मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पांअतर्गत (जायका) सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरु असताना मातीचा ढिगारा चार कामगारांच्या अंगावर पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी नांदेड सिटीच्या शेजारी घडली. यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर दोन कामगारांना वाचवण्यात आले आहे. कनीराम प्रजापती असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. चेतनलाल प्रजापती, खुर्शीद अली हे दोघे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामात दुर्घटना झाल्याने कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहरातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नदीत प्रक्रिया न करता थेट सांडपाणी जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या मदतीने जपानच्या ‘जायका’ वित्त संस्थेकडून अनुदान घेतले आहे. 2022 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरु झाले असून आत्तापर्यंत सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम शहराच्या विविध भागात सुरु आहे.
नांदेड सिटीलगत सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी ठेकेदाराने खोदकाम केले होते. तेथे चार कामगार काम करत असताना मातीचा मोठा ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला. हे कामगार अडकल्याने त्यांच्या बचावासाठी धावपळ सुरु झाली. पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरु केले. माती बाजूला काढून कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. अग्निशामक दलाने चौघांना बाहेर काढले आहे. त्यातील तिघांची प्रकृती स्थिर आहे पण एका कामगाराचा मृत्यू झाल्याच समोर आले आहे.
‘’धडधड आवाज आला अन् आम्ही मातीच्या ढिगार्याखाली गाडलो गेलो’’
‘’नेहमीप्रमाणे आम्ही काम करीत होतो. सायंकाळ होती, त्यामुळे घरी जायचे मनात होते आणि इतक्यात धडधड आवाज आला अन् काही समजायच्या आतच आम्ही मातीच्या ढिगार्याखाली गाडलो गेलो...' ही आपबिती नांदेड सिटीसमोर मोठ्या खड्ड्यात उतरून सांडपाणी वाहिनीचे काम करताना मातीचा ढिगारा कोसळून गाडला गेलेला चेतनलाल प्रजापती हा तरुण सांगत होता. त्याला त्याच्या इतर कर्मचार्यांनी वरच्यावर असल्याने बाहेर काढले आणि नांदेड सिटी येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले.
प्रजापती म्हणाला, 'जमिनीखाली गाडलो गेल्यानंतर डोळ्यांसमोर फक्त अंधार होता आणि श्वास गुदमरत होता. सर्वत्र शांतता पसरली होती आणि भीतीने हृदय बंद पडते की काय, अशी भीती वाटत होती. पण, काही वेळातच मला माझ्या सहकारी कर्मचार्यांनी बाहेर काढले आणि माझ्या जिवात जीव आला. मात्र माझे सहकारी कनिराम आणि खुर्शीद अली त्यावे ळी जमिनीखालीच होते. मला बाहेर काढल्यानंतर तत्काळ दवाखान्यात पाठविण्यात आले. खूप त्रास होत आहे. खुर्शीद अली यांनाही बाहेर काढल्याचे समजले. मात्र, कनिराम गेल्याचे समजल्यानंतर खूप दुःख वाटत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून आर्थिक मदत मिळाल्यानंतर या कामामध्ये कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी कंपनीतर्फे नेमलेल्या ठेकेदाराकडून हे काम सुरु होते. कामगारांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेण्यात आली नव्हती का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात या प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुरक्षेबाबत निष्काळजीपणा दिसून येतो. त्याच प्रमाणे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, मलनिःसारण विभागातील अधिकाऱ्यांनाही या घटनेची माहिती उशिरा देण्यात आली होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहे.
अंधार अन् चिखलात काम करताना कसरत
ढिगार्याखाली कर्मचारी गाडले जाण्याची घटना जंगलात नदीशेजारी घडली. त्यामुळे या भागात प्रचंड चिखल होता अन् त्यातच रात्र झाल्यामुळे प्रचंड अंधारही पडला. अशा अंधारात महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथक आणि पीएमआरडीए अग्निशमन दल हेलोजन लावून काम करीत होते. संपूर्ण अंधारात आणि चिखलात काम करताना त्यांना मोठी कसरत करावी लागली. असे असले तरी त्यांनी प्रयत्न करून बचाव कार्य उशिरापर्यंत सुरू ठेवले आणि ढिगार्याखाली अडकलेल्या कनिराम यांना बाहेर काढण्यात यश आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, महापालिकेच्या जायका प्रकल्पाच्या नदी सुधार योजनेअतंर्गत पाईपलाईनचे खोदकाम सुरू होते. हे नांदेड सिटी रस्त्यालगत सुरू होते. सात ते आठ फुटापर्यंत माती काढण्यात येत आली होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार काम करत आहेत. दरम्यान, मातीचा ढिगारा काढून बाजूला टाकण्यात येत होता तेथे खाली मजूर काम करत होते.’
महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, 'जायका प्रकल्पांतर्गत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरु होते. कामगारांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्यानंतर तिघांना सुरक्षीत बाहेर काढले आहे. एकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जायका प्रकल्पात सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाते, पण तरीही ही दुर्घटना का घडली याचा अहवाल मागविण्यात आला आहे.'
आणखी किती कामगारांचा बळी जाणार?
नितीन पवार (अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती ) म्हणाले, 'किती कामगारांचा बळी घेतल्यानंतर याची जबाबदारी असलेल्या विभागाला जाग येणार. कामगारांच्या जीवाला काही किंमत राहिली नाही. कामगारदिनानिमित्त कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार पुतळ्याजवळ एक उपोषण केलं. आणि या प्रश्नांकडे लक्ष वेधलं.त्यावेळी आम्ही मागणी केली होती कि संबंधित पोलीस स्टेशनचा पीएसआय (PSI), संबंधित विभागाचा कामगार अधिकारी आणि संबंधित विभागाचा परवाना देणाऱ्या यंत्रणेचा जुनिअर इंजिनिअर या तिघांची समिती नेमावी.
त्यांच्या परिसरात असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती राहणार नाही. याबद्दलची देखरेख करण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवावी. जिथे काम चालू आहे. तिथे काढलेल जे मटेरिअल असेल तर लगेच तिथून दुसरीकडे टाकल पाहिजे.प्रशासनाचे बेफिकीर आणि दुर्लक्षाचे माफ न करता येणारे जे मृत्यू आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.'
अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने कामगारदिनानिमित्त कामगार पुतळ्याजवळ एक उपोषण केलं.त्यावेळी काही मागण्या केल्या होत्या.
- कामगारांच्या कामाच्या, राहण्याच्या ठिकाणी वाहतूक करताना योग्य व्यवस्था करावी
- कामगारांचा अपघातात मृत्यू झाल्यास आणि त्यांचा मालक निश्चित नसल्यास मालकांचे उत्तरदायित्व राज्य शासनाने पार पाडून कामगार अपघात नुकसान भरपाई कायद्यानुसार कामगारांच्या वारसांना, जायबंदी कामगारांनासुद्धा भरपाई द्यावी .
- प्रशासनाने बेफिकीर आणि दुर्लक्षांना माफ न करता येणारे जे मृत्यू आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.'






