- संजना खंडारे
मेळघाट हा अमरावती जिल्ह्यातील एक निसर्गसंपन्न, पण सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या वंचित असा आदिवासी भाग. मेळघाटची ओळख प्रामुख्याने तिथल्या कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, गरिबी आणि स्थलांतराच्या बातम्यांपुरती मर्यादित आहे. परंतु या भागात घडणाऱ्या अघोरी अंधश्रद्धात्मक प्रथा आजही थरकाप उडवणाऱ्या आहेत. त्यात प्रमुख म्हणजे लहानग्यांच्या पोटावर दिला जाणारा "डंबा"... म्हणजे गरम खुरप्याचे किंवा विळ्याचे चटके.
मेळघाट हादरला! दहा दिवसाच्या बाळाला दिले गरम लोखंडाचे चटके
नुकतीच एक मन सुन्न करणारी घटना मेळघाटातील दहेंद्री गावातून समोर आली आहे. एका दहा दिवसांच्या चिमुकल्याला पोटफुगी झाली होती. वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी त्याच्या पोटावर गरम विळ्याचे तब्बल 39 चटके देण्यात आले. ‘डंबा’ दिल्याने पोटफुगी कमी होते, ही अंधश्रद्धा तिथल्या लोकांच्या मनात आजही खोलवर रुजलेली आहे.
या प्रकरणात एका वृद्ध महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे, पण अशी ही एकच घटना नाहीये. अशा अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. जिथे 8 महिन्याच्या किंवा 26 दिवसांच्या बाळांनाही डागण्या देण्यात आल्या होत्या. कोरकू आदिवासी समाजात अजूनही आजाराचे शास्त्रीय स्पष्टीकरण स्वीकारण्याऐवजी ती लोक भुतबाधा आणि करणी सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.
त्यामुळे डॉक्टर ऐवजी मांत्रिकाचा सल्ला महत्त्वाचा मानला जातो. हे मांत्रिक आजारी व्यक्तीवर मंतरलेलं पाणी पाजतात, गरम खुरपं वापरतात आणि डॉक्टरकडे नेल्यास रुग्ण मरतो, अशी भीती दाखवतात. आजही या विश्वासावर अनेक माता-पित्यांनी आपल्या निरागस मुलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले आहेत.
|
|
‘डंबा देणे’ हा नेमका काय अघोरी प्रकार आहे?
“डंबा” देणे ही प्रथा पारंपरिक लोक-उपचारांचा एक भाग आहे, असं भासवण्यात आलं आहे. पण त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. गरम धातूच्या वस्तूने शरीरावर चटके देऊन आजार बरा होतो, हे अजूनही या भागात ठामपणे मानलं जातं. डागण्या देणं म्हणजे पोटातल्या आजाराला 'बाहेर' काढणं, अशी त्यांची अंधश्रद्धा आहे.
डिसेंबर 2024 मध्ये चिखलदरा तालुक्यातील रेटाखेड्या गावातकरणी-जादुटोणा करते म्हणून गावकर्यांनी एका सत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेला अमानुषपणे मारहाण केली.
पहाटे आजी शौचालयास गेल्या असताना एका माणसाने त्या आजींना पकडले व ती जादूटोणा करते असे म्हणून तिला एका खांबाला बांधून ठेवले, तिला मिरचीची धुरी दिली, तिच्या तोंडाला काळं फासलं, तिच्या तोंडामध्ये कुत्र्याची विष्टा घातली, तसेच तिच्या हातापायावर तापलेल्या लोखंडी सळईचे चटके देण्यात आले. त्यानंतर तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची गावातून धिंड काढण्यात आली. या सर्व कृतीमध्ये सर्व गाव सामील होते.
आणखी एक घटना अवघ्या 26 दिवसांच्या बाळाबाबत घडली. हातरु तालुक्यातील सिमोरी गावच्या बाळाची तब्येत बिघडली. त्याला श्वास घेता येत नव्हता. आदिवासी भागात मूल आजारी पडले की डंबा देण्याची पद्धत आहे. म्हणून त्याच्या नातेवाईकांनी त्या छोट्या बाळाच्या पोटावरती दराती (छोटसं लोखंडी खुरपे) गरम करून 67 डंबा (चटके, डांगण्या) दिले. यानंतर बाळाची प्रकृती बिघडली.
कुटुंबियांनी बाळाला हातरुच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. पण बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणि पुढे अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नेले. एका 22 दिवसाच्या बाळासाठी पोटावरील 67 डागण्या आणि हा वेगवेगळ्या ठिकाणाचा प्रवास किती जीवघेणा ठरला असेल याची नुसती कल्पना देखील आपण करु शकत नाही. सरतेशेवटी बाळाच्या हृदयात छिद्र असल्याने बाळाला श्वास घेता येत नव्हता हे उघड झालं.
…अन् ‘अंनिस’च्या मोहिमेला सुरवात झाली..
अलिकडच्या काळातल्या या दोन घटनांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. त्यांनी या प्रथेविरोधात जनजागरण मोहीम राबवण्याचे ठरवले.
17 मार्च 2025 पासून मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. 'अंनिस'च्या वार्तापत्रात या यात्रेदरम्यानचा अनुभव कथन करताना कार्यकर्त्या नंदिनी जाधव सांगतात, "मी डंबा आणि जादूटोण्याच्या प्रकाराबाबतच्या मेळघाटामध्ये घडलेल्या दोन केसेसबद्दल उपस्थित अंगणवाडी सेविकांशी चर्चा केली.
महिलांना त्यांच्या गावांमध्ये कोणकोणत्या प्रथा चालतात याबाबतची माहिती विचारली. तेव्हा त्यांनी जादूटोणा, भानामती, भूत लागणे या प्रथा गावांमध्ये किती सर्रास आहेत याचे अनुभव सांगितले. तसेच गावातल्या लोकांचा आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही, डॉक्टर, दवाखाना याला पैसा लागतो, त्यांची जवळची सोय नसली तर लोक भगताकडे जातात.लहान मुलांच्या लशीकरणाबाबत प्रचंड उदासीनता आहे असे त्या सांगत होत्या. त्यांचा डॉक्टरांवर विश्वास नसतो. त्यामुळं मूल आजारी पडल्यावर त्याला डॉक्टरांकडे आणले जात नाही. मात्र त्याला भगताकडे नेले जाते. भगताची जडीबुटी, डागण्या देणे यावर विश्वास ठेवतात.
काही वेळा भगत अमुक प्रकारचे जेवण घातले नाही तर तमुक होईल, देव कोपतो अशा प्रकारची भीती घालून लुबाडणूक करतात. डंबा हा प्रकार प्रत्येक गावामध्ये कसा दिला जातो याबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मी जादूटोणाविरोधी कायद्याच्या संदर्भात माहिती दिली.कार्यक्रमांमध्ये जादूटोणा विरोधी कायदा, बालविवाह या संदर्भात माहिती सांगितली.सर्व गावातल्या साधारण 127 महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या.”
“बीमार होने के बाद पेट फूल गया तो, पेट मे दर्द होने के बाद डंबा दिया जाता है”
नंदिनी जाधव पुढे सांगतात, "जवळच असलेल्या आमदरी, खटकली या दोन गावामधील शाळेमध्ये कार्यक्रम घेण्याचे ठरवले परंतु मुले मोहाची फुले गोळा करण्यासाठी जात असल्यामुळे शाळेत मुलांची संख्या कमी होती. त्यामुळे खटकली गावातील शाळेच्या मुलांना आमदरीच्या शाळेत आणण्यात आले. अंगणवाडीच्या मुलांपासून ते पाचवी पर्यंतची मुले होती.
शाळेमध्ये प्रथम भगवान रणदिवे, श्रीकृष्ण धोटे या दोघांनी चमत्काराचे प्रयोग दाखवले. त्यानंतर मी मुलांशी संवाद साधला. खरेच चमत्कार घडतात का? भूत आहे का? चमत्कार कसे घडले जातात या बाबत विश्लेषण केले आणि महत्वाच्या मुद्याला हात घातला. इथे मी एकटी बोलणार नव्हते तर मला मुलांना बोलते करायचे होते. त्यानुसार मी त्यांना प्रश्न विचारत गेले. हिंदी मुलांना व्यवस्थित समजत असल्यामुळे हिंदीमध्ये त्यांना प्रश्न विचारायला सुरवाती केली. पहिला प्रश्न,
“बीमार हो तो कहा जाते हो?”
“भूमका के पास”
“भूमका क्या करता है?”
“भगोती देता है, दाणा फेक के देखता है, कौनसी बीमारी है”
“भूमका पढा-लिखा होता है? या डॉक्टर?”
“डॉक्टर…….”
“तो हमे कहाँ जाना चाहिए?”
“डॉक्टर के पास…”
असे प्रश्न विचारून झाल्यानंतर मुलांना एक चित्र दाखवले व त्यावर मुलांना प्रश्न विचारले असता मुलांनी त्या चित्राचे वर्णन केले. त्या चित्रांमध्ये एक भूमका म्हणजे मांत्रिक एका छोट्या मुलाला तापलेल्या सळईने पोटावरती डंबा (डागण्या) देत होता. चित्र दाखवून त्याबाबत प्रश्न विचारले असता मुलांनी याला डंबा म्हणतात असे सांगितले. मग परत मी प्रश्न विचारत गेले कारण मुलांकडून सर्व माहिती जाणून घेणे महत्वाचे होते.
“डंबा क्यू दिया जाता है?”
“बीमार होने के बाद पेट फूल गया तो, पेट मे दर्द होने के बाद डंबा दिया जाता है”
“डंबा किससे दिया जाता है?”
“दराती ….. ( छोटे खुरपे)”
“कहा दिया जाता है?”
“पेट पे…”
“दराती से डंबा कैसे दिया जाता है?”
“दराती चुली मे गरम करके”
“डंबा किसको दिया है?”
मुले हाथ वर करून मुझे यहा दिया है!(कोणी कोणी शर्ट वर करून दाखवत होते)
“डंबा कौन देता है?”
“माय(आजी), दाजाजी, भूमका”
“डंबा देते वक्त दर्द होता है?”
“हां….” केविलवाणे चेहरे करून बहुतेक मुले उत्तरे देत होती.
डंबा प्रथेविरुद्ध 21 दिवसांत 72 गावांमध्ये जनजागृती....
नंदिनी जाधव म्हणतात, “आमचा हा असा खडतर दिनक्रम तब्बल 21 दिवस चालला. 17 मार्च 2025 रोजी मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आणि त्याचा समारोप 7 एप्रिल 2025 रोजी झाला. खरेतर हा पहिला टप्पा पंधरा दिवसाचा होता. पण तो आम्हीच 21 दिवसांपर्यंत वाढविला. चिखलदरा तालुक्यातल्या 72 गावांत ही मोहीम पोचली. प्रत्येक गावातील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आणि प्रत्यक्ष गावकरी या सर्वांसाठी हे कार्यक्रम आम्ही घेतले.
प्रत्येक गावात दोन/तीन/चार ढाणे असल्यामुळे गावातील प्रत्येक ढाण्यामध्ये कार्यक्रम घेण्यात आले. या एकवीस दिवसांत आम्ही तिघांनी मिळून 72 गावात चमत्कार प्रात्यक्षिके व जनसंवादाचे एकूण 140 कार्यक्रम केले. दर दिवसाला सहा ते सात चमत्काराची प्रात्याक्षिके, चर्चा, माहितीची देवाणघेवाण, प्रश्नोत्तरे असे 140 प्रयोग केले.”
(संदर्भ - अंनिस वार्तापत्र)






