- संजना खंडारे
प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचं एक वाक्य फार ‘फेमस’ आहे. ते म्हणतात,
“कीर्तनाने कधी समाज सुधारला नाही आणि तमाशाने तो कधी बिघडला नाही..’’
परंतू गेल्या दोन दिवसांत एका साध्या लावणी नृत्यावरून राज्यभरात जो काही गहजब उडाला ते पाहून आपल्या राजकारण्यांनी रामदास फुटाणे यांचं हे वाक्य कायम लक्षात ठेवावं अशी म्हण्याची वेळ आली आहे. लावणी नृत्याऐवजी कथ्थक किंवा भरत-नाट्यम नृत्य केलं असतं तर इतका ‘राडा’ झाला असता का…? एकीकडे महाराष्ट्राच्या लोककलांचे जतन-संवर्धन व्हावं, लावणी नृत्याला जगभरात ओळख मिळावी म्हणून मंत्रालयात बैठका आयोजित केल्या जातात, प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या कर्तव्य पथावरच्या परेड मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथात आवर्जून लावणीचा समावेश करण्यात येत असताना याच लावणी नृत्यावर राज्याच्या राजकराण्यांनी इतका ‘तमाशा’ करावा याबद्दल अनेक लोककलावंतांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
‘वाजले की बारा’ वरून अजित पवारांना विरोधकांनी घेरले
तर मूळ घटना अशी आहे की, दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या नागपुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात एका महिलेने "वाजले की बारा', या लावणीवर ठुमके लावत तुफान नृत्य केले आणि त्याचा व्हिडीओही तुफान व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर व ग्रामीणतर्फे "दिवाळी मिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पडे पदाधिकारी उपस्थित होते. हा दिवाळी मिलन कार्यक्रम एनसीपी अजित पवार गटाच्या नागपुरातील मुख्य कार्यालयाच्या मुख्य हॉलमध्ये पार पडला. याठिकाणी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल समेत मोठ्या नेत्यांची छायाचित्रे सुद्धा आहेत.
लावणी सादर करणाऱ्या महिलेचे नाव शिल्पा शाहीर असे आहे. त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत याठिकाणी गेल्या होता. दिवाळी मिलन आणि सत्कार कार्यक्रम आहे, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना लावणी येते म्हणत लावणी करायला लावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या शहर कार्यालयात लावणी सादर करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्या शिल्पा शाहीर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित लेख वाचा: लावणी नर्तिका पूजा गायकवाडमुळे, ‘’हम बदनाम होते है…’’ |
ही घटना घडली आणि विरोधकांची राळ उडाली. सरकारी कार्यालयात ‘लावणी’ सादर झाली म्हणजे “संस्कृतीचा अपमान” झाल्याचा आरोप नेत्यांनी केला. पण प्रश्न असा आहे उगाचच लावणीवर बोभाटा करायची खरंच गरज होती का? कारण लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. लावणी ही केवळ नृत्यकला नाही, ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा एक जिवंत, लोकांच्या जीवनाशी घट्ट जोडलेला वारसा आहे.
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित तर होतातच सोबतच महाराष्ट्राच्या लोककलेचा अपमान देखील होतो. लावणी ऐवजी जर शास्त्रीय नृत्यप्रकार त्या ठिकाणी सादर करण्यात आला असता तर त्यावर कोणी आक्षेप घेतला असता का? ज्या राजकारण्यांनी लावणीला राजाश्रय दिला, त्याच राजकीय पक्षांच्या कार्यालयात कोणीतरी लावणी सादर केली तर काय बिघडलं? लावणी कला प्रकाराकडे आणि लावणी कलावंतांकडे नेहमीच तुच्छतेने का बघितलं जातं? या सगळ्या प्रकारामुळे पिढ्याने पिढ्या जी लोक या कला प्रकाराला जपत आली त्यांना नेमकं काय वाटतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा ‘बाईमाणूस’ने प्रयत्न केला. 
"लावणीचा अपमान हा समाजाच्या आजारपणाचं लक्षण आहे” - डॉ. मिलिंद कसबे
लावणी या लोककलेला अश्लीलतेच्या चष्म्यामधून बघितलं जातं, याला काय कारणं असावीत यावर लोककलेचे अभ्यासक डॉ. मिलिंद कसबे यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संपर्क साधल्यावर ते म्हणाले, "लावणी ही केवळ नृत्यकला नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक जिवंत भाग आहे. एकेकाळी लावणीला राजाश्रय मिळाला होता, परंतु समाजाने तिला कलात्मक दृष्टीने कधीच स्वीकारलं नाही. आज लावणी सादर करणाऱ्या हिलांकडे प्रतिष्ठेने पाहिलं जात नाही, तर त्यांना “मनोरंजनाचे साधन” म्हणून पाहिलं जातं. यामागे सामंती आणि वर्चस्ववादी मानसिकता आहे, जिथे खालच्या समाजघटकांनी जोपासलेल्या कलांना तुच्छ मानलं गेलं. कथ्थक किंवा भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यांना सन्मान मिळतो, पण लावणीला नाही, कारण तिचं मूळ लोकजीवनात आहे.
डॉ. कसबे पुढे म्हणाले की, राजकीय पक्षांनीही लावणीला साधन म्हणून वापरलं, परंतु तिचं कलात्मक मूल्य ओळखलं नाही. बघायला गेलं तर हा दोष फक्त बघणाऱ्याचा नाही तर सादर करणाऱ्यांचादेखील आहे. लावणी सादर करणारे, तमाशा सादर करणारे सगळे कलावंत हे 18 पगड जातीतले तथाकथित खालच्या जातीचे लोक आहेत.
या सर्व लोकांनी या कलेचा उपयोग प्रबोधन करण्यासाठी करायला हवा होता, पण याउलट त्यांनी तसं न करता स्वतःचं पोट भरण्यासाठी धार्मिक कर्मकांडाच्या आहारी जाऊन त्यांनी या कला विकसित करण्याचा मार्ग निवडला. त्यानंतर राजकीय पक्षांनी या कलाकारांकडे नेहमीच भोगवादी नजरेने बघितलं. असं असल्यामुळे या कला प्रकारातली ‘कला’ त्यांना कधीच दिसली नाही. 
काल-परवाचा व्हिडिओ व्हायरल झाला या घटनेबद्दल बोलायचं झालं तर एखाद्या इव्हेंट मध्ये एखाद्याने डान्स केला तर यामध्ये काय वावगं आहे? म्हणजे अंबानींच्या फॅमिलीमध्ये लग्न समारंभ होतात, त्यातले डान्सचे व्हिडिओ लोक आवडीने बघतात. तसंच हा व्हिडिओ बघूनही सोडून द्यायला हवं होतं. त्याचा एवढा मोठा बोभाटा करायची काहीही गरज नव्हती. पण असं न होता जे झालं त्याच्यावरून समजून येतं की समाजाची मानसिकता ही बिघडलेली आणि आजारी आहे.
फक्त समाजाची मानसिकताच नाही तर महाराष्ट्राची सगळीच कला संस्कृती आजारी आहे. याला वेगवेगळे विकार झालेले आहेत. हे विकार धर्माचे, जातीचे, वर्चस्वाचे, श्रीमंतीचे आहेत. हे सगळे विकार नाहीसे करण्यासाठी महाराष्ट्राला सांस्कृतिक प्रबोधनाची गरज आहे," असेही डॉ. कसबे यांनी सांगितले.
"लावणीने समाज घडवला; आज तिलाच वादग्रस्त ठरवलं जातंय...” - डॉ. गणेश चंदनशिवे
याच पार्श्वभूमीवर मुंबई लोककला अकादमीचे संचालक आणि ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे ‘बाईमाणूस’ शी बोलताना म्हणाले, "लोककला ह्या सगळ्या बहुजनांच्या आहेत. त्यांनीच याचं जतन आणि संवर्धन केलंय. लावणी असेल, भारूड असेल, पोवाडा असेल, दशावतार असेल खडीगंमत असेल हे सगळे लोककलाप्रकार बहुजन समाजाने लोकांचं उद्बोधन- प्रबोधन करण्यासाठी केलेले आहे. लावणीचं अलीकडंच आत्ताचं जे स्वरूप आलंय ते बघता त्यावर विरोधी पक्षनेते चिखलफेक करतीलच. परंतु या लावणीने समाजाचं उद्बोधन- प्रबोधन केलं, लोकांना लोकशिक्षण दिलं. अलीकडच्या काळात काही समाजकंटक, राजकीय नेते किंवा जी आंबटशौकीन लोकं आहेत त्यांनी अनेक संगीतबारी कार्यक्रमात जाऊन गोळीबार केले, बंदुकीच्या धाकावर अश्लील नृत्य करायला भाग पाडले आणि त्यामुळे लावणी भ्रष्ट होत गेली. लोकांना विसर पडला का की, लावणी यमुनाबाई वाईकरांनी जगवली, लावणी मधुबाई कांबिकरांनी जगवली.
लावणी लक्ष्मीबाई कोल्हापूरकरांनी जगवली, लावणीमुळेच राष्ट्रपती पुरस्कार शंकुतला नगरकर यांना मिळाला.. पद्मश्री पुरस्कार यमुनाबाई वाईकरांना मिळाला… आज रेश्मा मुसळे, राजश्री नगरकर, प्रमिला लोदगेकर या नृत्यांगनांना भारत सरकारच्या संगीत राष्ट्रीय अकादमीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवलेलं आहे. म्हणजे एकीकडे भारत सरकार या कलाप्रकाराचा सन्मान करत आहे आणि दुसरीकडे याच्यावर राजकारण होत आहे. अश्या गोष्टीमुळे लावणीच्या समृद्ध परंपरेला डाग लागतो. परंतु लावणीचं रूप अलीकडच्या काळात जे दाखवण्यात आलेलं आहे ते जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. त्यामुळे जे काही सुरू आहे ते चुकीच्या दिशेने चाललं आहे. लावणी या कलाप्रकाराकडे संस्कृतीच्या माध्यमातून बघावं असं माझ्यासारख्या अभ्यासकाला वाटतं."
(डॉ. गणेश चंदनशिवे)
डॉ. गणेश चंदनशिवे पुढे म्हणतात, "एकीकडे महाराष्ट्रातील परंपरा जतन आणि संवर्धनसाठी तुम्ही पुढे येत आहात आणि दुसरीकडे लावणीसारख्या कलाप्रकाराला तुम्ही भ्रष्ट म्हणत आहात. नागपूर मधील कार्यलयातील जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात त्या बाईने सिनेमातील गाण्यावर लावणी करण्यापेक्षा पारंपरिक गाण्यावरील लावणी केली असती तर टीका-टिपण्णी चा प्रकार झाला नसता. बघायला गेलं तर लावणी ही कधीच धांगडधिंगा करणारी नव्हती. ती आध्यत्मिक होती, भेदिक होती, कलगीतुऱ्याची, हौद्याची होती, चौकाची होती. या लावणी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या ज्या मोठमोठ्या कलाकार आहेत त्या गुलाबबाई संगमनेरकर, आशाबाई मुसळे, मधु कांबीकर, या कलावंतानी लावणी एका उंचीवर नेऊन ठेवली होती, मात्र आज लावणी त्या उंचीवर नाहीये. यामध्ये दोन्ही बाजूकडून चूक होत आहे, प्रेक्षक म्हणून तुम्ही कोणत्या बाजूने त्या कलाप्रकाराकडे बघता, तो बघण्याचा चष्मा प्रेक्षकांनी बदलला पाहिजे.
"पारंपरिक लावणीचा बाज मरता कामा नये" – लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडे
अलीकडच्या काळामध्ये लावणीच्या नावाने जो नृत्य प्रकार चालू आहे, त्याबद्दल नाराजी व्यक्त करताना लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे ‘बाईमाणूस’शी बोलताना म्हणाल्या, "मला आठवतं मी 7 वर्षांची होते तेव्हापासून पायात चाळ बांधले. आज माझं वय 74 आहे. आजही मी तमाशामध्ये लावणी गाते आणि सादर करते. माझी आई विठाबाई नारायणगावकर हिचे संपूर्ण जीवन तमाशात गेले. माझ्या लहानपणापासून मी ते बघितलं आहे. लावणी हा कलाप्रकार तमाशाच्या पोटीच जन्माला आला आहे. हा कलाप्रकार किती समृद्ध आहे हे आजपर्यंत बघत आले.
याचा इतिहास, याची उंची जपण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या काही वर्षात काहीजणी लावणीच्या नावाखाली जे अंगप्रदर्शन करत आहेत त्यामुळे या कलाप्रकाराला नावं ठेवली जात आहेत. याचा परिणाम आमच्या तमाशावर होत आहे. लावणी म्हणजे अंगभर नववारी, हातभरून चोळी, आणि प्रेक्षकांशी थेट संवाद. आमच्या या अश्या प्रकारात कुठेच अश्लीलता झळकली नाही आणि आजही आम्ही ते होऊ देत नाही. आता गेल्या काही वर्षात प्रेक्षकसुद्धा डीजे वर ज्या मुली लावणीच्या नावाखाली नाचतात तिथे जाऊन गर्दी करतात. पारंपरिक बाजातील लावणी कोणाला नको आहे. प्रेक्षक वर्ग नसल्याकारणाने आजकाल तमाशाचे फड कमी होत आहेत. आता कोणाला बोलावं आणि कोण ऐकणार आणि कोण सुधारणार असाच प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो.. एवढंच वाटतं की पारंपरिक लावणीचा कलाप्रकार मरता कामा नये.”
(लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे)
"राजकारणाने लावणीचा बाजार केला..कलाकार आज घरात बसले.." - मेघा घाडगे
लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे देखील नेहमीच पारंपारिक लावणी कला जपली पाहिजे यावर बोलत असतात. ‘बाईमाणूस’शी बोलताना त्या म्हणतात की, " लावणीला जी काही नावं ठेवली जात आहेत, याचं मूळ बघायचं असेल तर गेल्या तीन-चार वर्षात महाराष्ट्रात काय सुरू आहे हे बघावं लागेल. अनेक राजकीय पक्षांनी जे काही कार्यक्रम ठेवले, त्या कार्यक्रमात नृत्यांगना बोलावल्या गेल्या आणि कशाही पद्धतीने डान्स करणाऱ्यांना लावणीचं नाव देण्यात आलं. त्यावेळेस कोणीही आवाज उठवला नाही. जेव्हा आम्ही या विरुद्ध आवाज उठवला तेव्हा तुम्ही यांना कशाला बोलतायं, तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्ही सुद्धा असं नाचा, अशापद्धतीने आम्हाला टोमणे मारण्यात आले. तेव्हाच जर या सगळ्या गोष्टींना आळा घातला गेला असता तर आज कोणाचीही ताकीद झाली नसती लावणी वाईट आहे असं म्हणण्याची.
पारंपारिक लावणी जर बघितली आणि लावणीचा बाज जर बघितला तर ती कधीच नाव ठेवण्यासारखी नाहीये. आपल्या इकडचे राजकीय पक्ष म्हणतात, हा महाराष्ट्र पुरोगामी चा महाराष्ट्र आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपतो, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आणि हीच लोकं यांच्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात मुलींना अश्लील नृत्य करण्यासाठी पैसे देतात. मुळात त्या मुलींनी कसं नाचावं याच्यावर आक्षेपच नाहीये. त्यांना हवा तो उपजीविकेचा मार्ग त्यांनी अवलंबवावा. पण त्यामुळे नेहमी लावणीला का टार्गेट करावं? अशा सगळ्या प्रकारांमुळे भलेभले कलावंत आज घरी बसलेले आहेत. ज्यांनी एकेकाळी रंगमंच गाजवलेला होता. पण बोटावर मोजणाऱ्या मुलींनी महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय.
(लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे)
शास्त्रीय नृत्यांना जसा मान आहे त्या मानाने लावणी तर किती मोठी आहे. लावणीला कुठलंच बंधन नाहीये. लावणी प्रेक्षकांशी संवाद साधते, तिचं म्हणणं मांडते, तिला कोणत्या गोष्टीची गरज लागत नाही, लावणी ही नृत्यात माहीर आहे, दिसण्यात माहीर आहे, तिच्या पेहेरावात माहीर आहे, नखशिखांत आहे. शास्त्रीय नृत्य करणाऱ्या महिलांचा पेहरावामध्ये कधी अंग प्रदर्शन आलं का? तर नाही. कारण त्या त्यांचा कला प्रकाराला पुजतात जपतात.
लावणीला अशाप्रकारे का पूजलं जात नाही.. लावणीचा ही एक पेहराव आहे ती नऊवारी मध्येच केली जाते मग ती स्कर्ट घालून या मुलीने अंग प्रदर्शन करत का करावी? आज लावणी बघायला प्रेक्षक येत नाही याची लाज आपल्याला वाटायला हवी. या अशा गोष्टी का होतात यावर विचार करून याच्यावर मार्ग काढण्याची गरज आहे." असे मेघा घाडगे म्हणतात.






