनी ‘रमला कुठे गं कान्हा’ हे गाणं गायलं. ते ऐकून साने गुरूजींनी त्यांना एक गाणं रचून दिलं आणि त्याच चालीवर गायला सांगितलं.
एकदा गुरूजींनी एक कार्यक्रम बसवला होता आणि शाहीर साबळेंच्या देशभक्तिपर गाण्यानं त्याची सुरूवात होणार होती. तोपर्यंत आजीच्या कानावर शाहिरांच्या गाण्याच्या गोष्टी गेल्या होत्या. तिने शाहिरांना अक्षरशः घरातच कोंडून घातलं होतं. ‘तंगडं मोडीन गेलास तर,’ अशी धमकीच दिली होती. शाहीर आले नाहीत, तेव्हा स्वतः गुरूजी त्यांच्या मामाच्या घरी गेले. त्यांनी आजीची समजूत घालायला सुरूवात केली. पण आजीने गुरूजींनाही स्पष्टपणे सांगितलं, “अहो, त्याला साळा शिकायला पाठवलंय आईबापानी माझ्याकडं. तुमच्या संगं गाण बजावणं करून साळंचा इस्कोट करण्यासाठी नाही. आल्या पावली परत जा गुरुजी.”
साने गुरूजी आल्या पावली परत गेले. शाहीर तळमळले. अर्थात, शाहीर आणि गुरूजींचे ऋणानुबंध इथेच संपणारे नव्हते. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या वेळी साने गुरूजी आणि शाहिरांची पुन्हा भेट झाली. शाहीर त्यांच्यासोबत चळवळीत सहभागी झाले, महाराष्ट्रभर फिरले.
गांधी माझा सखा गं
ओवी त्यांना गाईन
अन् तुरुंगात जाईन
मी स्वराज्य मिळवीन
ही ओवी शाहीर तेव्हा गायचे. गुरुजींनी दलितांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणुन पंढरपूरला आमरण उपोषण सुरु केलं, तेव्हाही शाहीर साबळे त्यांच्यासोबत होते. त्यांनी महाराष्ट्रभर फिरून गुरुजींचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
शाहीर साबळेंच्या पोवाड्याची पहिली रेकॉर्ड जेव्हा एचएमव्हीने काढली, तेव्हा त्याची पहिला प्रत घेऊन ते साने गुरूजींना भेटायला गेले. ती ऐकण्यासाठी गुरुजी तिथल्या एका गुजराती कुटुंबाकडे गेले, कारण त्यांच्याकडे रेकॉर्डर होता. ती रेकॉर्ड ऐकल्यावर गुरूजींच्या डोळ्यांत पाणी आल्याचं शाहिरांनी सांगितल्याची आठवण वसुंधरा साबळेंनी लिहिली आहे.
लता मंगशेकरांच्या उपस्थितीत पहिला प्रयोग
मुंबईत पोटापाण्यासाठी आलेले शाहीर साबळे कुर्ला येथे राहत होते. तेथील कापड गिरणीत काम करताना त्यांना भजनी भारुडाचा छंद लागला. पश्चिम महाराष्ट्रातून गिरणगावात स्थायिक झालेल्या अनेक मंडळींनी आपल्यासोबत भजन आणि भारुडाची परंपरा आणली होती, ज्याचा प्रभाव शाहीर साबळे यांच्यावर पडला.
पुढे अभ्युदय नगर, काळाचौकी येथे राहू लागल्यावर त्यांची सुहास भालेकर, राजा मयेकर, माया जाधव, शहाजी काळे यांसारख्या कलाकारांशी मैत्री झाली आणि ‘शाहीर साबळे पार्टी’ची स्थापना झाली. १९४४ साली ‘यमराज्यातील एक रात्र’ या त्यांच्या पहिल्या प्रहसनाचा शुभारंभ दादर येथील अमर हिंद मंडळात झाला. या कार्यक्रमाला स्वतः लता मंगेशकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
शाहीर साबळे यांनी तमाशातील मोकळेपणा आणि नाटकातील संहिताप्रधानता यांचा संगम साधून मराठी रंगभूमीवर ‘मुक्तनाट्य’ या नव्या प्रकाराला जन्म दिला. ते खऱ्या अर्थाने मुक्तनाट्याचे जनक ठरले. त्यांनी आपल्या मुक्तनाट्यांमधून समाजातील समकालीन प्रश्नांवर अतिशय मार्मिक आणि बोधप्रद संवाद सादर केले.
‘यमराज्यातील एक रात्र’ या यशस्वी प्रहसनंतर ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोड्याची करामत’, ‘माकडाला चढली भांग’, ‘मीच तो बादशहा’ अशी अनेक प्रहसने त्यांनी सादर केली. या प्रहसनांमधील तत्कालीन प्रश्न आणि त्यावरील मार्मिक भाष्य रसिकांना हसता हसता विचार करायला लावत असे. ‘बापाचा बाप’, ‘कशी काय वाट चुकला’, ‘कोंडू हवालदार’ यांसारखी त्यांची मुक्तनाट्येही खूप गाजली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर यांनी ‘आंधळं दळतंय’ या शाहीर साबळे यांच्या मुक्तनाट्याला शिवसेनेच्या प्रसववेदना म्हटले होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तरी मुंबईवर परप्रांतीयांचाच वरचष्मा असल्याबद्दल शाहीर साबळे यांना नेहमी खंत वाटत असे.
‘आंधळं दळतंय’ या नाटकातून त्यांनी भाजी विकणाऱ्या पाटीवाल्याच्या तोंडून मराठी माणसाची व्यथा आणि उपेक्षा मांडली होती. मराठी माणूस जिन्याखाली राहणार याची खंत ते या नाटकातून व्यक्त करून गेले. साठ ते ऐंशीच्या दशकात, महाराष्ट्रातील क्वचितच असे एखादे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल, जिथे शाहीर साबळे यांचे मुक्तनाट्य किंवा प्रहसन झाले नाही. ही दोन दशके लोकनाट्य आणि मुक्तनाट्याचा सुवर्णकाळ ठरली.
शाहिरी फुलोरा… अनेक दिग्गज शाहीर एकत्र
त्याच काळात शाहीर आत्माराम पाटील यांनी ‘शाहिरी फुलोरा’ ही नवी संकल्पना राबवली. शाहीर साबळे, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर राजाभाऊ खामकर, शाहीर पुंडलिक फरांदे, शाहीर विठ्ठल उमप, शाहीर दादा कोंडके, शाहीर लीलाधर हेगडे यांसारखे दिग्गज कलावंत एकत्र आले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्यानंतर मराठी माणसाची चळवळ या शाहिरांनी आपल्या कलेतून गाजवली. ‘सरकार झाली गवळण, अरे कॉलनीत गोकुळ’ अशा स्वरूपाचे मार्मिक भाष्य त्या काळातील शाहिरांनी केले. शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे; तर श्रमिकांच्या तळहातांवर उभी आहे’ असा पुरोगामी विचार मांडला.
1952 साली शाहीर साबळे यांनी साम्यवादी चळवळीवर भाष्य करणारा ‘आधुनिक मानवाची कहाणी’ हा पोवाडा रचला. हा पोवाडा म्हणजे कार्ल मार्क्सच्या साम्यवादी चळवळीचा महामंत्रच होता. त्यांचे मित्र बाविस्कर, जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत होते, त्यांनी शाहीर साबळे यांना या पोवाड्याच्या लेखनासाठी प्रवृत्त केले. शाहीर साबळे हे बहुआयामी कलावंत होते. ते गीतकार, लोकनाट्याचे लेखक, विनोदवीर, नाट्यदिग्दर्शक, उत्तम गायक, उत्तम छायाचित्रकार आणि ढोलकी वादक अशा अनेक भूमिकांमधून महाराष्ट्राला भेटत राहिले.
‘महाराष्ट्राची लोकधारा’... मोबाईल थिएटरचे जनक
शाहीर साबळे आणि बाळासाहेब ठाकरे यांची घनिष्ठ मैत्री होती. शाहीर साबळे यांच्या मुक्तनाट्ये आणि प्रहसनांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमांचे सुरुवातीचे छायाचित्रकार बाळासाहेब ठाकरेच होते. शाहीर साबळे यांनी मराठी रंगभूमीवर मुक्तनाट्याची नवी देणगी दिली, तसेच ते मोबाइल थिएटरचे जनक ठरले. त्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा अतिशय प्रसिद्ध कार्यक्रम मराठी रंगमंचावर आणला, ज्यातून महाराष्ट्राच्या लोककलेची दौलतच रंगभूमीवर उभी राहिली. शंभू मित्रांनी आयोजित केलेल्या एका महोत्सवात कलकत्ता युथ क्वायरचा कार्यक्रम पाहून शाहीर साबळे विलक्षण प्रभावित झाले आणि त्यातूनच ‘महाराष्ट्राची लोकधारा’ साकारली.
‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमामुळे जागरण-गोंधळासारखी विधिनाट्ये, वासुदेव, कोकेवाला, जोशी, पिंगळा यांसारखी विथीनाट्ये, कृषी संस्कृतीतील भलरी गीते, कोळी बांधवांची गीते व नृत्ये, तमाशातील लावणी-बतावणी, मर्दानी पोवाडे, भजने आणि भारुडे असे लोकप्रकार मुख्य धारेमध्ये आले. शाहीर साबळे यांनी जात्यावरची गीते, लग्नगीते, गोंधळ-जागरणासारखी विधी-गीते, कोळीगीते, पठ्ठे बापूराव, प्रभाकर आदी शाहिरांचे गण-पोवाडे यांसारखी लोकसाहित्यिक सामग्री संकलित केली आणि ती ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातून जनतेमध्ये लोकप्रिय केली.
पोवाडे केवळ सांप्रदायिक अथवा राष्ट्रीय असतात या संकल्पनेला छेद देत त्यांनी सामाजिक विषयांवरचे पोवाडे देखील रचले आणि सादर केले. त्यांनी लोकसंस्कृतीला केवळ गाण्याचे माध्यम बनवले नाही, तर तिला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. इतकेच नव्हे तर केवळ राज्याच्या पातळीवर नव्हे, तर देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची-लोककलांची वेगळी ओळख निर्माण करून दिली. शाहीर साबळे यांची बांधिलकी केवळ रसिकांशी होती, ते कोणाचेही स्तुतिपाठक झाले नाहीत. त्यामुळेच ते स्वतंत्र अस्मितेचे शाहीर म्हणून ओळखले जाऊ लागले.
शाहीर साबळे यांचे त्यांच्या पसरणी या जन्मगावाशी शेवटच्या श्वासापर्यंत अतूट नाते होते. पसरणीच्या परिसरातच त्यांनी वृद्ध कलावंतांसाठी ‘तपस्या आश्रम’ उभा केला होता. शाहीर अमर शेख यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शाहीर मधुकर नेराळे, रमेश कदम, आत्माराम पाटील आणि शाहीर साबळे यांनी ‘शाहीर अमरशेख पुरस्कार’ सुरू केला. त्यांनी आपल्या जन्मगावी पहिला हरिजन मंदिर प्रवेश घडवून आणला. परंपरा जपतानाच त्यांनी काळाबरोबर चालण्याचे भानही दाखवले.
परंपरेचे गुणगान गाताना त्यांनी वेळप्रसंगी परंपरा तोडल्याही. त्यांनी आयुष्यभर आपल्या शाहिरी कलेत विवेकाचे अवधान राखले. आपल्या कार्यक्रमांतून अंधश्रद्धा वाढीस लागणार नाहीत, याची त्यांनी कायम काळजी घेतली. त्यामुळेच शाहीर साबळे हे खऱ्या अर्थाने समाजाला दिशा दाखवणारे, समाजात आत्मभान-विवेकभान निर्माण करणारे महाराष्ट्रशाहीर होते. त्यांनी शाहिराची जागल्याची भूमिका शेवटपर्यंत निभावली.






