- शंतनू खुजे
भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच जिंकलेला विश्वचषक हा केवळ एक विजय नाही, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एका जुन्या आणि संकुचित विचारसरणीवर मारलेली एक जोरदार 'चपराक' आहे. रविवारी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून इतिहासात पहिल्यांदाच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला आणि एक नवा इतिहास रचला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने केवळ ट्रॉफीच जिंकली नाही, तर महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि त्याला 'व्यवसायाच्या' तराजूत तोलणाऱ्या प्रत्येक टीकाकाराला आपल्या कामगिरीने उत्तर दिले आहे.
‘’माझ्याकडे अधिकार असते तर मी महिला क्रिकेट कधीच बंद केलं असतं’’
ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर इंग्लंड यांच्या विरुद्धचा सामना गमावल्यानंतर भारतीय महिला संघाला टीकेला सामोरं जावं लागलं. समाजमाध्यम अचानक महिलाद्वेषाचे मैदान बनले. हे ट्रोलिंग फलंदाजी, गोलंदाजी किंवा स्ट्राईक रेट बद्दल नव्हतं तर महिलांच नेमकं काय काम आहे याबद्दल होतं. स्वयंपाकघरातील विनोद परत आले. "महिलांनी कधीही क्रिकेट खेळू नये" असे म्हणणाऱ्या पुरुषांच्या जुन्या चित्रफिती आनंदाने रिट्विट केल्या गेल्या. याच काळात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी महिलांच्या क्रिकेट संदर्भात केलेलं जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं.
(श्रीनिवासन)
श्रीनिवासन म्हणाले होते की, "माझ्याकडे सर्व अधिकार असते तर मी महिला क्रिकेट ही संकल्पनाच कधी सुरू केली नसती. महिला क्रिकेटमध्ये अजिबात व्यवसाय नाही, आम्ही हे फक्त आयसीसीच्या नियमांमुळे करतोय". श्रीनिवास यांच्या या वक्तव्याचा खुलासा भारताच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांनी केला होता.
10 वर्षानंतर एडुलजी यांच्याकडून खुलासा…
2017 मध्ये एक्सप्रेस वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखती दरम्यान डायना एडुलजी यांनी सांगितले की, जेव्हा एन. श्रीनिवासन 2007 मध्ये बीसीसीआयचे खजिनदार बनले, तेव्हा त्यांनी श्रीनिवासन यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली होती आणि त्याच भेटीत महिला क्रिकेटबद्दल चर्चा करत असताना श्रीनिवासन यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, "माझे जर चालले असते, तर मी महिला क्रिकेट कधीच बंद केले असते." महिला संघ 2005 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना हरल्यानंतर श्रीनिवासन यांनी हे वक्तव्य केलं होतं.एडुलजी, ज्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आणि नंतर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या होत्या, त्यांनी अनेक वर्षांनंतर या मुलाखतीमध्ये हा किस्सा सार्वजनिक केला होता.
संबंधित लेख वाचा: धर्मांतराच्या आरोपावरून वडिलांची झाली होती बदनामी, अखेर लेकीने फक्त बापाचीच नाही तर, भारताचीही मान उंचावली! |
याच मुलाखतीत त्या पुढे म्हणाल्या की "2006 मध्ये महिला क्रिकेट बीसीसीआयमध्ये आल्यापासून मी नेहमीच बीसीसीआयचा विरोध करत आली आहे. बीसीसीआय ही एक पुरुषप्रधान संघटना आहे. त्यांना कधीही महिलांनी अटी घालू नयेत किंवा या गोष्टीत सहभागी व्हावे असे वाटत नव्हते. मी माझ्या खेळण्याच्या दिवसांपासून, मी सुरुवात केल्यापासून खूप बोलके होते, आताही, मी असे म्हणेन की महिला क्रिकेट चांगले खेळत आहे हे बीसीसीआयमध्ये अद्यापही स्वीकारलेले नाही. महिलांचा हा संघ चांगली कामगिरी करत आहे आहे हे स्वीकारणे बीसीसीआयच्या काही सदस्यांसाठी खूप कठीण आहे," असे एडुलजी म्हणाल्या होत्या.
पुरुषांच्या बाबतीत कधी असं लिंग आधारित ट्रोलिंग होत नाही...
महिला क्रिकेट संघ जरा अपयशी ठरला की लगेच, स्वयंपाक घरातील विनोद परत येतात. परंतु पुरुष संघाच्या बाबतीत असं कधी घडल्याचं आठवत नाही. पुरुष क्रिकेटर्स बद्दलचे ट्रोलिंग हे स्ट्राईक रेट, सरासरी आणि इकॉनॉमी याबद्दलच असतं. पुरुष क्रिकेट संघ कधीकाळी चांगली कामगिरी करण्यात जर अपयशी ठरला तर "तुम्ही क्रिकेट सोडून शेतात कामाला जा" असं म्हणताना कुणीच दिसत नाही. लिंग आधारित हे ट्रोलिंग महिलांचेच बाबतीत जास्त घडत आलंय.
(डायना एडुलजी)
महिला संघ एखादा सामना हरला की इंटरनेटवरचे वाचाळवीर लगेच "तुम्ही क्रिकेट खेळणं सोडून द्या आणि फक्त रिल्स बनवा" अशी टिप्पणी करायला मागे पुढे पाहत नाही. एकंदर पुरुष क्रिकेट संघातले काही खेळाडू देखील अशाच पद्धतीने समाज माध्यमांवर रील्स बनवत असतात पण या पद्धतीचे ट्रोलिंग त्यांच्या बाबतीत कधीच दिसून येत नाही. रिल्स बनवण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगचा सामना जेमिमा आणि राधा यादव यांसारख्या महिला खेळाडूंनी अनेकदा केला आहे.
कर्णधार हरमनप्रीतला सुरुवातीला झाला सामाजिक विरोध...
2005 मध्ये, जेव्हा भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला विश्वचषक अंतिम सामना खेळला तेव्हा हरमनप्रीत देखील पदार्पणाचे स्वप्न बघत होती. अखेर तिने 2009 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताकडून पदार्पण केले. काल ती भारताला महिलांचा विश्वचषक जिंकून देणारी पहिली भारतीय कर्णधार ठरली असली तरी सुरुवातीच्या काळात तिला देखील समाजाकडून विरोध पत्करावा लागला.
हरमनप्रीतचे वडील हरमंदर सांगतात की, समाजाकडून आणि काही नातेवाईकांकडून आम्हाला विरोध झाला होता ज्यांना मुलीने क्रिकेट खेळण्याची कल्पना पटत नव्हती.पण आम्ही पुरोगामी विचारसरणीने हरमनला पुढे नेले. बीसीसीआयने महिला क्रिकेटची जबाबदारी घेतल्यानंतर, परिस्थिती सुधारू लागली. तिला या खेळाची आवड होती आणि आता जेव्हा जेव्हा तिच्या मतदार कामगिरी करते तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून येते,"
(हरमनप्रीत कौर)
क्रिकेट खेळण्यासाठी मुलांसारखे केस कापणारी शेफाली वर्मा
शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात आलेल्या शेफाली वर्माने तिच्या कर्तृत्वाने विश्वचषकाच्या फायनलमध्ये तिची छाप सोडली. नुसतीच छापच नव्हे, तर फायनलमध्ये ती 'प्लेयर ऑफ द मॅच' ठरली. लहानपणी केस कापून मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यापासून सुरुवात करणाऱ्या शेफालीच्या जगातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये समावेश होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा आहे.
शेफालीचे वडील संजीव हे रोहतकमध्ये दागिने तयार करण्याचे काम करायचे. अगदी लहानपणापासून त्यांनी शेफालीला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यावेळी स्थानिक क्लबमध्ये मुलींना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला नकार दिला जात होता. त्यामुळं वयाच्या सहाव्या वर्षी शेफालीच्या वडिलांनी मुलासारखी दिसावी म्हणून शेफालीचे केस कापले. त्यानंतर तिला मुलांच्या स्पर्धांमध्ये खेळवायला सुरुवात केली. त्यावेळी ती मुलगी आहे हे कुणाच्याही लक्षातही येत नव्हतं.
(शेफाली वर्मा)
आता मात्र मानसिकता बदलेल...
हे विधान केवळ श्रीनिवासन यांचे व्यक्तिगत मत नव्हते, तर अनेक वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये रुजलेली ती एक पुरुषप्रधान व संकुचित मानसिकता होती, जी महिलांच्या खेळाला दुय्यम समजत होती. महिलांच्या खेळाकडे केवळ एक औपचारिकता म्हणून पाहिले जात होते आणि महिला क्रिकेटमध्ये व्यावसायिक फायदा नसल्याचही अनेकांचं मत होतं. महिला संघाने काल मिळवलेला विजय हा श्रीनिवासन आणि त्यांच्यासारखी मानसिकता असलेल्या अनेकांना दिलेलं उत्तर आहे. या विजयासह भारतीय महिला संघाने क्रिकेटमध्ये जणू नवा अध्यायच लिहिला आहे. या विजयामुळे महिला क्रिकेटला लिंगाच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांची मानसिकता मात्र नक्कीच बदलेल.
डायना एडुल्जी संघाच्या कर्णधार असतांना अत्यंत संघर्षमय परिस्थितीत त्यांनी महिला क्रिकेट टिकवले. त्यांच्या प्रयत्नांना अनेकदा दुर्लक्षित केले गेले. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, आज हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मासारख्या खेळाडूंनी मैदानावर मिळवलेला हा ऐतिहासिक विजय हा जुन्या विचारधारेला दिलेले सडेतोड उत्तर आहे.






